- पिना हराम ना , पिलाना हराम ना
- पिने के बाद यारो लडखडाना हराम है
- वाहन चालवणे ही अत्यावश्यक गोष्ट आहे, निकडीची गोष्ट आहे पण त्यासाठी 18 वर्षावरील व्यक्तिंनाच परवाना सरकारकडून मिळतो. ज्या गोष्टीला आवश्यक म्हणून मान्यता दिली जाते त्यासाठीच मान्यता दिली जाते. 6 वर्ष पूर्ण झाली की पहिलीच्या वर्गात बसवले पाहिजे. मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाली की ती विवाहास योग्य ठरते. मुलाचे लग्नाचे वर्य 21 मान्य केले आहे. कायद्याप्रमाणे सज्ञान होण्याचे वय 18 मानले गेले. त्याच पंक्तीत आता महाराष्ट्र सरकारने दारू पिण्याचे वय निश्चित करून दारू पिणे हा शिष्ठाचार असल्याचे मान्य केले आहे. बिअर पिण्याचे वय 21 वर्ष निश्चित केले आहे तर वयाची पंचवीशी पूर्ण झाल्यानंतरच इतर दारू पिता येईल. याप्रमाणे यापुढची काही व्यसने असतील तर त्याचीही वयोमर्यांदा निश्चित केली म्हणजे तो गुन्हा ठरणार नाही. म्हणजे अमूक एक वयात जुगार खेळावा. माडी चढण्यासाठी तमूक इतके वय. वेगवेगळी नशीली औषधे, चरस, गांजा ओढण्याचे तमूक इतके वय. हे सगळं निश्चित होउन देत. म्हणजे या सगळ्या व्यसनात अप्रत्यक्षपणे महात्मा गांधींना हे सरकार गुंतवणार असेच दिसते आहे. हे कोणतेही व्यसन करताना नोटा मोजाव्या लागतात त्या गांधीजींचे चित्र असलेली नोट दिली जाते. वा काय मस्त कल्पना आहे. दारू प्यायलात? द्या एक गांधीछाप नोट. बिअर प्यायलात द्या एक गांधीछाप नोट. राष्ट्रपिता म्हणता म्हणता या गांधींजींच्या नावाने राष्ट्र पिता पिता भ्रष्ट करायचे धोरण काँग्रेस सरकारने आखले आहे. गुजरातमध्ये गांधीजींचे राज्य म्हणून संपूर्ण राज्यात दारू बंदी आहे. पण महाराष्ट्राला तसे करता येणे शक्य नाही. दारूचे परवाने देताना मिळणारा शासनाला आणि ते मंजूर करणार्यांना मिळणारा पैसा फार महत्त्वाचा वाटतो आहे. पुरूषांच्या हृदयाचा मार्ग ज्याप्रमाणे चहाच्या कपातून जातो त्याप्रमाणे सत्तेचा मार्ग हा दारूच्या पेल्यातून जाताना दिसत आहे. या धोरणामुळेच कार्यकर्त्यांना अधिकृत पणे पिउन धिंगाणा घालण्याची परवानगी शासनाने दिली आहे. मंदीरातून मदिरालयात भावी पिढी नेण्याचे काम महाराष्ट्र शासनाने केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात खुले आम दारूच्या जाहीराती, पोस्टर्स वर्तमानपत्रे ते टिव्हीवरून दिसायला लागली तर त्यात काही नवला वाटायला नको. काही वर्षांपूर्वी सर्वत्र झळकलेली‘ तुमच्यासारख्या मर्दाला हीची साथ हवीच’ अशा आशयाने फोर स्न्वेअर सिगारेटची जाहीरात जॅकीश्रॉफने केली होती. त्यामुळे जॅकीचे सर्व फॅन 1980 च्या दशकात सिगारेट शौकीन झाले. आता वेगवेगळ्या व्हीस्की, रम, व्होडका, जीन अशा दारूच्या प्रकारांच्या जाहीरातींची पोस्टर्स गल्लोगल्ली लागली तर त्यात आश्चर्य वाटायला नको. ‘ तुम्ही तुमच्या वयाची 21 वर्ष पूर्ण केलीत? मग या बिअरच्या जगात तुमचे स्वागत आहे’ ‘ गद्धे पंचवीशी नव्हे आता म्हणे मद्ये पंचवीशी’ वयाची 21 वर्ष पूर्ण झाल्यावर वाढदिवसाला मित्र मंडळी बिअरची बाटली गिफ्ट म्हणून देउ शकतील. पंचवीशीत आल्यावर प्रमोशन दिले जाईल आणि एक खंबा दिला जाईल. पंचाहत्तर वर्षापूर्वी राम गणेश गडकरींनी आपल्या एकच प्याला या नाटकात आर्य मदिरा मंडळाची कल्पना मांडली होती. तळीरामाच्या सुपिक डोक्यातून ही कल्पना आली होती. तसे वेगवेगळ्या मदिरामंडळाची स्थापना होउ शकते. यातून काँग्रेस सरकार एखादा सेल उभा करू शकते. अखिल भारतीय मदिरा मंडळ काँग्रेस सेल. अखिल भारतीय बिअर प्राशक मंडळ युवक काँग्रेस अशा तर्हेचे सेल तयार होतील. त्यामध्येही काही महिला सदस्यांनाही आरक्षण देण्याची व्यवस्था काँग्रेस सरकार करेल यात शंकाच नाही. या देशातील किर्तीवंताच्या गौरवासाठी राष्ट्रपतींकडून पद्म पुरूस्कार दिला जातो. त्या धर्तीवर मद्य पुरस्कार देण्याची योजनाही सरकार राबवेल यात शंकाच नाही. मद्यभूषण, मद्यश्री, मद्यविभूषण, मद्यरत्न असे पुरस्कार दिले जातील कदाचित. या देशातील सर्वात मोठा दारू उत्पादक विजय मल्ल्या याला मद्याची सर्वात मोठी विक्री करणारा उत्पादक म्हणून भारतरत्न देण्याची मागणी कदाचित काँग्रेसकडून केली जाउ शकते. वेगवेगळ्या महोत्सवातून मद्याचे प्याले किती रिचवले जातात याच्या स्पर्धा घेतल्या जातील. आंबा महोत्सवाप्रमाणे मद्याचे महोत्सवही ठिकठिकाणी भरवले जातील. कोणीतरी गिनिजबुकमध्ये आपले नाव यावे यासाठी बेसुमार मद्य प्राशनाचाही प्रयोग करण्याचा प्रयत्न करेल यात शंकाच नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दारूबंदीचा प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न केले. पण या तळीराम सरकारने सुधाकराप्रमाणे युवापिढीला दारू पिण्याचे परवाने दिले. राष्ट्रपिता ते राष्ट्र पिता पिता अशी प्रगती म्हणजे गेल्या सहा दशकातील काँग्रेस सरकारचा विकास असाच याचा अर्थ आहे. पंकज उधासच्या ‘हुई मेहेंगी बहुत ये शराब तो थोडी थोडी पिया करो’ या गाण्यावर बंदी घातली जाईल आणि ‘ जहा चार यार मिल जाये वही रात गुजर जाय’ किंवा ‘ लोग कहते है मै शराबी हूँ ही गाणी अभ्यासक्रमात येउ शकतील. अभ्यासक्रमातही‘ पिना हराम ना पिलाना हराम है, पिने के बाद यारो , लडखडाना हराम र्है’ अशी गाणी आली तर त्यात आश्चर्य वाटायला नको. विधानसभेतही अधिवेशनात मग कदाचित चहापानाने सुरूवात करण्याऐवजी मद्यपानाने सुरूवात केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात आम्हाला विरोधकांचा चहापानावर बहिष्कार ऐवजी मद्यपानावर बहिष्कार अशी बातमी छापायला लागेल हे निश्चित आहे.
- ( जून 2011 मध्ये सरकारने दारू पिण्याचे वय निश्चित केले होते. त्यावरची ही माझी प्रतिक्रिया आहे)
शुक्रवार, ११ एप्रिल, २०१४
पिना हराम ना , पिलाना हराम ना पिने के बाद यारो लडखडाना हराम है
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा