शनिवार, १२ एप्रिल, २०१४

ढोल कोण वाजवतोय आणि आक्रोश कुणाचा दडपतोय?

नरेंद्र मोदी यांच्या उपोषणाने काँग्रेस पक्षाला बहुदा धडकी भरली असावी. कारण काँग्रेसच्या नेत्यांची राज्यभरातील मोठ्या दैनिकांमधून या उपोषणाची खिल्ली उडवली जात आहे. स्वत: विकास करायचा नाही, फक्त भ्रष्टाचार करायचा आणि दुसरा विकास करत असेल तर त्याला नावे ठेवायची ही काँग्रेसची कार्यप्रणाली आहे. गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी जे करून दाखवले त्याप्रकारचा विकास काँग्रेसला त्यापुर्वी गुजरातमध्ये सत्ता असताना कधीही करता आला नव्हता. पण मोदींच्या कार्याने काँग्रेस भयभीत झाली आणि त्यांच्या सद्भावना या उपोषणावर टीका करण्याचे सत्र आरंभले. आपल्या हातात असलेल्या प्रसारमाध्यमांचा कायमच दुरूपयोग करण्यासाठी चटावलेल्या काँग्रेसने हा प्रकार चालवला आहे. काँग्रेसच्या नेत्यांचे असलेले महाराष्ट्रातील महादैनिक म्हणवणार्‍या दर्डा बंधूंच्या वर्तमानपत्रात गुजरात दंगलीचे आक्रोश अजूनही इतके होत आहेत की ते लोकांना ऐकू जाउ नये म्हणून मोदींचे उपोषण आहे. इतके जोरात ढोल वाजवायचे की त्या ढोलात आक्रोश ऐकायला येणार नाहीत असा हा प्रकार असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात आपण ज्या प्रकारचा चष्मा वापरतो तसे आपल्याला दिसते हेच यातून दिसून येते. काँग्रेसने कायमच ही दृष्टी ठेवलेली दिसून येते. पण बोलायचे एक आणि करायचे एक ही काँग्रेस नेत्यांची करतूद आहे. तोच प्रकार दर्डाशेठनी आपल्या दैनिकांतून केलेला दिसतो. मोदींच्या सदभावनेची टर उडवत लोकमतने मोंदींकडे जात असलेले जनमत रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. पण जर मोदींची ही चूक आहे असे वाटत होते, मोदींचे हे उपोषणाचे नाटक आहे असे वाटत होते तर सर्व आवृत्त्यांसाठी गेले दोन ते तीन दिवस नरेंद्र मोदींच्या या उपोषणाच्या पूर्ण पानाच्या रंगित जाहीराती का आपल्या वर्तमानपत्रातून लोकमतने प्रसिद्ध केल्या हे जाहीर केले पाहिजे. कोणत्याही जाहीराती घेणे हा जरी लोकमतचा धर्म असला तरी नैतिकतेचा आणि आपला काही संबंधच नाही असे वर्तन मात्र योग्य नाही. आम्ही नरेंद्र मोदींच्या जाहीराती नाकारून सदभावनेचे नाटक करणार्‍यांना धडा शिकवला असे जाहीर करू शकले असते. वास्तविक पाहता गुजरातमधील उपोषणाच्या जाहीरात महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांतून असण्याचे काहीच कारण नव्हते. पण नितीशून्यता हाच व्यवहार बनलेल्या या प्रसारमाध्यमांनी, तमाम जनता आज नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचे स्वागत करीत असताना, आपल्याच दैनिकातून त्यांच्यावर टीका करण्याचा अधमपणा करताना दिसत आहे. एकीकडून लाखो रूपयांच्या गुजरात सरकारच्या नरेंद्र मोदींच्या जाहीराती घ्यायच्या आणि वर त्यांच्यावर टिका करायची. ती केवळ आम्ही किती परखड आहोत हे दाखवण्यासाठी करायची. आम्ही विकले गेलो नाही तर जाहीरात आणि आमची मते वेगळी आहेत हे दाखवण्यासाठी खोटी टिका करायची हे नितीशून्यतेचे लक्षण आहे. अण्णा हजारेंच्या उपोषणावरही गेल्या महिन्यात या दैनिकाने टिका करून काँग्रेसची तळी उचलण्याचा प्रकार केला आहे. जोरात ढोल वाजवून आक्रोश ऐकू जाउ दिले जात नाहीत हे म्हणणे काँग्रेसची भूमिका असू शकते. कारण इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख लोकांचा जो काँग्रेसने संहार केला होता त्याचे समर्थन राजीव गांधींपासून ते तमाम लाचार काँग्रेस नेत्यांनी केले होते. त्यावेळी एखादा वटवृक्ष कोसळतो तेव्हा त्याच्याखाली काही जीव जाणारच असे वक्तव्य करून काँग्रेसने शीखांच्या हत्याकांडाची कृती बरोबर असल्याचे म्हटले होते. त्या दिवसापासून शीख समाज काँग्रेसपासून दूर गेला होता. तो जवळ करण्यासाठी आणि पंजाबमधील काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी 2004 साली मनमोहनसिंग यांना पंतप्रधानपद दिले गेले. याला म्हणतात आक्रोश ऐकू येउ नयेत म्हणून मोठ्याने ढोल बजावणे. ही निती कायम काँग्रेसने अवलंबल्यामुळे नरेंद्र मोदींच्या कृतीचाही तोच अर्थ लावला गेला. गुजरातमध्ये कच्छ, सौराष्ट्र आणि अन्य प्रांतात राहणार्‍या गुजराती जनतेत जैन समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्या पर्युषण पर्वात हे लोक दरवर्षी भाद्रपद महिन्यात म्हणजे गणपती बसण्याच्या आधी एक दोन दिवस हे पर्युषण पर्व साजरे करतात. यात क्षमापना म्हणून एक कार्यक्रम असतो. आपल्या हातून वर्षभरात कळत नकळत, ज्ञात अज्ञातपणे कोणाची मने दुखावली गेली असतील, शारीरीक अथवा मानसिक हिंसा झाली असेल तर त्याबाबत क्षमा मागण्याचा कार्यक्रम असतो. याला क्षमापना कार्यक्रम म्हणतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात क्षमापना कार्डही या सुमारास बाजारात विक्रीला येत असतात. या काळात आपल्याकडील नोकर, चाकर आणि सर्वसामान्यांची सुद्धा क्षमा मागून त्यांचे तोंड गोड करण्याची पद्धत या गुजरातमध्ये आहे. त्याआधी उपोषण केले जाते. हे लोकमतच्या लोकांना माहित नसेल असे म्हणता येणार नाही कारण आपण वर्षभर केलेल्या पापांची क्षमायाचना दरवर्षी राजेंद्रभाई आणि विजय भाई दर्डा आपल्या सर्व आवृत्त्यांमधून मागत असतात. मग वर्षभर झालेल्या चुकांची क्षमायाचना करणारे दर्डा बंधू बरोबर आणि बाकीचे चूक असे कसे म्हणता येईल? काँग्रेसने नरेंद्र मोदींना गेल्या दहा वर्षात गोध्राचे खलनायक ठरवण्याचा प्रचंड आटापिटा केला. अर्थात हा आटापिटा गुजराती जनतेने हाणून पाडला. सतत तीन वेळेला वाढत्या संख्येने गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनाच तेथील जनतेने कौल दिला. असे असताना ज्ञात अज्ञातपणे गुजरातमध्ये झालेल्या हत्या किंवा दुखावलेली मने सांधण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी जर सद्भावना उपोषण केले तर ते मुळीच चुकीचे नाही. मात्र केवळ काँग्रेसला पोटदुखी होते म्हणून पक्षश्रेष्ठींची मर्जी संपादन करण्यासाठी नरेंद्र मोदींवर टिका करण्याचे काम दर्डा बंधूंनी आपल्या वर्तमानपत्रांतून केलेले दिसून येते. हे नितीशून्य पत्रकारीतेचे ज्वलंत उदाहरण म्हणावे लागेल. पण आपल्या हातात असलेल्या वर्तमानपत्रांना पकडून आणि पगारी कार्यकर्ते संपादकांना पकडून काँग्रेस विरोधकांचे खच्चीकरण करण्याचे कसे प्रयत्न करते हे आता जनतेने पाहिले पाहिजे. काँग्रेस पक्ष जर एवढा नितीमान आणि प्रामाणिक होता तर पक्षाने नरेंद्र मोदींच्या जाहीराती घेउ नयेत असे का सांगितले नाही? तुमची दैनिके पैशासाठी कोणालाही हाताशी धरू नयेत म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणून पक्षाने का आधार दिला नाही? आज ही काँग्रेसची वर्तमानपत्रे पैशासाठी वाटेल त्या जाहीराती घेत आहेत. त्यामध्ये दर्डाशेठ यांच्या वर्तमानपत्रांचा पुढाकार आहे. आज जेवढ्या फसवणूकीच्या जाहीराती येतात त्यात दर्डांच्या वर्तमानपत्रांची आघाडी आहे. यामध्ये फ्रेंडशिप क्लब असतील नाहीतर कुठे मार्केटींगच्या जाहीराती असतील. बनावट वैद्य, जोतीषी, बोगस औषधांच्या फसवणुकीच्या जाहीराती मोठ्या प्रमाणात आहेत. वर्षभर या जाहीराती छापायच्या आणि दर आठवड्याला एक चौकट टाकायची की, या जाहीरातीतील मजकूराशी संपादक सहमत नाहीत, त्यावरून व्यवहार करताना खात्री करून घ्यावी असे म्हणायचे. हा निव्वळ खोटारडेपणा आहे. आज अनेक फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी सापडत नाहीत. पण ते जाहीराती देण्यासाठी नियमीत या कार्यालयात येत असतात. अशी निती अवलंबणार्‍यांनी विकासकामे करणार्‍या नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करणे कितपत योग्य आहे याचा विचार जनतेने आणि वाचकांनी केला पाहिजे. आधी आपण वाजवत असलेल्या फुसक्या ढोलांमधून फसवणूक झालेल्या जनतेचा आक्रोश लोकांपर्यंत जातो आहे हे लक्षात घ्यावे आणि मगच नरेंद्र मोदींवर टिका करण्याचे धाडस काँग्रेसच्या बुरखाधारी वर्तमानपत्रांनी करावे. ( 20 सप्टेंबर 2011)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: