- राजकारणात आता सुसंस्कृतपणा राहिलेला नाही याबाबत केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी खंत व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर बनवण्यात येत असलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण अंतिम टप्प्यात असताना, यशवंतरावांचा संदर्भ देऊन आता राजकारणात सुसंस्कृतपणा राहिलेला नाही अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली. शरद पवारांनी व्यक्त केलेली ही खंत विचार करण्यासारखी आहे.
- शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अशा काही असंस्कृत आणि विचित्र लोकांच्या गर्दीमुळेच जास्त प्रमाणात वाढू शकत नसावा असे यावरून लक्षात येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातील कोणता सुसंस्कृतपणा शरद पवारांना जाणवला तेव्हा त्यांच्याकडे एवढी मोठी पक्षाने जबाबदारी दिलेली आहे? केवळ तोंडात जीभ दिलेली आहे याचा अर्थ काहीही बोलायचे आणि त्यासाठी का राष्ट्रवादीने त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे? सुसंस्कृतपणाचा विचार वर्षभरापूर्वी शरद पवारांच्या डोक्यात आला असता किंवा त्यावेळी त्यांना यशवंतराव चव्हाणांचे स्मरण झाले असते जितेंद्र आव्हाडांना त्यांनी प्रवक्ते केले असते का? केवळ दंगा करणे, गोंधळ घालणे आणि आपल्या पक्षाचे, स्वत:चे लक्ष वेधून घेणे ही संस्कृती त्यांनी जोपासली आहे. त्या संस्कृतीला शरद पवारांनी का जवळ केले?
- राज ठाकरेंना उत्तर देण्यासाठी खालच्या पातळीवर येण्याची गरज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना का वाटली? पाणीटंचाईने शेतकरी, ग्रामीण भाग तडफडत असताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याऐवजी पाणी द्यायचे कुठून? धरणातच पाणी नाही तर त्या धरणातच आम्ही मुतू का आता अशा तर्हेचे केलेले वक्तव्य कोणत्या सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे? हा सुसंस्कृतपणा नाही हे जर शरद पवार यांना पटत आहे तर त्यांना जवळ का केले आहे? त्यामुळे राजकारणात आता सुसंस्कृतपणा राहिलेला नाही ही संपूर्ण भारतीय राजकारणाची खंत व्यक्त केली की फक्त आपल्या पक्षाची खंत व्यक्त केली असा प्रश्न यामुळे निर्माण होतो.
- राष्ट्रवादी काँग्रेसने आपली लोकसभा उमेदवारांची यादी दोन दिवसांपूर्वी जाहीर केली. यामध्ये जे काही उमेदवार दिले आहेत त्यापैकी काही नावे ही निश्चितच उमेदवारी देण्यास योग्य अशी नाहीत. तरीही केवळ बळ आणि पैशाच्या जोरावर, दहशतीच्या जोरावर असे उमेदवार लादले जाणार असतील तर ही दहशतीची संस्कृती नेमकी कोण लादते आहे? अशा परिस्थितीत सुसंस्कृतपणाची अपेक्षा करणे किती निरर्थक आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून पद्मसिंह पाटील यांना दिलेली उमेदवारी ही कोणत्या सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे याचे उत्तर शरद पवारांना द्यावे लागेल. पद्मसिंह पाटील हे 2009 च्या निवडणुकीनंतर लगेचच तुरुंगात गेले. त्यांच्यावर असलेले आरोप हेही साधेसुधे नव्हते. तर खून, सुपारी देणे असले आरोप आहेत. त्या आरोपातून ते निर्दोष सुटलेले नाहीत. किमान निर्दोष सुटेपर्यंंत आपण पद्मसिंह पाटील यांना उमेदवारी देणार नाही असा संदेश शरद पवारांनी दिला असता तर भारतीय राजकारणाचे नाही निदान राष्ट्रवादीच्या शुद्धीकरणाचे ते प्रयत्न करत आहेत याचा मोठेपणा तरी शरद पवारांना मिळाला असता.
- पद्मसिंह पाटील यांची समजूत काढण्याइतपत मुत्सद्दीपणा निश्चितच शरद पवार यांच्यासारख्या जाणकार नेत्याकडे आहे. निर्दोष सुटल्यानंतर त्यांना कोणत्या तरी पदावर घेऊ, राज्यसभेवर पाठवू असा निर्णय घेता येणे सहज शक्य होते. पण शरद पवारांनी ते केले नाही. त्यामुळे राजकारणातील सुसंस्कृतपणा नष्ट होत चालल्याची त्यांची खंत आणि चिंता यामुळेच व्यर्थ ठरते.
- आता बाकीच्या राजकीय पक्षांकडे पाहूया. भारतीय राजकारणात प्रत्यक्षात नसले तरी राजकारणात ढवळाढवळ करणारे असे काही दिग्गज आहेत, त्यामध्ये अण्णा हजारेंचा समावेश आहे. फक्त भ्रष्टाचार आणि चारित्र्याच्या गप्पा करून सामान्य माणसाला गोंधळात टाकणारे अण्णा आपल्या आजूबाजूला असलेले लोक किती सुसंस्कृत आहेत याचा विचार कधी करतात का? चारित्र्याची सर्टिफिकेट कोणालाही देऊन आणि त्याचा प्रसार आणि विक्री करून अण्णा हजारे हे कसली संस्कृती या देशात लादत आहेत याचा विचार केला पाहिजे.
- त्यांच्याच आंदोलनातून निर्माण झालेला पक्ष आहे तो आम आदमी पार्टी हा पक्ष. या पक्षाने राजकीय अस्थिरता निर्माण करण्याची जी संस्कृती आणलेली आहे ती निश्चितच चिंतेची बाब आहे. आज संपूर्ण देशाला स्थिरता हवी आहे. विकासासाठी स्थिर सरकार ही काळाची गरज आहे. असे असताना विरोधी मतांचे विभाजन करण्यासाठी काँग्रेसच्या मदतीने आणि बाहेरच्या पैशावर हा पक्ष उभा राहतो. ही राजकीय अस्थिरतेची संस्कृती देशाला मारक अशीच आहे. शरद पवारांनी या संस्कृतीवरही बोलायला पाहिजे.
- शरद पवार हे एक महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे संयमी नेते आहेत. त्यांच्यावर कधीही टीका झाली तरी त्यांनी कायम संयम बाळगलेला आहे. आपली पातळी कधीही सोडलेली नाही. वाईट शब्दांचा वापर केलेला नाही. हा संयम सगळ्या पक्षांनी ठेवला पाहिजे याबाबत त्यांनी आग्रही भूमिका धरण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांना आपल्या पक्षापासून सुरुवात करावी लागेल.
- आज काँग्रेसचे नेते काय वाटेल ते बरळत असतात. खालच्या पातळीवर उतरून आपल्या विरोधकांवर टीका करत असतात. काँग्रेसच्या या प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी काँग्रेसला नाकारणे हाच यावर पर्याय आहे. राजकारणाचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि सुसंस्कृत राजकारणासाठी अशा प्रवृत्तींबरोबर जाणे हे चुकीचे आहे.
- शरद पवार नेमके तेच करीत आहेत. राजकारणात सुसंस्कृतपणा आणायचा असेल तर शरद पवारांना काँग्रेसची साथ सोडावी लागेल. ते धाडस त्यांनी केले तर महाराष्ट्राला त्यांचा अभिमान वाटेल. देशात ते आदरणीय असे ठरतील. यशवंतरावांचाच दाखला शरद पवारांनी दिला म्हणून आठवण करून द्यावी लागेल की 1977 च्या निवडणुकीत इंदिरा गांधींची पावले चुकीच्या मार्गाने पडत आहेत हे लक्षात आल्यावर यशवंतरावांनी इंदिरा गांधींची साथ सोडली होती.
- शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादीची निर्मिती केली तेव्हा सोनिया गांधींची साथ सोडली होती. परंतु नंतर शरद पवारांनी काँग्रेसला साथ का दिली हा खरा प्रश्न आहे. 2001-2 मध्ये देशात आपत्ती व्यवस्थापनाचा विषय आल्यावर या समितीचे प्रमुख म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी शरद पवार यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती. अटलबिहारी वाजपेयी हे तर आदरणीय नेते होते. त्यांच्या सुसंस्कृतपणाबद्दल कोणीही शंका घेणार नाही. त्यांनी ही जबाबदारी मोठ्या विश्वासाने शरद पवार यांच्यावर सोपवली असताना काँग्रेसचे सरकार आणण्याची आपत्ती शरद पवारांनी या देशावर का आणली?
- सुसंस्कृतपणाशी काडीमोड शरद पवार यांनी तिथेच घेतला होता. खरे तर शरद पवार यांनी काँग्रेसबरोबर जाण्याऐवजी तेव्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर जायला पाहिजे होते. तसे झाले असते तर आज जो असंस्कृतपणा काँग्रेसने या देशात आणला आहे ती वेळ आली नसती. अशा तर्हेची खंत व्यक्त करण्याची वेळ शरद पवारांवर आली नसती.
- काँग्रेस हा एकेकाळी सुसंस्कृत लोकांचा पक्ष होता. निवडणुकीत त्याही काळात एकमेकांवर टीका टिपण्णी होत होती. पण ती टीका अतिशय खेळकर आणि निरोगी होती. कोणाचे चारित्र्यहनन करणारी नव्हती. त्यामध्ये पुण्यातील साडेतीन शिरोमणींपैकी बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, जगन्नाथराव जोशी, जयंतराव टिळक यांच्यासारखे विद्वान लोक माहिर होते. या लोकांना ऐकण्यासाठी, त्यांची विद्वत्तापूर्ण भाषणे ऐकण्यासाठी लोक गर्दी करत होते. आता याच काँग्रेसला आणि त्यांच्या मित्र पक्षांना गर्दी कशी जमवायची हा प्रश्न पडतो.
- त्यासाठी सिनेसृष्टीतील कलाकारांना आणावे लागते. कारण वक्तृत्व हा भागच उरलेला नाही. चांगले विचार व्यक्त करणारे नेतेच नाहीत. आज ज्यांच्याकडे चांगले वक्तृत्व असलेले नेते आहेत ते पक्ष लोकांचे आशास्थान आहेत. राजकारणातील चांगले वक्ते नाहीसे होणे हाच राजकारणातील सुसंस्कृतपणा नष्ट होत चालल्याची साक्ष आहे. आज वक्ते नाहीत तर बरळणारे लोक आहेत.
- ते काँग्रेसचे नेते खुर्शिद नरेंद्र मोदी यांना नपुंसक म्हणतात. हे काय शहाणपणाचे आणि सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे काय? अशा लोकांबरोबर शरद पवार यांच्यासारखा सुसंस्कृत माणूस कसा काय जाऊ शकतो? असंगाशी संग म्हणजे प्राणाशी गाठ असते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमकुवत होण्याचे कारण तो पक्ष काँग्रेसबरोबर आहे हे आहे. काँग्रेसबरोबर गेलेले सगळे पक्ष दुबळे झाले आहेत. 2004 ला डावे कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी गेले. त्याचा फटका 2009 ला त्यांना बसला आहे. त्यातून त्यांना सावरता येणे अजून शक्य झालेले नाही.
- आज नरेंद्र मोदींवर प्रचंड टीका होते. काँग्रेस तर सातत्याने त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असते. पण नरेंद्र मोदींनी आपला संयम कधी सोडलेला नाही. काँग्रेस खालच्या पातळीला गेली म्हणून मोदी कधी घसरले आहेत का? त्यांनी फक्त विकासाच्या मुद्यावरच चर्चा केलेली आहे. नरेंद्र मोदींना नपुंसक, मौत का सौदागर असे वाटेल ते काँग्रेसकडून बोलले जात आहे.
- पण नरेंद्र मोदी त्याला कधी उत्तरही देत नाहीत. त्यामुळेच त्यांची प्रतिमा अधिक ठळक होत चाललेली आहे. हा जो सुसंस्कृतपणा त्यांनी जपला आहे त्याचा आदर शरद पवारांनी करायला काय हरकत आहे?
- राजकारणात सुसंस्कृतपणा असला पाहिजे याची जाणीव जर शरद पवारांना झालेली आहे तर त्यांनी नरेंद्र मोदींचे समर्थन करायला पाहिजे. कारण प्रचारात आणि वक्तव्यात ते कधीही असंस्कृतपणा दाखवत नाहीत. स्वत:बद्दल सांगतील, गुजरातबद्दल सांगतील, देशाबद्दल सांगतील.
- पण सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या चारित्र्यावर किंवा कसल्याही खाजगी गोष्टींबद्दल ते बोलत नाहीत. या सुसंस्कृतपणाकडे आता शरद पवारांनी उघड्या डोळ्यांनी बघितले पाहिजे.
रविवार, २० एप्रिल, २०१४
राजकारण आणि सुसंस्कृतपणा शरद पवारांना वाटणारी खंत
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा