- 16 व्या लोकसभेसाठी होत असलेल्या निवडणूक प्रचारादरम्यान बेताल, भंपक आणि निर्लज्ज विधाने करणार्या नेत्यांना पुरस्कार द्यायचे ठरले तर काँग्रेसच्या भंपक नेत्यांमध्ये त्यासाठीदेखील मोठी चुरस निर्माण होईल. या काँग्रेसच्या वक्तव्यांमुळे त्याला टोल्याला प्रतिटोला देण्याच्या नादात विरोधकांनाही घसरावे लागते. त्याचा परिणाम दोन दिवसांपूर्वी रामदेव बाबांनी केलेले वक्तव्य. रामदेव बाबांचा निषेध करून हे संपणार आहे काय? याची सुरूवात ज्या काँग्रेस नेत्यांनी केलेली आहे त्याचाही शोध घेतला पाहिजे. अशा बेताल आणि वाचाळ नेत्यांपासून देशाला वाचवण्याची गरज आहे. कारण आपल्याकडे समर्थांनीच म्हटले आहे की, ‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे’
- नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर झाल्यावर काँग्रेसने एकच लक्ष केले. नरेंद्र मोदींवर सातत्याने खालच्या पातळीवर टिका केली. आपल्या प्रसारमाध्यमांना वेठीला धरून सतत टिका करण्यास सुरूवात केली. कुमार केतकर, निखिल वागळे यांच्यासारखे पत्रकार मोदी द्वेषाने पछाडले. काँग्रेसचे नेते मूर्खपणा करत असताना आपणही त्यांची तळी उचलायची हे कितपत योग्य आहे? ज्येष्ठ म्हणवणार्या पत्रकारांनी वाहिन्यांवरून केलेली चर्चा आणि काँग्रेस नेत्यांचा हा प्रकार व्यर्थ वाचाळपणा आहे.
- एखाद्या व्यक्तिबाबत इतकी द्वेषमूलक, समाजात फूट पाडणारी आणि वैयक्तिक बाबी चव्हाट्यावर आणणारी विधाने सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी केली आहेत. एकाला झाकावे आणि दुसर्याला पुढे करावे, अशी परिस्थिती नाही. पण एखाद्याच्या खाजगी आयुष्यात डोकावायलाही या चिखलफेकीत कमी केले नाही. नरेंद्र मोदींच्या लग्नाचा, त्यांच्या पत्नीचा विषय अकारण आणून मूळ मुद्यांकडून लक्ष हटवण्याचे काम काँग्रेसने केले. देशातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांना हात घालण्यात अपयश आले आणि त्या प्रश्नांची तड लागू शकत नाही म्हटल्यावर आपले अपयश झाकण्यासाठी नेत्यांकडून बेताल विधाने होऊ लागतात. हा क्रियेविण वाचाळतेचा नमुना आहे.
- विरोधकही यात कमी नव्हते. निवडणुकीचे मुद्दे सोडून नको त्या मुद्यांवर घसरण्याची वेळही परस्परविरोधामुळे आणि काँग्रेस विरोधात एकजूट न झाल्यामुळे या निवडणुकीत दिसून आले. म्हणजे मराठी माणसाचा कैवार घेऊन लढत असल्याचे भासवणार्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी तर महाराष्ट्रातील विकासाच्या प्रश्नांऐवजी आरोग्यदायी सूप आणि तळकट वडे घेऊनच भांडायला सुरुवात केली. भावनिक साद ऐकून किती वेळा प्रतिसाद द्यायचा, असा प्रश्न मराठी जनतेला पडला आहे. आता काहीतरी करा नाहीतर तुमची अवस्थाहसी काँग्रेसप्रमाणे क्रियेविण वाचाळता आहे असे जनता समजेल.
- तोच प्रकार शरद पवार यांचाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तर शाई पुसून दुबार मतदान करण्याचा धक्कादायक सल्ला मतदारांना दिला. वर्षानुवर्षे सगळी सत्तास्थाने ताब्यात असूनही राज्यातील ऊस उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकर्यांना केंद्रीय कृषिमंत्री न्याय देऊ शकलेले नाहीत. लिटरला वीस-पंचवीस रुपये भाव मिळणार असेल तर शेतकर्याच्या बायकांनी रोज शेणामुतात कशाला हात घालायचा, या राजू शेट्टींच्या प्रश्नाला पवारांना समर्पक उत्तर देता येत नाही. मग दुबार मतदानाचा विनोद करण्याची पाळी त्यांच्यावर येते. गेली पंचेचाळीस वर्षे लोकांमधून निवडून येत असल्याचे पवार अभिमानाने सांगतात. पण हे निवडून येणे किती निखळ होते, हे आता वेगवेगळ्या वक्तव्यांतून दिसू लागले आहे. इतक्या वर्षांत बारामती तालुक्यातील 21 गावांचा पाणीप्रश्न सुटत नाही. पाण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने लढा देऊन कंटाळलेले ग्रामस्थ मग पवारांच्या वाढदिवसाला काळ्या कापडाच्या गुढ्या उभारतात तेव्हा पवारांना तो अपमान वाटतो. पाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेण्याऐवजी आणि निश्चित मुदतीत पाणी देण्याचा वायदा करण्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार मतदानाच्या आदल्या रात्री जाऊन ग्रामस्थांना दमदाटी करतात हे दीर्घकाळ सत्ता भोगल्याचा आणि धनशक्तीचा माज आहे, हे आता लपून राहिलेले नाही. ही वाचाळता काय कामाची?
- सप्टेंबर 2013 मध्ये उत्तर प्रदेशातील मुझ्झफरनगरमध्ये हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या. त्यात 49 जणांना प्राण गमवावे लागले. या दंगलीचा तुम्हाला बदला घ्यायचा असेल तर भाजपला मतदान करा, असे खुलेआम आवाहन अमित शहा यांनी केले होते. अशी वक्तव्ये करून नरेंद्र मोदींच्या वाटेत काटे पसरण्याचे काम भाजपचे नेते करत आहेत. नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचा हा अंतर्गत प्रयत्न वाटतो. नरेंद्र मोदींच्या पाठोपाठ क्रमांक दोनचे स्थान असलेल्या नेत्याच्या मनात बदला घेण्याचे विचार घोळत असतात असा संदेश जाणे हे फार भयानक आहे.
- भाजपचे आणखी एक बुद्धिवंत नेते गिरिराजसिंह यांनी तर निवडणुकीच्या निकालानंतर मोदींच्या विरोधकांना पाकिस्तानात पाठवण्याची बेताल भूमिका मांडली आहे. एकूणच या नेत्यांचा बुद्ध्यांक तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंबईत शिवसेनेच्या रामदास कदमांनीही मोदींच्या सभेत असेच विचित्र विधान केले होते. नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याच्या नावाखाली कसल्या घाणेरड्या अपेक्षा यातून व्यक्त होतात? अर्थात या सर्वांना नंतर नरेंद्र मोदींनी टोकले. त्यांचा निषेधही केला. पण हे काही योग्य नाही. आसपासच्या लोकांची वक्तव्ये सांभाळण्यातच नरेंद्र मोदींनी वेळ वाया घालवायचा का? मग काँग्रेस आणि भाजपत फरक तो काय? अशी बेताल वक्तव्ये करणार्या या नेत्यांच्या मागे असे किती जनमत असते की त्यांनी वाट्टेल ती बेताल विधाने करावीत आणि पक्षाने आणि देशानेदेखील अशी निर्बुद्ध विधाने ऐकून घ्यावीत? पुन्हा लोक मागे असणे म्हणजे काहीही बरळण्याचा अधिकार मिळत नाही हेदेखील या नेतेमंडळींनी लक्षात घेतले पाहिजे.
- समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, अबू आझमी हे तर अजूनही सोळाव्या शतकातच असल्याप्रमाणे अकलेचे तारे तोडत असतात. बलात्कार करणार्यांना पाठीशी घालताना मुलांकडून चुका होतात, असे मुलायमसिंह म्हणाले होते. त्याचबरोबर बलात्कार करणार्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यासही त्यांनी विरोध केला होता. अबू आझमी यांनी तर बलात्कार करणार्याबरोबरच या गुन्ह्यात बळी पडलेल्या स्त्रीलादेखील फासावर लटकवावे, असे भंपक विधान केले होते. का अशा नेत्यांना लोक निवडून देतात? या भंपकांच्या या विधानांकडे गांभिर्याने पहायला पाहिजे.
- तमाम भारतीयांना अभिमान वाटावा अशी भारतीय लष्कराची कामगिरी आहे. असे असताना कारगिलमधील शिखरे मुस्लिम सैनिकांनी परत मिळवली, असे धार्मिक विद्वेष पसरवणारे विधान समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केले. आपण जातीयतेच्या चिखलात लोळत असताना लष्करालाही त्यात ओढण्याचा प्रयत्न आझम खान यांनी केला आहे. लष्करातील सैनिकाचे रक्त ना कोणत्याही रंगाचे असते. सैनिकाला जात, धर्म नसतो. फक्त तो देशासाठी जगत असतो. देशासाठी प्राणांच्या आहुती देतो. असे असताना जातीपातीत आणि धर्मात सैनिकांना विभागण्याचे वक्तव्य करणार्या आझमखान सारख्या बेतालांमुळे या देशात अराजक माजू शकते. त्यांना वेळीच रोखणे आवश्यक आहे.
- राजकारण आणि योग याच्या कुंपणावर बसलेल्या रामदेवबाबांसारख्या नेत्यांनी आपली उरलीसुरली अब्रू अशाच एका विधानाने घालवली. राजस्थानातील अल्वर मतदारसंघात त्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा करून त्यांचे शिष्य महंत चांदनाथ यांच्यासाठी भाजपची उमेदवारी आणली. आता प्रचार टिपेला पोहोचला असताना मतदारसंघात पैसा येण्यात अडचणी निर्माण झाल्याने या दोघांत जो संवाद झाला तो जगाने ऐकला. चांदनाथ यांचे ते पैसे मागणारे विधान आणि इथे हे बोलू नका, असा रामदेवबाबाचा सल्ला. म्हणजे पैशाबाबत आपण नंतर बोलू, असेच बाबांनी सुचवले. काळा पैसा देशात परत आणण्यासाठी मोहीम राबवणार्या रामदेवबाबांचा एक नवा चेहरा यानिमित्ताने जनतेसमोर आला. या सगळ्या नेत्यांची विधाने पाहिली की यांचे खायचे दात आणि दाखवयाचे दात वेगळे आहेत हे लक्षात येते. हे सगळे आपल्याच महान लोकशाहीतील महान नेते आहेत. त्यांना सुधारण्याची जबाबदारी नियतीने मतदारराजावर सोपवली आहे. काँग्रेसचे राहुल गांधी चॉकलेट आणि टॉफीवर काय बोलतात. सोनिया गांधी काय बोलतात. त्याशिवाय राजकारणातील विदूषक अशी प्रतिमा झालेल्या दिग्विजयसिंग यांच्या वक्तव्याचा काही कशाशी संबंधच नसतो. फक्त उचलली जीभ लावली टाळ्याला अशी यांची गत असते. याकडे आता फक्त करमणूक म्हणूनच पहावे लागेल. कोणतेही धोरण, वैचारीक धन यांच्याकडून अपेक्षित नाही. त्यामुळेच अशा वाचाळांना घरची वाट दाखवणे हे काम मतदारांचे असले पाहिजे.
शनिवार, २६ एप्रिल, २०१४
वाचाळ नेत्यांपासून देशाला वाचवा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा