गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि राहूल गांधी यांच्यात आगामी लोकसभेच्या निवडणुका रंगतील अशा आशयाची वृत्ते सर्वच वर्तमानपत्रांमधून झळकली आहेत. नेतृत्वाच्या जिवावर निवडणुका लढवल्या जातात. काँग्रेस हा पक्ष गांधी या नावावर निवडणुका लढवत असतो. ज्यावेळी गांधी नावाचा करीष्मा त्यांच्याकडे नव्हता तेव्हा काँग्रेस सत्तेबाहेर फेकली गेली आहे. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीतील नरेंद्र मोदी विरूद्ध राहूल गांधी या सामन्यांचे अंदाज अमेरिकन संस्थेने व्यक्त करणे याचाच अर्थ काँग्रेसला मारक अशी पार्श्वभूमी झालेली दिसून येते. काँग्रेस जेव्हा जेव्हा सत्तेबाहेर गेली आहे तेव्हा तेव्हा गांधी नेतृत्त्वावरचा विश्वास उडालेला दिसून आलेला आहे. 1977 मध्ये इंदिरा आणि संजय गांधी यांच्या अत्याचारी वागण्यामुळे जनता गांधी या नावाचाच तिटकारा करू लागली होती. बोफोर्स फेअरफॅक्स प्रकरणामुळे राजीव गांधींचा तिरस्कार जनतेला वाटला आणि 1989 मध्ये काँग्रेसला बाजूला ठेवले. त्यानंतर राजीव हत्येच्या लाटेमुळे पुन्हा सरकार काँग्रेसचे आले तरी उरलेल्या पाच वर्षात काँग्रेसची अधोगती होत गेली. भ्रष्टाचार विकोपाला गेला. तशीच परिस्थिती आज आहे. त्यामुळे स्वच्छ प्रतिमेच्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाजपाला संधी मिळू लागली. गांधी या नावाशिवाय काँग्रेसची जादू चालत नाही हे लक्षात आल्यावर सोनिया लाओ देश बचाओ ची घोषणा देत लाचार काँगी नेत्यांनी सोनिया गांधींना राजकारणात आणले. सोनिया गांधींना काँग्रेसचे मॉडेल बनवून इंडोइटालियन काँग्रेसची स्थापना केली. त्याला गांधी हे सोनरी मुलामा लावलेले नाव जोडले आणि पुन्हा सत्ता मिळवली. पण आज हेच गांधी नाव काँग्रेसला वाचवू शकणार नाही याची भिती काँग्रेसमध्ये वाटू लागली आहे. काँग्रेसने कायम बाटल्या बदलण्याचे काम केले. नवे लेबल लावून नव्या बाटलीत जुनी दारू भरण्याचे काम काँग्रेसने केले. नेहरूंनंतर इंदिरा, इंदिरा गांधींनंतर राजीव, राजीव गांधींनंतर सोनिया आणि आता सोनियांची जादू चालेनाशी झाल्यावर पुन्हा राहूल नावाचे नवे लेबल नव्या दारूच्या बाटलीवर चिकटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीत काँग्रेसला राहूल गांधींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. साहजीकच जागतीक पातळीवर याबाबत चर्चा सुरू झाली. राहूल गांधी हे या निवडणुकांचे आव्हान पेलू शकणार नाहीत. परंतु प्रबळ विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष हा नेतृत्त्वापासून हेलकावे घेताना दिसत आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नंतर पंतप्रधानपदाचे नेते कोण असतील हे सांगण्याचे धाडस 2009 च्या निवडणुकीत केले नाही त्यामुळे नेतृत्त्वहीन निवडणुका लढवताना साहजीकच त्यांचे संख्याबळ कमी झाले. भाजपने अडवाणी, राजनाथसिंग, सुषमा स्वराज अशी अनेक नावे पुढे करण्याचा बहाणा केला पण संपूर्ण देशभरातून अटलजींप्रमाणे जनता प्रेम करेल असे एकही नाव त्यात नव्हते. भाजपची हीच कमजोरी हेरून काँग्रेसने आपल्या नेतृत्त्वाचा उदोउदो केला. पण तेच नेतृत्त्व आज भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकल्यामुळे लोकांना नकोसे झाले. आज आजारी म्हणून सोनिया गांधी काही बोलत नाहीत. पण प्रत्यक्षात काँग्रेस आज अंथरूणाला धरून बसली आहे अशी अवस्था आहे. साहजीकच भाजप आणि काँग्रेस यांची सारखीच अवस्था झाली. त्यामुळे आता कोणाच्या नेतृत्त्वाखाली या दोन आघाड्या निवडणुका लढवणार याबाबत देशविदेशात चर्चा सुरू झाल्या. भांडवली बाजारात राजकीय सुरक्षितता आणि स्थैर्य याला फार महत्त्व असते. अमेरिका, फ्रान्स सारख्या देशातील मोठ्या प्रमाणावर होणारी गुंतवणूक ही देशाच्या स्थैर्यावर अवलंबून असते. देशात स्थैर्य असेल तरच बाहेरच्या देशातील गुंतवणूक होउ शकते. त्यामुळे नेतृत्त्वहीन काँग्रेसची धुरा सध्या राहूल गांधींकडे येत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसपेक्षा प्रबळ नेतृत्त्व भाजप उभे करू शकते काय, याचा अंदाज अमेरिकेसारखे भांडवलदार देश घेउ लागले. त्याचवेळी अमेरिकेला नरेंद्र मोदी हे भाजपचे संभाव्य नेते असू शकतात याचा सुगावा लागला. त्यामुळे मोदी विरोधात राहुल गांधी या सामन्याची चुणूक आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसली. यामध्ये मोदींचे पारडे खूप म्हणजे खूपच जड असल्याचे दिसून आले आहे. नरेंद्र मोदींनी काँग्रेसकडून गेल्या तीन टर्ममध्ये जी गुजरातची सत्ता खेचून आणली आहे त्यात काँग्रेसला पुन्हा वर डोके काढायला कुठे संधीच दिलेली नाही. कारण त्यांनी कामच इतके जबरदस्त केले आहे की संपूर्ण देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जो तो नरेंद्र मोदींची स्तुती करतो आहे. नरेंद्र मोदींच्या कामाने भारावून जाताना दिसत आहे. त्या तुलनेत राहूल गांधीकडे कोणतीच जमेची बाजू नाही. नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने गुजरातचा विकास केला आहे त्याने संपूर्ण देश प्रभावीत झाला आहे. जो तो नरेंद्र मोदींपासून प्रेरणा घेताना दिसत आहे. नरेंद्र मोदींची प्रेरणा घेउन बिहारचा विकास झाला आहे. नितिशकुमार यांनीही चांगली कामगिरी केलेली दिसून येत आहे. नरेंद्र मोदी यांनी प्रशासन गतिमान केले आहे. या गतीमानतेमुळे लाल फितीत अडकलेला कारभार संपुष्टात आला आहे. गुजरातमध्ये भ्रष्टाचार कमी झाला आहे. या सर्व आघाड्यांवर आज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे अण्णा हजारेंच्या स्वप्नातील नेतृत्त्व ठरतात. अशा परिस्थितीत राहूल गांधी कुठेच दिसत नाहीत. खुपच खुजे आहेत. केवळ गांधी या नावाचे भांडवल त्यांच्याकडे आहे. वायफळ आणि निरर्थक वक्तव्ये करणे याशिवाय त्यांना काहीच येत नाही. कसलेही मंत्रीपद त्यांनी सांभाळलेले नाही. त्यामुळे राहूल गांधींना कसलाच अनुभव नाही. कोणतेही काम करण्याची क्षमता त्यांच्यात नाही. सरकार भ्रष्टाचार संपवू शकणार नाही. सरकार दहशतवाद कमी करू शकणार नाही अशी वक्तव्ये करून राहूल गांधींनी आपली अकार्यक्षमता, अपात्रता, डिसअॅबिलीटी सिद्ध करून दाखवली आहे. या उलट दंगली कशा रोखायच्या असतात, राज्यात शांतता कशी निर्माण करायची असते हे नरेंद्र मोदींनी दाखवून दिले आहे. गुजरातमध्ये गोध्रा दंगलीनंतर परत कधीही दंगल घडली नाही. राज्याने नरेंद्र मोदींचे नेतृत्त्व निर्विवाद मान्य केले आणि विकासपुरूष अशी त्यांची प्रतिमा त्यांनी सिद्ध करून दाखवली. याचवेळी गुजरात आणि गोध्राचे खलनायक अशी प्रतिमा उभी करण्याचे कारस्थान काँग्रेसने केले. गुजरातमधील गोध्राची दंगल मोदींनी घडवली असे आरोप करून नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला गेला. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजप विरोधात प्रचार करताना काँग्रेसने देशभरातल्या विविध निवडणुकीत त्याची चित्रफीती दाखवून रात्रीत मते फिरवण्याचा प्रयत्न केला. गुजरातमध्ये त्याचा कणभरही परीणाम झाला नाही. मात्र अन्य भारतात भाजपला त्याचा फटका बसला कारण सत्य परिस्थितीत काँग्रेसने पुढे येउ दिली नाही. चांगल्या व्यक्तिमत्त्वांना बदनाम करायचे, चांगल्या व्यक्तींना बदनाम करायचे, विरोधी पक्षांना भ्रष्ट ठरवायचे कारस्थान गल्ली ते दिल्ली काँग्रेसवाले करताना दिसत आहेत. पण मोदींनी गुजरातमध्ये सातत्याने स्थीर सरकार दिले. काँग्रेसचे दहशतवादी सर्व देशात धुमाकूळ घालत असताना गुजरातमध्ये गृहखाते दक्ष राहिलेले दिसले. नरेंद्र मोदींच्या आधी पंधरा वर्षांपुर्वी गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता असताना अहमदाबाद, बडोदा अशा ठिकाणी बाँम्बस्फोटाच्या घटना घडल्या आहेत. दंगली घडत होत्या. पण नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर गुजरात हे शांत राज्य अशी ख्याती निर्माण झाली. व्यापार, उद्योगाला प्रचंड चालना मिळाली. त्यामुळे सर्वात प्रगत आणि जास्त महसूल देणारे राज्य अशी त्याची ख्याती झाली. त्यामुळे या नेतृत्त्वाखाली भाजपाने निवडणुका लढवल्या तर भाजपला एकहाती सत्ता मिळू शकते. त्यामुळे देशभरातील सर्व वर्तमानपत्रांतून आज झळकलेले राहूल विरूद्ध नरेंद्र मोदी या आगामी निवडणुकीतील सामन्याच्या शक्यतेने काँग्रेसचे धाबे दणाणले नसतील तरच नवल म्हणावे लागेल. अमेरिकेसारख्या देशातील कंपनीने आपल्या सर्वेक्षणातून हा अहवाल प्रसिद्ध करून मोदींची केलेली स्तुती म्हणजे काँग्रेसचा पराभव आहेच. पण अमेरिकेनेही मोदींपुढे लोटांगण घातल्याचे दिसून येते. ज्या नरेंद्र मोदींना अमेरिकेने व्हीसा नाकारला होता त्याच अमेरिकेला मोदींची दखल घेण्यास भाग पडणे म्हणजे नरेंद्र मोदींच्या कार्याने भांडवलदार प्रवृत्तीचा केलेला हा पराभवच म्हणावा लागेल. मोदी विरूद्ध काँग्रेसची अंदाधुंदी असा हा सामना असणार आहे. काँग्रेसच्या अंदाधुंद कारभाराला लगाम घालण्यासाठी भाजपाने मोदींचे शस्त्र वापरले तर दिल्ली दूर नाही हे लक्षात घ्यावे.(16 सप्टेंबर 2011)
शनिवार, १२ एप्रिल, २०१४
भाजपचे मोदी विरूद्ध काँग्रेसचे अंदाधुंदी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा