दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढते आहे. वाहन हातात येण्याचे वयोमानही कमी झाले आहे. पुर्वी नोकरी, कामधंदा लागल्यानंतर वाहनांचा विचार होत होता. पण आता शिक्षणातच अन्य गरजेप्रमाणे वाहनांची आवश्यकता भासू लागली आहे. ही आवश्यकता आहे की लाड आहेत. आपल्याकडील परिस्थितीचा बडेजाव आहे काय याचाही विचार आता करावा लागेल. पण आज काल 15 व्या वर्षापासूनच किंवा त्यापुर्वीच मुलांच्या हातात वाहने येउ लागली आहेत. आता शाळा कॉलेजच्या मुलांना सायकल चालवणे हे कमीपणाचे वाटते. प्रत्येकाला बाईक हवी असते. पण त्या बाईकसाठी जे हजारो रूपये मोजावे लागतात ते कसे आले आहेत याचे गणित मुलांना माहित नसते. आपण जेव्हा स्वकमाईतून काही करतो तेव्हाच त्यातून खर्च करताना माणसाला त्याची किंमत कळते. पण ती वस्तु जेव्हा सहजसाध्य असते, पैसे न खर्च करता मिळते तेव्हा त्याबाबत थोडा बेजबाबदारपणा वाढतो. आज तरूणाईकडे बापकमाईच्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. शेतकर्यांच्या मुलांकडे जमिनी प्रकल्पाला दिल्यामुळे किंवा विकसीत करण्यासाठी दिल्यामुळे पैसा आला आहे. त्या पैशातून अनेकांनी गाड्या खरेदी केलेल्या आहेत. अशा अनेक कारणांनी गेल्या अनेक वर्षात वाहनांची संख्या सर्वत्र वाढलेली दिसून येते. भविष्यात सर्वात मोठा प्रश्न कुठला असेल तर तो पार्कींगचा प्रश्न असेल. तसा तो आजच आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी किंवा अन्य कसल्याही खरेदीसाठी आपल्याला मुख्य बाजारपेठेत जायचे तर आजकाल पार्कींगला जागा नाही म्हणून कुठे तरी लांब गाडी लावायची आणि मार्केटमध्य हिंडत बसायचे. त्यामुळे खर्या अर्थाने त्या वाहनाचा काहीच फायदा होत नाही. कारण या टोकापासून ते त्या टोकापर्यंत वाहने लागलेली असतात. एक किलोमिटरपेक्षा जास्त लांब रांग ही वाहनांची असते. खरेदी करून ती ओझी, त्या पिशव्या घेउन आपल्या गाडीपर्यंत यायचे त्यापेक्षा तो रिक्षावाला कसाबसा आत घुसतो आणि सामान घरपोच करतो हे सोपे वाटते. या समस्या सगळ्या वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी एका नामांकीत दैनिकाने बातमी छापली होती की रस्त्यांवरील खड्ड्यांचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे वाहनांचा मेंटनन्स खर्च वाढल्यामुळे वाहने विकून टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. तशी ही बातमी राजकीय उद्देशाने प्रेरीत वाटत असली तरी गेल्या काही महिन्यात, वर्षात इंधनांचे दर जे प्रचंड वाढले आहेत ते गाडी चालकाला परवणारे नाहीत म्हणून माणसे गाड्या विकू लागली आहेत हे टाळण्याचा प्रयत्न यातून होताना दिसत आहे. पण अशा आपल्या थोड्या वापरलेल्या गाड्या विकण्याचे प्रमाण वाढल्यामुळेही सेकंड हँड वाहनांचे खरेदीचे प्रमाण वाढले आहे हे विसरून कसे चालेल? रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहने विकून टाकत असतील तर ती ज्यांना विकली जाणार आहे त्यांना खड्डे लागत नाहीत काय? त्यामुळे रस्त्यावर येणार्या वाहनांची संख्या तर कमी होणारच नाही. दसरा, दिवाळी या सणांना हजारो वाहने विकली जातात. ही सगळी एकाचवेळी रस्त्यावर येतात तेव्हा भविष्यात काय चित्र असेल याची कल्पनाच केलेली बरी. म्हणजे मुंबईच्या माणसाला पुण्याला जायचे आहे तर पार्कींगला जागा नाही म्हणून पनवेलला गाडी पार्क केली आणि पुण्यापर्यंत चालत जावे लागले. हा प्रकार घडला तर आश्चर्य वाटायला नको. यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी गाडी पार्क करणे आणि वाट काढणे हे फार मोठे संकट आहे. आज अनेक वाहन खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांना घेतलेले वाहन पार्क करण्यासाठी जागा नाही म्हणून वाहन खरेदी करता येत नाही. परीस्थिती असुनही वाहन पार्क करायला जागा नाही म्हणून वाहन घेता येत नाही. कारण ज्या सोसायटीत ते रहात असतात त्या अपार्टमेंट, बिल्डींगच्या तळमजल्याची जागा ही पार्कींगसाठी असुनही तिथे दुकाने गाळे काढून बिल्डरने फसवलेले असते. काही काही इमारतींच्या जागेत पार्कींगची अशी व्यवस्था केलेली असते की पहिली गाडी काढल्याशिवाय दुसरी गाडी काढता येत नाही. पहिली गाडी काढणारा आपल्या वेळेत खाली येणार नसतो त्यामुळे सगळी हालवाहलवी करेपर्यंत सार्वजनिक वाहनाने जाणे योग्य आहे असा विचार केला जातो. आज वाढत्या शहरीकरणात अणि शहर नियोजनात सर्वात मोठा प्रश्न हा पार्कीगचा असणार आहे. या पार्कींगचे नियोजन करण्यासाठी प्रयत्न होणे महत्त्वाचे आहे. ठिकठिकाणी सार्वजनिक पार्कीगची सोय करणे ही जबाबदारी प्रत्येक नगरपालिका, महापालिकांनी घेतली तर रोजगारातही प्रचंड वाढ होईल. पार्कींगची सोय करणारे प्रशिक्षित तरूण हे करीअरचेही एक क्षेत्र ठरू शकेल. फारसे शिक्षण नसलेल्या तरूणांनाही यातून रोजगार उपलब्ध होउ शकेल. असे पार्कींग झोन तयार करणे आणि त्यामुळे वाहनांची होणारी कोंडी दूर करणे हे फार महत्त्वाचे काम असणार आहे. ठराविक अंतरावर असणारी सार्वजनिक शौचालये आणि मुतार्यांबरोबरच ठराविक ठिकाणी अशी पार्कीगची सुविधा असणे गरजेचे आहे. मुख्य बाजारपेठा, रहदारीच्या ठिकाणी असे भुखंड विकसीत करून पार्कींगची व्यवस्था केली तर पोलिसांना आपली क्रेन घेउन चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या गाड्या पकडत बसावे लागणार नाही. बाजारपेठांमधून होणारी वाहनांची कोंडी दूर केली आणि बाजारपेठेतच छानपैकी पार्कींग झोन निर्माण केले पाहिजेत. आज वाढत्या अपघातांना कारण योग्य प्रमाणात पार्कींगची सोय नसणे हे कारण आहे. वाहतुकीची कोंडी होण्याचे मुख्य कारण योग्य ठिकाणी पाकीर्र्ग न केल्यामुळे बाकीच्यांची होणारी गैरसोय हे आहे. इमारतींच्या गेटसमोरच बाहेरची वाहने पार्क केली जातात त्यामुळे इमारतीतून बाहेर पडणार्या वाहनांचीही गैरसोय होते. त्याचप्रमाणे त्या इमारतीतील वाहनांना आत जाता न येण्यामुळे तो बाकीची वाहने अडवून ठेवतो. हे प्रकार टाळण्यासाठी पार्कींगचा प्रश्न सोडवणे ही काळाची गरज आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार. पण वाढत्या वाहनाबरोबरच पार्कींगची सुविधा आहे की नाही याचे नियोजन होणे महत्त्वाचे आहे. एखाद्या वाहन खरेदीच्यावेळी ज्याप्रमाणे खरेदीदाराचा इन्शुरन्स, टॅक्सची जबाबदारी वाहन विक्रेते घेतात. त्याचप्रमाणे वाहन रस्त्यावर आल्यावर त्याच्या लायसन्सची चौकशी केली जाते, पीयुसीचे प्रमाणपत्र आहे हे पाहिले जाते. त्याचप्रमाणे वाहन खरेदी करताना इथून पुढे वाहनाचे पार्कीग सुरक्षित करण्याची सुविधा आहे याबाबतचा दाखला मागितला जावा. असा दाखला असल्याशिवाय खरेदी केलेले वाहन पार्क केले असताना चोरीला गेले अथवा हरवले याची तक्रारही नोंद करून घेउ नये. बँकेत कर्ज घेताना ज्याप्रमाणे रिपेमेंट कपॅसिटी तपासली जाते त्याचप्रमाणे वाहन खरेदी करताना किंवा वाहनांसाठी कर्जपुरवठा करताना त्या त्या वित्तसंस्थांनी वाहनाची सुरक्षित पार्कींगची सोय आहे काय याचे तपशिल घेतले पाहिजेत. वाहन पार्क करण्यासाठी योग्य जागा नाही या कारणावर कर्ज नाकारली गेली पाहिजेत. पार्कीगची सुविधा नसेल तर वाहनांचे प्रमाण वाढवण्यावर थोडे नियंत्रण आणावे लागेल. वाहनांचा विमा उतरवताना विमा कंपन्यांनी वाहनाचे पार्कीग कुठे केले जाणार, घरी असताना वाहन ठेवायला जागा आहे काय याचा उल्लेख करायला लावला पाहिजे. चुकीच्या ठिकाणी किंवा असुरक्षित पार्कींगमुळे होणार अपघात, वाहन चोरी याचे क्लेम करता येणार नाहीत असा नियम केला तर पार्कींगचे नियम सुधारतील आणि तशी व्यवस्था केली जाईल.
रविवार, १३ एप्रिल, २०१४
नियमांत बदल केले पाहिजेत
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा