शुक्रवार, ११ एप्रिल, २०१४

साधू विरूद्ध संधीसाधू

साधू विरूद्ध संधीसाधू


लोकशाहीची फार मोठी विटंबना या देशात होताना दिसते आहे. आम्ही आमच्या आंदोलनाच्या मार्गाने सरकारला नमवू शकतो असा अभिमान बाळगणार्‍या नेत्यांनाही सरकारपुढे झुकावे लागते तेव्हा नक्की काय प्रकार चालला आहे असे वाटते. लोकपाल विधेयकाच्या मसुदा समितीच्या बैठकीचे चित्रीकरण करावे ही मागणी अण्णा हजारेंनी उचलून धरली. त्या मागणीला सरकारने विरोध केला. त्यामुळे अण्णा हजारेंनी बैठकीवर बहिष्कार टाकला. सरकारचे प्रतिनिधी आणि जनतेचे सामाजिक प्रतिनिधी अशा एकत्रित बैठकीचे स्वरूप असताना यातील समाजाचे प्रतिनिधी म्हणवणार्‍या नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. त्याबरोबर सरकारने अण्णांच्या नाड्या आवळल्या. बैठकीवर बहिष्कार तुम्ही टाकता आहात. त्या बैठकीचा निर्णय घेण्यास आम्ही समर्थ आहोत. ही बैठक होणारच त्यामुळे तुम्ही बहिष्कार टाकल्यावर तुम्हाला वगळून निर्णय घेणे भाग पडेल असे धमकावताच अण्णांच्या टीमने शरणागती पत्करली.  त्यामुळे सरकारवर विश्‍वास ठेवणे शक्य नाही आणि अण्णांच्या विचित्र हट्टामुळे त्यांच्याकडून काही निर्णय होईल अशी अपेक्षा करता येत नाही. या कचाट्यात सामान्य माणूस पडला आहे. आज भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या देशात, भ्रष्टाचाराने देश गिळंकृत करायला निघालेल्या या काँग्रेस सरकारला उलथून लावण्याची जनतेची इच्छा आहे. पण जनतेला पर्याय सापडत नाही ही परिस्थिती आहे. पंधरा वर्षांपुर्वी काँग्रेसची अशीच अवस्था झाली होती. बिगर गांधी काँग्रेस अस्तित्वात होती तेव्हा काँग्रेस संपण्याच्या अवस्थेत होती. तेव्हा नेतृत्व करण्यास एकही पुरूष या काँग्रेसला मिळाला नाही म्हणून परदेशातून नेतृत्व आयात करावे लागले. त्यांची परकीय भ्रष्ट संस्कृती इतकी विकोपाला गेली की संपूर्ण देश बरबटून गेला आहे. या काँग्रेसच्या भ्रष्ट व्यवस्थेला सामान्य माणूस विटली आहे. पण आज सामान्य माणूस चाचपडतो आहे. चाचपणीही करतो आहे. त्यामुळेच अण्णांच्या उपोषणाला दोन महिन्यांपुर्वी चांगला प्रतिसाद मिळाला होता. रामदेव बाबांनाही जनतेने चाचपून पाहिले आहे. अण्णा, बाबा असे एकीकडे साधू असताना काँग्रेस संधीसाधूपणाचा लाभ उठवते आहे. अण्णांनी बहिष्कार टाकल्यावर आपल्याला पाहिजे तसा मसुदा आम्ही तयार करू असे धमकावून अण्णांना या सरकारने पुरते चेपवून टाकले. त्यामुळे शरणागती पत्करत आम्ही बैठकीला उपस्थित राहतो. कसलीही आमची मागणी मान्य केली नाही तरी चालेल असे म्हणत चित्रीकरणाची मागणी   मागे घेत सर्व सामाजिक सदस्यांनी बैठकीला जाण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे या बैठकीत नक्की काय होणार याचे आकलन केव्हाच झाले आहे. काँग्रेसची समिती या सगळ्या साधूंना गुंडाळून आपल्याला पाहिजे तसाच मसुदा तयार करून घेणार हे निश्‍चित आहे. ज्या समितीत कपिल सिब्बल सारखे विचित्र नेते आहेत ते या मसुद्यातून काँग्रेसचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी हा मसुदा तयार होणार काय असा प्रश्‍न पडतो. त्यामुळे हे जन लोकपाल न राहता काही लोकांचे काहीलोकपाल होणार असे चिन्ह आहे. हे सगळे का घडते आहे? या देशात एवढी लोकसंख्या आहे, काँग्रेसवरचा संताप एवढा आहे की या लोकांनी फुंकर मारली तरी वादळ निर्माण होईल. त्या वादळात ही काँग्रेसची फुटकळ माणसे कुठल्या कुठे उडून जातील. काँग्रेसची या वादळापुढे काहीच ताकद असणार नाही. या वादळाने ती काँग्रेस पार इटलीत जाउन फेकली जाईल इतकी ताकद त्या वादळात असताना त्या वादळाचा लाभ उठवू शकेल असे कोणी या देशात आज मितीला नाही. आज खर्‍या अर्थाने देशप्रेमी असलेल्या विरोधकांची ताकद कमी पडण्याचे कारण प्रत्येकाचा अजेंडा आणि झेंडा वेगळा आहे. विरोधकांची ही विखुरलेली ताकदच काँग्रेसचे बलस्थान झाले आहे. या विखुरलेल्या ताकदीसाठी एकत्र करणारे सर्वसामान्य नेतृत्व आज असणे गरजेचे आहे. हे अवघड नाही. अशक्य तर बिल्कूल नाही. पण ते घडत नाही हेच दुर्दैव आहे. आणीबाणीच्या काळात 1975 नंतर एकापाठोपाठ एक नेते इंदिरा गांधीनी मिसा कायद्याखाली तुरूंगात टाकले होते. कोणी सहा महिने, कोणी अठरा महिने असे तुरूंगात होते. त्याचवेळी या अंधकारात ‘अंधेरे में एक प्रकाश जयप्रकाश, जयप्रकाश’ आशी घोषणा आली आणि तुरूंगातून विरोधकांनी आपण एक आले पाहिजे अशा विचाराने अनेक डावे, उजवे एकत्र येत जनता पक्षाची स्थापना झाली. जयप्रकाश नारायणांसारखे परिवर्तनाचे वारे फिरवणारे नेतृत्व आज या देशात नाही ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. आणीबाणी जाहीर करण्यापुर्वीची पाच सहा वर्ष जशी परिस्थिती होती, त्याहीपेक्षा भयानक परिस्थिती आज आहे. अशा परिस्थितीत सरकार विरोधात जनतेला एकत्र करणारे नेतृत्व निर्माण होण्याची गरज आहे. अण्णा हजारेंच्या रूपाने दुसरे जयप्रकाश नारायण या देशातील जनतेला लाभतील अशी अपेक्षा होती. पण साधू विरूद्ध संधीसाधू या लढ्यात संधीसाधू आपले साधून घेणार यात शंकाच नाही. त्यामुळेच जोपर्यंत सर्व विरोधक एकत्रित येउन सर्वसमावेशक नेतृत्व या देशाला देत नाहीत तोपर्यंत आपल्याला या सोनियांच्या पारतंत्र्यात रहावे लागणार आहे. सोनियांच्या गुलामगिरीत रहावे लागणार आहे हे निश्‍चित.
(9 हवडफ 2011)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: