लोकशाहीत विरोधी पक्षाला सत्ताधारी पक्षाइतकेच महत्त्व आहे. विरोधकांनी सरकारवर अंकुश ठेवायचा असतो. संविधानाला हेच अभिप्रेत आहे; पण इथे तर सत्ताधारी पक्षाला कामच करू द्यायचे नाही, अशी विरोधी पक्षांची भूमिका आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे परस्परांचे शत्रू आहेत, असे वातावरण निर्माण केले जात आहे. कोणत्याही चांगल्या कामासाठी विरोधक आणि सत्ताधारी एकत्र येतात असे दिसत नाही. आज मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, शेतकºयांचे प्रश्न आहेत. यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा हे प्रश्न सोडवण्यासाठी साधक बाधक चर्चा होऊन दोघे अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर एक का होत नाहीत? हे लोकशाहीला अभिप्रेत नाही. केंद्रात आणि राज्यात सगळीकडे हाच प्रकार आहे. केवळ विरोधासाठी विरोध करायचा हेच फक्त काम राजकीय पक्षांना समजत आहे. आपण वेगवेगळ्या पक्षांचे असलो, तरी जनहितासाठी एक व्हायचे असते या भावना संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे राजकारण नेमके कोणत्या दिशेने चालले आहे हे अनाकलनीय आहे. सरकारच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याचे मोठे मन विरोधकांकडे असले पाहिजे, तसेच विरोधकांच्या चांगल्या प्रस्तावाचे स्वागत करण्याची जबाबदारी सत्ताधाºयांची आहे; पण आम्ही विरोधक म्हणजे शत्रू आहोत, अशा प्रकारे वावरत असू तर ते चुकीचे आहे.
खरं तर राजकारण हा अगदी प्राचीन काळापासून, इतिहासकाळापासून भारताच्या समाजजीवनाचा आत्मा राहिला आहे. भारताच्या वैभवाचे अनुष्ठान म्हणजे राजकारण मानले जाते. या राजकारणात राष्ट्र जीवन महत्त्वपूर्ण मानले जाते. राष्ट्र जीवन हे पूर्वीपासून राजकारणाशी जुडलेले आपण पाहतो आहोत. राष्ट्र जीवनात जे आदर्श आहेत, ते राजकारण करताना पाळले गेलेत, तरच देश प्रगती करू शकणार आहे. परस्परांचे कितीही विरोधक असलो, तर जनहितासाठी एक झालेच पाहिजे हे लक्षात घेण्याची गरज आहे; पण तसे होताना दिसत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.
लोकशाहीत जेव्हा निवडणुका होतात आणि पाच वर्षांसाठी एखाद्या राजकीय पक्षाला वा पक्षांच्या आघाडीला जनतेकडून कौल मिळतो, तेव्हा पाच वर्षे सरकार चालवण्याचा घटनात्मक अधिकार मिळतो. त्या अधिकारावर विरोधी पक्षांनी अतिक्रमण करणे अपेक्षित नसते. सरकारवर टीका करण्याचा विरोधी पक्षांचा अधिकार आहे. तो अमान्य करण्याचे कारण नाही; पण सरकारला कामच करू द्यायचे नाही, ही विरोधकांची कृती लोकशाहीला मारक आहे. हा नवा प्रकार राज्यापासून केंद्रापर्यंत सगळीकडे रूजतो आहे हे वाईट आहे. कोरोनाच्या काळात शाहीनबागचे आंदोलन जाणूनबुजून उभे करण्यात आले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिल्लीच्या दौºयावर आले असताना जाणीवपूर्वक दंगल घडवण्यात आली. गेल्या तीन-साडेतीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकºयांचे आंदोलन सुरू आहे. आता त्यांनी सीमेवर कच्ची घरे बांधायला घेतली आहेत. हे काय चालले आहे? हे खरोखरच शेतकरी आहेत का? शेतकºयाला इतका वेळ आहे का वाया घालवायला? या सगळ्या घटना पाहता भारतात स्थिती चिंताजनक आहे. सगळीकडे अंदाधुंदी माजली आहे. एमपीएससी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सरकारच्या चुकीमुळे रस्त्यावर उतरावे लागते. मराठा आरक्षणासाठी मराठा समजाला लढा द्यावा लागतो आहे. सरकार त्याबाबत खंबीर भूमिका घेताना दिसत नाही. शेतकºयांचे अनेक प्रश्न आहेत. शिक्षणाचे प्रश्न आहेत. गेल्या वर्षभरापासून शिक्षण व्यवस्था ठप्प झालेली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याकडे कोणीही पाहत नाही, त्यावर बोलत नाही. पाच राज्यांत निवडणुकांचा कार्यक्रम आहे. त्यात पश्चिम बंगालमध्ये दंगली घडत आहेत. हल्ले होत आहेत. हे सगळे अराजक माजवले जात आहे ते कशासाठी? लोकशाहीला मुठमाती देण्याचा हा प्रकार का केला जात आहे?
कायदा-व्यवस्था कशी बिघडेल यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. भारताची जगात प्रतिष्ठा वाढवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कॅनडासारख्या अनेक देशांत मोदींच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले, त्यांच्या सरकारच्या वतीने ते लावले गेले; पण त्याचे कौतुक कोणी केले नाही. हा मनाचा मोठेपणा विरोधकांकडे का नाही? कारण विरोधक म्हणजे आमचे शत्रू आहेत ही भावना रूजली आहे ती लोकशाहीला मारक आहे.
केंद्रात काँग्रेस हा त्यातल्या त्यात मोठा पक्ष आहे; पण विरोधीपक्षाच्या दर्जा नसला तरी त्यांच्यातील पोरकटपणामुळे जनहिताचे मुद्दे न मांडता निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे मांडले जातात. काँग्रेसचे नेते राहुल गांधी अजून २०१६-१७मध्येच आहेत. त्यांच्यादृष्टीने अजून २०२१ साल उगवलेलेच नाही. अर्थसंकल्पाच्या भाषणात ते अजूनही नोटबंदी, जीएसटी आणि राफेलवर टीका करत होते. नोटबंदीनंतर ५ केंद्रीय अर्थसंकल्प झाले. जीएसटी म्हणजे फक्त गब्बरसिंग टॅक्स ही कोटी केली लोक टाळ्या वाजवतील, अशी अपेक्षा करून आदळआपट करतात; पण कोणत्याही मुद्यात दम नसतो. मोदी सरकारने केलेले सगळे वाईटच, चुकीचेच आहे, हे बोलण्यासाठी आपल्याला इथे पाठवले आहे असा त्यांचा समज आहे. मग चुकीचे काय आहे हे सांगता येत नाही. अशावेळी नोटबंदी, जीएसटी, अंबानी, अदानी यांच्या नावाने शंख करायचा असा प्रकार ते करतात. हे काय लोकशाहीतील चांगले लक्षण म्हणायचे का? तुम्हाला जनतेने यासाठी निवडून दिले आहे? जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर बोला; पण सत्तेत आपले विरोधक आहेत म्हणजे ते शत्रू आहेत. त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीवर टीकाच करायची, असा समज त्यांचा आहे. हा समज बदलण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा