दिवाळी जसजशी जवळ येउ लागते तसतशी सर्वसामान्य आणि मध्यमवर्गियांची धांदल उडते. याचे कारण त्याचे केवळ पगारावरच चालत असते. चतुर्थश्रेणी किंवा कामगार जगतातील लोक यांना दिवाळी ही पर्वणीची वाटते. पण मध्यमवर्गियांना ही अधिक खर्चाची वाटत असते. याचे कारण साग्रसंगित दिवाळीचा झगमगाट करताना, कौटुंबिक आनंद मिळवताना त्याच्या अवतीभवतीच्या जगाचाही त्याला विचार करावा लागतो. घरातील मोलकरीण दादा दिवाळीचं काय झालं? असा प्रश्न विचारते तेव्हा न कुरकुरता त्या मोलकरणीला एक महिन्याचा पगार द्यावा लागतो. मोलकरीण जर झांबाज असेल तर ती त्यावर थांबत नाही पैशांबरोबरच कपडे देण्याची मागणीही करतात. मोलकरणींची उपलब्धता आणि विश्वासार्हता यावर हा खर्च अवलंबून राहतो. या मोलकरणींना नाखूष करून चालत नाही. त्यांना आपण सांगू शकत नाही की, बाई आम्हालाच बोनस नाही तर तुला कसे आम्ही देणार? नोकरदारवर्गाला दिवाळीचा बोनस किंवा सानुग्रह अनुदान जे दिले जाते ते यासाठीच असते. आपली पुढची यंत्रणा व्यवस्थित सुरू राहीली पाहिजे. पण सरकारने मागणी मान्य केली नाही किंवा व्यवस्थापनाने बोनस दिला नाही तरी त्याला मात्र आपल्या घरातल्या गड्यांना, मोलकरणींना बोनस द्यावा लागतो. एका महिन्यात दोन तीन महिन्यांचा खर्च करताना त्याची अगदी तारांबळ उडते. त्यामुळे मध्यमवर्गिय आणि नोकरदारांना दिवाळी ही त्रासदायक वाटते. एरवी कधी वेळेवर न येणारे पोस्टमन या दिवसात हमखास वेळेवर येतात. तो तसा निरूपद्रवी प्राणी असतो. पण त्याला दिवाळीची पोस्ट द्यावी लागते. आपली आठवड्यातून, दिवसातून येणारी काही पत्रे त्याने इमानेइतबारे वर्षभर आणून पोहोच केलेली असतात. न कंटाळता जिने चढून वर येउन पत्र घरपोच केल्याबद्दल वर्षातून एकदा एखादी हिरवी नोट त्याच्या हातात टेकवावी लागते. त्याच्या चेहर्यावरचा तो आनंद पाहताना सामान्य मध्यमवर्गियांना समाधान वाटते. या समाधानात तो विसरून जात असतो की आपल्याला बोनस मिळालेला नाही. आपल्याला ही देणी, हे खर्च आपल्या खिशातून करायचे आहेत. बोनस मिळाला असता, सानुग्रह अनुदान मिळाले असते तर बरे झाले असते पण याचे दु:ख चेहर्यावर न दाखवता सामान्य, मध्यवर्गिय माणसांना दुसर्याला दिवाळी देण्याचा आनंद असतो. दरमहा एचपीचा किंवा भारत पेट्रोलियमचा सिलेंडर दर महिन्याला नोंदवल्यानंतर चार दिवसांनी घेउन येणार्या गॅस एजन्सीच्या निळ्या नाहीतर लाल कपड्यातील कामगारांना एखादी महात्मा गांधी छाप नोट द्यावी लागते. कारण का तर गॅसची टंचाई निर्माण झाली तरी आपल्याला नंबर न डावलता त्याने काळा बाजार करून त्रास देउ नये. गॅसची पाईप उंदरांनी कुरतडली किंवा खूप दिवस ती घरात असल्यामुळे जुनी झाल्यामुळे गॅस लिक होत असेल. सिलेंडरचे गास्केट गेले असेल तर निर्माण होणार्या धोक्याच्यावेळी मदतीला त्याने वेळेवर धावून आले पाहिजे. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने तो येतो तेव्हा त्याला सांगता येत नाही की बाबारे आम्हाला बोनस नाही तर तुम्हाला कुठुन देणार? सामान्य मध्यवर्गिय माणसाचे हे दुखणे असते. दुसर्यांनी दिवाळी आनंदात करावी यासाठीच त्याला पणतीतील वातीप्रमाणे या दिवाळीत अक्षरश: जळावे लागते. कारण या सगळ्यांच्या दृष्टीने तो माणूस साहेब असतो, सर असतो. हे साहेबपण, ‘सर’पण टिकवून ठेवण्यासाठी त्याला हे खर्च टाळता येत नाहीत. कामाचा मोबदला किती मिळतो आहे यापेक्षाही त्याच्यावर कार्यालयीन कामाचा प्रचंड बोजा असतो. हा बोजा उचलण्यासाठी त्याला या माणसांची गरज असते. त्यामुळे मोबदला आपल्याला मिळाला नाही तरी चालेल पण या सर्व सेवेकर्यांना दिवाळीची बक्षिसी देण्याचे धोरण त्याला आखावे लागते. मोलकरीण वेळेवर कामाला आली नाही म्हणून बायकोला भांडी घासावी लागली तर बायको जेवण कसे वेळेवर बनवेल आणि मी कामावर कसा वेळेवर जाणार? नाहीतर न जेवताच आपल्याला जावे लागेल अशी चिंता त्याला जाळत असते. त्यामुळे आपल्या बायकोला त्रास होउ नये, आपल्याला वेळेवर कामाला जायचे आहे म्हणून त्याला मोलकरणीला बोनस द्यावाच लागतो, जरी त्याला काहीही मिळाले नसले तरी. गॅस संपला आहे, दुसरा सिलेंडरही केव्हा जाईल सांगता येत नाही. महिना महिना मिळणार नाही असे म्हणतात. अशी भुणभुण बायकोने लावू नये आणि आपल्याला ऑफीसातून आल्यावर चहाचा कप हातात मिळावा म्हणून गॅसचा सिलेंडर घेउन येणार्याला ही दिवाळी बक्षिसी द्यावीच लागते. महिन्यातून एकदा डोक्यावरचा भार कमी करण्यासाठी आणि ऑफीसात बरे दिसावे यासाठी करावी लागणारी कारागिरी दिवाळीच्या आधी जास्त प्रेमाने होते. पाठीवर दणके मारत मालिश केल्याच्या नादात तो कारागिर साहेब, दिवाळी द्या बर का असे हक्काने सांगतो. त्याला नाही कसे म्हणणार? अरे आम्हाला दिवाळीची काहीच कमाई नाही तर तुला काय देणार असे सांगायचे? पण त्याने प्रेमाने गालावरून हात फिरवून लावलेल्या पावडरीचा मोबदला त्याला द्यायलाच लागतो. आठवड्याला लॉण्ड्रीची कागदात गुंडाळलेली कपड्यांची थप्पी घेउन येणारा आणि नियमीत कपडे घरातून घेउन जाणारा दिवाळीत कपड्यांची थप्पी घेउन येतो आणि बिल दिल्यानंतरही घुटमळतो तेव्हा त्याला केवळ चहाचा कप देउन कटवता येत नाही. त्याचीही पाच पन्नासची अपेक्षा असते. त्याला द्यावी लागते बक्षिसी. नाही दिली तर तो तुमचा आवडता कपडाच नेमका जाळून ठेवेल किंवा त्यावर डाग पाडेल. कपडे जळले अथवा खराब झाले तर आम्ही जबाबदार नाही असे त्याच्या पावतीवर आधीच लिहीलेले असते. त्यामुळे काही बोलताही येणार नाही. कपडे वॉश करताना किंवा ड्रायक्लिनींग करताना शर्टच्या बटणांची जबाबदारी तो घेत नाही. चांगली इस्त्रीची घडी घातलेला लाँण्ड्रीतून आलेला शर्ट अंगात घालायचा आणि मग लक्षात येते की शर्टची बटणेच ड्रायक्लिनींगच्या वेळी तुटलेली आहेत. पुन्हा दुसरा ड्रेस घालावा लागतो. असे प्रकार वारंवार घडू नयेत म्हणून त्या पोर्याला आपल्याला नोट सरकवावी लागते. त्याला सांगता येत नाही की आम्हाला बोनस मिळालेला नाही म्हणून. कामगार आणि चतुर्थश्रेणीतील माणसांना दिवाळीची अशी छोटी छोटी म्हणत भरपूर कमाई होत असते. दिवाळी निमित्त व्यावसायिक उलाढाल वाढल्याने व्यापारीवर्गाला फायदा होत असतो. हा फायदाही मध्यवर्गिय आणि मोठ्या वर्गातील खरेदीदारांमुळे झालेला असतो. पण सामान्य मध्यमवर्गिय माणूस मात्र दिवाळीत दुसर्यांवर खर्च करता करता स्वत:ला सावरत असतो. सर्वांच्या घरात दिवाळीच्या पणत्या लागाव्यात म्हणून नाईलाजाने का होईना त्याला काही ना काही द्यावे लागते. हे सगळे खर्च केल्यानंतर जे काही शिल्लक राहते त्या लक्ष्मीची पुजा इमाने इतबारे तो करतो. त्याच्या या प्रामाणिकपणाचा आनंद घेत पाडव्याला त्याची पत्नी त्याला ओवाळते. भाउबिजेला आपल्या मुलांना असलेल्या सख्ख्या आणि मानलेल्या सगळ्या बहिणींना ओवाळणी देण्यासाठीही त्याला तरतूद करायची असते. हे सगळे खर्च करत सगळ्यांच्या चेहर्यावरील अनमोल आनंद टिपताना त्याला विसरायचे असते की आपल्याला बोनस मिळालेला नाही. कामगार जगतात संप करून, प्रशासनास जेरीस आणून आपल्या मागण्या दामटून वसूल करण्याच्या जगात बुद्धिजीवी माणसांची मात्र होरपळ असते. तीच त्याच्या जीवनाची वात असते. पणतीतील वात स्वत: जळते दुसर्यांना उजेड देते. दिवाळीची पणती म्हणजे खर्या अर्थाने मध्यमवर्गिय माणसाची स्थिती असते.
रविवार, १३ एप्रिल, २०१४
पणतीतील वातीसारखी मध्यमवर्गियांची स्थिती
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा