दूसरा प्रहार कधीजून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काँग्रेसने इंधनावरील नियंत्रणे उठवली आणि एकदम दरवाढ झाली. महागाईचा मुद्दा उसळला आणि सर्व विरोधक खडबडून जागे झाले. आठवडाभरात धडाधड आंदोलने उभी राहीली. 5 जुलैला तर देशव्यापी बंद झाला. हा ऐतिहासिक एकजूटीने केलेल्या बंद नंतर मात्र विरोधक थंड पडल्यासारखे दिसतात. एकदा आंदोलन करून काही उपयोग नाही तर आंदोलन यशस्वी करण्यासाठी त्यात सातत्य असावे लागते. दोन महिन्यांपुर्वीच्या सरकारच्या निर्णयाचे चटके आता लोकांना जाणवू लागले आहेत. मुंबई उपनगरे आणि परिसराचाच विचार करायचा झाला तर पंधरा दिवसांपूर्वी नवी मुंबई परिवहनने आपले बसचे भाडे वाढवले. त्यांनंतर बेस्टने दरवाढीचा निर्णय काल घेतला आहे. आज फक्त एसटीने दरवाढ केलेली नाही. पण एसटीची दरवाढ तीन महिन्यांपूर्वीच, इंधन दरवाढ होण्यापूर्वीच झालेली आहे. तरीही ती येत्या काही दिवसात पुन्हा होउ शकते ही टांगती तलवार सर्वसामान्यांवर आहेच. त्यामुळे प्रत्यक्ष दरवाढीच्या निर्णयानंतर दीड ते दोन महिन्यांनी त्याचे चटके ऐन पावसात बसत असताना विरोधकांनी थंड पडून चालणार नाही. विरोधकांनी एकजूट दाखवून जो बंद केला होता, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना कुठे तरी आपली बाजू मांडण्यासाठी कोणीतरी आहे, आपल्याला पर्याय आहे अशी भावना त्यातून निर्माण झाली होती. या जुलमी काँग्रेस राजवटीला वठणीवर आणण्यासाठी त्यांची खुर्ची खेचण्यासाठी कोणतरी पुढे येईल असे वाटू लागले होते. आणिबाणी नंतर ज्याप्रमाणे विरोधक एक येउन जनता पक्ष स्थापन झाला आणि काँग्रेसला सत्तेतून दूर केले होते तसा काहीतरी चमत्कार होईल, विरोधकांची एकजूट होईल अशी अपेक्षा विरोधकांकडून सामान्य जनता करत होती. पण फक्त एक दिवसच तो बंद पाळला आणि नंतर काहीच घडले नाही यामुळे सामान्य माणूस पुन्हा अस्वस्थ झाला आहे. महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांना दूर करण्यात काँग्रेस यशस्वी झाली आहे. पण आपला मूळ मुद्दा बाजूला पडलेला असताना पुन्हा समेवर येण्याचे काम विरोधकांना अजून जमले नाही. केवळ औपचारीकता म्हणून बंद पाळले जात असतील तर सत्ताधारी काँग्रेसवर ज्याप्रमाणे सामान्य माणूस नाराज आहे, त्यापेक्षाही नाराजी विरोधकांना सहन करावी लागेल. एक घाव घातला तर दोन तुकडे व्हायलाच पाहिजेत. पण घाव घालूनही तुकडे होत नसेल तर पुन्हा तुकडा पडेपर्यंत प्रहार करायला पाहिजे. विरोधकांनी 5 जुलैला केलेल्या बंदचा घाव काँग्रेस सरकारच्या वर्मी लागला, पण जो तुकडा पडणे आवश्यक होते तो नाही पडला. त्यानंतर काँग्रेस अधिक सावध झाली, आक्रमक झाली, आपल्या मुद्द्यावरून हटण्याच्या वृत्तीवर कायम राहीली आणि विरोधकांची धार कमी झाली. आता विरोधक प्रहार करणार नाहीत अशी परीस्थिती निर्माण केली. तशी परिस्थिती निर्माण झाल्यावर भाव वाढ पुन्हा होउ लागली. बेस्टची दोन रूपये दरवाढ होते, एनएमएमटीची दरवाढ होते तेव्हा सामान्य माणसाला आपल्या खर्चात सरासरी 200 रूपयांचा फटका बसतो. हा फटका प्रत्यक्ष असतो. पण बेस्ट किंवा एसटीची दरवाढ झाली की इतर प्रवासी साधनांवर त्याचा परिणाम होतो, रिक्षा टॅक्सीचालक लगेच दरवाढ करतात. त्यामुळे पुन्हा सामान्य माणसांना महिनाकाठी आणखी 1 हजार रूपयांचा फटका बसतो. या दोन्हीचा परिणाम वाहतूक खर्चावर होत असल्यामुळे भाजीपाल्यापासून ते प्रत्येक जीवनावश्यक गोष्ट वाढत जाते आणि सामान्य माणसाला आपले आर्थिक गणित कसे मांडावे हे सुचेनासे होते. यावर कुठेतरी नियंत्रण असायला पाहिजे होते. विरोधक असे नियंत्रण सरकारवर आणतील ही अपेक्षा सामान्य माणसाला होती. पण ती साफ धुळीला मिळाली आहे. विरोधकांनी येत्या काही दिवसात दुसरा प्रहार केला नाही तर त्यांच्या एकजूटीबाबत सामान्य माणसाला शंका घ्यायला वाव मिळेल. मोठ्या प्रमाणात महागाईला विरोध महागनगरांमधून आणि मोठ्या शहरांमधून झाला होता. त्यामध्ये मुंबई, पुणे अशा शहरांबरोरच शहरी भागातून तो प्रखरपणे जाणवला होता. यामागचे कारण शहरी भागात सामान्य माणसला खर्च जास्त करावा लागतो, महागाईची झळ ग्रामीण भागाच्या तुलनेत पटकन आणि जास्त बसते. अशा शहरी भागांमधून काँग्रेसने वेगवेगळे मुद्दे निर्माण करून महागाईच्या मुद्द्यांवरून सामान्य माणसांचे लक्ष हटवण्यासाटी अन्य नव्या समस्या, प्रश्न तयार केले. ही धूळफेक करून काँग्रेसने आपले उद्दीष्ट साध्य केलेे पण त्याची जबाबदारी आता विरोधकांवर येउन पडली आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी आता पुन्हा सामान्यांचा विश्वास मिळवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे उभे राहीले आहे. महाविद्यालयाचा अकरावीचा प्रश्न निर्माण करून, त्याच्याकडे लक्ष वेधून, बेस्ट फाईवच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष वेधून सरकारने आपल्या विरोधात गेलेले वातावरण निवळण्यात यश मिळवले. एकदा वातावरण निवळले की नंतर विरोधातले मुद्दे विरघळून जातात याचे भान काँग्रेसने ठेवले आणि विरोधकांचा स्वार्थ कसा आहे, ते आपमतलबी कसे आहेत हे दाखवण्यासाठी खासदारांच्या वेतनवाढीचा मुद्दा उचलून धरला. खासदारांना वेतनवाढ हवीच या मुद्द्याला विरोधकांनी अजिबात विरोध केला नाही तर आणखी वाढ मागण्याचा प्रकार केला. आदल्या दिवशी 300 टक्के पगारवाढ केल्यानंतर पुन्हा विरोधकांच्या पदरात झुकते माप टाकत दुसरे दिवशी विरोधकांनी मागणी केली म्हणून ही वाढ 500 टक्के करीत आहोत असा साळसूदपणा दाखवला. यामध्ये विरोधक सपशेल चीत झाले. स्वत:चा पगारवाढीकडे खासदार कसे लक्ष देतात आणि त्यात विरोधकही काहीच विरोध करीत नाहीत, तर विरोधकांच्या दबावानेच ही आम्ही कमी सुचवलेली वाढ जास्त करण्यात आली, हे दाखवण्यात काँग्रेसला यश आले. या सगळ्या गोंधळात महागाईचा मुद्दा मागे पडलाच. पण पुन्हा येत्या काही दिवसात, काही तासात पेट्रोलची दरवाढ होईल अशी बातमीही सर्वत्र पसरली आहे. ही वाढही अटळ आहे. पण त्यामुळे सामान्य माणसांचे फार हाल होणार आहेत. तुटपुंज्या पैशात घर चालवणे सामान्य माणसाला कठीण आहे. त्यासाठी विरोधकांनी आपली मरगळ झटकून पुन्हा एकदा कामाला लागले पाहिजे. दुसरा प्रहार करायला सिध्द झाले पाहिजे. खासदारांची पगारवाढ करून आपण विरोधकांना ताटाखालचे मांजर कसे केले आहे हे दाखवून दिले आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस सरकारमधीलच घटक पक्ष आसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी विरोधक सेटलमेंट करणारे आहेत असा गवगवा सुरू करून एक विषय चघळायला सोडला आहे. संशयाचे भूत सामान्य माणसाच्या मनात पेरण्याचे काम काँग्रेसवाले करतात. ते काम शरद पवारांनी केले आहे. त्यामुळे विरोधकांची धार आणखी कमी झाली आहे. ती पूर्ण बोथट होण्यापूर्वी आणि धारातीर्थी पडण्यापूर्वी महागाईचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला पाहिजे. विरोधकांनी यावर अधिक आक्रमक झाले पाहिजे. मुद्द्यापासून दूर जाणार्यांना सत्तेपासून कायमच दूर रहावे लागते. काँग्रेसने कायमच हा फाँर्म्युला वापरून भरकटणार्या विरोधकांची फरफट करण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा काँग्रेसबरोबर फरफटत जायचे की नवे आंदोलन उभे करून सामान्य माणसांचा विश्वास संपादन करायचा हे सर्व विरोधकांच्या हातात आहे. आज हे होण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येकजण स्वतंत्रपणे लढतो आहे. आपली छोटीछोटी ताकद दाखवून शक्तीप्रदर्शन करीत आहे. पण ही शक्ती त्या काँग्रेसपेक्षा खूपच कमी आहे. त्या शक्तीला आव्हान देण्यासाठी एक सर्वमान्य नेतृत्व पुढे येण्याची आवश्यकता आहे. सर्व पक्षांची मोट बांधू शकेल आणि सर्वांना एक करू शकेल असे नेतृत्व पुढे यावे आणि सरकारविरोधात वातावरण निर्माण करावे असे आज सामान्य माणसाला वाटते आहे. ती ताकद जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत काँग्रेस विरोधकांना असे खेळवत ठेवेल आणि स्वत:चे हित साधून घेईल. स्वतंत्रपणे केलेल्या आंदोलनांची अलिखीत एकजूट 5 जुलैला पहायला मिळाली. आता एका छत्राखाली येउन दुसरा प्रहार क़धी घालणार याकडे सामान्य माणूस डोळे लावून बसला आहे.( सप्टेंबर 2010).
शनिवार, १९ एप्रिल, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा