बुधवार, ३१ मार्च, २०२१

राष्ट्रवादीचे गृहमंत्री

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर १९९९ ला जेव्हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार सत्तेवर आले, तेव्हापासून गृह खाते हे कायम राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलेले आहे. राज्यात पंधरा वर्ष आघाडी सरकार सत्तेत होते. या काळात गृहखात्याचा कारभार हा राष्ट्रवादीनेच सांभाळला आहे. आताही महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर हे खाते राष्ट्रवादीने आपल्याकडेच ठेवले. या खात्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना दोघेही आग्रही होते; पण कोणाचेही न ऐकता राष्ट्रवादीने आपली मक्तेदारी निर्माण केली.


मागच्या पंधरा वर्षांच्या काळात छगन भुजबळ, आर. आर. पाटील, जयंत पाटील यांनी हे पद दीर्घकाळ सांभाळले; पण कोणत्या तरी घटनेने या मंत्र्यांना वादाच्या भोवºयात सापडावे लागले होते.

छगन भुजबळ हे सुरुवातीला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. त्या काळात पोलिसांची घरे, निवासस्थानाचे प्रश्न सोडवणार हे ते आपल्या भाषणातून नेहमी बोलायचे. पोलिसांना कमी पडणारे घरे हा दशकानुदशकांचा प्रश्न आहे. त्यावेळी पोलिसांचे ते आवडते गृहमंत्री होते; पण अचानक बनावट स्टँपपेपर घोटाळा उजेडात आला. तेलगी प्रकरण समोर आले. बनावट नोटांचे प्रकरण समोर आले. या प्रकरणातील संशयाची सुई ही छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्याकडे वळाली. ती कशी वळाली, कोणी वळवली, आता तो तेलगी कुठे आहे? हा संशोधनाचा विषय आहे; पण त्यावरून अल्फा टीव्हीवर म्हणजे सध्याचे झी मराठी टीव्हीवर एक कार्यक्रम केला होता. घडलंय बिघडलंय हा तुफान विनोदी व्यंगात्मक कार्यक्रम होता. त्यात या प्रकरणावरून छगन भुजबळ यांच्यावर टीका केली गेली. नाशिकच्या नोटा छापायच्या गोडावूनपासून छगन भुजबळांच्या घरात कसा पैसा जातो असले काहीतरी त्यात दाखवले होते. त्यावरून भुजबळांचे कार्यकर्ते तुफान चिडले आणि त्यांनी अल्फा टीव्हीवर हल्ला केला. तोडफोड केली. मग काय सगळे कलाकार पेटून उठले. आपल्या अभिव्यक्तीचा पुरेपूर फायदा उठवत त्या घडलंय बिघडलंयचा पुढचा भाग आणखी स्ट्राँग केला आणि भुजबळांवर राजीनाम्यासाठी दबाव निर्माण केला. शेवटी शरद पवारांनी त्यांना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदावरून राजीनामा देताय का काढून टाकू, असा प्रस्ताव मांडला आणि हा राजीनामा आला. पण अचानक हा राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांना बसलेला जोरदार धक्का होता. गृहमंत्रीपद म्हणजे चांगले खाते आहे, असे भुजबळांना वाटत होते; पण त्यानंतर त्यांना आग्रह केला, तरी ते हे खाते घेण्यास नकार देऊ लागले. एका मुलाखतीत ते म्हणाले, गृहखात्यात कितीही चांगले काम केले, तरी ते जनतेला कधीच दिसणार नाही. त्यामुळे ते खाते नकोच. पोलिसांचे पगार वाढवले, त्यांना घरे दिली, तरी त्याचा जनतेशी काहीच संबंध नसतो. त्यापेक्षा सार्वजनिक बांधकाम खाते बरे. अमूक एक रस्ता भुजबळांनी केला, असे तरी लोक म्हणतील. ही त्यांनी भूमिका घेतली; पण तरीही स्ट्राँग गृहमंत्री म्हणून आपणच आहोत हे ते कायम सांगत आले आहेत.


आर. आर. पाटील आबा हे सज्जन व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. सुरुवातीला ग्रामीण विकास खात्याच्या कारभारातून त्यांनी जी झेप आणि लोकप्रियता मिळवली ती त्यांना गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन गेली. गृहमंत्रीपदाचा त्यांचा कारभार अतिशय स्वच्छ आणि चांगला होता. त्यांनी कधीही पोलीस आणि अधिकाºयांना हॅरेस केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे पोलीसही त्यांचा आदर करत होते. आर. आर. पाटील यांचा सख्खा भाऊ पोलीस खात्यात असतानाही त्यांनी कधी भावासाठी वशिला लावला नाही, म्हणजे आज १६ वर्ष सस्पेंड झालेल्या पोलिसाला उच्च पदावर बसवण्याचा आणि मोठ्या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी देण्याचा प्रकार हे सरकार करत असताना, आर. आर. पाटील यांनी कधी तसला प्रकार केला नव्हता. त्या काळात एखाद्या पोलिसावर कारवाई म्हणजे त्याची बदली गडचिरोलीला करणे, असा प्रघात होता. कारण गडचिरोलीत नक्षलवादी पोलिसांचा काटा काढत. त्यामुळे पोलीसच तिकडे जायला तयार होत नसत. ही भीती काढून टाकण्यासाठी गडचिरोलीचा पालकमंत्रीच मी होण्यास तयार आहे, असा विश्वास आर. आर. पाटील यांनी दिला होता; पण हे खातेच शापीत असल्यामुळे त्यांना या खात्याचा राजीनामा देणे भाग पडले.

मुंबईवर २६/११चा दहशतवादी हल्ला झाला आणि त्यावेळी आर. आर. पाटील हे गृहमंत्री असल्याने त्यांना माध्यमांसमोर यावे लागले. प्रसारमाध्यमांना ब्रेकिंग न्यूज मिळवायची झालेली घाई आणि नव्यानेच दाखल झालेल्या अनेक वाहिन्या यामुळे गृहमंत्र्यांचा बाइट घेण्यासाठी कॅमेरे आले; पण त्यांनी बाइट म्हणजे लचकाच तोडला अक्षरश:.


हा हादसा कसा झाला, असा प्रश्न एका हिंदी वाहिनीच्या रिपोर्टरने विचारला आणि त्यांना पोलिसांवर टीका करण्याची भूमिका घेतली. त्यावेळी पोलिसांची बाजू सावरून धरण्यासाठी आर. आर. पाटील नकळतपणे अनवधानाने म्हणाले, इतने बडे शहरों में ऐसी छोटीमोटी घटना होती हैं. बस ते वाक्य त्यांच्या अंगलट आले. वास्तविक पोलीच चांगली कामगिरी करत होते. हा हल्ला नेमका कोणी केला आहे, तो दहशतवादी हल्ला आहे, पाकिस्तानचे षड्यंत्र आहे, हे काहीही समोर आलेले नव्हते. तो हल्ला परतवणे याला प्राधान्य देणे महत्त्वाचे होते. त्यादृष्टीने मुंबई पोलीस लढत होते. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आर. आर. पाटील बोलून गेले; पण प्रसारमाध्यमांनी त्याचे इतके भांडवल केले की, त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. एवढा मोठा दहशतवादी हल्ला होत असताना, अशा घटना छोटेसे हादसे होत असतात, असे आर. आर. पाटील कसे काय बोलू शकतात, असा कांगावा केला आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या नेत्याला टार्गेट करून राजीनामा देणे भाग पाडले. राष्ट्रवादीच्या दुसºया गृहमंत्र्याची ही अशाप्रकारे गच्छंती झाली. आता तिसरे गृहमंत्री अनिल देशमुख हे लेटरबॉम्बने जात्यात आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: