रविवार, १३ एप्रिल, २०१४

शिक्षकांनी अधिकाराचा वापर केला नाही

       राजदंड ही काय कल्पना आहे याकडे आजपर्यंत गांभीर्याने न पाहिल्यामुळेच आपल्या राज्यात हे अराजक माजले आहे. जेव्हा एखाद्या राजाला राज्याभिषेक होई तेव्हा त्याच्या मस्तकावर राज्याभिषेक झाला की तो घोषणा करीत असे. अहं दंडयामी. मी शासक आहे. मी शास्ता आहे. सर्वांनी नियमाप्रमाणे वागले पाहिजे. जो कोणी राजधर्माव्यतिरीक्त नियमबाह्य वर्तन करेल त्याला दंड देण्याचा अधिकार मला या अभिषेकाने प्राप्त झाला आहे, असे तो ओरडून सांगत असे. याचवेळी दुसरा प्रश्‍न उपस्थित व्हायचा. तो म्हणजे जर राजाच चुकला तर? राजाला शासन करण्याचे काम कोणाकडे?  कोदंड यामी. कोदंडयामी? त्यावेळी हा राजदंड उपयोगाला यायचा. हा राजदंड हातात असतो तो कुलगुरूंच्या. गुरूपुढे सर्वच जण झुकतात. त्याप्रमाणे राजालाही या गुरूपुढे झुकावे लागायचे. हा राजदंड या कुलगुरूंच्या हातात असत, ते या राजदंडाचा धाक दाखवून राजाला योग्य मार्गावर आणत. आज या राजदंडाचा वापर होत नाही म्हणून अराजक माजले आहे. आज नावाचे राजेंद्र आहेत पण सगळीकडे अराजक माजलेले दिसून येते आहे. शिक्षण, संस्कृती या शब्दांचा अर्थ व्यभिचारी असा होउ लागला आहे. राजदंडाची भिती वाटत नसल्यामुळे आज जनलोकपाल नावाच्या जनतेच्या दंडाची आवश्यकता निर्माण झाली आहे. आज काँग्रेसचा सगळा भ्रष्टाचार यामुळेच सुरू आहे. आपल्या हातात हा राजदंड आहे याची जाणिव गुरूंना नाही म्हणून ही वाताहत होताना दिसत आहे. आम्ही लोकशाही स्वीकारली, राजेशाही सोडली म्हणजे नक्की काय? जे राज्य एकटा राजा चालवायचा ती त्याची श्रमविभागणी केली. त्याच्या जबाबदार्‍यांची विभागणी करून ती विविध मंत्रिगणांवर सोपवली. पण शासक हे, राज्यकर्ते हे माणसंच आहेत ना? या माणसांच्या हातून झालेल्या चुकांना राजदंड दाखवण्याचे काम कोणी करायचे? गुरु, कुलगुरू यांचे राजव्यवस्थेत स्थान काय? या सर्व कुलगुरूंचे प्रतिनिधीत्व राज्यपालांकडे जाते. राज्यपाल या राजदंडाचा वापर करतात का? या राजदंडाला गंज चढत असल्यामुळेच अराजक माजले आहे. आज मुंंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षाचालकांची समस्या निर्माण झाली आहे. सर्वसामान्य माणसांना त्रास देण्याचे काम रिक्षाचालक करतात. रिक्षाचालकांची प्रवृत्ती गुन्हेगारी स्वरूपाची झालेली दिसून येते. पण त्यावर अंकुश ठेवण्याचे काम आम्ही करू शकत नाही कारण आमच्या मदतीला पोलिस येउ शकत नाहीत. पोलिसांना त्यांनी हप्त्यांनी बांधुन ठेवलेले आहे. पोलिसांचा दंडा रिक्षाचालकांना धाक दाखवू शकत नाही. पोलिसांवर गृहखात्याचा महसुलीचा दबाव आहे. त्यामुळे सगळीकडे अराजक माजलेले दिसून येते. जेव्हा जेव्हा या देशात राजदंडाने राजाला मार्गावर आणले आहे तेव्हा तेव्हा रामायण घडले आहे. जेव्हा राजदंड गंजलेला आहे तेव्हा तेव्हा महाभारत घडलेले दिसून येते. तमाम जनतेच्या रक्षणासाठी विश्‍वामित्रांनी एक यज्ञ आरंभला होता. तेव्हा विश्‍वामित्रांनी या यज्ञरक्षणासाठी तुझा ज्येष्ठ पुत्र राम माझ्यासोबत पाठव अशी विनंती अयोध्येचा राजा दशरथाला केली होती. पण पुत्रमोहाने त्याचे मन धाकधुक करू लागले. रामाऐवजी मीच रक्षणासाठी येतो, पण रामाची मागणी करू नका असे दशरथाने सांगितले. इथे पुत्रप्रेम, मोह, स्वार्थ आला. राजाला तसे वागून चालणार नाही. त्यावेळी राजाची ही चूक दुरूस्त करण्यासाठी कुलगुरू वसिष्ठांनी राजदंड वापरला. हे राजा, तुझे कर्तव्य संपूर्ण प्रजेचे रक्षण करणे आहे. स्वत:च्या पुत्राच्या रक्षणासाठी तू स्वत: यज्ञरक्षणासाठी जाईन म्हणतोस यात शौर्य काहीच नाही. तू चुकतो आहेस. समस्त प्रजाजन हे राजाचे पुत्र असतात. तू एका पुत्राचे रक्षण करण्यासाठी धडपडतो आहेस हा अधर्म आहे. राजधर्माला सोडून ते वागणे नाही. विश्‍वामित्र दुबळे आहेत म्हणून तुझ्याकडे मदतीची याचना करीत नाहीत. तुला त्यांच्याबरोबर रामालाच पाठवावे लागेल. असे राजदंड दाखवून वसिष्ठांनी सांगितले तेव्हा दशरथ ताळ्यावर आला. पुढचे सगळे व्यवस्थित झाले आणि राम घडला.  राजदंडाचा वापर कुलगुरूंनी  केला नाही तर महाभारत घडते. भर सभेत द्रौपदीला पणाला लावली जाते, तीला वस्त्रहीन करण्यासाठी तीच्या उत्तरीयाला हात घातला जातो. हा एवढा अधर्म घडत असतानाही कृपाचार्य कुलगुरू बघत बसतात. मनात आणलं असतं तर हा अनर्थ ते थांबवू शकले असते. इथंही पुत्रप्रेमाने आंधळा झालेल्या धृतराष्ट्राला राजदंड न दाखवल्यामुळे संपूर्ण कुरूवंशाचा नाश झाला. हा राजदंड वापरण्याचे सामर्थ्य असूनही तो वापरला जात नाही हेच दुर्दैव आहे. आज राज्यकर्ते नको ते वागत आहेत. अशा परिस्थितीत कुलगुरू, गुरू, शिक्षकवर्ग सुस्त होऊन गप्प बसला आहे, ही धुंदी या देशात फार वाईट आहे. कारण आज चांगले संस्कार करण्यासाठी शिक्षकवर्गच अस्तित्वात नाही. सगळे कागदोपत्री शिक्षक आहेत. जे फक्त कागदोपत्री पगार घेतात ते कोणावर संस्कार करणार? कोणावर अंकुश ठेवणार? आज महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी अतिशय वाईट निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे. हे निर्णय चुकीचे आहेत हे माहित असुनही शिक्षकांनी त्या निर्णयाला विरोध का केला नाही? आजचा शिक्षक हा शिक्षक किंवा गुरू न राहता तो नोकर, गुलाम झाला आहे. पगारासाठी पोटार्थी झाला आहे. त्याला स्वत:च्या हक्काबाबत जेवढी जाणिव आहे तेवढी समाजाप्रती नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्या हातात राजदंड असुनही धुंद अवस्थेमुळे त्यांनी त्याचा वापर केला नाही, त्यामुळे भावी पिढीचे आयुष्य महाराष्ट्राच्या  शिक्षणमंत्र्याने जुगाराला लावले तरी हे लोक बघत बसले. या जुगारात फक्त शिक्षणसम्राट, संस्थाचालक आणि खोट्या बनावट  पटसंख्या दाखवणार्‍या संस्था आणि शिक्षणमंत्री, शिक्षणखात्याचा लाभ झाला. शिक्षक मतदारसंघातून शिक्षकांचे प्रतिनिधी आमदार विधानपरिषदेत पाठवले प्रतिनिधी केवळ शिक्षकांच्या मागण्या मांडताना दिसतात. शिक्षणाबाबत कोणताही बदल सुचवत नाहीत, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. स्वार्थी राजकारण्यांची साथ देण्यासाठी शिक्षक विधानपरिषदेत गेल्यामुळेच, राजदंडाचा वापर झाला नाही. त्यामुळे बाळासाहेब थोरातांसारख्या विचित्र मंत्र्यानें परिक्षा न घेता मुले पुढे ढकलण्याचा फंडा काढून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य जुगारावर लावले आहे.  पत्रकार म्हणवणार्‍या राजेंद्र दर्डा यांनी त्यांचाच कित्ता गिरवला. स्वत:चे डोके चालवावे असे अजिबात वाटले नाही. या अत्यंत चुकीच्या निर्णयाला शिक्षकांनी विरोध केला नाही, यातच ते शिक्षक नाहीत तर केवळ पोटार्थी आहेत, नोकरदार आहेत, काही काम मिळाले नाही म्हणून शिक्षकाची नोकरी करायला आलेले आहेत हे दिसून येते. दुसरी नोकरी मिळाली असती तर ती केली असती. पैशासाठी कोणताही धंदा करू अशा वृत्तीचे शिक्षक या राज्यात पेरले गेले त्यामुळे राजकारणी लोकांचे फावत गेले. ज्यांच्या हातात राजदंड होता त्यांनी त्याचा वापर न करता मशगुल राज्यकर्त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात धन्यता मांडणारे शिक्षक या भावी संकटाला जबाबदार आहेत असेच म्हणावे लागेल. अशा शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी आदर करावा अशी अपेक्षा बाळगणेही चुकीचे आहे. आम्हाला अशैक्षणिक कामे नकोत, आम्हाला जनगणनेची कामे नकोत, निवडणुकीची कामे नकोत असे ओरडून सांगणार्‍या शिक्षकांनी  शिक्षणमंत्र्यांना का नाही ठणकावून सांगितले की तुम्ही हे चुकीचे करीत आहात. जगात कुठेही अशी पद्धत नाही. परिक्षा न घेता मुलांना पुढे ढकलणे, त्यांची परिक्षा नाममात्र घेणे, परीक्षापद्धती बंद करणे हे अत्यंत चुकीचे आहे, असे सांगावेसे एकाही शिक्षकाला का वाटले नाही? एकाही शिक्षक संघटनेने  याला विरोध का केला नाही? सहाव्या वेतन आयोगासाठी झगडणार्‍या शिक्षकांनी महाराष्ट्र सरकारने लादलेली ही नवी शिक्षणपद्धती चुकीची आहे हे सांगण्यासाठी मोर्चा काढला असता तर खचितच शिक्षकांबद्दल आदर वाढला असता. आता तुम्ही आम्हाला शिकवणार नाही आणि तुम्ही आम्हाला नापासही करणार नाही हा संदेश या मूर्ख सरकारच्या धोरणामुळे गेला आहे. त्याला विरोध केला नाही म्हणून अजून पाच वर्षांनी जेव्हा आपलीच मुलं याच जाळ्यात फसलेली या शिक्षकांना दिसतील तेेव्हा हे शिक्षक जाग्यावर येतील. (शिक्षणातील दुरावस्थेचा हा लढा मी अनेकवर्ष देतो आहे. त्याविरोधात लिहीतो आहे. ऑक्टोबर 2011)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: