सोमवार, १४ एप्रिल, २०१४

काँग्रेसला लाजेशी संबंध नाही हे स्टंटमन राहूल गांधींना कसे माहित नाही?

  •    
  • सोनिया काँग्रेसचे स्टार प्रचारक स्टंटबाज राहूल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांच्या दु:खाने व्यथित होउन आपल्याला लाज वाटते असे वक्तव्य केले. राहूल गांधींचा स्टंट कितपत खरा आणि कितपत खोटा हा जरी भाग असला तरी सध्या देशाला आणि देशातील प्रत्येक नागरिकाला याचीच लाज वाटत आहे की आम्ही सातत्याने त्या काँग्रेसच्या पाठीमागे लागून पाच दशके सत्ता हातात दिली, त्या काँग्रेसने देशाची काय दशा केली आहे त्याचेच हे फळ आहे.
  •      राहूल गांधींना साधी गोष्ट समजत नाही की कोणताही प्रकल्प कोणत्याही राज्यात आणला जातो तो केंद्राच्या संमतीनेच आणला जातो. केंद्र सरकारच्या पुढाकाराने आणला जातो. केवळ मायावतींचे सरकार जमिनी संपादीत करत आहे म्हणून राहूल गांधींनी केलेली स्टंटबाजी काँग्रेसचा खोटारडेपणा उघड करणारी आहे हेच यातून दिसून आले आहे. याचा अर्थ राहूल गांधी यांना लाज कसली वाटली? केंद्रात काँग्रेसचे सरकार आहे याची लाज वाटली काय?
  •        भ्रष्टाचाराच्या विळख्यात देशाला जखडून टाकणारे भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज या काँग्रेसच्या सरकारमध्ये आहेत. कलमाडींसारखा काँग्रेसला आर्थिक रसद पुरवणारा आणि आपल्या तुंबड्या भरणारा डॉन भारताची अपकिर्ती जगभर करतो. त्या काँग्रेसने त्यांना पाठीशी घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि अंगावर आल्यावर फेकण्याचा प्रयत्न केला याची लाज वाटली नाही राहूल गांधी यांना. कलमाडींचे पाप झाकण्यासाठी काँग्रेसने शिखर बँकेवर प्रशासक नेमून राष्ट्रवादीला बदनाम करण्याची दुष्ट खेळी केली याची लाज का राहूल गांधींना वाटली नाही? शिखर बँकेने ज्या सहकारी बँकांना मदत केली त्यामुळे शिखर बँकेचा एनपीए वाढला त्या बँका शेतकर्‍यांच्याच बँका होत्या. शेतकर्‍यांना वाचवण्यासाठी जर शिखर बँकेने ते धोरण स्वीकारले असेल तर त्याला विरोध करणे म्हणजे काँग्रेस किती शेतकरी विरोधी आहे हेच दिसून येते आहे. या गोष्टीची लाज राहूल गांधींना वाटायला मग काहीच हरकत नाही.
  •    खरं तर लाज वाटणे हे काँग्रेसच्या स्वभावात बसते काय याची खात्री आधी राहूल गांधींनी त्यांचे राजकीय गुरू दिग्वीजय सिंग यांच्याकडून करून घेणे गरजेचे आहे. लाज सोडूनच लोक काँग्रेसमध्ये जातात. लाज सोडल्याशिवाय लाच खाता येत नाही. लाचखोरांच्या पक्षात लाजरे काय कामाचे? पण अजूनही आपण सभ्य आहोत हे दाखवण्याचा राहूल गांधींचा हा केविलवाणा प्रयत्न तर नाही ना?
  •     निवडणुका जवळ आल्या की राहूल गांधींना अशी स्टंटबाजी करायची सवय आहे. भावनिक वातावरण निर्माण करून स्टंटबाजी करायची आणि अशिक्षित महिला मतदारांना आपलेसे करायचे  याला खरं तर इमोशनल ब्लॅकमेलिंगच म्हटले पाहिजे.
  •     या देशात आपण राहतो याची लाज राहूल गांधी यांना वाटते याचाच अर्थ त्यांच्या पक्षाने या देशासाठी काही केलेले नाही. इथे शेतकरी आत्महत्या करतात, त्याचे भांडवल करून काँग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी विदर्भात राहूल गांधींनी केलेली स्टंटबाजी नंतर किती फोल होती हे दिसून आले. कलावती नावाच्या आत्महत्याग्रस्त महिलेबरोबर फोटो काढले, तिच्या घरी चटणी भाकरी खाल्ली, तिला आर्थिक मदत दिली जाईल असे सांगितले आणि स्वत:ला मोठे करून घेतल्यावर त्या कलावतीबाईला आजपर्यंत काँग्रेसने अथवा राहूल गांधी यांनी कसलीही मदत केलेली नाही याची लाज राहूल गांधीना का वाटत नाही?
  •     उत्तर प्रदेशातले शेतकरी आणि बाकीच्या राज्यांमधले शेतकरी यात राहूल गांधी फरक कसा करू शकतात? उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांच्या जमिनींचे संपादन केले जात असल्याबद्दल राहूल गांधी उपोषणाला काय बसले, मोटरसायकलस्वारी काय केली पण मग त्यांना महाराष्ट्रातील आमचा कोकणातला शेतकरी आपल्या जमिनी प्रकल्पाला नाकारतो आहे त्या शेतकर्‍यांच्या जमिनी जैतापूरच्या प्रकल्पासाठी जबरदस्तीने घेण्याचे कारस्थान तुमचेच काँग्रेस सरकार करते आहे त्याची राहूल गांधीना लाज का वाटत नाही?
  •     राहूल ब्रिगेड म्हणवून आपण काहीतरी करतो आहोेत हे दाखवण्याचा प्रयत्न राहूलच्या मागे धावणारे करतात. पण काहीतरी करून कसे चालेल? योग्य तेच केले पाहिजे. वाट चुकल्यासारखे करून चालणार आहे काय? दिग्वीजयसिंग आणि राहूलचा आदर्श ठेवणारे त्यांच्या मागे धावणारे असेच पोरकटपणा करताना दिसतात. नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांचा लढा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून दिला जात आहे. गेली तीस वर्ष हा संघर्ष शेकापक्षाने केला आहे. मार्च महिन्यात या आंदोलनात स्थानिक काँग्रेसचे आमदार आणि त्यांच चिमूटभर कार्यकर्ते उतरले. अरे आपण करतो काय आणि वागतो काय याचे भान यांना कसे नाही? तुमची सत्ता असताना तुम्ही आंदोलन करुच कसे शकता. याचा अर्थ तुमचा पक्ष हा सरकार चालवायला लायक नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. अशा स्थानिक आमदारांची  लाज राहूल गांधींना वाटणार की मुख्यमंत्र्यांची आणि महाराष्ट्र सरकारची लाज वाटणार?
  •    शेतकरी हाच घटक महत्त्वाचा असताना या देशात शेतजमिनी  संपादीत करून त्याठिकाणी भांडवलदारांचे प्रकल्प लादण्याचे प्रस्ताव जे केंद्र सरकार चालवते त्या सरकारची लाज राहूल गांधीना का वाटली नाही हा खरा प्रश्‍न आहे.
  •    वेळोवेळी स्टंटगिरी करून सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळ  फेकताना राहूल गांधींना लाज वाटली नाही. गतवर्षी मुंबईत येउन लोकल प्रवास करण्यासाठी तिकीटाच्या रांगेत उभे राहून तिकीट काढले. पण खासदाराला रेल्वे प्रवास मोफत आहे हे माहित असूनही केवळ स्टंटबाजी करताना आपण महाराष्ट्राला फसवत आहोत याबाबत राहूल गांधींना लाज नाही वाटत. 
  •     संपूर्ण देशभरातले प्रकल्पांमध्ये प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडवले जात नाहीत. ते वर्षानुवर्षे संघर्ष करीत आहेत. हा सगळा संघर्ष काँग्रेस विरोधातच आहे हे माहित नसल्याबद्दल राहूल गांधींना लाज नाही वाटत.
  •     ज्या उत्तर प्रदेशमधील शेतकर्‍यांचा कनवळा राहूल गांधींना येतो आहे तिथे बेरोजगारी आणि दारिद्य्राने सर्वांना गांजले आहे. तेथील कामगार रोजगारासाठी मुंबई आणि महाराष्ट्रात येतो आहे. या उत्तर प्रदेशात अलीकडील काही वर्ष सोडली तर काँग्रेसचीच राजवट होती. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी , राहूल गांधी ज्या अमेठी, रायबरेली मतदारसंघातून निवडून येतात ते मतदारसंघ किती मागासलेले आहेत हे पाहिल्यावर राहूल गांधींना खरी लाज वाटायला पाहिजे.
  •      खरोखरच लाज वाटत असेल राहूल गांधींना तर त्यांनी राजकारण संन्यास घेउन इटालीला आपल्या मातुल प्रदेशात जावे. इथल्या बरबटलेल्या काँग्रेसजन आणि सरकारला राम राम ठोकून निघून जावे. असे न करता इथे राहणे म्हणजे पक्के काँग्रेसाळल्याचे म्हणजे निर्लज्जपणाचे लक्षण असते. निर्लज्जम सदासुखी अशी आपल्याकडे म्हण आहे ती बहुदा काँग्रेसबाबतच लागू पडताना दिसते आहे. कारण काँग्रेसमध्ये सगळ्यात जास्त लाचार आणि निर्लज्ज आहेत. त्यामुळे राहूल गांधींना कोणत्याही गोष्टीची लाज वाटते याचा अर्थ ते काँग्रेसशी बंडखोरीच करत आहेत असे म्हणावे लागेल.
  •    देशद्रोह्यांना आणि दशहतवाद्यांना प्रोत्साहन देणार्‍या या सरकारला शिक्षणाचे मातेरे करून भावी पिढी अडाणी बनवण्याचे  षडयंत्र करताना लाज वाटत नाही. सामान्य माणूस महागाईने होरपळत असताना आणि गरीब माणूस काबाडकष्ट करीत असताना रोम जमत असताना फिडल वाजवत बसणार्‍या राजाची परंपरा जपणार्‍या आपल्या सोनिया काँग्रेस धोरणाचीच खरोखर राहूल गांधीना लाज वाटायला पाहिजे.
  •      पण राहूलच्या या नव्या वक्तव्याने आणि स्टंटमुळे काँग्रेसची प्रतिमा उघड होते आहे. काँग्रेसला लवकर संपवण्यासाठी राहूल गांधींना अशी वारंवार लाज वाटली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी केलेली काँग्रेसची घाण पाहिली तर आपोआप काँग्रेसला संपवावे असेच राहूलला वाटायला काहीच हरकत नाही. पण हा राहूलचा स्टंट काँग्रेसला अडचणीत आणणारा ठरेल असे दिसते आहे. त्यामुळे आता काँग्रेसलाच राहूलची लाज वाटत असेल की काय असे दिसते.
  • (15 मे 2011)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: