राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणासंदर्भात आभार व्यक्त करण्यासाठी केलेले भाषण अतिशय चांगले होते. लोकांना भाषणं ऐकायला आवडतात. या भाषणाने शिवसैनिक सुखावले असतील, सहकारी पक्षही सुखावले असतील, पण महाराष्ट्र मात्र आश्चर्य व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. कारण हे चांगले भाषण आहे असे वाटले तरी ते योग्य ठिकाणी केलेले भाषण नव्हते. त्यामुळे महाराष्ट्राला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. हे विधिमंडळाचे सभागृह होते, तिथे जे मुद्दे मांडणे अभिप्रेत आहे तेच मांडणे आवश्यक होते, पण त्याला बरोबर बगल देत आपण आता मुरब्बी राजकारणी झाल्याची साक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. राजकारणात हीच परिपक्वता अपेक्षित असते. आपण प्रश्नांना बगल कशी देऊ शकतो हे उत्तम राजकारण्याचे वैशिष्ट्य असते. विशेष म्हणजे सावरकरांना भारतरत्न देण्याचा निर्णय कोण घेतं, असा प्रश्न विरोधकांना विचारत उद्धव यांनी केंद्र सरकारने सावरकरांना भारतरत्न दिलेला नाही, असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोनदा यासंदर्भात पत्र पाठवण्यात आली होती, अशी आठवणही उद्धव यांनी करून दिली, पण विरोधकांनी प्रश्न विचारला होता की २६ फेब्रुवारीला सावरकरांची पुण्यतिथी होती त्याचे विस्मरण मुख्यमंत्र्यांना का झाले, असा सवाल होता, पण एखाद्या मुरलेल्या राजकारण्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्या प्रश्नाचे उत्तर टाळत बगल दिली त्याचे सर्वांना कौतुक वाटले. नेमक्या प्रश्नांकडे दुर्लक्ष कसे करायचे हे फार महत्त्वाचे असते.
भाषण चांगलं होतं, पण जागा चुकलेली होती असे हे भाषण होते. कारण इथे जनतेच्या प्रश्नांवर बोलायचे होते, पण हे राजकीय निवडणुकीतील भाषण होते. जसे प्रचारसभांमध्ये टोलवाटोलवी करतात तसे हे भाषण होते. त्यामुळे खरं तर मुख्यमंत्र्यांनी कबुली देऊन वापरलेले असंसदीय शब्द हेसुद्धा कौतुकास्पद होते असेच म्हणावे लागेल. बंद कमºयात अमित शाह यांच्याबरोबर झालेले बोलणे, फडणवीसांना बाहेर उभे करणे आणि त्यांच्या नकळत दिलेला शब्द होता हे अर्थसंकल्पीय अधिवेशनात, राज्यपालांच्या भाषणावर आभार प्रदर्शन करण्याचे मुद्दे होते का? का भाजप आपल्यापासून गेला याची खंत अजूनही शिवसेनेला वाटते आहे, असा प्रश्न या भाषणामुळे महाराष्ट्राला पडला आहे. भाषण चांगले होते, पण ते सभागृहातील नव्हते. कारण आता सव्वा वर्ष झालेला आहे. संपला तो विषय. आता काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आहोत आपण, पण हे सगळे बाजूला राहिले आणि अमित शाह यांनी दिलेला शब्द भाजपने पाळला नाही हे सांगायला मुख्यमंत्री विसरले नाहीत. याचा अर्थ कुठेतरी खंत मनात अजूनही आहे.
औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणाचा प्रश्न विरोधकांनी विचारला होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही करू ना संभाजीनगर. जरूर करू. त्याच्या आधी मला ही पण तारीख हवी की याच विधानसभेमध्ये आपण संभाजीनगर विमानतळाचं नामकरण केलं आहे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, पण कोणाच्या दारी ते अडून ठेवलं आहे?, असा प्रश्न विचारत उद्धव यांनी पुन्हा नामकरणाला केंद्राचा हिरवा कंदील मिळालेला नसल्याचं सूचित केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुपुत्राचं नाव विमानतळाला देत नाही असे सांगून बगल दिली, पण खरा प्रश्न आहे हे छत्रपती संभाजीनगर विमानतळ होणार आहे औरंगाबादमध्येच ना? मग अगोदर त्या शहराचे नाव जोपर्यंत संभाजीनगर होत नाही तोपर्यंत कसे काय नामकरण होणार? पण बगल देण्याचे कौतुक करावे लागेल.
विशेष म्हणजे मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते, कोविडमधील भ्रष्टाचार, शेतकरी कर्जमाफी वगैरे प्रश्नांना पद्धतशीरपणे बगल देत मुख्यमंत्र्यांनी केलेले भाषण खरोखरच कौतुकास्पद होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीत ते खºया अर्थाने तयार झाल्याचे चित्र बघायला मिळाले. यासाठी त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे.
शेवटी शिवसेना आणि भाजप हे नैसर्गिक मित्र आहेत. आज राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर केलेली आघाडी ही तडजोड आहे. भाजपला धडा शिकवण्यासाठी केलेली ती तडजोड होती, पण कुठेतरी अजूनही भाजपने शब्द दिला होता, तो पाळला नाही याचा त्रास शिवसेना नेत्यांना होतो आहे हे दिसून येत होते. आम्हाला ही तडजोड मान्य नाही, केवळ तुम्हाला भीती दाखवण्यासाठी आम्ही ही तडजोड केलेली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी कधीच शिवसेनेचे साथीदार असू शकत नाहीत असेच भाव त्यातून प्रकट होत होते. आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असे बोललो होतो ते करून दाखवले, पण विधान भवनावर भगवा फडकवता आलेला नाही. विधान भवनावर भगवा फक्त सेना-भाजप एक असतील तेव्हाच फडकेल किंवा शिवसेना स्वबळावर सत्तेत येईल तेव्हा ते शक्य होईल, पण एकूणच मुख्यमंत्र्यांच्या भाषणात जोश होता तो शिवाजी पार्कवरील मैदानात भाषण असते तसा तो जोश होता. हे भाषण चांगले होते, पण सभागृहातील ते भाषण नव्हते. प्रचाराचे ते भाषण होते. मुंबई महापालिकेच्या पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत त्याची ती नांदी होती. त्यामुळे विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे टाळून तू गाय मारलीस मग आम्ही वासरू मारू अशा तू तू मैं मैं चे हे भाषण होते. केंद्राने काय केले? मग आम्हाला प्रश्न विचारू नका. हा प्रकार सभागृहातल्या भाषणासाठी खास नव्हता. भाषण म्हणून उत्तम, पण जागा चुकलेले भाषण होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा