आज २७ मार्च हा ‘जागतिक रंगभूमी दिन’. प्रत्येक शनिवारी आपण तिसरी घंटामधून रंगभूमीवरच्या हालचाली टिपत असतोच, पण आज जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने रंगभूमीवरील ‘एकपात्री’ या अविष्कारावर नजर टाकणार आहोत. एकपात्री प्रयोग हे खूप लोकप्रिय होतात. १९७० आणि १९८० च्या दशकात असे अनेक एकपात्री प्रयोग लोकप्रिय झाले. पु. ल. देशपांडे हे एकपात्री न म्हणता त्याला ते बहुरूपी असे म्हणत असत. कारण एक व्यक्ती अनेक विध अशी बहुरूपे सादर करत असतात, म्हणून ते त्याला बहुरूपी म्हणत. पु. लं.नी काही प्रयोग हे एकट्याने, तर काही प्रयोग अनेक पात्र आणून केलेले आहेत, पण ‘असा मी असामी’ त्यांनी एकपात्री म्हणून सादर केलेला अविष्कार खूप गाजला होता.
१९८० च्या दशकात आणि त्यानंतर पंचवीस वर्षं सुपरहिट गाजलेला एक एकपात्री प्रयोग म्हणजे प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचा ‘वºहाड निघालंय लंडनला’. अनेकविध पात्रांची जंत्रीच त्यांनी निर्माण केलेली होती. त्यामुळे हा प्रयोग प्रचंड गाजला होता. हजारो प्रयोग या नाटकाचे झाले. संपूर्ण स्टेज व्यापून टाकण्याची किमया प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी केलेली होती. कितीही वेळा पाहिला तरी त्यात काहीतरी नवीन पहायला मिळायचे इतकी ताकद या प्रयोगात होती. त्याचदरम्यान ‘मी अत्रे बोलतोय’ हा आचार्य अत्रेंवरचा एकपात्री प्रयोग सदानंद जोशी करत असत. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. सुषमा देशपांडे यांनी ‘व्हय मी सावित्रीबाई’ नावाचा एकपात्री चांगला केला होता. यात एक महिला कलाकार अनेक भूमिका सादर करताना फार मोठे आव्हान होते, पण आपल्याकडे एकपात्री प्रयोग चांगले चालतात. एकपात्री प्रयोगासाठी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे दमदार स्क्रीप्ट असावी लागते. या सर्व दिग्गजांना त्या स्क्रीप्ट साध्य झाल्या. त्यांनी त्या लिहिल्या म्हणून त्याचे नाव झाले, लोकप्रियता मिळाली, पण दुसºयाने लिहिलेले एकपात्री सादर करणे तितके सोपे नसते. संदीप पाठक यांनी त्या ‘वºहाड निघालंय लंडनला’ या प्रयोगाची जी वाट लावली आहे ती पाहिल्यावर हे प्रकर्षाने जाणवते. बंडा जोशींसारखे कलाकार हास्यपंचमीच्या माध्यमातून अनेक विनोदांची मालिका, गाणी सादर करून दोन-अडीच तास काढतात, पण खºया अर्थाने एकपात्री प्रयोग करणारे कलाकार आणि चांगले प्रयोग आज उपलब्ध नाहीत. बोरीवलीचे सुरेश परांजपे हे गेली चाळीस वर्षं असाच एक अनोखा प्रयोग करत आहेत. ‘नट नाटक’ नावाने ते आपला अविष्कार सादर करतात. नाटकाच्या पुन:प्रत्ययाचा आनंद देण्याचा ते प्रयत्न करतात. जुनी गाजलेली जी नाटके आहेत आणि ज्या नाटकातील भाषा सुंदर आहे त्या भाषेचे सौंदर्य, साजशृंगार आणि लालित्य आपल्या अभिनय आणि वाणीतून दाखवण्यासाठी ते प्रयत्न करतात. यासाठी त्यांनी ‘नट नाटक’ हा कार्यक्रम सुरू केला. चाळीस वर्षांत त्यांनी ६५० पेक्षा जास्त प्रयोग केले आहेत. आता त्यांची वाटचाल सातशेव्या प्रयोगाच्या दिशेने चालली आहे. जुनी गाजलेली नाटके जी आहेत त्यामध्ये बाळ कोल्हटकरांचे ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, शन्ना नवरेंचे ‘सूर राहू दे’, मधुसुधन कालेलकरांचे ‘अपराध मीच केला’, बाळ कोल्हटकर यांचे ‘लहानपण देगा देवा’, आचार्य अत्रे यांचे ‘तो मी नव्हेच’ आणि पुलंचे ‘असा मी असामी’ यातील काही प्रवेश ते सादर करतात. ते सादर करताना त्यातील मूळ व्यक्तिरेखेच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आभास ते निर्माण करतात हे फार छान आहे. ते नक्कल करत नाहीत, मिमिक्री करत नाहीत, पण त्यांचा अविष्कार पाहताना ‘तो मी नव्हेच’मधील लखोबा म्हणजे पणशीकर समोर डोकावतात. ‘दुर्वांची जुडी’मधील सुभाष उभा राहतो.
१२ आॅगस्ट १९७९ ला त्यांनी ब्राह्मण सभा, गिरगांव येथे आपल्या ‘नट नाटक’ या एकपात्री कार्यक्रमाला सुरुवात केली आणि आजपर्यंत ते नोकरी सांभाळून हा प्रयोग करत असतात. परांजपे विद्यालय अंधेरी आणि पार्ले टिळक विद्यालयात क्लार्क ते अधीक्षक अशा पदांवर काम करताना त्यांनी ३३ वर्षं नोकरी सांभाळून आपल्यातील हा कलाकार जिवंत ठेवला आणि राज्यभरात त्यांनी या कार्यक्रमाचे प्रयोग केले. समाजसेवी संस्थांना. अपंग, वृद्धाश्रमांना, महिलाश्रम, अनाथालय यांच्या करमणुकीसाठी आपले प्रयोग सवलतीच्या तर कधी मोफतही देण्याची सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली आहे. एकपात्री प्रयोग बघायला प्रेक्षकांना आवडतात, पण पूर्वीसारखे आता त्याचे प्रयोग कमी होताना दिसत आहेत. चांगल्या संहितेचा अभाव हे त्या मागचे कारण असू शकते, पण रंगभूमीवरचा हा एक प्रकार सध्या ठप्प झालेला दिसतो आहे. अनेक वेळा एकपात्री प्रयोग म्हणून विनोदांचेच सादरीकरण केले जाते, पण त्यासाठी चांगले कथानक असेल तर प्रेक्षक ते स्वीकारतात. ‘वºहाड निघालंय लंडनला’ या प्रयोगातून लक्ष्मण देशपांडे यांनी कथानकातून नाट्य उभे केले. त्यातून विसंगती आणि विनोद निर्मिती होत एक महानाट्य, दोन संस्कृतींमधील फरक आणि मानवी मनाची आंदोलने उभी केली. म्हणून हा प्रयोग अत्यंत ताकदवान ठरला. सुषमा देशपांडे यांनी सावित्रीबार्इंच्या जीवनातील सगळा संघर्ष उभा केला, म्हणून त्याला यश मिळाले. सदानंद जोशींनी आचार्य अत्रेंच्या आयुष्यातील काही प्रसंग आणि विनोद उभे केले. आचार्य अत्रेंच्या शैलीत ते सादर केले. त्यामुळे ज्यांनी आचार्य अत्रे पाहिले नाहीत त्यांना ते भेटवण्याचे काम केले, पण अशाप्रकारचे परिश्रम आता कोणी घेताना दिसत नाही, हे कबूल करावे लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा