बुधवार, ३१ मार्च, २०२१

हे थांबणार कधी?

राज्यात सध्या सुरू असलेल्या प्रकारांनी सतत कोण ना कोणीतरी पत्रकार परिषद घेऊन नवनवीन माहिती जाहीर करत आहे. प्रसारमाध्यमांना नवे खाद्य मिळत असले, तरी ‘हे थांबणार कधी’ असा सामान्यांचा प्रश्न आहे. यातून साध्य काय होणार, हा सामान्यांचा प्रश्न आहे. फडणवीस येतात, पत्रकार परिषद घेतात, थोड्या वेळाने शरद पवार येतात, त्यांच्यानंतर चंद्रकांतदादा येतात, नारायण राणे येतात, मध्येच संजय राऊत येतात. फक्त आरोप आणि प्रत्यारोप. यातून पुढे काहीच होताना दिसत नाही. रोज नवीन गौप्यस्फोट केले जात आहेत. नेत्यांच्या पाठोपाठ होणाºया पत्रकार परिषदा, दाव्यांवर केले जाणारे प्रतिदावे, बदल्या, कोर्टात खटले दाखल करणे, अशा प्रकरणांमुळे चक्रावून टाकणारे वातावरण निर्माण झाले आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. याला राजकारण म्हणतात का? याला सरकार चालवणे म्हणतात का? नवी पिढी हे पाहताना अक्षरश: त्याकडे करमणूक म्हणून पाहते आहे. म्हणजे बिग बॉसमध्ये राखी सावंत जशी करमणूक करत असते तशीच करमणूक कॅमेºयापुढे नवीन माहिती घेऊन येणारे नेते करत आहेत. तरुण पिढी विचारत आहे की, काय आजचे आदर्श आहेत आमच्यापुढे? पूर्वीच्या लोकांना महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवराय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कुणी सहकार महर्षी, कुणी शिक्षण महर्षी, कोणी समाजसेवक असे आदर्श होते, पण हे आदर्श निर्माण होण्याचे दिवस या राज्यातून संपले का? आता फक्त टीकाटिपण्णी आणि याला गाडा रे त्याला पाडा, हा काय प्रकार चालला आहे? हे कुठेतरी, कधीतरी थांबले पाहिजे असे वाटते.


खरं तर मूळ प्रकरण अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी कोणी ठेवली हे आहे. तो विषय कुठल्या कुठे भरकटवला गेला. ‘लेटर बॉम्ब’मुळे त्याला वेगळेच परिमाण लाभले. सोमवारी लोकसभेतही या प्रकरणावरून वादंग माजवले गेले. त्यातून महाराष्ट्राची पुरती शोभा झाली आहे. राज्याच्या लौकिकाला त्यातून बाधा येत आहे, हे लक्षात घेण्याची जबाबदारी कोणाची आहे? महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी याचा विचार केला पाहिजे. गेल्या तीन-चार दिवसांत इतक्‍या पत्रकार परिषदा झाल्या की, त्यातून सगळेच जण पुरते भांबावून गेले. यातील काही पत्रकार परिषदा तर केवळ दुसºया पक्षाचा एखादा नेता काहीतरी बोलला म्हणून त्याला काहीतरी उत्तर देण्यासाठी झाल्या. राज्यातील दूरचित्रवाणी वाहिन्या याचे रंगवून रंगवून वार्तांकन करीत राहिल्या. आता नॅशनल मीडियानेही यात लक्ष घातल्याने या साºया प्रकरणाला मोठीच हवा दिली गेली आहे. हे सगळे ठरवून चालले आहे, हे सहजपणे कोणाच्याही लक्षात येईल. हे कुठेतरी थांबले पाहिजे. यातून साध्य काय होत आहे? जनतेचे सगळे प्रश्न संपले आहेत का? लोक विसरले का, या देशात चार महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू होते. इथला बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे हे लोक विसरले का? बेरोजगारी, टंचाई, पाण्याचा प्रश्न, जगण्याचा प्रश्न, शेतकºयांचे प्रश्न, सगळे कसे बाजूला पडले एकाएकी? आठ आठ वर्षं झाली तरी काही प्रकरणांचा तपास लागत नाही, तेव्हा पोलीस यंत्रणा गप्प बसतात आणि आपल्याला वसुली करायला लावली म्हणून गळा काढतात. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे खुनी अजून पकडले गेले नाहीत. तो तपास कुठपर्यंत आलेला आहे? पानसरे हत्येचे काय झाले? त्याचा तपास नाही. हे सगळे प्रश्न अचानकपणे असे बाजूला कसे पडतात? त्यामुळे पोलिसांनी त्यांची कामे केली पाहिजेत आणि राज्यकर्त्यांनी जनतेची कामे केली पाहिजेत. एकमेकांत गुंतागुंत झालेली असली की त्याचा नक्की शेवट काय हे कळेनासे होते. नेमके तसेच काहीसे इथे झालेले आहे.

राज ठाकरे किंवा शरद पवार म्हणतात ते अगदी खरे आहे की, मूळ विषय हा अंबानी यांच्या घराच्या बाहेर स्फोटकांची गाडी कोणी ठेवली हा आहे. त्याचबरोबर मनसुख हिरेन यांची हत्या कोणी केली हाही महत्त्वाचा विषय आहे. या दोन महत्त्वाच्या विषयांवर तपास केंद्रित होणे आवश्‍यक असताना, सचिन वाझे यांना कामावर कोणी घेतले येथपासून वाझेंना गृहमंत्र्यांनी शंभर कोटी रुपयांचे टार्गेट कसे दिले, या विषयापर्यंत अनेक स्वरूपाचे फाटे त्याला फोडले गेले. आक्षेपांचे मुद्दे उपस्थित करण्यालाही काही ताळतंत्र असला पाहिजे, त्याचेही येथे भान राखले गेले नाही. हे कशासाठी सगळे केले गेले? फक्त गॉसिपिंगचे राजकारण चालले आहे असेच चित्र यातून दिसते आहे. गेल्या काही दिवसांतील भाजपने चालवलेला आकांडतांडव लक्षात घेतल्यानंतर या मूळ प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास करण्यात त्यांना स्वारस्य आहे की नाही, हेच लक्षात येईनासे झाले आहे, पण हे कुठेतरी थांबले पाहिजे. पोलिसांच्या तपासकामात अनावश्यक राजकीय हस्तक्षेप थांबला पाहिजे. तपासाची सगळी सूत्रं आपल्या हातात आहेत असे भासवून फडणवीस सध्या जो समांतर तपास करत आहेत तो त्यांनी पोलिसांकडून करवून घेतला पाहिजे, पण हे प्रकरण कुठेतरी थांबले पाहिजे आणि महाराष्ट्राची नाचक्की थांबवली पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: