शनिवार, १२ एप्रिल, २०१४

दहशतवादाच्या मुळाशी काँग्रेस सरकारच आहे

दिल्लीत मागच्या आठवड्यात झालेल्या बाँम्बस्फोटानंतर संपूर्ण देशभरात एक वैचारीक मंथन होउ लागले आहे. सर्वसामान्य माणसांमध्ये एक प्रकारची भिती निर्माण झाली आहे की सातत्याने होणार्‍या या दहशतवादाशी काँग्रेसचा तर संबंध नसेल ना? दहशतवाद कधीच संपणार नाही असे काँग्रेसच्या युवराज राहूल गांधी यांनी आधीच कबूल आहे. त्यामुळे या देशातला दहशतवाद काँग्रेसला खरोखरच संपवायचा नाही काय? सामान्य माणसाच्या मनात सरकारबद्दल, सरकार चालवणार्‍या काँग्रेसबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली आहे. या सरकारच्या हेतुबद्दल सामान्यांच्या मनात शंका आहे की खरंच सरकारला या  देशातला दहशतवाद संपवायचा आहे काय? तर दुर्दैवाने याचे उत्तर नाही असेच येते. त्यामुळे दहशतवादाचे कारण या देशात काँग्रेस अस्तित्वात आहे असेच दिसून येते. दहशतवाद निपटून काढणे खरेच अवघड आहे काय? तर याचे उत्तरही बिल्कूल अवघड नाही असेच येते. पण हे सर्व सरकारी इच्छाशक्तीवर अवलंबून आहे, त्यामुळे इथला दहशतवाद निपटला जात नाही. दहशतवाद्यांचा थांगपत्ता लागत नाही, ते सापडत नाहीत हे निव्वळ थोथांड आहे. सरकारची ती फार मोठी चूक आहे. नको त्या गोष्टीत आमचे सरकार गुंतून पडते आहे. आपली भ्रष्टाचाराची प्रकरणे दडवण्यासाठी सरकारला असे हल्ले हवे असतात. या ठिकाणी सरकार याचा अर्थ काँग्रेस असाच घेतला पाहिजे. कारण सर्वाधिक काळ काँग्रेस या देशात सरकारमध्ये आहे. भ्रष्टाचाराचे आणि दहशतवादाचे बिज या काँग्रेसनेच देशात पेरले आहे. सरकारने दहशतवाद्यांची मानसिकता कधी तपासून पाहिली आहे काय? दहशतवादी कसे तयार होतात, याचा सरकारने कधी अभ्यास केलेला आहे काय? कोणतीही घटना ही नियोजन असल्याशिवाय होत नाही. हे नियोजन अवैध काम करणार्‍या आमच्या दहशतवाद्यांना जमते पण सरकारला का जमत नाही. दिल्लीत काय किंवा मुंबईत अथवा देशात अन्यत्र जिथे जिथे बाँम्बस्फोट घडले ते घडल्यानंतरच आम्हाला समजले. पण त्याचे नियोजन काही महिने आपल्या देशात घडत होते. जिथे घडत होते ते आपलेच लोक होते. आपल्यातच रहात होते. तरी सरकारला सुगावा का लागला नाही? सामान्य माणसाला आज हाच प्रश्‍न सतावतो आहे. सरकार दहशतवादाला खतपाणी घालते या मताला इथेच पुष्टी मिळते. ही संपूर्ण कृती कशी घडते, घटना कशी घडते, त्यासाठी काय काय वापरले जाते, काय काय केले जाते याचे सगळे तपशिल सरकारकडे आहेत. पण तरीही सरकार दहशतवाद रोखू शकत नाही, याचे कारण सरकारला हा दहशतवाद हवा आहे. काँग्रेसला हा दहशतवाद हवा आहे. त्याचीच कबूली राहूल गांधींनी दिली होती. जेव्हा एखादा दहशतवादी किंवा एखादी दहशतवादी संघटना काही बाँम्बस्फोट करण्यासाठी, किंवा हल्ला करण्याचे नियोजन करते तेव्हा ते प्रथम काय करत असतील? पाकीस्तानात राहून ते इथे काही करू शकणार नाहीत. याचाच अर्थ त्यांना भारतात महत्त्वाच्या ठिकाणी राहणे भाग पडते. ते या ठिकाणी राहण्यासाठी जागा शोधणार. मग अशा दहशतवाद्यांना राहण्यासाठी उपलब्ध होउ शकतील अशा जागा कोणत्या आहेत याचे तपशिल सरकारकडे असणे गरजेचे आहे. नवनवीन होणारी बांधकामे, त्या बांधकामांमध्ये रहायला येणारे लोक, जागा भाड्याने देताना एजंट करत असलेली मध्यस्ती, एकांतातल्या जागा या सर्व जागांची तपासणी करणारी एक यंत्रणा आपल्याकडे असणे आवश्यक आहे. मुंबईत, दिल्लीत कोणत्याही क्षणी कोणीही नवीन रहायला आला, घर विकत अथवा भाड्याने घेतले तर ती व्यक्ती कुठून आली, काय करते याचे तपशिल ठेवणारी यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे. ही रहायला येणारी माणसं कोण, कुठली आहेत, नवे कोण आहेत हे समजले तरी त्यांचा हेतु काय हे तपासणे अवघड नाही. हेतु समजला तरी लगेच कारवाई करता येणे शक्य नाही पण ते कुठे जातात, कोणाच्या संपर्कात आहेत, त्यांना कोठून काय मिळणार आहे, ते काय खरेदी करतात हे लक्षात घेणारी यंत्रणा आमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे येणारी रसायने, स्फोटकं कुठून येतात? ते कसे तयार करतात हे तपासणारी यंत्रणा आमच्याकडे उभी केली पाहिजे. पाकीस्तानातून मुंबईत येताना, दिल्लीत येताना किंवा भारतात कोठेही येताना त्यांनी काही अमोनियम नायट्रेड अथवा स्फोटके आणलेली नसतात. तर ती इथंच तयार केलेली असतात. तिकडून येताना त्यांना आमच्या सीमेवर तपासून आत घेतले जात असते. त्यामुळे त्यांना लागणारी रसायने कोठे मिळतात याची जाणिव त्यांना असते. तशी रसायने विकणारे, स्फोटकाचे सामान पुरवणारे इथे कोण आहेत याचा तपशिल आम्हाला का जमवता येत नाही? कारण आमच्याकडे तशी यंत्रणाच आम्ही उभी केलेली नाही. घातपाती कृत्य करण्यासाठी आमच्या देशात बाहेरचे लोक येतात तेव्हा त्यांच्या हालचालींवर आम्ही नजर ठेवत नाही. त्यामुळेच आमच्याकडे घातपाती कृत्ये सहज घडून जातात. हल्ला झाल्यानंतर, स्फोट झाल्यानंतरच आम्हाला याची जाणिव होते. इथेच कुठेतरी गडबड आहे. स्फोटानंतर शोधापेक्षा आमच्याकडे सवंग लोकप्रियतेलाच उत अधिक येतो. जखमींना, मृतांना पहायला नेतेमंडळी, सरकारचे प्रतिनिधी, मंत्री, गर्दी करतात. त्यामुळे यंत्रणा अडखळते, कोलमडून पडते. दिल्लीतील स्फोटानंतर पंतप्रधान मनमोहनसिंग राममनोहर लोहिया रूग्णालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी गेले. त्यामुळे ज्या रूग्णावर उपचार करणे गरजेचे होते, त्या रूग्णाकडे दुर्लक्ष करून डॉक्टर मंडळी पंतप्रधानांना भेटण्यात दंग झाली. यामध्ये अडीच तासांचा वेळ वाया गेला. त्यामुळे त्या रूग्णाच्या शरीरात विष तयार झाले. त्या रूग्णाचे कमरेपासून खालचे पाय तोडावे लागले. याला जबाबदार कोण? म्हणजे दहशतवाद्यांपेक्षा वाईट कृत्य आमच्या सवंग लोकप्रियता आणि प्रसिद्धी तंत्राने केलेले दिसून येते. नसती भेट दिली पंतप्रधानांनी तर काय फरक पडला असता? जखमी बरे झाल्यावर जा ना तुम्ही त्यांना भेटायला. ती बेशुद्ध अवस्थेत असताना त्यांच्या वेदना काय कळणार आहेत तुम्हाला? प्रसारमाध्यमांनी रूग्णालयाती पंतप्रधानांची भेट, लुंगीवाल्या पी. चिदंबरमची भेट याच्या चित्रिकरणात किती वेळ वाया घालवला याचे काही गणित आहे? जखमी, रूग्ण, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, रूग्णालयातील भेटायला आलेले नागरिक यांच्या प्रतिक्रीया, अनुभव कथनात इतका वेळ घालवला की यामुळे आपण टिव्हीवर दिसणार या नादात डॉक्टरमंडळी उपचाराकडे दुर्लक्ष करून कॅमेर्‍यापुढे येउ लागली. हे कुठे तरी थांबले पाहिजे. हा सुद्धा अतिरेक आहे, दहशतवाद आहे. काय दाखवले पाहिजे, काय बोलले पाहिजे याचे ना प्रसारमाध्यमांना भान राहिले आहे ना सरकार नामक यंत्रणेला त्याची जाणिव आहे. याचाच फायदा दहशतवादी संघटनांना होत आहे. हिजबुल मुजाहिद्दीन असो वा सिमी अथवा कोणतीही दहशतवादी संघटना ही भारतात सक्रीय आहे, इंडियन मुजाहिद्दीन, स्टुडंडस इस्लामिक मुव्हमेंट इन इंडिया. याचा अर्थ या संघटनांना पाकीस्तानांतून मदत मिळत असली तर दहशतवादी कारवायांचे नियोजन हे इथेच केले जाते. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम सरकारचे होते. पण ते न ठेवल्यामुळे, त्यांना पाठीशी घातल्यामुळे दहशतवादी कारवाया थांबत नाहीत. या सगळ्या गोष्टींशी सरकार, काँग्रेसपक्ष निगडीत आहे. त्यामुळे या देशातील दहशतवाद निपटून काढण्याची काँग्रेस सरकारची इच्छा नाही. राहूल गांधी असोत अथवा मनमोहनसिंग यांनी आपली दहशतवाद संपवू शकत नाही याची कबूली देउन आपली अपात्रता जाहीर केली आहे. अशा अपात्र लोकांच्या हातात आपण कितीदिवस हा देश चालवायला द्यायचा याचा विचार आता जनतेने केला पाहिजे. जनतेने सरकारला आता विचारले पाहिजे की , खरंच तुम्हाला दहशतवाद मिटवायचा आहे काय? तुम्ही दहशतवाद मिटवू शकत नाही असे म्हणता यामागे नक्की काय आहे? या दोन प्रश्‍नांवर काँग्रेसला निरूत्तर करून दहशतवादाचे मूळ काँग्रेस आहे हे जनतेपुढे येण्याची गरज आहे.
                   (सप्टेंबर 2011)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: