शनिवार, १२ एप्रिल, २०१४

शरद पवारही नमो नम: म्हणतील

शरद पवारही नमो नम: म्हणतील

शरद पवारांची नरेंद्र मोदींवरची टिका ही टिका आहे की कौतुक आहे हे  समजणे तसे अवघडच आहे. कारण शरद पवार नेहमी जे बोलतात त्याच्या विरोधात काहीतरी घडत असते. त्यांचा हो म्हणजे नाही आणि नाही म्हणजे हो असतो हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे.
म्हणूनच त्यांची नरेंद्र मोदींवरची टिका ही टिका आहे की कौतुक हे समजणे तसे अवघडच. पण खर्‍या अर्थाने शरद पवारांची ही भूमिका बाहेर येईल ती 16 मेच्या निकालानंतर.
कामोठ्यातल्या सभेत शरद पवार म्हणाले नरेंद्र मोदींच्या एकट्याच्या हातात सत्ता सोपवणे धोक्याचे आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की त्यांच्या एकट्या हातात सत्ता देणे योग्य नाही तर कोणीतरी मदतीला गेले पाहिजे. त्यांच्याशी कोणीतरी जुळवून घ्यायला पाहिजे. हे जुळवून घेणारे शरद पवारांशिवाय दुसरे कोण असणार आहे?
शरद पवारांनी जेव्हा महाराष्ट्रातला दुधाचा प्रश्‍न निर्माण झाला होता तेव्हा गुजरातचे कौतुक केले होते. गुजरातमध्ये जसा एकच ब्रँड आहे तसा महाराष्ट्रातही एकच ब्रँड असला पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करून आपण गुजरात पॅटर्नकडे सरकू शकतो हे त्यांनी वर्षभरापूर्वीच दाखवून दिले होते. त्यामुळे काँग्रेसला बरं वाटावं म्हणून जरी शरद पवारांची नरेंद्र मोदींवरची टिका असली तरी ती तितकी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. याचे कारण दुधाबाबत एकच बँ्रड चालतो. मग सत्तेबाबत का चालणार नाही? अमूल दुधावरून शरद पवारांनी दिलेला हा सिग्नल फार महत्त्वाचा आहे. 
मुळात सुशीलकुमार शिंदे या आपल्यापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या नेत्याला काँग्रेसने वरचे स्थान दिले आणि आपल्याला त्यानंतरचे स्थान मिळाले याची शरद पवारांना खंत आहे. त्यामुळे त्यांनी एकदा लाल दिव्याची गाडी बंद ठेवून दिल्लीत आपली नाराजीही व्यक्त केली होती. पण नंतर त्यांनी हे शस्त्र लोकसभा निवडणुकीत वापरण्याचे ठरवले असावे. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाल्यानंतर दुसर्‍या क्रमांकाचे स्थान शरद पवारांचे असेल असा समज त्यांचा होता. पण काँग्रेसने तिसर्‍या चौथ्या क्रमांकावर शरद पवारांना बसवल्यामुळे आता शरद पवार दुसरा क्रमांक मिळवून आपण पहिल्या क्रमांकाचे नेते आहोत हे सिद्ध करायला चालले आहेत. मोदींनी पहिल्या क्रमांकाचा पक्ष असा नावलौकीक मिळवल्यावर सोळा मेच्या रात्रीत आपण पहिल्या क्रमांकाचे मित्र पक्ष मिळवणारे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवार करतील. त्यावेळी मोदींच्या एकट्याच्या हातात सत्ता देणे योग्य नाही तर आम्हीही त्यात येतो असे सांगून काँग्रेसला लाथाडून शरद पवार तिकडे गेल्याशिवाय राहणार नाहीत ही सत्यस्थिती आहे.
ठिकठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी वाढत चाललेली दरी तेच दाखवते आहे. एका मंचावर असूनही राम ठाकूर थोडेच नार्वेकरांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत? जसा त्यांनी आझम पानसरेंचा घात केला तसाच ते नार्वेकरांचा करणार आहेत. तिकडे रत्नागिरीत नीलेश राणे यांचा घात राष्ट्रवादी करणार आहेत. त्यामुळे एकमेकांना पाडण्याच्या राजकारणात शरद पवार गुजराती अमूल दुधाचा रतीब सुरू करतील आणि नमोनम: म्हणतील यात शंकाच नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: