पश्चिम बंगालच्या राजकारणात गरीबांचा अमिताभ अशी ओळख असलेल्या मिथुन चक्रवर्ती याचे आगमन झाल्यामुळे अभिनेते आणि नेते या विषयाकडे लक्ष वेधले गेले. अर्थात साधारणपणे लोकप्रियतेच्या शिखरावर असल्यावर अभिनेत्यांना राजकारणात आणले जाते, पण आजमितीला मिथुन चक्रवर्ती हा तसा निवृत्तीतच जमा असल्यासारखा आहे. त्यामुळे त्याचा भाजपला किती फायदा होईल किंवा अभिनेता म्हणून गाजला तरी नेता म्हणून किती गाजतो हे पहावे लागेल.
प्रसिद्धीच्या शिखरावर गेलेल्या कलाकाराचे राजकारणात आगमन होते तेव्हा रुपेरी पडद्यावर कितीही यशस्वी असला, तरी या राजकारणाच्या पटलावर किंवा अभिनेता नेता बनतो तेव्हा त्याची कामगिरी सुमारच झाल्याचे दिसून आले आहे. त्याला एखाददुसरा अपवाद असू शकतो. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर गांधी घराण्याशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे, राजीव गांधींच्या मैत्रीखातर तत्कालीन सुपरस्टार अमिताभ बच्चन राजकारणात आला. १९८४ च्या निवडणुकीत अलाहाबाद मतदारसंघातून मातब्बर अशा हेमवतीनंदन बहुगुणा यांच्या विरोधात हा छोरा गंगा किनारेवाला लढला आणि चांगल्या मताधिक्क्याने विजयीही झाला, पण संसदेत जाऊन अमिताभ काही करू शकला नाही की, आपल्या खासदारकीची टर्मही त्याने पूर्ण केली नाही. त्यानंतर काँग्रेस आणि राजकारणापासून शक्यतितके दूर राहात पुन्हा रुपेरी पडद्यावर शराबी बनून मोठा झाला. त्यामुळे कितीही सुपरस्टार असला तरी त्याला राजकारणात काही स्टारडम मिळाले नाही.
आपला पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यालाही काँग्रेसने जवळ केले होते. भारतीय जनता पक्षाने राममंदिराची लाट निर्माण केल्यानंतर १९९१ च्या निवडणुकीत राजीव गांधींनी राजेश खन्नाला दिल्लीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. साक्षात लालकृष्ण अडवाणींच्या विरोधात राजेश खन्नाला उभे केले. या निवडणुकीत अत्यंत कमी फरकाने राजेश खन्ना पराभूत झाला होता. अडवाणींनी दोन ठिकाणांहून निवडणूक लढवली होती. त्यामुळे दिल्लीचा त्यांनी राजीनामा दिला. त्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने पुन्हा राजेश खन्नाला उमेदवारी दिली. त्यावेळी भाजपचा उमेदवार होता अभिनेता शत्रुघ्न सिन्हा. यावेळी राजेश खन्नाने भाजपच्या शत्रुघ्न सिन्हा याचा २५ हजार मतांनी पराभव केला. १९९२ ते १९९६ अशी चार वर्षे राजेश खन्ना खासदार होता. काँग्रेस सत्तेत होती, पण कोणतीही प्रभावी कामगिरी त्याला करता आलेली नव्हती. त्यामुळे पडद्यावरचा सुपरस्टार मतांसाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा तो फ्लॉप होतो हे भारतीय लोकशाहीने पुन्हा एकदा पाहिले. ना अमिताभ यशस्वी झाला, ना राजेश खन्ना.
सुपरस्टार नसला तरी करमणुकीचा बादशाह म्हणून गोविंदाकडे सगळेजण पाहतात. हमखास करमणूक, विनोद आणि निखळ आनंद देणारा गोविंदा... कुणी त्याच्यात दादा कोंडकेंना शोधत असले, तरी प्रेक्षक त्याला पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत होते, पण काँग्रेसची वक्रदृष्टी गोविंदावर पडली आणि तो नंतर राजकारणातही फ्लॉप झाला आणि रुपेरी पडद्यानेही त्याला नंतर स्वीकारले नाही. गंगाकिनारीचा छोरा राजकारण सोडल्यानंतर सावरला, पण विरारचा छोरा मात्र लांब फेकला गेला. २००४ च्या निवडणुकीत गोविंदाने भारतीय जनता पक्षाचे मातब्बर नेते राम नाईक यांचा पराभव केला, लोकसभेत गेला, पण ना त्याची चांगली उपस्थिती होती, ना मतदारसंघासाठी त्याने काही विशेष केले. पडद्यावर किमान दिसत तरी होता, पण राजकारणात गेल्यानंतर ना पडद्यावर, ना संसदेत, ना मतदारसंघात, कुठेच दिसत नव्हता. त्यामुळे छोटे मियाँही बडे मियाँप्रमाणेच राजकारणात फ्लॉप ठरले. अभिनेता म्हणून गाजलेली त्याची कारकीर्द नेता म्हणून पुसली गेली.
कधी सुपरस्टार नसलेला पण हिमॅन म्हणून दीर्घकाळ कारकीर्द गाजवणारा अभिनेता म्हणजे धर्मेंद्र. राजस्थानातील बिकानेर मतदारसंघातून धर्मेंद्रने २००४ ते २००९ या काळात भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व केले. शॉटगन म्हणून कडक डायलॉग फेकणारा शत्रुघ्न सिन्हा भाजपच्या राजकारणात चांगलाच गाजला होता. ना कोणती जबाबदारी, ना पद.. या घुसमटीत सध्या विरोधकांची भूमिका करत असला आणि चर्चेत असला तरी भाजपने त्याला प्रचारकापलीकडे काहीच दिलेले नाही. त्यामुळे ‘खामोश’ असे म्हणता येत नसल्यामुळे त्याची पंचाईत झालेली होती. तसे भाजपने त्याला भरपूर दिले होते. २००९ आणि २०१४ या दोन लोकसभा निवडणुकांत भाजपचा खासदार म्हणून पाटणासाहीब मतदारसंघातून तो विजयीही झाला. त्यापूर्वी वाजपेयी सरकारनेही त्याला अल्पकाळासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाची जबाबदारी दिली. भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक खात्याची जबाबदारी दिली. तरीही बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागल्याने शत्रुघ्न सिन्हा कायम अस्वस्थच राहिला. अभिनेता म्हणून जशी सरासरी कामगिरी आहे, तशीच नेता म्हणूनही सरासरीपेक्षा कमी कामगिरी त्याची राहिली आहे.
आवाजात मार खाल्लेला, पण संन्यास घेतला नसता, तर अमिताभ बच्चन याच्या सुपरस्टार पदाला आव्हान उभे करू शकेल, असा अभिनेता म्हणजे विनोद खन्ना. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ४ वेळा खासदार झाला. १९९८, १९९९, २००४ आणि २०१४ या चार निवडणुकांत गुरुदासपूरमधून विनोद खन्ना विजयी झाला. २००२ मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये पर्यटन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री अशी दोन खातीही सांभाळली. २००९ ला मात्र लोकसभा निवडणुकीत त्याला पराभव पत्करावा लागला. अभिनेते जेव्हा नेते बनले त्यामध्ये काँग्रेसमधून खासदार आणि मंत्रीपदापर्यंत पोहोचलेले सुनील दत्त वगळता अन्य कोणी खास कामगिरी केलेली नाही. राज बब्बर, नितीश भारद्वाज अशा अनेकांनी वेळोवेळी बाजी मारून नेली, पण त्यांची खास उल्लेखनीय अशी कामगिरी नाही. त्याचप्रमाणे अभिनेत्रींमध्येही शबाना आझमी वगळता कोणीही राजकारणाचा मनापासून आनंद घेतलेला दिसत नाही. भारतीय जनता पक्षातून हेमामालिनी राज्यसभेवर गेल्या. नंतर २०१४ च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, तर पोटनिवडणुकीत त्या विजयी झाल्या. रुपेरी पडद्यावर ड्रीम गर्ल असलेली बसंती पडद्यावर गीता होती, तर राजकारणात मात्र सीताच राहिली. राज्यसभेवर गेलेल्या अभिनेत्रींमध्ये रेखा, जया बच्चन, जयाप्रदा या सगळ्या बिग बीच्या पडद्यावरील आणि पडद्यामागील नायिका होत्या, पण त्यांची कामगिरी काही खास म्हणून गौरवता येणारी नाही.
काँग्रेसमध्ये जाऊन कोणताही अभिनेता जम बसवू शकत नाही याची अलीकडची साक्ष म्हणजे रंगिला गर्ल उर्मिला मातोंडकर. २०१९ च्या लोकसभेचे तिकीटही मिळाले, पण तिला पराभव स्वीकारावा लागला. आता ती शिवसेनेत दाखल झाली. त्यामुळे अभिनेते नेते बनायला आल्यावर किती यश मिळेल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत मिथुन चक्रवर्तीची झालेली एण्ट्री किती हिट होते हे २ मे रोजी समजेल. तसा मिथुन चक्रवर्ती तृणमूलच्या राजकारणात नापास झाल्यानंतर हे नापास पोर भाजपने दत्तक घेतले आहे. त्याचा फायदा त्यांना किती होतो हे पहावे लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा