रविवार, १४ मार्च, २०२१

भाजपचे शक्तिप्रदर्शन

कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या महाविशाल सभेने, पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या परिवर्तनाचे संकेत दिले आहेत. अर्थात मोदी प्रत्येक निवडणुकीत ज्याप्रमाणे हवा करतात तशी हवा तर पश्चिम बंगालमध्ये त्यांनी निर्माण केली. मतदारांवर प्रभाव टाकण्याची ही भाजपची मोदी शैली प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाचा भाग ठरलेली आहे. मोदी-शहांच्या रॅली हे प्रत्येक निवडणुकीतील भाजपचे यशाचे गमक बनले आहे. पण पश्चिम बंगालमध्ये विचार करता इतके शक्तिप्रदर्शन करूनही भाजपला खरोखरच फायदा मिळेल का?, हा प्रश्न आजही आहे. अजिबात संख्याबळ नसलेल्या भाजपला थेट सत्तेचे स्वप्न साकार करता येईल, असे समजणे तसे स्वप्नाळू असेल. जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार मागच्या निवडणुकीत ज्या पक्षाचे आहेत, त्या भाजपला दोनशे जागांचे स्वप्न पडले आहे. उद्दीष्ट आहे. किमान पक्षी बहुमतासाठी १५०, तरी जागा मिळवाव्याच लागतील. त्यासाठी ही गर्दी जमवणे आणि गर्दीच्या सभेचा प्रभाव टाकणे ही भाजपची स्टाईल रविवारीही पाहायला मिळाली. या सभेत अभिनेता आणि तृणमूलचा पार्टटाईम नेता मिथुन चक्रवर्तीला पक्षप्रवेश करून भाजपची मदार त्याच्या पाठीवर ठेवली आहे; पण भारतीय जनता पक्षाची ही गर्दी, ही वाढ म्हणजे एकप्रकारची सूज आहे, असेच म्हणावे लागेल. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधील आमदार फोडून डझनाने ते आपल्या पक्षात घेतले. तृणमूलचे नेते म्हणजे मूळचे काँग्रेसचे नेते. त्यांना भाजपत आणून आपले लेबल चिकटवण्याचे काम भाजप करत आहे. त्यांच्या जिवावर भाजप सत्तेची स्वप्न पाहत आहे. ते पाहता हे लोक कधीही फिरू शकतात. त्यामुळे अशा प्रकारे शत प्रतिशत भाजप किंवा पक्षवाढ ही काही खरी पक्षवाढ नाही हे लक्षात घ्यावे लागेल. पक्षवाढ ही बळाच्या नाही, तर विचारांच्या जोरांवर होणे अपेक्षित आहे; पण तसे काहीच इथे दिसत नाही. सत्ता मिळवणे हा एकच विचार फक्त इथे दिसून येतो. त्यामुळेच रविवारच्या सभेत किती लाख लोक उपस्थित होते, याला फारसे महत्त्व नाही. खरंतर आजवर मोदींनी पक्षाच्या प्रचारासाठी अनेक जाहीर सभांना संबोधित केले आहे. मोदी हे खºया अर्थाने प्रचारकच आहेत. रविवारची सभा ही न भूतो न भविष्यती अशी प. बंगालमधील सभा होती. या सभेसाठी पूर्वतयारीही जबरदस्त करण्यात आली होती, कारण यापूर्वी याच मैदानावर झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या सभेचा विक्रम मोडीत काढण्याचा निर्धार भाजपा कार्यकर्त्यांनी केला होता. राज्याच्या कानाकोपºयातून लोक पंतप्रधानांच्या सभेत सहभागी होण्यासाठी आले होते. त्यामुळे या गर्दीवरून निकालाचा अंदाज आता लोक बांधू लागले आहेत; पण गर्दीवरून निकालाचे अंदाज कधीही खरे ठरत नाहीत. सभा ऐकायला सगळ्या विचारांचे लोक येत असतात. महाराष्ट्रात पूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना अशीच गर्दी होत असे. त्यावेळी त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवले होते की, ही गर्दी चांगली आहे; पण ती मतात परिवर्तीत झाली पाहिजे. राज ठाकरे यांच्या सभांनाही प्रचंड गर्दी असते; पण यश कुठे मिळते? त्यामुळे गर्दीवरून बंगालमध्ये काही चमत्कार घडेल, असा अंदाज बांधणे घाईचेच ठरेल; पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिथुन चक्रवर्तीला या सभेत सादर करणे हा एक महत्त्वाचा कार्यक्रम होता. मिथुन चक्रवर्ती यांनीही एक काळ गाजवलेला आहे. गरीबांचा अमिताभ अशीच त्याची ओळख होती. तरुणांना, सामान्यांना त्याचे चित्रपट आवडत होते. त्यामुळे त्याची लोकप्रियता आहे, हे नक्कीच. साहजिकच मिथुनला बघायलाही लोक जमलेले असू शकतात हे सत्यही नाकारून चालणार नाही. म्हणूनच या सभेत मिथुनची हजेरी असणे आणि भाजप प्रवेश होणे याचा खरंच भाजपला फायदा होईल का, हे पहावे लागेल. तसा मिथुन कधी कुठल्या वादाबिदात अडकलेला नाही. उथळ वक्तव्ये करून चर्चेतही राहिलेला नाही. मिळेल ती भूमिका करायची या गणिताने तीन दशके रूपेरी पडद्यावर तो टिकून राहिला. त्यामुळे एक स्वच्छ प्रतिमेचा अभिनेता, अशी त्याची ओळख असली, तरी राजकीय नेता म्हणून तो किती प्रभावी ठरतो, हे महत्त्वाचे आहे. मागच्या निवडणुकीत मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेसचा झेंडा हातात घेतला होता. तृणमूलने त्यांना राज्यसभेवरही पाठवले होते; पण अल्पकाळात राजीनामा देऊन तो बाहेर पडला. त्यामुळे त्याचा राजकारणात रस कितपत आहे, याची शहानिशा करावी लागेल. गेल्या महिन्यात सरसंघचालक अचानक मुंबईतील त्याच्या निवासस्थानी भेट घेतात आणि त्याचा भाजपप्रवेश होतो हे संघाचे नियोजीत गणित आहे. संघाचे नियोजन फार महत्त्वाचे असते. त्यामुळे त्या नियोजनाने जर ही पावले टाकली असतील, तर सहज सत्ता मिळवणे भाजपला शक्य आहे, कारण संघाचा प्रचार हा वेगळा असतो. संघ जर पश्चिम बंगालच्या निवडणुकीत उतरला असेल आणि भाजपला मदत करणार असेल, तर परिवर्तन होऊ शकते हेही लक्षात घेतले पाहिजे, कारण भाजप अशा मोदींच्या सभा, गर्दी दाखवून जरी नजरेसमोर आली, तरी संघाचा आतून होणारा घरटी प्रचार, संपर्क हा फार महत्त्वाचा असतो. संघप्रचारक न कंटाळता प्रत्येकाला भेटून आपला विचार पोहोचवून मत बदलवू शकतात हे नक्की. म्हणूनच मोहन भागवत यांनी जर यात काही पुढाकार घेतला असेल, तर पश्चिम बंगालमध्ये भाजपला सत्तेत येणे शक्य आहे. त्यादृष्टीने मिथुन चक्रवर्ती यांचे भाजपत जाणे आणि गर्दी जमणवणे हे फार महत्त्वाचे आहे; पण काही करून पश्चिम बंगालची सत्ता मिळवणे हे भाजपचे आजचे प्रमुख ध्येय आहे, हे नक्की. रविवारच्या सभेतील महिला आणि युवकांचा सहभाग अविश्वनीय होता. ठिकठिकाणाहून आलेले कार्यकर्ते वंदे मातरम् आणि जय श्रीरामचे नारे देत होते. या नाºयांमुळे अवघा परिसर भाजपमय होऊन गेला होता. उत्तर प्रदेशात भाजप सरकार येण्यापूर्वी राज्याची जशी स्थिती होती, काहीशी तशीच स्थिती सध्या बंगालची झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था जवळपास नष्ट झाली आहे. प्रचंड भ्रष्टाचार, विशिष्ट समुदायाचे लांगूलचालन, बहुसंख्य हिंदू समुदायाचा मानभंग करणे, असे प्रकार राज्यात घडत आहेत. त्याचा फायदा उठवत भाजप दणका देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी मिथुन चक्रवर्तीसारखे नेते बाहेर काढले जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: