रविवार, १४ मार्च, २०२१

क्रिकेटचा जुगार


भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करून कसोटी मालिका जिंकली आहे. त्याचबरोबर कसोटी चॅम्पियनशिपच्या अजिंक्यपदासाठी आता जूनमध्ये लढण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालेला आहे, पण काहीही असले तरी आजकाल क्रिकेट हा जुगार होताना दिसतो आहे. भारतातील क्रिकेट हा आता जुगार झालेला आहे. खेळ जिंकण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी नाही, तर पैसे कमावण्यासाठी खेळायचा असा प्रकार चालला आहे. पाच दिवस कसोटी खेळण्याचे कौशल्य लोप पावत चालले आहे. झटपट खेळायचे आणि सामना संपवायचा. पाच दिवसांचे पैसे दोन दिवसांत मिळवायचे, असेच काहीसे दिसते आहे. याला कारण टी-२० सामन्यांचा अतिरेक. आयपीएलसारख्या हंगामांनी केलेला हा जलदगती खेळ खेळाडूंना पाच दिवस मैदानावर टिकून देत नाहीये. त्यामुळे कसोटीचा आनंद संपुष्टात आला आहे.

मागच्याच आठवड्यात आयपीएलचे लिलाव जाहीर झाले. क्रिकेटपटू त्याचा लिलाव होऊन विकला जातो, ही संकल्पनाच अत्यंत किळसवाणी आहे. पैसे मिळायला लागल्यावर माणसे कोणत्या थराला जातील हे यातून दिसते. त्यामुळे आता मॅचफिक्सिंग, स्पॉट फिक्सिंगमध्ये नाव येणे हेही मोठेपणाचे लक्षण ठरेल काही दिवसांनी. कारण फिक्सिंगमध्ये एखादा अडकला तर तो चांगला खेळाडू आहे, निकाल बदलण्याची त्यामध्ये ताकद आहे असा अर्थ काढला जाऊ शकतो, पण यामुळे जुगाराला ऊत येणार हे निश्‍िचत. आपल्याकडे राजकारण असो, शिक्षण असो, सहकार असो, निवडणूक असो, सगळे विषय पैशांनी व्यापून टाकलेले आहेत. क्रिकेटपटूंचा लिलाव हेच घृणास्पद आहे.


एका देशाच्या संघातून खेळणारे खेळाडू या आयपीएलमध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळतात आणि एकमेकांना बाद केल्यावर टाळ्या वाजवतात. आता धोनीला बाद केल्यावर रैना टाळ्या वाजवणार. झटपटच्या नादात क्रिकेटची वाट लागली आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंडबरोबरच्या मालिकेत एकही कसोटी सामना पाच दिवस चालला नाही. तितका वेळ खेळपट्टीवर थांबण्याची क्षमता नष्ट झाली आहे हे दिसून येते. पाच दिवसांच्या क्रिकेटचा पूर्ण चोथा झालेला आहे. पूर्वी भारतीय क्रिकेट संघ पाच-पाच दिवसांचे सामने अगदी निष्ठेने खेळत होता. सामना हरणे, सामना जिंकणे काहीही असले तरी पाच दिवस टिकून राहण्याची कसोटी असायची. पैशाला महत्त्व नव्हते, खेळाला महत्त्व होते. खेळातल्या डावपेचाला महत्त्व होते. आता सगळे फिक्सिंग झाले. आज परिस्थिती अशी आहे की, ज्यांना क्रिकेट कळत नाही आणि ज्यांनी राजकारणात घुसखोरी करून पदे मिळवली ते आयपीएलमध्ये प्रमुख आहेत. कधी क्रिकेट खेळला नाही, विषय समजत नाही, बॅट हातात धरता येत नाही, तो झाला आयपीएलचा अध्यक्ष. केवळ पैशाच्या जोरावर. पैसा कमावण्यासाठी. आयपीएल हा सगळा विषय बदमाषांच्या हातातला विषय झाला आहे. कोटी कोटीच्या बोली करायच्या. हे पैसे काही घरातले कोणी घालत नाहीत. आयपीएलच्या विविध कंपन्यांनी या आयपीएलमध्ये घातलेला पैसा हा लोकांकडूनच उपसलेला पैसा आहे. स्वत:चे शौक पुरे करण्याकरिता आणि पुन्हा त्यातून पैसे मिळवण्याकरिता या आयपीएलचा जन्म झाला. एप्रिल महिन्यात सुरू होणारी आयपीएल १४ वी आहे. २००८ ला हे नाटक सुरू झाले.

क्रिकेट हा इंग्रजांचा खेळ. इंग्रजांनी जगभरात जुगार रुजवला. अर्थात जिथे राज्य केले तिथेच हा जुगार इंग्रजांनी रुजवला आहे. इंग्रजांनी रेसकोर्सची मैदाने आणि क्रिकेटची मैदाने निर्माण केली. त्यांच्या दृष्टीने रेस आणि क्रिकेट हा जुगाराचाच खेळ होता आणि आहे. कालांतराने गेल्या काही वर्षांत रेसकोर्स बंद झाले. घोड्यांच्या शर्यतीवर पैसे लावणारे जॉकी संपुष्टात आले. आता आयपीएलच्या रूपाने हे मालक म्हणून नवीन जॉकी तयार झाले आहेत. घोडे आपल्या पाठीवर माणसाला बसवून पळायचे आणि आता हे क्रिकेटचे खेळाडू बॅट घेऊन धावत आहेत. इतकाच फरक झालेला आहे, पण क्रिकेटचा खेळ हा पुरता जुगार झालेला आहे. इंग्लंडमध्ये त्याला अधिकृतपणे मान्यता आहे, पण भारतात त्याकडे खेळ म्हणूनच पाहिले जाते. त्यामुळेच जिंकता जिंकता हरणारी मॅच हे आमचे दु:ख असते, पण एखादा सामना हरूनही पैसा मिळत असेल, तर तो हातात आलेला सामना सोडणारीही प्रवृत्ती वाढते आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये लिलाव होणारे खेळाडू म्हणजे आता सगळे रेसचे घोडे झाले आहेत. रेसमध्ये धावू न शकणा‍ºया घोड्यांना नंतर गोळी मारून टाकले जात असे. ही सगळी जुगाराची ब्रिटिश संस्कृती आहे. ब्रिटिशांनी रेस आणि क्रिकेट हे दोन्ही पैसा कमावण्यासाठी काढलेले खेळ आहेत. त्यामुळे पैसा मिळवताना अपयश आले तरी चालेल, पण पैसा मिळाला पाहिजे ही त्यांची नीती. त्यामुळेच आजपर्यंत विश्‍वचषक स्पर्धेत घरचा खेळ असूनही इंग्लंड कधी २०१९ पर्यंत जिंकलेला नाही. २०१९ चा विश्वचषक जिंकताना टाय होणे, जादा ओव्हर टाकून निकाल लावणे हे सगळे जुगाराचे डाव होते. १९७५ ते २०१५ पर्यंत आपला खेळ असूनही इंग्लंड का कधी जिंकले नव्हते? तर जुगारी जसे जुगार खेळण्यासाठी जास्त लोक मिळावेत म्हणून इतरांना जिंकण्याची संधी देतात तसे काही गणित इथे असू शकते. सगळ्यांना उल्लू बनवण्याचे काम त्यांनी केले.


या खेळाचे महत्त्व अतोनात वाढवून ठेवलेले आहे. लोकांना वेडे करण्याचा हा प्रकार आहे. आपण नेमके काय करतो आहोत, कुठे पैसा खर्च करतो आहोत, याचे भान राहिलेले नाही. जिथे पैसा फेकून खेळ खेळला जातो, तो खेळ किळसवाणा मानला पाहिजे. खेळामध्ये एक पावित्र्य आहे. त्या पावित्र्यापासून आयपीएलने क्रिकेटला पूर्ण बदनाम करून टाकले आहे. खेळाशी बांधिलकी राहिली नाही. खेळाला सुरुवात होण्याच्या अगोदर बोलीत मिळालेल्या पैशाचे ड्राफ्ट हातात पडल्यामुळे खेळलेच पाहिजे, असा काही नियम राहिलेला नाही. त्यामुळे हा सारा जुगार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: