शनिवार, १२ एप्रिल, २०१४

बंगाली धोतीवाल्याने मद्रासी लुंगी केली वर

गेल्या वर्षी उघडकीस आलेला आणि गेली दहा वर्ष सुरू असलेल्या जी टू स्पेक्ट्रम घोटाळ्यात माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांच्याबरोबर केंद्रिय मंत्री पी. चिंदंबरम हे सुद्धा दोषी असल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेसचे वर पासून खालपर्यंत किती बरबटले आहेत हे दिसून आले आहे. मनमोहनसिंग यांच्या नंतर स्वच्छ आणि शांत चेहरा म्हणून दक्षिण भारतात काँग्रेस घुसवण्यासाठी काँग्रेसने निर्माण केलेला मुखवटा या घटनेमुळे गळून पडला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान अर्थमंत्री प्रणव मुकर्जी यांनीच पी चिदंबरम यांची लुंगी खेचून आतलं सत्य दाखवल्याचे दिसत आहे. प्रणव मुकर्जी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की ‘या घोटाळ्यापासून ए राजा यांना पी चिदंबरम थांबवू शकले असते, पण त्यांनी थांबवलेले नाही.’ म्हणजे घोटाळा होत आहे, त्यात अपहार आहे, गोंधळ आहे हे स्पष्ट समोर दिसत असूनही, जे चालले आहे ते चुकीचे आहे हे माहित असूनही पी. चिदंबरम यांनी ए. राजांना थांबवले नाही. याचा नेमका अर्थ काय समजायचा हे लक्षात घेतले पाहिजे. यातून अनेक कंगोरे दिसून येतात. काँग्रेसच्या कारस्थानी आणि भ्रष्टाचारी राजकारणाचे पदर यातून दिसून येतात.  काँग्रेसला दक्षिणेतील विशेषत: तामिळनाडूमधील तमिळी भाषिकांना नेस्तनाबूत करण्यासाठी बदनाम करणे हाच त्यामागचा मुख्य उद्देश होता. त्यासाठी एका दगडात अनेक पक्षी मारण्याचे काम कारस्थानी सोनिया काँग्रेसने केलेले दिसून येते. महाराष्ट्राला नामोहरम केल्यानंतर तामिळनाडूला संपवण्यासाठी झालेले कारस्थान म्हणजे ए राजा यांना केलेली अटक आहे. आपल्या घटक पक्षांना साथीला घेउन केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने हा घोटाळा केला आणि वेळ आल्यावर त्यांचा बळी दिला असा प्रकार झाला आहे. तमिळी टायगर्समुळे संपूर्ण तमिळी लोकांना वेठीस धरण्याचे सूडाचे राजकारण काँग्रेसने गेल्या दहा वर्षात केले. दक्षिण भारतात काँग्रेसला घुसायचे आहे पण तेथील तमिळप्रेमिंना डावलून घुसायचे आहे. राजीव गांधींच्या हत्येत तामिळ टायगर्सचा समावेश असल्यामुळे संपूर्ण तमिळी लोकांना वेठीला धरण्याचा प्रकार काँग्रेसने केला आहे. त्यामुळेच जे जयललीता आणि करूणानिधी यांचा आलटून पालटून वापर करून एकमेकांना संपवण्यासाठी दोघांत सुंदोपसुंदी लावण्याचे काम सोनिया काँग्रेसने केले. द्रमुक आणि अद्रमुक यांना परस्पर लढवत एकमेकांना संपवण्याचे भाउबंदकीचे ब्रिटीश राजकारण सोनिया गांधींनी केले. त्या राजकारणाचाच बळी करूणानिधी ठरले, त्या राजकारणाचाच बळी ए राजा ठरले. दक्षिणेतील जास्तीत जास्त काँग्रेसचे आणि मित्र पक्षांचे नेते निरनिराळ्या लफड्यात अडकवायचे आणि त्यांना तुरुंगात पाठवायचे सत्र काँग्रेसने केले. मित्र पक्षांशी गद्दारी करण्याचे काम याठिकाणी काँग्रेसने केले.  त्यामुळेच जी टू स्पेक्ट्रम घोटाळ्यात माहित असूनही पी. चिदंबरम यांनी ए राजा यांना वाचवले नाही. गेले वर्षभर हे  प्रकरण गुलदस्त्यात राहिले. पण नंतर मात्र आता पी. चिदंबरमची अडचण वाटू लागल्यावर त्यांनाही उघडे पाडायचे काम काँग्रेसनेच केले. यामध्ये फक्त स्वार्थ आणि स्वार्थच दिसून येतो. आज चारीत्र्यवान आणि भ्रष्टाचारमुक्त असा एक तरी नेता काँग्रेसकडे दाखवायला आहे काय?  गल्लीतल्या कार्यकर्त्यांपासून ते दिल्लीतल्या कारभार्‍यापर्यंत एकतरी सज्जन म्हणून दाखवता येईल असा काँग्रेसकडे चेहरा आहे काय? केवळ पांढरे झब्बे घालायचे, पांढरे खादीचे स्वच्छ कपडे घालायचे, पांढर्‍या लुंग्या नेसायच्या म्हणजे आतला कारभार स्वच्छ आहे असे म्हणता येईल काय? पांढरे कापड प्रेतालासुद्धा गुंडाळतात. आज पांढर्‍या कापडातील काँग्रेसची ही माणसं म्हणजे प्रेताला केलेल्या साजशृंगाराप्रमाणे निर्जिव आहेत. जनता मुर्दाड आहे आणि आपण काही केले तरी चालते असा समज करून घेतलेली ही काँग्रेस आहे. त्याच वृत्तीचे पुन्हा एकदा पी. चिदंबरम यांच्या फिटलेल्या लुंगीमुळे दर्शन घडले आहे. यातून काँग्रेसने एक लक्षात घेतले पाहिजे की काँग्रेसी स्वार्थी आणि लोभी प्रवृत्तीचे दर्शन जगापुढे आले आहे. म्हणजे स्वत:ला वाचवण्यासाठी आजवर मित्रपक्षांचा बळी दिला आता स्वपक्षातील नेतेही तुमचा केव्हा बळी देतील हे सांगता येत नाही, हे प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांने लक्षात घेतले पाहिजे. जी टू स्पेक्ट्रम घोटाळ्याने द्रमुकच्या घरचे वासे फिरवले गेले. पण आज तीच आग काँग्रेसच्या घरातही लागली आहे हे निश्‍चित. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम आणि अर्थमंत्री प्रणव मुकर्जी यांच्यातील पर्यायाने काँग्रेस अंतर्गत गटबाजी आता उघड झाली आहे. काँग्रेसने जे गेल्या काही वर्षांपासून दक्षिण विरुद्ध उत्तर असे राजकारण चालवले आहे त्याचे हे स्पष्ट उदाहरण आहे. स्पेक्ट्रमचे वाटप लिलावानुसार न करता पी चिदंबरम आणि ए राजा यांनी संगनमताने आपल्या मर्जीनुसार केले हेच प्रणव मुकर्जी यांनी उघड केले आहे. प्रणव मुकर्जी यांनी या प्रकारातून पी चिदंबरम यांच्या अटकेचीच व्यूह रचना केल्याचे दिसून येते आहे. म्हणजे आपल्याच पक्षातील लोकांना अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसमध्ये कशी सुंदोपसुंदी चालू आहे हे सुद्धा या घटनेवरून दिसून येते. त्याचबरोबर  शांत आणि संयमी अशी प्रतिमा उभी करणार्‍या पी. चिदंबरम यांचा खरा चेहरा कसा आहे हे सुद्धा समोर आले आहे. पक्षाशी, आघाडीती घटक पक्षातील सहकार्‍याशी गद्दारी करणार्‍या पी चिदंबरम यांच्याकडे देशातील महत्त्वाचे असे गृह खाते आहे हे  विशेष. त्यामुळेच पी. चिदंबरम यांच्या गृह मंत्रीपदाच्या कालावधीत गेल्या दोन वर्षात सर्वाधीक दहशतवादी हल्ले झाल्याचे दिसून येत आहे. इमेल येतात, माहिती येते पण आम्ही हल्ले रोखू शकत नाही. हे का होते? कारण काँग्रेसचे नेते गृहमंत्रीपदावर आहेत. ज्यांच्यावर कोणतीही विश्‍वासार्हता नाही. याच पी चिदंबरम यांनी मागच्या पाच वर्षात अर्थमंत्री असताना देशातील बँकींग धोरण विस्कळीत केले होते. बँकांची संख्या कमी करून मोठ्या बँकांनी छोट्या बँका गिळण्याचे आणि पर्यायाने छोट्या, सामान्य लोकांच्या ताब्यात असलेल्या जनतेची आर्थिक नाडी आवळण्याचा प्रयत्न केला होता. दक्षिणेतील बँकांना मोठे करण्यासाठी चांगल्या बँका गिळंकृत करण्याचे काम या पी. चिदंबरम यांनीच केले होते. यात युनायटेड वेस्टर्न बँक ही आयडीबीआयच्या घशात घालण्याचे काम केले गेले. तसेच सांगली बँक, गणेश बँक ऑफ कुरुंदवाड अशा अनेक मोठ्या आणि चांगल्या बँका अन्य दाक्षिणात्य आणि मल्टिनॅशनल बँकांमध्ये विलीन करणे भाग पाडले. सामान्य माणसांची आर्थिक नाडी आवळणार्‍या या काँग्रेसच्या चोरांना आता तुरुंगात बसवण्याची वेळ आली आहे. 2001 मध्ये स्पेक्ट्रम खरेदीसाठी ठरवलेली 1600 कोटी रूपयांची प्रवेश फी आठ वर्षांनी म्हणजे 2008 ला आकारण्यासाठी ए राजा यांना पी चिदंबरम यांनी मान्यता दिली. ती दिली नसती तर ए राजा यांच्यावर ठपका आला नसता. ए राजा यांनी मनमानी केली असे म्हटले जाते पण अर्थमंत्री म्हणून त्यावेळी चिदंबरम त्यांना रोखू शकत होते.121 कंपन्यांना इरादा पत्र पाठवल्यानंतर फक्त पाच दिवसात चिदंबरम यांनी पंतप्रधान कार्यालयाला याबाबत कोणताही आक्षेप घेता येणार नाही असे कळवले होते. तेव्हा पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेच होते. हे सगळे प्रणव मुकर्जी यांनी उघड करून पी. चिदंबरम यांच्याभोवती फास आवळला आहे. यातून त्यांना वाचवणे आता काँग्रेसला शक्य होणार नाही. अर्थात सत्तेच्या जोरावर खर्‍याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्यात काँग्रेसचा हात कोणी धरू शकत नाही. पण तरीही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा प्रकार कोणा विरोधकांनी बाहेर काढलेला नाही तर काँग्रेसच्याच ज्येष्ठ मंत्र्याने बाहेर काढला आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणाला खोटे आणि कोणाला खरे ठरवण्यासाठी काँग्रेस पुढे येते हे पाहिले पाहिजे. ए राजा पासून सुरू झालेल्या या घोटाळ्याची व्यापी पी या चिदंबरम यांच्या नावापर्यंत पोहोचली आहे. आता ए टू झेड मधील आणखी काही नावे येतात काय? हे पहावे लागेल. पण बंगाली धोतींनी मद्रासी लुंगी वर केली आहे हे खरे.( 23 सप्टेंबर... पी चिदंबरम यांच्या मुलाविरोधात आम आदमी पार्टीने आपला उमेदवार उभा केलेला नाही. )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: