शुक्रवार, ५ मार्च, २०२१

आचरटपणाचा अतिरेक थांबला



अखेर साडेचार वर्ष प्रेक्षकांना पिडून माझ्या नवºयाची बायको ही मालिका येत्या रविवारी ७ तारखेला शेवटचे दोन तास पिडून बंद होत आहे. आता प्रेक्षकांना काहीतरी भविष्यात चांगले बघायला मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. एखादं कथानक किती ताणायचं आणि कथानकातील आत्माही संपून गेल्यावर ती मालिका केवळ टीआरपीसाठी चालवायची हा जो घाणेरडा ट्रेंड चालला आहे, त्याचा अतिरेक म्हणजे ही मालिका होती. आचरटपणाचा अतिरेक अशीच या मालिकेची ख्याती झाली होती.

या मालिकेचे खरे कथानक इतकेच की, एक सामान्य गृहिणी असलेल्या राधिकाच्या नवºयाचे छानछौकीवाल्या शनायाच्या प्रेमात पडणे. बावळट, सामान्य बायकोपेक्षा आकर्षक राहणारी शनाया त्याला आवडणे हे स्वाभाविक आहे. आपला मेक ओव्हर करून ती नवºयाला वठणीवर आणते इतपर्यंत ठिक होते. अतिशय हुशार असलेल्या गुरूनाथला त्याचीच कंपनी विकत घेऊन ३०० कोटींची कंपनी उभी करणारे कथानक हेही अतिरेकीच होते. या मालिकावाल्यांना फूड प्रोडक्टशिवाय दुसरे कुठलेही बिझनेस दिसत नाहीत का? असा प्रश्न पडतो. म्हणजे होणार सून मी या घरचीमध्ये गोखले यांची गृहउद्योगात फूड प्रॉडक्टस. माझ्या नवºयाची बायकोमध्येही मसाले कुटणे आणि फुड प्रॉडक्टस. आता येऊ कशी तशी मी नांदायलामध्येही खानविलकरांची फूड प्रॉडक्टस आहेत. अन्य उद्योग करण्याइतके आमचे निर्माते-लेखक अजून आत्मनिर्भर झालेले दिसत नाहीत, याची नोंद सरकारने घेतली पाहिजे.


पण राधिका कुरघोड्या करून मोठी बनते आणि गुरूनाथला धडा शिकवते इथपर्यंत हे कथानक संपले होते; पण त्यात ते पोपटरावचे लफडे, ३० कोटी जमवणे, गावात जाऊन लोकांच्या मदतीसाठी जाणे, त्या पैशांची पळवापळवी हा आचरटपणा होता. सुरुवातीला कुठेतरी मसाले कुटताना बायका दाखवल्यानंतर हा कारखाना, फॅक्टरी नक्की कुठे आहे याचा कसलाही संबंध नाही.

म्हणजे गल्लीत सुट्टीच्या दिवशी मुले जमतात. जी मुले जमली असतील त्यात जो खेळ खेळता येईल तसा खेळ करायचा. तसाच प्रकार या मालिकेत होता. एक राधिका दिसली की मग जे कोण उपलब्ध असतील त्यांना धरून एपिसोडची स्क्रीप्ट चालवायची. ज्यांना वेळ नाही त्यांना चक्क सोयीप्रमाणे बाजूला करायचे, असे कथानक रचले गेले होते. त्यामुळे या मालिकेचे कथानक म्हणजे नव्यानेच स्वयंपाक करायला शिकत असलेल्या मुलीला कणिक भिजवायची असेल, तर जशा अडचणी येतात तसे झालेले दिसते. म्हणजे कधी पिठात पाणी जास्त झाले म्हणून पिठ टाकायचे, तर कधी पुन्हा पाणी टाकायचे. गुरूनाथला काय नाही करायला लावले आहे या मालिकेत? हमाली करण्यापासून ते सिंगापूरचा रोमान्स करण्यापर्यंत आणि चपलेने मार खाण्यापासून वेड लागण्यापर्यंत, स्मृतीभ्रंश होण्यापर्यंत काय-काय केले आहे, हे त्यालाही सांगता येणार नाही; पण या मालिकेने विनाकारण साडेचार वर्ष ठाण मांडल्याने या कलाकारांवर जो छाप पडला आहे तो पुसून टाकण्यासाठी या कलाकारांना खूप काळ वाट पहावी लागेल. निदान इथून पुढे तरी इतक्या मालिका ताणायला नकोत याचे भान निर्माते सांभाळतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.


मालिका ही एखाद्या सुंदर मुलीच्या सुंदर स्कर्टप्रमाणे असली पाहिजे. म्हणजे स्कर्ट इतका लांब नको की, तो परकर वाटेल आणि इतका आखूड छोटा नको की, मुख्य विषयही कव्हर होणार नाही. त्याप्रमाणे योग्य भागात योग्य कथानक संपवण्याचे कसब लेखक, दिग्दर्शक, निर्माते यांनी दाखवले, तर प्रेक्षकांना चांगल्या मालिका नवनव्या मालिका बघायला मिळतील; पण आता साडेचार वर्षांनी का होईना हा आचरटपणा थांबतो आहे, म्हणून समाधान मानायला हरकत नाही. यात सगळ्यांच्या लक्षात राहील ती खºया अर्थाने व्यवहारी असलेली रसिका सुनील अर्थात शनाया. इतका दीर्घकाळ मालिकेत गुंतून आपले करिअर वाया घालवणे तिला पटले नाही, म्हणून मध्येच दोन वर्ष तिने मालिका सोडली. आपले परदेशात जाऊन करिअर पूर्ण करून आली आणि अखेरच्या टप्प्यात भाव खाऊन गेली. बाकी सगळे रेंगाळले ते काही काम नव्हते म्हणून असेच म्हणावे लागेल. किंबहुना आपल्या कार्यक्षमतेवर विश्वास नसल्याने हे कलाकार यात गुंतत गेले. काही काही भाग तर इतके रटाळ आणि फालतू होते. ते पिंकी नावाचे प्रकरण तर अत्यंत हिडीस होते. त्या अद्वैत दादरकरला त्या बाईच्या वेषात पाहणे ओंगळवाणे वाटत होते. त्याच्या प्रेमात श्रेयसने पडणे हे त्याचे पडीकपण दाखवत होते. कुणाच्याही प्रेमात तो पटकत पडत होता. शनाया झाली, पिंकी झाली, माया झाली हा आपला प्रेमात पडतो आहे फसतो आहे. काय हा आचरटपणा होता. त्या पिंकीच्या वेषात सौमित्रला पाहण्यापेक्षा बनवाबनवीमध्ये ओबडधोबड असला तरी लक्षा किती जबरदस्त दिसत होता; पण बायकांचे कपडे घालून प्रेक्षकांसमोर येण्याची हौस पुरुषांना का वाटत असते समजत नाही. त्या हवा येऊ द्यामध्ये तोच प्रकार. प्रत्येक जण साड्या नेसून येतोच आहे; पण हा आचरटपणा आता निरोप घेतो आहे याचे समाधान आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: