शिमगा गेला आणि कवित्त्व उरलेअण्णांचे उपोषण सुटले आणि त्या आंदोलनाची अवस्था आता शिमगा गेला आणि कवित्त्व उरले अशा पद्धतीने झाल्याचे दिसू लागले आहे. एखादे वादळ यावे तसे अण्णांनी वादळ निर्माण केले. वादळात किंवा महापुरात लोंढे यावेत तसे जनसमुदायाचे लोंढे देशभर वहात होते. पण आता तेचे लोंेढे शांत झालेले दिसत आहेत. झपाटून गेल्याप्रमाणे अण्णांच्या विचाराने प्रभावीत झाल्याप्रमाणे सरकारला, राजकारण्यांना आरोपींच्या पिंजर्यात उभे करणारे अण्णा आणि त्यांचे अनुयायी, अण्णांची टोपी घालणारे आता मात्र विचार करू लागले आहेत की आपण केले हे चांगले की वाईट? याचे कारण या अण्णांच्या आंदोलनात अण्णा जिंकले सरकार नमले असा आभास निर्माण केला गेला. मात्र प्रत्यक्षात सरकारची जीत झाल्याचे कोणालाही समजले नाही. काँग्रेसच्या राजकारणाची कल्पना कोणालाच करता येत नाही त्याप्रमाणे अण्णांचे हे आंदोलन मोडून काढण्यासाठी नरो वा कुंजरोवाचा डाव काँग्रेसकडून खेळला गेला. अण्णांच्या सर्व अटी मान्य करून नवा मसुदा तयार केला जाईल व पुढील अधिवेशनात या विधेयकावर चर्चा होईल असे सांगून अण्णांना शांत केले खरे. पण त्याचबरोबर एक मोठ्या प्रमाणात वैचारीक मंथन काँग्रेसने सुरू केले. आपल्या हातातील माध्यम सत्तेचा वापर अत्यंत व्यवस्थितपणे करून काँग्रेस धार्जिण्या म्हणवल्या जाणार्या विचारवंतांच्या वर्तमानपत्रांतून अण्णांचे कसे चुकीचे धोरण आहे हे सांगण्यासाठी अहमहमिका सुरू झाली. आपल्या देशात गेल्या काही वर्षांपासून विचारवंत हे फक्त काँग्रेसमध्येच असू शकतात हे ठसवण्याचेही प्रकार वाढीस लागलेले दिसून येतात. त्यामुळेच काँग्रेस सरकार नमल्याचे दाखवून नंतर हे आंदोलन चुकीचे कसे आहे हे दाखवण्याचा प्रकार आता सुरू झालेला आहे. प्यादे एक घर मागे घ्यायचे आणि तिरकस उंटाची चाल खेळून मात करायची असा प्रकार आता सरकारने केलेला दिसून येतो. यामध्ये काँग्रेसला साध्य करायचे आहे की गांधीजी हे गांधीजीच होते. गांधीजींचे स्वामित्व फक्त काँग्रेसकडेच असू शकते. दुसरा गांधी होणे नाही हे दाखवण्याचा अटोकाट प्रयत्न काँग्रेसने केलेला दिसून येतो आहे. त्यात काँग्रेस सरकार यशस्वीही होताना दिसते आहे. अण्णा हजारे हे दुसरे गांधी नव्हेत हे सिद्ध करून दाखवल्यावर जनलोकपाल बिलाची आवश्यकताच नाही असे सांगून त्या जनलोकपाल विधेयकाबाबत आग्रही असणारी जनता आपोआप बाजूला जाईल हा फार मोठा डाव काँग्रेसने टाकला आहे. हा टाकलेला डाव जिंकण्यासाठीच टाकलेला आहे हे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळेच अण्णा जिंकले नाहीत तर पुरते रूतले, गाळात रूतले अशी अवस्था आता झालेली दिसून येते. त्यामुळे आता विरोधकांपुढे खर्या अर्थाने प्रश्न आहे तो गाळात रूतलेल्या अण्णांना वर काढायचे की काँग्रेसचे काम सुरू ठेवायचे? अण्णांच्या आंदोलनात सर्व डावे पक्ष, उजवे पक्ष, विरोधी पक्ष उतरले होते. महात्मा गांधींच्या फोटोपुढे अण्णांनी मांडी घालून आंदोलनाला सुरूवात केली होती. सगळीकडे अण्णा हजारे म्हणजे दुसरे महात्मा गांधी अशी हवा निर्माण केली गेली. पण या देशात दुसरा महात्मा तयार होताच कामा नये, होउच शकणार नाही हे बिंबवणे अत्यंत महत्त्वाचे होते. ते काम काँग्रेसने केले. कारण आजवर महात्मा गांधींच्या नावावर, आम्ही गांधीवादी आहोत हे दाखवण्याच्या नादात काँग्रेसने सत्ता मिळवली. गांधी म्हणजेच काँग्रेस असे समिकरण झाले. अशा परिस्थितीत दुसरा गांधी तयार झाला तर विरोधकांच्या हातात तो गांधी जाणार. हा जुना गांधी विरोधात नवा गांधी हा विचार जनता करणार आणि निवडणुकीत जुना गांधी मागे पडणार याची जाणिव काँग्रेसला प्रकर्षाने झाली. त्यामुळे जनलोकपाल बाजूला सारण्यासाठी या होउ घातलेल्या नव्या गांधीला बाजूला करून त्या नव्या गांधीच्या डोक्यावरची टोपी उतरवण्याचे काम काँग्रेसने हातात घेतले. त्यासाठी आपल्या हातातील माध्यम सत्तेचा अतिशय शांतपणे वापर केलेला दिसून येतो. यामध्ये संपादकांमध्ये ज्यांना विचारवंत म्हटले जाते, म्हणजे काँग्रेस विचारवंत म्हणूनच ज्यांची ओळख आहे त्या कुमार केतकरांनी आपल्या हातात जी निपक्षपाती दैनिकाची दिव्य ज्योत हातात घेतली आहे त्या मराठी दैनिकातून अण्णांच्या पाठीराख्यांवर चांगलेच फटकारे मारले आहेत. हे फटकारे अर्थातच पाठीराख्यांना आहेतच पण त्यापेक्षा ते अण्णांना आहेत. त्यामुळे काँग्रेसने बाहेर काढलेले हे कुमार केतकरास्त्र सध्या अण्णांची हवा घालवून देण्यास पुरेशी असल्याचे दिसत आहे. कारण आता सगळीकडे याच विचारवंत मुद्यांवर चर्चा झाल्यामुळे अण्णांना चिकटून असलेले आपोआप दूर होतील यात शंकाच नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधात लढणार्या अण्णांना भ्रष्टाचाराची व्याख्याच विचारली आहे. ही भ्रष्टाचाराची व्याख्या यापुर्वी माहितीच्या अधिकाराचा कायदा होण्यापुर्वीही चर्चेत आली होती. पण कुमार केतकर यांनी मात्र केवळ घेणाराच नाही तर देणाराही तितकाच भ्रष्ट आहे असे सांगून सत्ताधारी घेत असतील तर देणारे विरोधकही भ्रष्ट आहेत असे अप्रत्यक्ष सांगून ‘हमाम में सब नंगे होते है ’ असे दाखवून दिले आहे. त्यामुळेच आपले नागडेपण दिसू नये म्हणून अण्णांच्या आडोशाला लपलेले आणि पाठीशी असलेले आपोआप दूर होतील ही चाल आहे. ती चाल काँग्रेसने केतकरास्त्र टाकून यशस्वी करण्याचे ठरवलेले दिसते. कुमार केतकर यांनी म्हटले आहे की, गांधीजी उपोषणे करत होते पण ते कधी सरकारला धमकावत नव्हते, अटी घालत नव्हते. अमूक एक तारखेपर्यंत व्हावे अशा अटी कधी महात्मा गांधींनी घातल्या नव्हत्या. महात्मा गांधी हे आत्मक्लेश करून घेत होते. आत्मक्लेश म्हणजे मनाला त्रास करून घेत होते, जनाला नाही. अशा आशयाचे मुद्दे उपस्थित करून अण्णांचे महात्म्य कमी करण्यात कुमार केतकर यांनी चांगलीच बाजी मारली. अण्णांच्या पाठीमागे असलेल्या सिव्हील सोसायटीबद्दलचा राग कुमार केतकरांनी आपल्या विचारांतून व्यक्त केला आहे. याचे कारण सांगताना केतकर म्हणतात की सिव्हील सोसायटीच्या मनात राजकारण्यांबद्दल द्वेषाची भावना होती. संसदेबद्दल घृणा होती. नेत्यांबद्दल नफरत होती. या वाक्यांना फारसा अर्थ आहे असे बिल्कूल म्हणता येणार नाही. कारण कुमार केतकर म्हणतात त्याप्रमाणे राजकारण्यांबद्दल सिव्हील सोसायटीला द्वेष होता असे असते तर त्याचा राग अन्य पक्षांना का आला नाही? तो फक्त काँग्रेसलाच का आला? कारण राजकारणी म्हणजे फक्त सत्ताधारी असा अर्थ होत नाही. राजकारण्यांमध्ये विरोधकही आले,विरोधकांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली नाही. संसदेबद्दल घृणा असण्याचे कारणच उद्भवत नाही. पण संसदेत बसलेल्या लोकांबद्दल घृणा असणे स्वाभाविक होते. केतकर म्हणतात तशी नेत्यांबद्दल नफरत नव्हती. नफरत काँग्रेसच्या नेत्यांबद्दल होती. भ्रष्टाचाराची व्याख्या तरी काय असा मुद्दा उपस्थित करून सामान्य माणसांकडून होणार्या कृतीला भ्रष्ट ठरवण्याचे काम केतकरांनी केले आहे. यामध्ये ते म्हणतात, पैसे न घेता एखाद्या विद्यार्थ्याला वशिल्याने अॅडमिशन मिळवून देणे हा सुद्धा भ्रष्टाचार आहे. पैसे न घेता ओळखीने रेल्वेत रिझर्वेशन मिळवणे हाही भ्रष्टाचारच म्हटलेला आहे. गॅस सिलेंडरवाल्यांना अडवून नंबर न लावता सिलेंडर मिळवणे हा भ्रष्टाचार असल्याचे केतकरांचे म्हणणे आहे. अशी अनेक उदाहरणे दिली आहेत. पण त्यातील ही उदाहरणे सामान्य माणसांशी संबंधीत आहेत म्हणून त्यावर चर्चा ही होणे गरजेचे आहे. शिक्षणासाठी अॅडमिशन मिळवताना ओळखीचा वापर करणे आणि त्या ओळखीतून डोनेशन कमी करण्यास भाग पाडणे हा भ्रष्टाचार कसा काय होउ शकतो? सामान्य माणूस आपल्या पोटाला चिमटा घेउन मुलांना शिकवत असतो, त्याला लुटण्याचे काम शिक्षण संस्था करत असतात. पण त्या शिक्षणसंस्थांना दिली जाणारी देणगी कमी करण्यासाठी कोणाचा वशिला, ओळख लावणे या गोष्टीला केतकर पाप संबोधतात. काँग्रेसने मांडलेली शिक्षणसंस्थांची दुकाने चालवण्यासाठी हे समर्थन आहे काय? खरं तर शिक्षण मोफत आणि कमीतकमी दरात दिले जावे असे केतकरांना का वाटत नाही? सरकारने त्यासाठी प्रयत्न करावेत आणि त्याची काटेकोरपणे अमलबजावणी व्हावी याकडे केतकर का डोळेझाक करतात? गॅसची, सिलेंडरची वारंवार टंचाई निर्माण होत असताना त्याची मुबलकता निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची नाही काय? सामान्य माणसाला घरची चूल बंद पडू नये म्हणून नंबर लावलेला असतानाही सिंलेंडर आठ ते पंधरा दिवस मिळत नसेल तर अडवून सिलेंडर घेतला म्हणून बिघडले कुठे? रेल्वे रिझर्वेशनच्या बाबतीतही तोच प्रकार आहे. सामान्य माणसांच्या या वर्तनाला भ्रष्ट ठरवून नितीशून्य वागणार्या नेत्यांची पाठराखण केतकरांनी केलेली आहे असेच यातून दिसून येते. म्हणजे अण्णा म्हणजे गांधी नव्हेत. गांधी दुसरीकडे असता कामा नयेत. अण्णाही आमच्याइतकेच भ्रष्ट आहेत. अण्णांचे समर्थन करणारे तितकेच भ्रष्ट आहेत हे दाखवताना केतकरांनी सामान्य माणूस ते अण्णा सगळेच भ्रष्ट असल्यामुळे बाकी कोणाला आंदोलनाचा अधिकार नाही, त्यामुळे काँग्रेसला नावे ठेवण्याचा कोणाला अधिकारच नाही असे दाखवून दिले आहे. सेल्स टॅक्स न घेता पावतीशिवाय वस्तू विकत घेणारा सामान्य माणूस दोषी आहे, भ्रष्ट आहे असे जेेव्हा कुमार केतकर म्हणतात तेव्हा यंत्रणेवरचा सामान्य माणसांचा विश्वास उडेलच पण प्रसारमाध्यमांवरचा आणि संपादकांवरचाही उडेल हे केतकरांनी का लक्षात घेतले नाही? बहुसंख्य केमिस्ट, औषध विक्रेते पावती देत नाहीत. पावती हवी असेल तर औषध मिळणार नाही अशी भूमिका घेतली तर औषधावाचून रोग्याने मरायचे काय हे सांगावे. सामान्य माणसाच्या हातात काहीच नसते. अशा परिस्थितीत कोणाच्या पाठीशी रहावे याचे ज्ञान त्याला होत नाही. पण याचा अर्थ तो भ्रष्टाचारी आहे असे म्हणता येणार नाही. सामान्य माणूस हा अगतीक आहे, परस्वाधीन आहे. पैसे न देता अॅडमिशन मिळवता येत नसेल, किंवा हे वशिल्याचे मार्ग वापरु शकत नसेल तर तो आपल्या मुलांना शिकवू शकणार नाही. सिंलेंडर मिळवला नाही तर उपाशी रहावे लागेल. तशी परिस्थिती कोणा राजकारण्यांवर कधी येत नसते हे केतकरांनी लक्षात घेतले पाहिजे. पण केवळ काँग्रेसचे झाकण्यासाठी अण्णांच्या आंदोलनाच्या शिमग्यानंतर हे काँग्रेसने कवित्व करण्यात काहीच अर्थ नाही.
सप्टेंबर 2011
शनिवार, १२ एप्रिल, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा