शुक्रवार, ११ एप्रिल, २०१४

काँग्रेस नेत्यांना त्राही माम करा

आम्ही गांधीवादी आहोत. कोणत्याही गोष्टीवर आम्ही लोकशाही मार्गाने तोडगा काढतो. विचाराचा लढा आम्ही विचाराने लढतो. मुद्दे संपले की विरोधक गुद्यांवर येतात. हे काँग्रेसच्या नेत्यांचे नेहमीचे भाषणातील मुद्दे असतात. पण काँग्रेसने आपले नागडेपण रविवारी पहाटे दाखवले. गांधीेजीच्या विचाराने आम्ही चालतो म्हणणार्‍या काँग्रेसचे खरे स्वरूप केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला कळून आले आहे. बाबा रामदेव यांच्या आंदोलनाला ज्या पद्धतीने काँग्रेसने चिरडण्याचा दुष्टपणा केला आहे त्यावरून या देशात लोकशाहीचा खून काँग्रेसने केला आहे हे स्पष्ट होताना दिसत आहे. ब्रिटीशांनी ज्या पद्धतीने स्वातंत्र्य लढ्यातील आंदोलकांची आंदोलने चिरडण्याकरीता गोळीचा वापर केला होता, लाठी काठीचा वापर केला होता तोच प्रकार ही परकीय काँग्रेस या देशात करीत आहे. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे या परकीय, देशद्रोही काँग्रेसला या देशातून हद्दपार केले पाहिजे. मुळात काँग्रेस ही परकीय विचारांची धारा असल्यामुळे काँग्रेसला या देशाबद्दल प्रेम नाही. सत्ता करणे आणि भ्रष्ट मार्गाने पैसा कमावणे यासाठी काँग्रेस सदैव सत्तेत असते. भारतीयांवर तहहयात राज्य करायचे या प्रेरणेने ब्रिटीशांमधील काही लोकांच्या पुढाकाराने निर्माण केलेली आणि इंग्लंडमधील हुजूर आणि मजूर पक्षाप्रमाणे ब्रिटीश सत्तेत प्रबळ विरोधी पक्ष असला पाहिजे म्हणून काँग्रेस पक्षाची स्थापना केली. ब्रिटीशच राहिले नाहीत तर काँग्रेसची गरजच काय आहे हा या देशाचा खरा प्रश्‍न आहे. ब्रिटीश गेले तरी काँग्रेस संपवली नाही याचाच अर्थ या देशाला खरे स्वातंत्र्य मिळालेच नाही असेच आहे. ब्रिटीश गेले नाहीत तर ब्रिटीशांच्या सत्तेचे सत्तांतर झाले इतकेच झाले. नाहीतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या राज्यात सुराज्य आले असते. रामराज्य आले असते. पण केवळ राम या नावाचीच या काँग्रेसवाल्यांना एवढी घृणा आहे की रामदेव बाबा उपोषणाला बसले म्हणून त्यांची पाचावर धारण बसली. त्यामुळे हा राम आपल्यालाच वनवासाला पाठवल्याशिवाय राहणार नाही याची भिती या सोनिया काँग्रेसने घेतली आणि अत्याचाराचा, अन्यायाचा मार्ग काँग्रेसने स्वीकारला.  काँग्रेसने गेल्या साठ बासष्ठ वर्षात केले काय? अजूनही आपल्या देशात वापरले जातात ते ब्रिटीशांचे कायदेच वापरले जातात. आम्ही आमचे स्वत:चे कायदे करू शकलेलो नाही. निधर्मी देश म्हणून मिळवायचे आणि प्रत्येक धर्मासाठी वेगळा कायदा वापरायचा. ही धर्माधर्मात फूट पाडण्याची काँग्रेसची निती म्हणजे ब्रिटीशांची फोडा आणि झोडा निती आहे. अत्यंत लाचारपणे त्या इटलीच्या महिलेला डोक्यावर घेतले आणि भारतातील सर्वोच्च पद बहाल करणे हे स्वातंत्र्याचे लक्षण असूच शकत नाही. महात्मा गांधींनी ही काँग्रेस ब्रिटीश विरोधी लढ्यासाठी असली पाहिजे अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर या पक्षाला विसर्जन केले  पाहिजे असे त्यांचे म्हणजे होते. पण पंडित नेहरूंनी काँग्रेस विसर्जन न करता पुन्हा ब्रिटीश राजवटीची मूहूर्तमेढ रोवली. नेहरूंचे म्हणणे होते हे स्वातंत्र्य नाही तर सत्तांतर आहे. या प्रकारे स्वातंत्र्य न मिळताच गेली सहा दशके आम्ही स्वातंत्र्य मिळाल्याच्या गप्पा मारत आहोत. हा तर काँग्रेसचा स्वैराचार आहे. या काँग्रेसला आता देशातून हद्दपार करण्याची गरज आहे. गांधीजींना कोणी नथूरामाने मारले असेल पण गांधींच्या विचाराचा खून मात्र काँग्रेसनेच केला आहे.  एक संत, एक योगी त्याच्या समवेत आंतरराष्ट्रीय स्तरावर किर्ती मिळवलेले साधक, तपस्वी, सामाजिक कार्यकर्ते केवळ भ्रष्टाचार विरोधात उपोषणाला बसतात आणि संपूर्ण देशभरातून त्यांना पाठींबा मिळतो म्हटल्यावर काँग्रेस पूर्ण हादरुन गेली. आपल्या सत्तेच्या बळावर पोलिसांना आदेश देउन या आंदोलकांवर बेसुमार लाठीमार केला गेला. बाबा रामदेवांना बेकायदेशीरपणे अटक करून हरिद्वारला नेउन सोडले गेले. हा प्रकार अत्यंत हिणकस असा आहे. काँग्रेसच्या लाचार नेत्यांनी , भ्रष्टाचारी नेत्यांनी आपल्या प्रवृत्तीचे खरे दर्शन यातून दाखवून दिले आहे. असे काय घडले असते रामदेव बाबांशी चर्चा करून त्यांना उपोषण करण्यापासून परावृत्त केले असते तर काय झोळीत दगड पडला असता काँग्रेसच्या? पण बाबा रामदेव यांचे उपोषण काळा पैसा, स्वीस बँकेतील पैसा याबाबत होते. भ्रष्टाचाराविरोधात होते. त्यामुळे काळा पैसा, स्वीस बँकेत, परदेशी बँकांत खाती फक्त  काँग्रेसच्याच लोकांची आहेत. ते नेमके काँग्रेसच्या राणीला झोंबले. आपला भ्रष्टाचार आता उघड होणार याची भीती सोनियांपासून तमाम भ्रष्ट काँग्रेस नेत्यांना वाटू लागली. रामदेवबाबांना बदनाम करण्याची षडयंत्र रचली गेली. पण कोणीच काँग्रेसच्या बाजूने बोलेना, रामदेवा बाबांना पाठींबा मिळतो आहे हे लक्षात आल्यावर बळाचा वापर करून लाठीमार, अश्रूधूर सोडून हे आंदोलन चिरडण्याचा काँग्रेसने वापर केला. ही काँग्रेसला झालेली विनाशकाले विपरीतबुद्धी आहे असेच म्हणावे लागेल. यामुळे आपला काळा पैसा हा स्वीस बँकेत आहे, परदेशी बँकांमध्ये आहे, काँग्रेस हा भ्रष्टाचारी पक्ष आहे हे सिद्ध झाले आहे. काँग्रेसनेच त्यामुळे ही अप्रत्यक्ष कबूली दिली आहे. गांधीवाद, लोकशाही, विचारधारा ही सगळी काँग्रेसची थोतांडे आहेत. रक्तपात करणे, गोळीबार करणे आणि आंदोलने चिरडून टाकणे हेच काँग्रेसचे ध्येय आहे. त्यामुळे रामदेव बाबांचे आंदोलन चिरडणे आणि त्यांना व आंदोलकांना मारहाण करणे हे काँग्रेसला संपवणारे लक्षण आहे. ही पडलेली एक ठिणगी येत्या काही दिवसात एवढी भडकणार आहे की काँग्रेस नेत्यांना आपला गाशा गुंडाळून तोंड लपवून बसावे लागणार आहे. इजिप्तमध्ये जशी काही महिन्यांपुर्वी जनतेतून आंदोलन झाले. तसेच आता भारतात होणार आहे. जनता रस्त्यावर उतरून या नेत्यांना मारायला आता कमी करणार नाही असे दिसते आहे. काँग्रेसनेच लोकशाहीचा खून केल्यावर कसली आली आहे सत्ता आणि कसले आले आहे सरकार? कोण कायदा पाळणार आता? ही यादवी माजण्याची लक्षणे आहेत. म्हणूनच आता काँग्रेसला हटवून परदेशात पळवून लावले पाहिजे. पाकीस्तानी नेते ज्याप्रमाणे सत्तेवरून हाकलल्यावर तोंड लपवून वेगवेगळ्या देशात आसरा घ्यायला पळतात तसे या सोनिया गांधी, प्रणव मुकर्जी, कपिल सिब्बल, राहूल , दिग्वीजय या सर्वांना तोंड लपवून त्राही माम करत पळायला लावल्याशिवाय या देशाला स्वातंत्र्य मिळाले असे म्हणता येणार नाही. त्याशिवाय सुराज्याचे स्वप्न पाहता येणार नाही.
(बाबा रामदेव यांचे आंदोलन काँग्रेसने मोडून काढले होते. त्यांना महिलांचा ड्रेस घालून पलायन केले म्हणून काँग्रेस थट्टा करते, परंतु आंदोलने मोडून काढून लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार काँग्रेस करते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: