शनिवार, १२ एप्रिल, २०१४

बाई आणि बाबाच्या चक्रात अडकलेली काँग्रेस देशाचे वाटोळेच करणार


कोणताही मुद्दा वादग्रस्त बनवून तो चिघळवायाचा ही काँग्रेसची परंपरा आहे. निर्णय न घेता त्यावरून माणसे झगडत राहिली पाहिजेत हे तर काँग्रेसचे ब्रिटीशकालीन तत्त्व आहे. भारताचे पहिले काँग्रेसी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी या देशाचे केलेले फार मोठे नुकसान म्हणजे तिबेटचा प्रश्‍न वादग्रस्त बनवला.  याबाबत सरदार वल्लभाई पटेल यांनी सावध केले होते. वल्लभाईंनी एक पत्र पाठवूनही नेहरूंनी त्याकडे दुर्लक्ष केले. यामागे नेहरूंचा देशाचे नुकसान करण्यामागे काय हेतु होता किंवा त्यांना देशाचे नुकसान केल्यामुळे काय फायदा झाला हे कायम गुलदस्त्यात राहिले आहे. राजीव गांधींच्या खुन्यांना झालेली फाशी माफ करावी यासाठी सोनिया गांधी आणि काँग्रेसकडून जे प्रयत्न सुरू आहेत ते जसे अनाकलनीय आहेत तसाच प्रकार नेहरूंच्या कृतीत होता. आज तेच या देशातील जनतेपुढे येणे आवश्यक आहे. दीर्घकाळ सत्तेवर राहिलेली काँग्रेस ही खरोखरच देशासाठी काम करीत होती की पुर्वी जसे मोगल राजे, इंग्रज या देशावर येउन राज्य करीत होते त्याप्रमाणे काम करते  आहे का याचा विचार आता केला पाहिजे. नाहीतर ही काँग्रेसची भुतं काश्मिरपाठोपाठ या देशाचे आणखी तुकडे पाडायला कमी करणार नाहीत. काश्मिरचा प्रश्‍न चिघळवण्यासाठी अफझल गुरूच्या फाशीचे राजकारण केले जात आहे. त्या कारणावरून दिल्लीतील बाँम्बस्फोट घडवला जात आहे. म्हणजे देशातील दहशतवाद्यांचे रक्षण काँग्रेस करीत असेल तर काँग्रेसच खरी दहशतवादी आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ही काँग्रेसची दहशतवाद जोपासण्याची परंपरा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. पंडीत नेहरुंनी तिबेट प्रश्‍नी चीनबरोबर फाजील लगट केली. तिबेटींनी भारताला चीनी अत्याचारांपासून वाचवा असे सतत सांगितले होते. आम्ही भारतीय आहोत. आम्हाला भारतीय म्हणूनच जगायचे आहे असे तिबेटींना वाटत होते. पण चीनला पोषक असे वातावरण पंडीतजींनी केले. तिबेटला लष्करी संरक्षण देण्याची जबाबदारी भारताची आहे अशी मागणीही तिबेटने केली होती. सरदार वल्लभाई पटेल यांनीही त्यास अनुकुलता दाखवली होती. त्यांनी नेहरूंना तसे पत्राने कळवले होते. पण नेहरूंनी त्या पत्राला केराची टोपली दाखवली. आज जे चीनी आक्रमण या देशावर झाले आहे. बाजारपेठेपासून भूखंडापर्यंत त्याचे जनक हे काश्मिरी गुलाबराव पंडीत आहेत. पोलादी पुरूषाला गुलाबी मनाने वाकवण्याचा इतिहास या देशात पंडीत नेहरूंनी केला. 9 नोव्हेंबर 1950 ला सरदार वल्लभभाई पटेल यांनी नेहरूना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात त्यांनी स्पष्ट म्हटले होते की , चीन हा भारताचा मित्र आहे असे आपण मानता. पण चीन तसे मानतो आहे काय? पंडीतजी हे कलियुग आहे. या कलियुगात अहिंसेचे उत्तर अहिंसेने द्यायचे असते. पण कोणी आपल्यावर हल्ला करीत असेल तर अहिंसेचा उपयोग नाही. आपल्याला ठोस उत्तर द्यावे लागेल. पण नेहरूंनी पटेलांच्या या पत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. भारताचे अहित आणि चीनचे हित लक्षात घेतले. याला देशप्रेम म्हणायचे की देशद्रोह हे जनतेनेच आता ठरवायला पाहिजे. हा तिबेटचा प्रश्‍न अजूनही  जळतो आहे. ती आग लावणारे आहेत थंड डोक्याचे पहिले पंतप्रधान. काँग्रेसचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू. ज्या निर्दयपणे ब्रिटीशांनी बंगालची, भारताची फाळणी केली त्याच निर्दयपणे काश्मिर, तिबेटसारखे भाग पंडीतजींनी घालवले आहेत. पंधराव्या शतकात बाबर या देशात राज्य करून गेला. त्याने काही वास्तू, जमिनी वादग्रस्त केल्या. त्यासाठी आत्ता लढा देत आहोत. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातील शत्रूविरोधात लढण्याआधी स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या या स्वकीय शत्रूंविरोधात आधी लढले पाहिजे. काही शतकांपुर्वीच्या बाबरावरून वाद घालण्याअगोदर अलीकडच्या काळातीलच स्वातंत्र्योत्तर घटनेकडे पाहून या काँग्रेसी राजवटीचा बरबटलेला कारभार लक्षात घेतला पाहिजे. घोटाळा, गोंधळ, भ्रष्टाचार, वादग्रस्त विषय निर्माण करणे या सुत्रांचे धोरण करूनच काँग्रेस कायम सत्तेवर पोहोचली आहे. नेहरूंच्या या बावळटपणामुळे भारत चीन युध्द झाले. त्यात आपण आपली जमीन गमावून बसलो. युध्द हरलो. या सगळ्या गोष्टींना नेहरू जबाबदार आहेत. पण त्यानंतर पाठोपाठ झालेले पाकीस्तानचे युध्द, पंडीत नेहरुंचे निधन, लालबहादूर शास्त्रींचे निधन या थोड्या थोड्या काळाने घडलेल्या घटनांमुळे या देशात सत्तेचे परिवर्तन होउ लागले नाही. काँग्रेसच्या अपयशाला त्यांच्या मृत्यूच्या सहानुभूतीच्या लाटेने झाकून टाकले. त्यामुळे त्यांच्या कन्या इंदिरा गांधी या दीर्घकाळ पंतप्रधान म्हणून या देशात टिकल्या. पाकीस्तानशी दोन युध्द करून आणि पाकीस्तानचे तुकडे करून बांग्लादेशाची निर्मिती करण्याच्या श्रेयातून या देशाचे तुकडे करण्याचे पाप झाकण्याचा प्रयत्न काँग्रेसने त्या काळात केला. त्या लाटेवर इंदिरा गांधी दीर्घकाळ टिकल्या. पण नंतर सत्तेची धुंदी त्यांना चढली. 1975 साली आणिबाणी पुकारली. या आणीबाणीचे निमित्त देशाला शिस्त लावणे आहे असे त्यांनी भासवले. त्यासाठी वीस कलमी आर्थिक योजना असा कार्यक्रम राबवल्याचे त्यांनी जाहीर केले. पण आणिबाणी पुकारण्यामागे काँगे्रेस सरकारचा एक घोटाळा कारणीभूत होता हे लपवून ठेवले गेले. आणि बाणी पुकारण्यामागचे नक्की कारण देशातील जनतेपुढे येणे आवश्यक आहे. ज्या राजनारायण यांनी इंदिरा गांधी यांना लोकसभा  निवडणुकीत पराभूत केले होते त्यांनी इंदिरा गांधीविरोधात निवडणुकीच्या काळात केलेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची चौकशी करण्याची केस न्यायालयात टाकली होती. या खटल्यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या दोषी असल्याचे अलाहाबादा उच्च न्यायालयाचे लक्षात आले. इंदिरा गांधी यांनी सरकारी यंत्रणेच्या निवडणूक प्रचारासाठी दुरूपयोग केल्याचे न्यायालयाने मान्य केले. त्यामुळे इंदिरा गांधी यांची निवड अलाहाबाद उच्च न्यायालयाने अपात्र ठरवली होती. लोकसभेत त्या बसू शकत नाहीत असा शेरा मारला होता. त्याचबरोबर लोकसभेची मुदत सहा वर्षापर्यंत वाढवण्याच्या त्यांच्या प्रकाराबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त  केली होती. इंदिरा गांधींच्या या भ्रष्ट आणि अत्याचारी राजवटीविरोधात जयप्रकाशनारायण यांनी रान उठवायचे ठरवले आणि ते रस्त्यावर उतरले. आज ज्या प्रमाणे अण्णा हजारे यांनी देश पिंजून काढला त्याचप्रमाणे सगळे घडले होते. पण मागच्या अनुभवावरून काँग्रेसने अधिक सावध पवित्रा घेतला. अण्णा हजारे हे लोकनायक जयप्रकाशजींप्रमाणे हिरो होउ नयेत, महात्मा गांधींप्रमाणे होउ नयेत यासाठी बदनामीचे नाटक सुरू केले. काँग्रेसने आपल्या भ्रष्टाचाराचा आलेख वाढवत ठेवला तसाच तो झाकण्याचा प्रयत्न जोरात केला. त्यासाठी दोन वेगळ्या विचारांचे पिलू सोडण्याचे तंत्र विकसीत केले. म्हणजे एकीकडून दिग्विजय सिंगांसारख्या वेड्या माणसाच्या तोंडून मत व्यक्त करायचे. आम्ही अण्णांचा रामदेवबाबा करू असे म्हणायचे. त्याचवेळी सोनिया गांधी, मनमोहनसिंग यांनी आपण अण्णांचा आदर करतो म्हणायचे. जनमताचा कौल यातून घेण्याचा प्रकार त्यांनी केला.   खरं तर भविष्यात या गोष्टी अभ्यासक्रमात यायला पाहिजेत. काँग्रेसचा पराभव करून जर नवे सरकार सत्तेवर आले तर त्यांनी इतिहासाच्या अभ्यासक्रमात याबाबत समावेश करायला पाहिजे. मोगल राजवट, ब्रिटीश राजवट यावर इतिहासात अभ्यास आहे. तशीच काँग्रेसची जुलमी राजवट या देशातील पिढीपुढे आणली पाहिजे. विकास कामे काळाच्या ओघात होत जातात. पाकीस्तान या देशाच्या एक विसांशही नाही. पण आज भारतात जे जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते ते तिथेही आहे. कारण जागतिकीकरणाच्या रेट्यात तंत्रज्ञान सर्वत्र गेले आहे. अगदी नेपाळसारख्या देशातही भारतातील अद्यावत तंत्रज्ञान आहे. त्यामुळे काँग्रेसने विकास केला,  देश प्रगतीपथावर नेला हे संागून देशाची फसवणूक केली जात आहे. बाजारपेठेच्या नियमाप्रमाणे असा विकास आपोआप होत असतो. त्याचे उगाच श्रेय काँग्रेसने घेउ नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. आदिलशहाचे, औरंगजेबाचे मोगली राजवटीतील अत्याचार दाखवतो. ब्रिटीश राजवटीचे दाखवतो तसेच काँग्रेसी अत्याचाराचा इतिहासही अभ्यासक्रमात आलाच पाहिजे. काँग्रेसने काही चांगली कामे केल्याचा डंका पिटला असेल तर ब्रिटीशांनी काय कमी सुधारणा  केल्या? रेल्वे, तार पोस्ट या दळणवळणाच्या साधनांची देणगी ब्रिटीशांचीच आहे. अजून काही चांगले पूल ब्रिटीशांनी बांधलेले आहेत. सतीची प्रथा बंद करण्याचे काम ब्रिटीशांनीच केले. पण अंधश्रध्दा निर्मूलनाचा कायदा करायला काँग्रेस सरकार पुढे येत नाही. कारण प्रत्येकाचा एक कोणीतरी बाबा आहे. नाहीतर बाई आहे. बाई आणि बाबाच्या जाळ्यात अडकलेले हे सरकार देशाचे वाटोळेच करणार आणि केले आहे हे भावी पिढीलाही समजले पाहिजे. (सप्टेंबर 2011)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: