बुधवार, २४ मार्च, २०२१

चित्रपटसृष्टीतील सात दशकांचा प्राण


चित्रपट निर्मितीसाठी सर्वात महत्त्वाची बाब असते ते म्हणजे कथानक. नायक-नायिका आणि खलनायक. या खलनायकाचे काम चोख असले की, बाकीचे सगळे बरोबर आपली शक्ती पणाला लावतात. अशाच प्रकारे आपली खलनायकी पणाला लावून चित्रपटात प्राण ओतणारा कलाकार म्हणजे प्राण. तब्बल सात दशके चित्रपटसृष्टीत टिकून राहणारा हा गुणी कलाकार अखेरपर्यंत सर्वांना प्रिय असाच होता. रुपेरी पडद्यावर खलनायक असला, तरी वास्तव जीवनात तो नायक म्हणूनच लक्षात राहिला.

प्राणचे मूळचे नाव प्राण क्रिशन सिकंद. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत ७० हून अधिक वर्षे घालवून ४०० हून अधिक चित्रपटांत अभिनय केला आहे. खलनायक म्हणून त्यांच्या भूमिका गाजल्या असल्या, तरी त्यांनी इतरही प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश नूरजहान हिच्याबरोबर ‘खानदान’ या चित्रपटात १९४२ साली केलेल्या नायकाच्या भूमिकेपासून झाला. प्राण यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लाहोरमध्ये तयार झालेल्या १७ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत, पण सातत्याने नवनवे काहीतरी दाखवणे, आपली स्टाइल निर्माण करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.


प्राण यांचे वडील कंत्राटदार असल्यामुळे गावोगावी फिरत असत. प्राण हे रामपुरी चाकूसाठी प्रसिद्ध असलेल्या रामपूर येथून मॅट्रिक पास झाले. पुढे न शिकता त्यांनी दिल्लीत कॅनॉट प्लेसजवळील दास फोटोग्राफी स्टुडिओ या दुकानात नोकरी धरली. दाससाहेबांनी दुकानाची लाहोरला शाखा काढली आणि प्राण यांना तेथे नेमले. दुकानातले काम संपले की, एका ठराविक उपाहारगृहात प्राण आणि त्यांच्या मित्रांची मैफिल रंगायची.

एके दिवशी मुमताज शांती या त्या काळच्या आघाडीच्या अभिनेत्रीचे पती आणि दलसुख पंचोली या चित्रपट निर्मात्याचे पटकथा लेखक वली हे प्राण यांच्या टेबलाजवळ आले आणि त्यांनी त्यांना चित्रपटात काम देण्याची पक्की आॅफर दिली. दुस‍ºया दिवशी स्टुडिओत यायला सांगितले, मात्र प्राणसाहेबांनी या बोलावण्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना चित्रपटात काम करण्याची मुळीच हौस नव्हती. नोकरीत मिळणारे २०० रुपये त्यांना पुरेसे वाटत होते. आठ दिवसांनी परत वली प्राणना भेटले, त्यांना खूप बोलले आणि स्टुडिओत का आला नाहीस म्हणून जाब विचारला. प्राणसाहेब म्हणाले, मला काय माहीत की ही आॅफर खरी आहे? मात्र त्यांनी दुस‍ºया दिवशी स्टुडिओत यायचे कबूल केले. पंचोलींसमोर उभे राहिल्याबरोबर त्यांनी प्राणना ‘जट यमला’ या पंजाबी सिनेमासाठी करारबद्ध केले आणि हातावर आगाऊ म्हणून ५० रुपये ठेवले.


‘जट यमला’ आणि ‘खानदान’ या चित्रपटांत त्यांच्या मते कशातरी भूमिका केल्यावर प्राणसाहेबांचा भाव वाढला आणि त्यांना चित्रपटाचे पाच हजार आणि पुढे नऊ हजार मिळू लागले, पण... भारताची फाळणी झाली आणि प्राण यांना मुंबईत यावे लागले. पुढचे ३०० दिवस प्राण बेकार होते आणि एके दिवशी त्यांना देव आनंद नायक असलेल्या ‘जिद्दी’मध्ये काम मिळाले. फक्त ५०० रुपये एकूण रकमेचा करार आणि त्यातले १०० रुपये आगाऊ. १९४८ मध्ये प्रकाशित झालेल्या त्या ‘जिद्दी’मध्ये प्राणसाहेबांनी खलनायकाची अशी जिद्दीने भूमिका केली की त्यांच्यापुढे चित्रपटांची रांग लागली. ‘अपराधी’ (नायिका-मधुबाला), ‘बडी बहन’ या चित्रपटांनंतर, ‘बहार’पासून प्राण यांनी आपल्या कामाकडे गांभीर्याने बघायला सुरुवात केली.

दिलीप कुमार, राज कपूर, अशोक कुमार, बलराज सहानी यांच्याबरोबर काम करताना आपले शिक्षण आणि वाचन कमी असल्याचे प्राण यांना जाणवले. आपल्याला रंगमंचावर काम करण्याचा अनुभव नाही. त्यामुळे असल्या नायकांबरोबर टिकून राहायचे असेल तर खूप मेहनत केली पाहिजे आणि आपल्या भूमिकेत वेगळेपणा आणला पाहिजे याची त्यांनी खूणगाठ बांधली. मग ते पटकथा लेखकांशी आणि दिग्दर्शकांशी चर्चा करून भूमिका समजावून घेऊ लागले आणि आपल्या परीने त्यात लकबींचा वापर करू लागले. ‘जिस देश में गंगा बहती है’मध्ये राकाच्या मनातली फाशीची भीती दाखवणारी गळ्यावरून बोट फिरवायची त्यांची लकब राज कपूरना खूप आवडली. अशाच वेगवेगळ्या लकबी त्यांच्यातील खलनायकाने चित्रपटांमधून वापरल्या.


प्राणसाहेबांनी हिंदी चित्रपटांतील खलनायकाला स्टार बनवले. प्राण यांचे वागणे अतिशय शिस्तबद्ध होते. सभ्यपणा जपणे हे त्यांच्यादृष्टीने महत्त्वाचे होते. राजेश खन्ना यांच्यासारख्या सुपरस्टारबरोबर त्यांच्या बेशिस्तपणामुळे काम न करण्याची प्रतिज्ञा प्राण यांनी शेवटपर्यंत पाळली. सगळ्या कलाकारांबरोबर काम केलेला हा खलनायक राजेश खन्नांच्या मनमानी, उर्मट आणि बेशिस्त स्वभावामुळे त्यांच्याबरोबर चित्रपटात काम त्यांनी केले नाही.

देशाच्या फाळणीला त्यांच्या मते जबाबदार असलेल्या भारतातील काँग्रेस या राजकीय पक्षाचा प्राण यांना अतिशय राग होता. त्या पक्षाच्या इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीविरुद्ध त्यांनी देव आनंद आणि विजय आनंद या बंधूंना घेऊन चित्रपट कलाकारांचा राजकीय पक्ष काढण्याचा प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला होता.


प्राण यांनी राज कपूर, दिलीप कुमार, देवानंद यांच्याबरोबर असंख्य चित्रपट केले असले, तरी अमिताभ युग सुरू झाल्यानंतर या दोघांची जमलेली जोडी वयाचे अंतर विसरून प्रेक्षकांना भावली. अनेक विविध चित्रपटांत प्रेक्षकांसमोर ते दोघे आले, पण प्राण आणि अमिताभची फायटिंग प्रेक्षकांना खूप आवडायची. ‘मजबूर’, ‘जंजीर’, ‘डॉन’ या चित्रपटांत या फायटिंगचे सीन प्रेक्षकांना खूप आवडले. या तिन्ही चित्रपटांत फायटिंग केल्यानंतर दोघांची मैत्री होते. या दोघांची फायटिंग असली पाहिजे ही निर्मात्यांची मागणी असायची.

कालांतराने चरित्र भूमिका सुरू केल्यावरही अमिताभ आणि प्राण एकत्र आले, पण दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी थांबली नाही. ‘अमर अकबर अँथनी’, ‘शराबी’, ‘नास्तिक’, ‘कालिया’, ‘गंगा की सौगंध’ अशा अनेक चित्रपटांतून दोघांची जुगलबंदी प्रेक्षकांना भावली होती.


नायक-नायिका कोणीही असो, प्राण यांच्यापुढे ते सगळे फिके पडायचे. म्हणूनच नायक म्हणून अभिनयात प्रत्येकाचे लक्ष्य अमिताभची उंची गाठायचे असते, तर खलनायक म्हणून प्रत्येकाला प्राण व्हायचे असते. कारण प्राण ज्या चित्रपटात असे त्या चित्रपटाचा तो प्राण असायचा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: