रविवार, १३ एप्रिल, २०१४

काँग्रेस विरोधात जनता एकवटली

खडकवासला येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार हर्षदा वांजळे यांचा पराभव केला. या निवडणुकीच्या निकालावरून लक्षात घेतले पाहिजे की आता काँग्रेस विरोधी वातावरण संपूर्ण देशभरातून तयार झालेले आहे. वास्तविक पाहता ही निवडणूक एरवी झाली असती तर हर्षदा वांजळे या निवडून येण्यास काहीच हरकत नव्हती. कारण एखाद्या लोकप्रतिनिधीच्या मृत्यूनंतर त्याच्या घरातील दुसरा उमेदवार  त्या रिक्त जागी होणार्‍या पोटनिवडणुकीसाठी उभा केला जातो तेव्हा त्याला तिकीट जाहीर झाल्यावरच तो अर्धी लढाई जिंकलेला असतो. अशी असंख्य उदाहरणे आपल्याकडे घडलेली आहेत. पण नेमके याचवेळी असे काय घडले की ही अर्धी लढाई जिंकल्यानंतर उरलेली अर्धी लढाई मात्र हर्षदा वांजळे यांना हरावी लागली? याचे कारण एकच की हर्षदा वांजळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असल्या तरी राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसची आघाडी असल्यामुळे काँग्रेसवरचा राग मतदारांनी काढलेला दिसून येतो. हर्षदा वांजळे यांचे पती हे मनसेचे आमदार होते. त्यांची लोकप्रियता अफाट होती. पण हर्षदा वांजळे या काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या. मनसेच्या तिकीटावर त्यांना ही निवडणूक लढवता येणे शक्य नव्हते आणि मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करून ही निवडणूक लढवली. रमेश वांजळे यांच्या पत्नी उभ्या रहात असल्यामुळे राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या दिवंगत आमदाराला श्रद्धांजली म्हणून दुसरा उमेदवार दिला नाही. पण काँग्रेस पक्षाने मात्र संधीसाधूपणा करून आपल्या पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या हर्षदा वांजळे यांना दुसर्‍या पक्षात पाठवून ती जागा हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. अशा राजकारणाच्या स्वार्थी हेतुमुळे सहानुभूतीची लाट काही केल्या निर्माण होउ शकली नाही. राष्ट्रवादीसोबत काँग्रेस असल्यामुळे मतदारांनी राष्ट्रवादीच्या हर्षदा वांजळे यांना नाकारलेले आहे हे या निवडणुकीवरून लक्षात घेतले पाहिजे. पुण्यात काँग्रेस विरोधी प्रचंड संतापाची लाट आहे. तशी ती संपूर्ण देशातही आहे. सुरेश कलमाडी यांनी केलेल्या राष्ट्रकूल भ्रष्टाचारामुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली बदनामी पाहता काँग्रेसवर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट निर्माण झालेली आहे. त्यातच काँग्रेसच्या भ्रष्ट प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी अण्णा हजारे यांनी केलेल्या आवाहनामुळे जनतेचे मत बदलले आहे. काँग्रेसला काही करून मतदान करायचे नाही या निर्णयावर जनता येउ लागली आहे. त्याचीच ही झलक आहे. या निवडणुकीत एका विशिष्ठ ठिकाणचेच मतदार होते अशातला भाग नव्हता. खडकवासला हा मतदारसंघ ग्रामीण आणि शहरी भागाचे मिश्रण असलेला मतदारसंघ होता. साधारणपणे शहरी मतदारांपेक्षा ग्रामीण भागात मतदान जास्त होते. पण या मतदानाचेवेळी दिसून आले की शहरी आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणच्या मतदानाची टक्केवारी तुलनेने सारखीच आहे. म्हणजेच शहरातील मतदानाचा टक्का वाढला आहे असे म्हणायला हरकत नाही. हा वाढलेला टक्का काँग्रेसला नाकारायला आलेला टक्का होता हे लक्षात घेणे जरूरीचे आहे. सध्या राज्य सरकार विरोधात सर्वसामान्य जनतेची प्रचंड संतापाची भावना आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न हा महाराष्ट्रात सर्वत्र फोफावलेला प्रश्‍न आहे. काही महिन्यांपुर्वी मावळ भागात जे पवना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन झाले त्या आंदोलनात पोलिसांनी सरकारच्या आदेशावरून प्रकल्पग्रस्तांवर जो लाठीमार केला, गोळीबार केला त्यामुळे काँग्रेसबद्दल प्रचंड राग जनतेच्या मनात आहे. सर्वसामान्य प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे सोडून, त्यांना त्यांचा हक्क देण्याचे सोडून त्यांच्यावर हल्ले केले जातात? त्यांचे बळी घेतले जातात ही मनाला विषण्ण करणारी घटना आहे. त्यामुळेच हा रागही मतपेटीतून मतदारांनी दाखवलेला दिसून येतो आहे. राष्ट्रवादीची काँग्रेसबरोबर युती नसती तर कदाचित हर्षदा वांजळे निवडून आल्या असत्या. पण असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ म्हणतात तो प्रकार राष्ट्रवादीच्या बाबतीत झालेला दिसून येतो. हर्षदा वांजळे या पुर्वाश्रमीच्या काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्य असत्या तरीही निकालात फरक पडला असता. त्यामुळे यावरून लक्षात घेतले पाहिजे की जनतेने, नागरिकांनी, मतदारांनी एकमुखाने काँग्रेसला सपशेल नाकारले आहे. दिवसेंदिवस हाच कल वाढत जाणार आणि संपूर्ण देशातून काँग्रेसला सत्तेवरून पायउतार व्हावे लागणार हे या निकालाने स्पष्ट झालेले आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. काँग्रेसने कायम स्वार्थाचे, सुडाचे राजकारण केले. भ्रष्टाचाराचा अतिरेक केला. युवा पिढीला हे अभिप्रेत नाही. आपल्या बापजाद्यांचा दाखला द्यायचा आणि निवडून यायचे हे दिवस संपले आता हे काँग्रेसने आता लक्षात घेतले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसलाही भविष्यात काँग्रेस बरोबर कोणत्याही निवडणुकीत आघाडी करावी की नाही याचा दहा वेळा विचार करावा लागेल. आगामी काळात राज्यात सात महापालिका आणि अनेक नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमधून काँग्रेसला नाकारण्याचे दिवस आले आहेत याचा हा सिग्नल आहे. पनवेल नगरपालिकेतही काँग्रेसला येथील मतदार पूर्णपणे नाकारतील असेच चिन्ह आहे. पैशाच्या बळावर फार काळ माणसं विकत घेता येत नाहीत हे काँग्रेसला आगामी काळात दिसून येणार आहे. बाजारसमितीच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे काँग्रेस शून्यावर येउन पोहोचली तोच निकाल पनवेल नगरपालिका निवडणुकीत दिसण्याची चिन्ह आहेत. आज रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांना लायक उमेदवार मिळत नाहीत म्हणून अन्य पक्षातील माणसे फोडून त्यांना उमेदवारीसाठी आमिषे दाखवली जात आहेत. निवडून येण्याचा निकष लावून दुसर्‍या पक्षातील वजनदार कार्यकर्त्यांना बोलावले जात आहे यातूनच सध्या जे काँग्रेसचे नगरसेवक होते त्यांच्या निष्क्रियतेचा दाखला मिळाला आहे. नागरिकांची या काँग्रेस नगरसेवकांवर नाराजी आहे हे यातून स्पष्ट दिसत आहे.  त्यामुळे सर्व पातळीवर काँग्रेस संपलेली आहे. आपल्या निष्क्रियतेमुळे काँग्रेसचे नेते आपल्या सहकारी मित्र पक्षांचे कसे नुकसान करतात याचे बोलके उदाहरण म्हणून हर्षदा रांजळे यांच्या पराभवाकडे बघावे लागेल. त्यामुळे येत्या काही दिवसात काँग्रेस विसर्जनाची तयारी करायला हरकत नाही. महात्मा गांधींचे मत होते की स्वातंत्र्यानंतर काँग्रेस विसर्जीत केली पाहिजे. पण पंडीत जवाहरलाल नेहरूंनी ती विसर्जीत करू दिली नाही. परकीयांच्या हातातून परकीयांच्याच हातात देण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. ब्रिटीशांच्या हातून सोनियांच्या हातात काँग्रेस असा या देशातील काँग्रेसचा प्रवास झाला. पण आता जनतेला समजून चुकले आहे की आता कसलीही सहानुभूतीची लाट तुम्हाला वाचवू शकणार नाही. ज्या सहानुभूतीच्या लाटेवर काँग्रेस कायम सत्तेवर आली ती लाट निर्माण करण्यासाठी जनतेचे इथून पुढे सहकार्य मिळणार नाही हे काँग्रेसने समजून घेतले पाहिजे. त्यामुळे आजमितीला या देशात काँग्रेसला घरघर लागली आहे हेच यातून दिसून येते. हा निकालाचा कल सत्ता परिवर्तनाचा नव्हता हे लक्षात घेतले पाहिजे. हरयाणातील हिस्सार पोटनिवडणुकीत भजनलाल यांच्या मृत्युनंतर त्यांच्या मुलाला जनतेने निवडून दिले. त्यामुळे संपूर्ण देशात काँग्रेस विरोधाची लाट आलेली आहे हे लक्षात घेतले पाहिजे.( ऑक्टोबर 2011)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: