शनिवार, १२ एप्रिल, २०१४

पैशासाठी वाट्टेल ते करणार्‍या काँग्रेसनेच केला आता शिक्षण घोटाळा

काँग्रेस सरकारने महाराष्ट्रात केलेला शिक्षण घोटाळा हा महाराष्ट्राला काळीमा फासणारा घोटाळा आहे. प्रत्येक ठिकाणी घोटाळे करून भ्रष्ट मार्गाने पैसे मिळवायची चटक लागलेल्या काँग्रेसने शिक्षणासारख्या क्षेत्रात केलेला भ्रष्टाचार हा अतिशय संतापजनक आहे. पुर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यातच फक्त भ्रष्टाचार होतो असा लोकांचा समज होता. तो काँग्रेस सरकारने पूर्णपणे दूर केलेला आहे. जिथे काँग्रेस तिथे भ्रष्टाचार कसा करायचा याचे नियोजन केले जाते हेच जणू या शिक्षण घोटाळ्यावरून काँग्रेसने सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे या घोटाळ्यांची जबाबदारी घेउन शिक्षणमंत्र्यांना राजीनामा देणे भाग पाडले पाहिजे. आधिच्या शिक्षणमंत्र्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले पाहिजे. एकट्या नांदेड जिल्ह्यात 1 लाख 40 हजार बोगस विद्यार्थी असल्याचे दाखवून त्यावरचा खर्च लाटण्याचे काम या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या शाळांनी केेलेले आहे. नसलेले विद्यार्थी आहेत असे भासवून त्यांच्यासाठी जादा तुकड्या मंजूर करणे, त्यांच्यासाठी जादा शिक्षकांच्या जागा निर्माण करणे, नवी पदे भरती करणे, या मुलांसाठी पुस्तके, शालेय पोषण आहार मिळवणे अशा पद्धतीने काँग्रेसच्या शिक्षण संस्थांनी तब्बल 1 लाख चाळीस हजार विर्द्यांर्थ्यांचा पुस्तक वह्यांचा खर्च जरी विचार केला तरी हा खर्च कोट्यवधी रूपयांच्या घरात जातो. याशिवाय या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शेकडो शिक्षकांचा गलेलठ्ठ पगार अनेकवर्ष सरकारच्या तिजोरीतून लुबाडला आहे. शालेय पोषण आहारासाठी येणार्‍या धान्याचा काळाबाजार केला आहे. प्रत्येक क्षेत्र भ्रष्टाचाराच्या गर्तेत ओढून काँग्रेसने अतिशय वाईट आणि संतापजनक घोटाळा केला आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यात हा शेकडो कोटींचा घोटाळा गेली अनेकवर्ष राजरोसपणे सुरू आहे. शिक्षण मंत्र्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे घोटाळे होत असतील असे म्हणताच येणार नाही. फक्त कागदोपत्री शाळा उभ्या करायच्या आणि त्यासाठी मिळणारा शासकीय निधी वापरायचा हा प्रकार काँग्रेस नेत्यांनी प्रत्येक क्षेत्रात केलेला दिसून येतो. पुर्वी काँग्रेसच्या पुढार्‍यांनी फक्त सहकार क्षेत्रातच घोटाळे केले होते. पण सहकार बुडवून झाल्यावर आता शिक्षण क्षेत्राचे वाटोळे करायला सरकार टपले आहे. सहकारी कुकुटपालन संस्थांच्या नावाखाली रिकाम्या शेड उभ्या करायच्या आणि कोंबड्या आणि अंडी फस्त करायची आणि शासनाचा निधी लुटायचा हा प्रकार काँग्रेस नेत्यांनी वर्षानुवर्षे चालवला. त्यासाठी लागणार्‍या विमा कंपन्यांना आणि शासकीय अधिकार्‍यांना फसवण्यासाठी इकडच्या पोल्ट्रीतल्या कोंबड्या तिकडे आणि तिकडची अंडी इकडे असले प्रकार सातत्याने केले. अगदीच नाही जमले की रोगाची साथ आली आणि सगळ्या कोंबड्या मरून गेल्या असले प्रकारही या काँगी पुढार्‍यांनी केले. चार पाच वर्षांपुर्वी बर्ड फ्ल्यू नावाचा एक रोग आला होता. त्या रोगात कोंबडी खाल्याने हा रोग होतो आणि कोंबडीमुळे त्या रोगाचा प्रसार होतो म्हणून संपूर्ण देशभरातून कोंबड्या मारून टाकल्या होत्या. हा सुद्धा एक घोटाळाच होता. कोंबड्या मारल्या की रोग नष्ट झाला हे कोणाला पटेल? पण केवळ कुकुटपालन व्यवसायातील घोटाळे झाकण्यासाठी, त्याचे अनुदान लाटण्यासाठी, विमा कंपन्यांना लुबाडण्यासाठी हा प्रकार केला होता. जसे कोंबड्यांचे खुराडे रिकामे असले की या खुराड्यातील कोंबड्या  त्या खुराड्यात नेल्या जातात तशी नांदेडमध्ये काँग्रेसच्या पुढार्‍यांनी या शाळेतील मुले त्या शाळेत नेण्याचा प्रकार केला आणि तब्बल 1 लाख 40 हजार बोगस विद्यार्थी नेमून त्यांच्यावरच्या कोट्यवधी रूपयांच्या निधीचा अपहार केला आहे. याला सर्वस्वी शिक्षण खाते, शिक्षणमंत्री जबाबदार आहेत. आपल्याकडे लोकसंख्येचे आकडे अपटुडेट असताना असलेल्या संख्येपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश कसा मिळू शकला याचे गणित शिक्षण खात्याने कधी मांडलेच नाही. त्यामुळे पटावरची संख्या आणि प्रत्यक्ष संख्या याचा घोळ घालण्याचे काम केले. आज कित्येक मराठी शाळांना मंजुरी मिळावी म्हणून प्रस्ताव प्रलंबित आहेत. ज्याठिकाणी खरोखरच शाळांची आवश्यकता आहे त्या शाळांना मंजुरी देण्यासाठी शिक्षणमंत्र्यांना वेळ नाही. मराठी शाळांना मंजुरी नाकारली जाते. मात्र घोटाळे करण्यासाठी या शाळांना मात्र तातडीने परवानगी दिली जाते. याला सर्वस्वी शिक्षणमंत्रीच जबाबदार आहेत. त्यामुळे या नांदेडमधील घोटाळा प्रकरणी तत्कालीन शिक्षणमंत्र्यांवर फौजदारी गुन्हे नोंदवून कारवाई करण्याची गरज आहे. कोणता क्रायटेरिया, कोणता निकष लावून या शाळांना मान्यता दिली याचा तपास होणे गरजेचे आहे. आज ही घटना फक्त नांदेडमध्ये असल्याचे दिसत असले तरी संपूर्ण राज्यात काँग्रेस पुढार्‍यांनी हा घोटाळा केलेला असणार आहे हे निश्‍चित. त्यामुळेच जर राष्ट्रकूल घोटाळा प्रकरणी सुरेश कलमाडी यांना तुरुंगात टाकले जाते, दूरसंचार घोटाळा प्रकरणी ए. राजा यांना तुरुंगात टाकले जाते तर या महाभयंकर अशा शिक्षण घोटाळा प्रकरणी शिक्षणमंत्र्यांवरही तशीच कारवाई होणे गरजेचे आहे. आधीच्या शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या चुका पुन्हा तशाच पुढे सुरु ठेवणे आणि त्याकडे डोळेझाक करणे एवढेच शिक्षणमंत्र्यांनी केेलेले दिसते. गेल्यावर्षीपासून शाळांच्या परिक्षा न घेता, विद्यार्थ्यांना नापास न करता वरच्या वर्गात ढकलायचे धोरण आखले गेले आहे, ते सुद्धा या घोटाळ्याचाच भाग आहे. परीक्षा घेतल्या म्हणजे विद्यार्थी आणि त्यांच्या उत्तरपत्रिका दाखवणे भाग आले. त्यामुळे सरसकट एकदा शाळेत प्रवेश घेतला की त्याला वरच्या वर्गात काही येवो न येवो ढकलत रहायचे असा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला. त्यामुळे या शिक्षणघोटाळ्यात आजी माजी सर्व शिक्षणमंत्र्यांचा हात आहे हे निश्‍चित. त्यामुळे संगनमताने घोटाळा केल्याच्या कलमाखाली, मोक्काअंतर्गत या सर्वांवर कारवाई होणे गरजेचे आहे. देशात कोणत्याही राज्यात परिक्षा न घेता, नापास न करता सरसकट विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ढकलायचे आणि विद्यार्थ्यांना अनपढ करायचे धोरण फक्त महाराष्ट्र सरकारने राबवले आहे. त्यामध्ये कोणतीही तार्कीक कसोटी लढवलेली नाही. कोणताही अभ्यास केला नाही. फक्त आपले उखळ पांढरे करण्यासाठी आणि बोगस विद्यार्थ्यांना लपवण्यासाठी खर्‍या विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचे काम या सरकारने केले आहे. ही तपासणी आत्ता नेमकी नांदेड जिल्ह्यातच का केली गेली? अन्य जिल्ह्यात का केली नाही यालाही फार महत्त्व आहे. नांदेडच्या मुख्यमंत्र्यांचा आदर्श घोटाळा गाजला आणि त्यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले. त्यांच्यापाठोपाठ आता अन्य मुख्यमंत्र्यांची चौकशी सुरू झाल्यावर आधीच बदनाम झालेले नाव आणखी बदनाम करून त्याकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी ही तपासणी नांदेडमध्ये केली गेली. त्यामुळे नांदेडची माती ही घोटाळे करण्यासाठी आदर्श माती आहे हे ठसवण्यासाठी काँग्रेसने ही चाल केली आहे. पण संपूर्ण राज्यात किमान 15 लाख बोगस विद्यार्थी असण्याची शक्यता आहे. बोगस मतदार, बोगस रेशनकार्ड तयार करून काँग्रेसचे नेते निवडणुका जिंकतात आणि बोगस शाळांच्या तुकड्या निर्माण करून, बोगस शिक्षक, बोगस विद्यार्थ्यांची नावे असले धंदे करतात. निवडणुकीत काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे बोगसनामा आहे हेच लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात हा केलेला घोटाळा म्हणजे फार मोठा गुन्हा आहे. शिक्षणासाठी याच महाराष्ट्रात जोतीराव फुले यांनी आपली हयात खर्ची केली. स्त्रीशिक्षणाचा पाया सावित्रीबाईंनी घातला तो याच महाराष्ट्रात, धोंडो केशव कर्वे यांनी परीत्यक्ता आणि अनाथ मुलींसाठी शाळा सुरू केली ती याच महाराष्ट्रात, बहुजन आणि सर्वसामान्यांना खेडोपाडी शिक्षण मिळावे म्हणून रयत शिक्षण संस्थेचा वड संपूर्ण देशभरात फोफावला त्या वटवृक्षाची मुळे कर्मवीर भाउराव पाटील यांनी महाराष्ट्रातच रोवली. अशा शिक्षणासाठी आपली हयात निरपेक्ष बुद्धीने खर्च करणार्‍या महात्म्यांच्या महाराष्ट्रात काँग्रेसने स्वातंत्र्योत्तर शिक्षण घोटाळे करून पैशाचा केलेला अपहार ही अतिशय वाईट आणि संतापजनक गोष्ट आहे. महाराष्ट्राचा  हा अपमान करणार्‍या सरकारला सत्तेवरून हाकलून देण्यासाठी आता जनतेने रस्त्यावर उतरले पाहिजे.(सप्टेंबर 2011)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: