बुधवार, २४ मार्च, २०२१

अस्थी विसर्जन

सुधीरला हॉस्पिटलमधून फोन आला. ‘तुमचा पेशंट दगावला आहे; पण कोरोना झालेला असल्यामुळे त्याची डेडबॉडी आम्ही ताब्यात देणार नाही. पालिकेचे कर्मचारीच पीपीई कीट घालून त्याच्यावर अंत्यसंस्कार करतील. कोणी स्मशानात येण्याची तसदी घेऊ नका. दोन दिवसांनी हव्या असतील, तर अस्थी घेऊन जा.’


सुधीरला पायाखालची जमीन फाटल्यासारखं झालं. कोरोनाची पॉझिटिव्ह टेस्ट आली आणि पालिकेने एखादा लपून बसलेला गुन्हेगार पकडावा त्याप्रमाणे अप्पांना उचलून नेले. चौदा दिवस कोणी भेटायचे नाही सांगितले. या चौदा दिवसांत काय झाले ते माहिती नाही; पण अप्पा गेले. अंतिम दर्शनही नाही. अंत्यसंस्कारही करता येणार नाहीत. प्रेताभोवती बसून दोन अश्रू ढाळावेत म्हटले, तर तेही नाही.

पूर्वी कुष्टरोगी एखाद्या घरात असला की, त्याला असाच उचलून नेला जात होता. गावाबाहेर काढला जात होता. घरच्यांशी संपर्क साधून दिला जात नव्हता. कुठे गावकुसाबाहेर जंगलातच कधीतरी तो मरून पडत असे. त्याहीपेक्षा ही भयानक अवस्था होती. असे अप्पासारखे कितीतरी लोक असतील की, ज्यांच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकले नसतील. फक्त समाधानासाठी अस्थी घेऊन यायच्या. त्या अस्थीही आपल्या नातेवाईकाच्या असतील याचा काय भरवसा?; पण कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर त्याची ज्याप्रकारे विल्हेवाट लावली जात होती ती अत्यंत वाईट होती. मे २०२०. सगळं जग दहशतीखाली होते. कोरोना झालेल्या रुग्णापासून इतरांना लागण होऊ नये, म्हणून दगावलेल्या पेशंटची परस्पर विल्हेवाट लावली जात होती, याची खंत अनेकांना होती. त्यापैकीच एक होता तो सुधीर.


अप्पांनी सगळ्यांचं केलं होतं. त्यामुळे अप्पांचंही सगळं नीट झालं पाहिजे, असं सुधीरला वाटत होतं; पण आंतरवैरी ठरल्याप्रमाणे अखेरचे दर्शनही घेता आले नाही. त्यांनी नेलं अप्पांना उचलून घरातून. टॅटूटॅटू करत घोंगावत अचानक दारात अ‍ॅम्ब्युलन्स आली. अप्पांना ताब्यात घेतले. स्ट्रेचरवर उलटे झोपवून नेले. त्यावेळी अप्पांना काही झालं आहे, असे वाटतही नव्हते; पण त्यांनी तोंडाला फडके बांधा. स्ट्रेचरवर पालथे झोपा. असे सांगून गाडीत टाकून नेले. घराभोवती बांबू बांधून घरही सील केले. कुणाला बाहेर पडता येईना. १४ दिवसांनी सर्वांनाच कैद. अप्पांच्या संपर्कात असल्याने सगळ्यांच्या टेस्ट करायचे फर्मान आले. त्याप्रमाणे पालिकेचे लोक येऊन सगळ्यांचे नमुने घेऊन गेले. अप्पा बरे होऊन १४ दिवसांनी येणार, अशी अपेक्षा असतानाच आज अचानक फोन येतो आणि स्मशानातून फक्त दोन दिवसांनी अस्थी घेऊन जा असे सांगितले जाते. कुठला हा न्याय? कसलं हे पाप?

सुधीर मटकन खाली बसला. घरातले सगळे जमले. काय झालं अचानक त्यांना समजेना. आईला सांगायचं कसं? अशा अनेक विचारांनी काहूर केलेले असताना, सत्तरीच्या घरातील आईपण समोर आली. आईनेच विचारले, ‘काय झालं सुधीर? बरं वाटत नाही का?’


आईच्या प्रश्नाने सुधीरच्या डोळयात पाणी उभे राहिले. आवंढा गिळतच त्याने सांगितले, ‘आई, अप्पा गेले...’ घरातल्या सगळ्यांनी हंबरडा फोडला; पण आई मोठी धीराची होती. पंचेचाळीस वर्ष ज्याच्याबरोबर संसार केला तो अचानक सोडून गेला; पण त्याने मोठा केलेला संसार समोर होता. तेच भविष्य होतं. भविष्यच रडायला लागलं, तर कसं चालेल. आता आपणच खंबीरपणे मुलांना धीर दिला पाहिजे. या भावनेने ती माऊली पुढे आली आणि म्हणाली, ‘या लॉकडाऊनमुळे आपल्याला भेटायला कोणी येणार नाही, धीर द्यायला नातेवाईकही जवळ नसणार. बस, रेल्वे बंद, त्यामुळे कोणी येणार नाही. त्यामुळे आपल्यालाच सगळं सावरलं पाहिजे.’

आईचं बोलणं अंगावर शहारा आणणारं होतं; पण तरीही सुधीरनं सांगितलं की, आई आपलं अंतिम दर्शनही होऊ शकले नाही. त्यांनी डेडबॉडी ताब्यात देण्यास नकार दिला. परस्पर अंत्यसंस्कार केले आणि अस्थी घेऊन जा म्हणून कळवले. कसा विश्वास बसेल यावर? ’


आईने आता रडायचं नाही, असंच ठरवलं होतं. त्यामुळे तिनेच सर्वांना समजावले. हा इतका धीटपणा या बाईत कुठून आला होता माहिती नाही. कदाचित कोरोना इफेक्ट असेल हा; पण ठामपणे ती म्हणाली, ‘कोरोनाने आपला एक बळी घेतला असला, तरी सगळं कुटुंब आपण एकत्र आलो आहोत. कुटुंब एक केलं पण शेजारपाजार, नातेवाईक सगळे तोडले. जाणारं माणूस निघून जातं. त्यावर शोक केला जातो. त्याच्या नावानं आंघोळ केली जाते. या घरानं किती जणांचे अश्रू पुसले आहेत याचा हिशोबच नाही. शेजारी पाजारी कोणाच्याही घरात कोणी वारलं की, आपल्या घरातून त्या शेजाºयांना चहा पाणी, पिठलं भात असा स्वयंपाक करून पाठवला जात होता. आलेले २५ ते ३० नातेवाईकही त्यात जेवायचे इतका स्वयंपाक आपण करायचो. अप्पा तर जगमित्र होते. एखादे लग्न चुकवतील; पण कधी कुणाची मयत नाही चुकवली. खांद्यावर टॉवेल टाकून लगेच धावत जायचे. तिरडी बांधण्यापासून सगळं ते करायचे. खांदा देण्यासाठी सर्वांच्या पुढे ते असायचे; पण आज त्यांना खांदा देण्यासाठी कुणी नाही. किती विचित्र आहे हे? पण आता सरकारने आदेशच तसा काढला आहे ना? आता उद्या अस्थी घेऊन या आणि आपण त्या विसर्जित करू, त्याचेच दर्शन घेऊ. फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याला फासावर चढवल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे देतात; पण कोरोना झालेल्यांचा मृतदेह मात्र मिळू शकत नाही. कोरोना होणे हा केवढा गुन्हा आहे.’ असं म्हणून आवरलेले अश्रू बाहेर पडलेच. सगळ्यांनी मनसोक्त रडून घेतलं; पण नंतर आई पुन्हा म्हणाली, ‘अप्पा खूप सज्जन होते. अनेकांचे त्यांनी केले हे मान्य. अनेकांना खांदा दिला त्यांनी; पण ते नेहमी खांदा देऊन आले की म्हणायचे, कोणावर आपला बोजा पडता कामा नये. आपला बोजा कोणी असा उचलून न्यावा आणि संपलं म्हणून देह जाळून टाकावा यासारखं काय वाईट ना? मला कोणाच्या खांद्यावरून जायची इच्छाच नाहीये. मरणाचे सत्य सरणावर गेल्यावर कळते. त्यांनी अनेकांना खांदा दिल्यामुळे त्यांना कदाचित समजलेही असेल; पण कोणाच्या खांद्यावरून जायचे नाही ही त्यांनी आपली इच्छा पूर्ण करून घेतली आहे. त्यामुळे आता त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे, असे समजून आपण वागूया.’

आईचे बोलणे सगळ्यांना पटले. आता रडण्यात अर्थ नव्हता. दुसºया दिवशी सुधीरने जाऊन अस्थी आणल्या. त्या अस्थींवरच संस्कार केले, नमस्कार केला आणि सर्वांनी त्या विसर्जित केल्या; पण कोरोनाने एक वेगळा अनुभव या कुटुंबाला दिला होता.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: