शुक्रवार, ११ एप्रिल, २०१४

चांगले वक्ते आणि विचार हे शेकाप-मनसेचे बलस्थान

चांगले वक्ते आणि विचार हे शेकाप-मनसेचे बलस्थान

  • लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले. अपेक्षेप्रमाणे नाही पण तरीही मतदानाची टक्केवारी वाढते आहे ही फार चांगली गोष्ट आहे. या देशात परिवर्तनाची लाट आहे. या राज्यात नवनिर्माणाची लाट आहे. लोकसभेेत संख्याबळ कमी असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष या पक्षांचे संख्याबळ फार महत्त्वाचे असेल. शेतकरी कामगार पक्षाच्या आमदारांची संख्या दोन आकडी होण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांचे संख्याबळही 2009 च्या तुलनेत दुप्पट झालेले दिसेल. त्यामुळे महाराष्ट्रात सत्तेच्या चाव्या कोणाकडे असाव्यात हे ठरविण्याचा अधिकार महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेकाप युतीकडे असेल.

  • आज महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत त्यापैकी फक्त ज्यांचे भाषण ऐकावे असे एकमेव नेते आहेत. ते म्हणजे राज ठाकरे. आपल्या भाषणातून ते अत्यंत मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण असे बोलत असतात. पुराव्याशिवाय ते काहीही बोलत नाहीत. निराधार वक्तव्ये करणे हे त्यांच्या रक्तात नाही. त्यामुळे कायम लाखोंच्या संख्येने असलेल्या सभांना ते संबोधीत करतात.
  • निवडणुकांमध्ये चांगल्या वक्त्यांची भाषणे ऐकायला मिळणे ही नागरिकांच्या दृष्टीने पर्वणी असते. स्वातंत्र्यानंतर जेवढ्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीत चांगले राजकीय वक्ते होते. पण गेल्या काही वर्षांपासून निवडणुका लढवणारांमध्ये, राजकीय पक्षांमध्ये चांगले वक्ते नाहीत हे दुर्दैव आहे. चांगला विचार असेल तर वक्तृत्व चांगले होणार. फक्त टिका टिपण्णी करणार्‍यांकडे वर्क्तृत्व कसे असणार? त्यामुळे महाराष्ट्रात चांगले वक्ते फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शेतकरी कामगार पक्षाकडे आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांची, वक्त्यांची भाषणे ऐकण्यासाठी येणारा एक वर्ग असतो. हा वर्ग मतदानावर परिणाम करणारा असतो. सभेला जमणारी गर्दी सगळ्या पक्षाच्या लोकांचीही असते. पण जाताना ती एक विचार घेवून जातात. असा विचार देणारे वक्ते महाराष्ट्रात फक्त मनसे आणि शेकापक्षाकडे आहेत. शेतकरी कामगार पक्षाने कायम संघर्ष केला आहे, आंदोलने केली आहेत, मोर्चे काढले आहेत. त्यामुळे सातत्याने मतदारांच्यापुढे जाण्याची सवय या पक्षाला आहे. मतदारांशी संवाद साधण्यासाठी चांगले वक्तृत्व असावे लागते ते शेकापक्षाचे नेते आमदार विवेक पाटील, जयंत पाटील, मीनाक्षीताई पाटील, धैर्यशील पाटील यांच्यात आहे. आपल्या मंत्रमुग्ध भाषणानेच आमदार विवेक पाटील यांनी विधानसभा गाजवली होती. डान्सबारवर बंदी आणण्यासाठी राज्य सरकारला भाग पाडले होते. तसाच संघर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना करीत आहे. राज ठाकरे आपले मुद्दे भाषणातून मांडून ते पटवून देतात. मराठी माणसांचा हक्क, रोजगाराच्या संधी आणि टोलविरोधी आंदोलन यातून राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपलेसे केले आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे एकत्रित येणे ही परिवर्तनाची आणि नवनिर्माणाची नांदी आहे.
  • आज बाकीच्या पक्षांकडे मुद्दे नाहीत. वक्तृृत्त्व नाही. फक्त खालच्या पातळीवर येवून टिका करणे आणि चिखलफेक करणे याशिवाय काँग्रेसला काही येत नाही. आमदार विवेक पाटील शेकापक्षाचे उमेदवार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रचारासाठी ज्या ज्या सभा घेतल्या आहेत त्या सभांमधून तयांनी आपल्या वक्तृत्त्वाने सर्वांना भारावून टाकले आहे. पेणच्या पहिल्या सभेपासून आमदार विवेक पाटील यांनी लक्ष्मण जगताप यांचा जो आत्मविश्‍वास आपल्या भाषणाने वाढवला आहे तो जगताप यांना विजयाकडे घेवून जाताना दिसत आहे. पनवेल, उरण, खालापूर, कर्जतमधील त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कारण आमदार विवेक पाटील यांनी आपण काय करतो, काय करू शकतो आणि काय करणार आहोत हे मुद्दे मांडले आहेत. मात्र काँग्रेसने फक्त आमदार विवेक पाटील यांच्यावर टिका करण्या पलिकडे आणि घाणेरडे बोलण्या व्यतिरीक्त काहीही केले नाही. त्यांच्याकडे बोलण्यासारखे आहेच काय? प्रशांत ठाकूर हे काँग्रेसचे आमदार एकाही सभेत भाषण करत नाहीत. कारण भाषण करायला यायला पाहिजे. खोबरं खोवताना जसा खरवडल्याचा आवाज येतो, त्याप्रमाणे भाषण करणार्‍या प्रशांत ठाकूर यांना कोण ऐकणार? काय मुद्दे आहेत काँग्रेसकडे? काय मुद्दे आहेत राष्ट्रवादीकडे? काय मुद्दे आहेत राम ठाकूर-प्रशांत ठाकूर यांच्याकडे त्यांच्या उमेदवाराला मतदारांनी मते द्यावीत?
  • काँग्रेसने गेल्या दहा वर्षात केलेली मतदारांची फसवणूक लपविण्यासाठी विरोधकांवर गलिच्छ टीका करायची. गेल्या दहा वर्षात झालेल्या महागाईकडे मतदारांचे लक्ष जायला नको म्हणून विरोधकांवर टीका करायची. का तर त्या टिकेला उत्तर देण्यात भाषणाचा विरोधकांचा वेळ खर्ची होईल. त्यांच्याकडे असलेले मुद्दे ते सोडतील. पण असे होणार नाही. काँग्रेसमुळे आज या देशातील महिला सुरक्षित नाहीत. गॅस सिलेंडरच्या अनुदानाचा प्रश्‍न निर्माण करून गॅसची केलेली दरवाढ. आधारकार्ड आणि सरकारी बँकांमधून खाती उघडण्यासाठी टाकलेला दबाव. त्यामुळे झालेली नागरिकांची पळापळ. इतके करूनही आधार कार्ड नंतर निराधार असल्याचे जाहीर करणे. गॅस अनुदान देतो सांगून जास्ती किंमत वसूल करण्याचा केलेला प्रयत्न. यातून सामान्य माणसांची, गोरगरीबांची केलेली फसवणूक विसरण्यासाठी काँग्रेसचे नेते विषय भरकटवत नेत आहेत. पण विरोधक त्याला पुरून उरतील. परिवर्तनाची लाट कोणीही थोपवू शकणार नाही. महाराष्ट्रात, देशात परिवर्तन अटळ आहे, नवनिर्माण होणार आहे हे निश्‍चित.
  • राज ठाकरे यांच्या सभांना संपूर्ण महाराष्ट्रात इतका जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे की त्याचा धसका काँग्रेसने घेतला आहे. राष्ट्रवादीने घेतला आहे. त्याचे पडसाद सोशल मिडीयावरून दिसत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून व्हॉटसअ‍ॅपवर केंद्रिय गुप्तचर विभागाचा अंदाज म्हणून संभाव्य निवडून येणार्‍या उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जात आहे. अत्यंत बनावट आणि फसवी यादी जाहीर करून मतदारांना फसवले जात आहे. केंद्रीय गुप्तचर विभागाने आपला हा अहवाल व्हॉटसअपवर प्रसिद्ध केला असल्याचा आभास निर्माण करून खोटा अंदाज वर्तवला जात आहे. ही काँग्रेसने केलेली संभ्रमावस्था आहे. पराभवाच्या भितीपोटी केलेली खेळी आहे. पण त्याचा काहीही परिणाम होणार नाही.
  • विशेष म्हणजे या अंदाजात मावळच्या निकालापुढे प्रश्‍नचिन्ह उपस्थित केलेले आहे. ज्या कोणी हे केले आहे त्यालाही खोटे बोलण्याचे धाडस झाले नाही. कारण मावळमधून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार लक्ष्मणभाऊ जगताप हे नुसते निवडूनच येणार नाहीत तर भरघोस मतांनी निवडून येणार आहेत. त्या तुलनेत राष्ट्रवादीचे उमेदवार कुठेच चर्चेत नाही. पनवेल उरण खालापूरमध्ये राम ठाकूर, प्रशांत ठाकूर यांच्या सभेला माणसे जमत नाहीत. गर्दी जमेना म्हणून राष्ट्रवादीचेच नेते आर आर पाटील यांनी सभा रद्द केली. त्यामुळे बिथरलेल्या, घाबरलेल्या काँग्रेस नेत्यांनी आमदार विवेक पाटील यांना टिकेच लक्ष करून आपला अडाणीपणा सिद्ध केला आहे. या निवडणुकीत आणखी एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे की शिवसेनेचे नेते शेकापक्षावर गद्दारीची टीका करतात. शिवसेनेकडे फक्त गद्दारी केली, पाठीत खंजीर खुपसला एवढेच मुद्दे आहेत. त्यामुळेच ते शेकापक्ष, मनसेवर यावरून टिका करतात. पण शिवसेनेशी खरी गद्दारी करणार्‍या राहुल नार्वेकरांबद्दल ते काहीही बोलत नाहीत. विधानपरिषदेवर पाठविण्याचा सोपा मार्ग शिवसेनेने नार्वेकरांना दिला होता. विधान परिषदेचा अर्ज दाखल केला. परंतु उध्दव ठाकरे यांना कल्पनाही न देता त्यांनी तो काढून घेतला. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर नार्वेकर राष्ट्रवादीत आले आणि मावळची उमेदवारी मिळवली. ही गद्दारी शिवसेनेला का दिसत नाही? त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे काही साटेलोटे आहे काय असा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे गद्दारीची भाषा शिवसेनच्या तोंडी शोभत नाही. हे सगळे इथला जागृत मतदार पाहतो आहे. त्यामुळेच शेतकरी कामगार पक्षाचा विजय निश्‍चित आहे. आज शेकापकडे विचारवंत आहेत, वक्ते आहेत, मनसेसारखे आक्रमक आणि नवनिर्माणाचा विचार मांडणारे नेते आहेत. आज महाराष्ट्राला याचीच गरज आहे. ती गरज पूर्ण करण्याचे काम शेकाप मनसे करणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: