शनिवार, १२ एप्रिल, २०१४

महाराष्ट्राचा स्वाभीमान गहाण ठेवण्याची परंपरा

महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून युतीची पाच वर्ष सोडली तर सत्ता कायम काँग्रेस पक्षाकडेच राहीली आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण या काळात महाराष्ट्राचा विकास काय झाला आहे हे पाहणे अत्यंत आवश्यक आणि मनोरंजक ठरणार आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाणाचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदले गेले आहे. यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसमधील जे काही अपवादाने असलेले सज्जन नेते आहेत त्यापैकी एक होते. गरीबीतून वर आलेले आणि सामान्य माणसांबद्दल कणव असलेले नेते अशी त्यांची ख्याती. पण कणव असणे आणी त्यापोटी काही करणे यामध्ये फरक आहे.  महाराष्ट्राचा  स्वाभीमानाचा कणा अशी ख्याती आहे. देशाच्या नकाशातही महाराष्ट्र म्हणजे पाठीचा कणा वाटावा अशा ठिकाणी आहे. काश्मिर हा चेहरा आहे. तो काँग्रेसने कापून टाकला आहे. पण महाराष्ट्र हा पाठ आणि पोट आहे. पण तो कणा मोडून लाचार करण्याचे काम यशवंतरावांनी केले. यशवंतराव जसे  दिल्लीश्‍वरांपुढे लाचार होत होते तीच परंपरा आजच्या मुख्यमंंत्र्यांनीही सुरू ठेवली आहे. महाराष्ट्राचा स्वाभीमान घालवण्याचे काम सर्वात प्रथम कोणी केले असेल ते यशवंतरावांनी. तेव्हापासून आमचे काँग्रेसचे मुख्यमंत्री दिल्लीतल्या पोरासोरांचे जोडेच उचलण्याचे काम करीत आहेत. आर्थिक दृष्ट्या संपन्न राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जो महाराष्ट्राचा सन्मान व्हायला पाहिजे तो कधी होत नाही  योगासनाने माणसाचे अंग लवचिक होते म्हणतात. अगदी पायाचा अंगठाही तोंडात घेण्याइतका लवचिकपणा अंगात येतो. पण ज्याला योगासने करता येणे शक्य नाही त्यांनी अंगात लवचिकपणा आणण्यासाठी काँगे्रसमध्ये जावे. दिल्लीची बाई किंवा बुवा आला की झाला लवचीक. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच असाच लवचिक  लाचारपणा सांभाळला आहे. महारार्ष्ंट्र आणि गुजरात एकाचवेळी निर्माण झालेली राज्ये. पण गुजरातची प्रगती कशी आणि महाराष्ट्राची अवस्था काय? काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला कधी मान असलेली कोणी पाहीली आहे का? खांद्यावर दिसते ते थेट मुंडकेच दिसते. कारण ही मान त्यांनी दिल्लीत गहाण ठेवली आहे. महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी सहकाराचा मंत्र जपला पाहिजे ही हाक यशवंतरावांनी दिली. त्यानंतर महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने उभारले जाउ लागले. कारखान्याच्या जोरावर त्याच नावाने सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, सहकारी कुकुटपालनसंस्था, सहकारी पाणीपुरवठा संस्था, सहकारी वाहतूक संस्था, उसतोडणी कामगारांच्या संस्था, सहकारी सूत गिरण्या असे विविध उद्योेग सहकारी चळवळीच्या माध्यमातून उभारले गेले. पण सहकाराचे जे उद्दीष्ट होते की एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ, या तत्त्वाला काँग्रेसच्या नेत्यांनी हरताळ फासला. कारखान्यांचे, सहकारी संस्थांचे पेव फुटले पण त्याचा वापर काँग्रेसच्या नेत्यांनी राजकारण आणि सत्तेसाठी केला. प्रत्येकाचा साखर कारखाना असलाच पाहिजे हा दंडक काँग्रेसने रूजवला. त्यामुळे आपल्या मतदारसंघात साखर कारखाना उभा करणे हाच खरा विकास असे चित्र काँग्रेसने महाराष्ट्रात निर्माण केले. त्यामुळे कायम पश्‍चिम महाराष्ट्राकडे, विदर्भ, मराठवाड्याकडे   आलटून पालटून महाराष्ट्राचे नेतृत्व गेले. महाराष्ट्राचे नेतृत्व फक्त  साखर कारखानदारांचे भोवतीच फिरत राहीले. साखरपेरणी करून मुख्यमंत्रीपदे खरेदीचा पाया या सहकाराने महाराष्ट्रात रूजवला. साखरेसाठी लागणारा उस जसा चरकातून पिळला जातो, त्यातला  साखरेचा अंश काढून चोथा बाहेर फेकला जातो तोच प्रकार आमच्या नेत्यांचा झाला. दिल्लीश्‍वरांच्या चरकात आमचे कणाहीन कारखानदार मुख्यमंत्री लाचारपणे पिळले जातात. साखर ते काढून घेतात आणि चोथा महाराष्ट्राला उरतो. देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्रात आहे. कायम चांगले संख्याबळ महाराष्ट्राने दिलेले आहे. असे असताना आमचे मुख्यमंत्री लाचार होउन का बसतात हे न समजणारे आहे. नरेंद्र मोदी, नितीशकुमार, मायावती गुजरात, बिहार, उत्तरप्रदेशसाठी भरभरून आणू शकतात फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गप्प बसतात. विरोधात राहून बाकीचे मुख्यमंत्री काम करू शकतात पण महाराष्ट्राच्या नेत्यांना दिल्लीतल्या नेत्यांपुढे आपले म्हणणे मांडण्यासाठी तोंड उघडता येत नाही. इतके मुखदुर्बल नेते महाराष्ट्राच्या वाट्यालाच का? या महाराष्ट्राची निमीती काँग्रेसच्या दिल्लीच्या नेत्यांचे जोडे उचलण्यासाठी का झाली आहे?  पंडीत जवावरलाल नेहरू महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांनी यशवंतरावांना आपल्याच राज्यात अपमानीत केले होते. हीच परंपरा आजही आहे. दक्षिणेतले नेते ज्या ताठ मानेेने दिल्लीत जातात त्या ताठ मानेने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का जाउ शकत नाही? दिल्लीत गेल्यावरही नेहरूंनी यशवंतरावांना सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे वागणूक दिली होती. आग्रा येथे औरंगजेबाने जो प्रकार शिवाची महाराजांबद्दल केला होता तसाच प्रकार यशवंतरावांबद्दल पंडीत नेहरूंनी दिल्ली दरबारी केला होता. यशवंतरावांनी मुकाटपणे अपमान गिळला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोडून चीन युध्दाच्यावेळी संरक्षणमंत्रीपदाची धुरा सांभाळायला गेले. ‘  हिमालयावर येता घाला, सह्यगिरी हा धावून गेला’ म्हणून त्याचे कौतुक केले. पण नेहरूंनी युध्दाच्या बाबतीत ‘तुम लढो हम तुम्हारे कपडे संभालते है ’अशीच भूमिका घेतली. स्वत:च्या चुकीच्या धोरणाने या देशाला युध्दात पराभव पत्करावा लागला. देशाचा भूभाग चीनच्या घशात घातला.  युध्दात पराभूत झाल्याचे पाप संरक्षण खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पदरात टाकले. यालाच म्हणायचे चरकातून उसाचा रस काढायचा आणि चोथा फेकायचा. ही चोथा फेकण्याची प्रथा यशवंतरावांच्या काळापासून महाराष्ट्रात सुरू झाली ती आजतागायत  सुरु  आहे. हा चोथा फेकण्यासाठी महाराष्ट्राचे डंपिंग ग्राउंड काँग्रेसने केले आहे. पण तो कचराही लाचार हास्य तोंडावर आणून आमचे मुख्यमंत्री अभिमानाने मिरवत असतात. महाराष्ट्राच्या निर्मीतीसाठी हजारो लोक धडपडत असताना नेहरूंच्या ताटाखालचे मांजर होउन यशवंतरावांनी नेहरूंच्या तोंडातील उष्टी वाक्ये महाराष्ट्रात फेकण्याचे काम केले होते. एका महान राष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले यशवंतराव चव्हाण नंतर केंद्रात संरक्षण, अर्थ, परराष्ट्र अशा अनेक खात्यांचे मंत्री झाले पण स्वाभीमान आणि मराठी बाणा कधी दिसला नाही. नेहरूंनंतर त्यांच्या कन्येने इंदिरा गांधींनी तर अक्षरश: त्यांना हाताच्या बोटावर नाचवले. नको इतका पिंगा महाराष्ट्राच्या एकेकाळच्या मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या दरबारात घातला. त्यांच्या आणीबाणीच्या काळात त्यांच्या तालावर ते नाचले. आणिबाणीनंतरच्या पराभवानंतर काँग्रेसचे जे काही लोक निवडून आले होते त्यापैकी एक यशवंतराव चव्हाण होते. त्यामुळे विरोधीपक्षनेतेपद त्यांच्याकडे होते. त्यानंतर ते उपपंतप्रधानपदापर्यंत पोहोचले होते. पण 1980 ला काँग्रेस राजवट पुन्हा सत्तेवर आली तेव्हा ते वेगळ्या काँग्रेसच्या तुकड्यावर होते. अरस काँग्रेसचा एक भाग होते. पण दोनच वर्षात ते स्वगृही परतलो म्हणत इंदिरा काँग्रेसमध्ये गेले. पण या दोन वर्षांच्या काळात महाराष्ट्राचे एकेकाळचे मुख्यमंत्री असलेल्या यशवंतरावांना फक्त मानहानीच सहन करावी लागली. ना कसली जबाबदारी ना काही. फक्त काँग्रेसचा खासदार म्हणून इंदिरा गांधींच्या मागून जाणे एवढेच हाताशी उरले होते. इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते म्हणून, उपपंतप्रधानपदार्यत पोहोचलेले नेते, विरोधीपक्ष नेतेतपद भूषवलेले नेते म्हणून पंतप्रधानपदावर महाराष्ट्राचा यशवंतरावांचा हक्क होता. पण काँग्रेसच्या लबाड लोकांनी यशवंतरावांचे नावही पुढे येउन दिले नाही. असा महाराष्ट्राचा अपमान काँग्रेसच्या नेत्यांनी सतत केला. महाराष्ट्रातून पैसा, आर्थिक  पाठबळ देण्याचे काम करायचे पण खर्च करायला परवानगी दिल्लीची. इथल्या संकटग्रस्तांना, पूरग्रस्तांना पँकेज देताना तुकडा फेकल्यासारखे काहीतरी फेकायचे. नुकसानीची दखलही न घेता किडुक मिडूक द्यायचे. त्यामुळेच यशवंतराव ते पृथ्वीराज चव्हाण महाराष्टाचा विकास झाला की र्‍हास झाला याचा विचार करण्याची गरज आहे. (26 सप्टेंबर 2011)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: