भारतीय जनता पक्षाला दक्षिणेत शिरकाव करता आलेला नाही. दक्षिणेचे प्रवेशद्वार असलेल्या कर्नाटकात त्यांनी उलथापालथीचे राजकारण करून सत्ता संपादित केली असली, तरी तामिळनाडू आणि केरळपर्यंत वाटचाल करणे तितके सोपे नाही, कारण वर्षानुवर्ष ज्या राज्यांवर जयललिता आणि करुणानिधी यांच्या आलटून-पाटलून सत्ता असायच्या तिथे दुसºया कोणाचा शिरकाव होणे शक्यच नाही; पण नेमकी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकेकाळी जयललिता यांच्या निकटवर्ती असलेल्या शशिकला नटराजन यांनी निवृत्ती घोषित केली. याचा नक्कीच काहीतरी अर्थ आहे. शशिकला यांनी सत्ता, श्रीमंती व तुरुंगवासही भोगला; पण त्याचवेळी राजकारणात कमबॅक करण्याचे शक्य असताना त्यांनी निवृत्तीचे संकेत दिले. हे नक्की काय राजकारण आहे, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. तामिळनाडूच्या राजकारणात रजनीकांत काहीतरी चमत्कार घडवेल, अशी अपेक्षा असताना अचानक रजनीकांत यांनीही इतक्यात नकोचा पवित्रा घेतला. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात आता कमल हसन काही गडबड करतात का, यशस्वी होतात का, हे अंदाज बांधत असतानाच भाजपला थोडा स्पेस मोकळीक निर्माण झाली आहे असे चित्र दिसते आहे. तामिळनाडूत द्रमुक, अद्रमुक आणि कमल हसन यांच्या स्पर्धेत कुठेतरी मतविभाजनाचा फायदा उठवत शिरकाव करायचा आणि नंतर यापैकीच एकाला हाताशी धरायचे असे काही तरी भाजपचे गणित असू शकते. किमान या तिघांपैकी एकाला एनडीएशी जोडणे हे तरी भाजपचे लक्ष्य असू शकते. या पार्श्वभूमीवर शशिकला यांची निवृत्ती किंवा निवडणुकीच्या राजकारणापासून लांब राहणे हे भाजपच्या पथ्यावर पडू शकते.
विधानसभेची निवडणूक काही आठवड्यांवर आहे. त्यामुळेच शशिकला यांनी अचानक घेतलेला हा निर्णय अनेकांना चकित करणारा ठरला. २७ जानेवारी रोजी त्यांची बंगळुरूच्या तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर त्या राज्याच्या राजकारणात व विशेषत: अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या कारभारात सक्रियपणे सहभागी होतील, अशी अटकळ बांधली जात होती. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या दोन पानी पत्रात आपला हा निर्णय नमूद केला आहे. जयललिता यांची स्वर्णिम राजवट परत यावी, यासाठी आपण प्रार्थना करू, असे त्यात म्हटले आहे. अम्मा ज्याप्रमाणे म्हणत, त्याप्रमाणे द्रमुक या दुष्ट शक्तीचा पराभव करणे हे अम्मांच्या पक्षाच्या प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याचे ध्येय असले पाहिजे, असे पत्रात म्हणताना शशिकला यांनी आपली राजकीय भूमिका मांडली होती. मग अवघ्या महिनाभरात काय झाले असे अचानक की, त्यांनी माघार घ्यावी?
जयललिता यांच्या राजवटीत शशिकला व त्यांचे कुटुंब एक बडे प्रस्थ बनले होते. जया अम्मा यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे, काही काळ का होईना; पण शशिकला यांच्या हाती होती. त्याच वेळी ओ पनीरसेल्वम मुख्यमंत्री झाले. त्यांचा शशिकला यांना विरोध होता. त्यांनी जयललिता यांच्या समाधीसमोर धरणे धरले; पण त्यांची पदावरून उचलबांगडी झाली. त्यानंतर शशिकला यांच्या विरुद्ध बेहिशेबी संपत्ती जमा केल्याच्या आरोपावरून खटला दाखल झाला. त्यांची व दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी झाली. त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली. २०१८मध्ये अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम हा स्वत:चा पक्ष स्थापला. विधानसभेत प्रवेश केला, लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाले नसले, तरी अण्णा द्रमुकची बरीच मते त्यांनी खेचली. आता दिनकरन यांची भिस्त शशिकला यांच्या प्रतिमेवरच होती. शशिकला यांच्या निर्णयाने दिनकरन सर्वात जास्त अस्वस्थ झाले; पण आपली मते फुटणार नाहीत या विचाराने अण्णा द्रमुकने सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. भाजप या पक्षाशी युती करत आहे. शशिकला पक्षात परत याव्यात असे भाजपला वाटत होते. त्यांच्या आधारे जयललिता यांचा वारसा पुढे चालवण्याचे आश्वासन देणे सोपे ठरले असते. जर अण्णा द्रमुकला विजय मिळाला, तर त्यांचा राजकीय वनवास लांबेल; पण जर सत्ता गेली तर पक्ष वाचवण्यासाठी कार्यकर्ते त्यांना साकडे घालतील. मग पक्षात व राजकारणात परतणे सोपे ठरेल, हा विचार करून शशिकला यांनी तूर्त राजकारण टाळण्याचे ठरवले असावे; पण भाजपला काही फायदा देण्यासाठी ही पोकळी त्यांनी निर्माण केली आहे का?, हे पाहावे लागेल.
जयललिता यांच्या पक्षाशी जवळीक साधून एनडीएचा घटक पक्ष वाढवायचा आणि दक्षिणेत मजबूत होण्याचे भाजपचे स्वप्न होते. तशा जयललिता पंचवीस वर्षांपूर्वी एनडीएबरोबर होत्याच. पण वाजपेयी सरकारला याच जयललिता यांनी खूप नाचवले होते. त्यावेळी समता, ममता आणि ललिता तिघेही भाजपबरोबर होते, तरी ते त्यांना नाचवत होते. आज एनडीएबरोबर यापैकी ना ललिता आहे ना ममता. भाजप सगळीकडून वाढत असला, तरी त्यांची ती सूजच जास्त आहे. कारण या पक्षातले आपल्या पक्षात घ्यायचे, निवडून येण्याची क्षमता असलेले अन्य पक्षातले नेते पळवायचे आणि त्यावर कमळाचे लेबल लावायचे; पण हे कमळाचे लेबल दक्षिणेत लावणे अवघड आहे. दक्षिणेत त्यांच्या लेबलवरच त्यांना मदत करायचे. त्याच्याशी मदतीचे धोरण घेतच मोठे व्हायचे धोरण भाजपला स्वीकारावे लागणार आहे. जी तडजोड नितीशकुमार यांच्याशी बिहारमध्ये केली तशाच तडजोडी करत दक्षिणेत घुसावे लागणार आहे. त्यामुळे जे जयललिता यांच्या पक्षाला आघाडीसोबत जोडण्यासाठी शशिकला यांचे पुनरागमन महत्त्वाचे होते; पण त्यांच्या निवृत्तीनंतर निर्माण झालेली ही पोकळी कमळ फुलवण्यासाठी होते का, हे पाहावे लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा