अतुलशास्त्री भगरे हे नाशिकचे उत्तम पंडित, ज्योतिषी आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते झी मराठीवर सकाळी साडेआठ वाजता भविष्य सांगत आहेत. भगरे गुरुजींचे भविष्य ऐकणे हे अत्यंत करमणुकीचे आणि माहितीप्रधान असते. त्यापूर्वी विजय केळकर, जोशी हे लोक भविष्य सांगत होते, पण त्यांची भविष्य कथनाची पद्धत ही अनाकलनीय अशी होती. अमुक एक ग्रहाचा त्रिकोणयोग, युती झाली वगैरे. लोकांना त्याच्याशी काही देणेघेणे नसते. दिवस कसा जाईल, चांगला की वाईट, काही धोका आहे का, नुकसान आहे का, लाभ आहे का, हे समजणे लोकांना हवे असते. नेमकी ही नस पकडून भगरे गुरुजींनी अतिशय रंजकपणे भविष्य कथनाला सुरुवात केली आणि हा हा म्हणता त्यांचा असा प्रेक्षकवर्ग जमू लागला. भविष्य, ज्योतिष यावर विश्वास नसणाराही केवळ अतुलशास्त्रींना ऐकण्यासाठी सकाळ सकाळ टीव्हीपुढे बसू लागला हे अतुलशास्त्री भगरे गुरुजींचे यश होते.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागला. सर्व मालिकांचे चित्रीकरण थांबले. जुने भाग, जुन्या मालिका पुन्हा पुन्हा दाखवल्या जाऊ लागल्या. या काळात झी मराठी कोणी तारले असेल तर ते या अतुलशास्त्री भगरे यांनी. लॉकडाऊनच्या काळात वाहिन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली होती. अशातच दूरदर्शनने आपले हुकमी एक्के बाहेर काढले. रामायण आणि महाभारत या मालिका सुरू केल्या. त्यामुळे प्रेक्षक दूरदर्शनकडे वळला. अशा परिस्थितीत झी मराठीपुढे प्रेक्षक टिकवणे हे आव्हान होते. त्यासाठी कदाचित त्यांनी आपली कुंडली भगरे गुरुजींना दाखवली असावी, पण त्याचवेळी चाणाक्ष झी मराठीच्या व्यवस्थापनाने भगरे गुरुजींचीच कुंडली पाहिली असावी. ही कुंडली आपले भाग्य उजळू शकते याची जाणीव झी मराठीला झाली आणि आपला टीआरपी वाढवण्यासाठी भगरे गुरुजींना संधी दिली गेली. दररोज सकाळी साडेआठ ते नऊ असा अर्धातास भगरे गुरुजींना मिळत होता. तो वेळ वाढवून दिला. शिवाय पुन्हा सायंकाळी साडेपाचला पुन:प्रक्षेपण सुरू केले. त्यामुळे खरोखरच प्रेक्षकवर्ग मिळवण्यात झी मराठीला यश आले.
भगरे गुरुजी अर्धा तास राशीभविष्य सांगतातच, पण त्याही पलीकडे ते आयुर्वेदातील, आजीबाईच्या बटव्यातील जी औषधांची माहिती देतात ती फार महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या आजारांवर, व्याधींवर घरगुती असे जे उपचार ते सांगतात, कसले काढे कसे घ्यायचे याची ते माहिती देतात. यामुळे आबालवृद्ध हा कार्यक्रम पाहू लागले.
औषधांची माहिती, राशीभविष्य, दिनविशेष अशी सगळी माहिती दिल्यावर अतुलशास्त्री भगरे नामक ज्ञानकोषातून पुराणातील कथा बाहेर पडू लागल्या. या काळात दररोज ते विष्णुपुराणातील कथा सांगू लागले. या कथा सांगताना त्यांची देहबोली, हावभाव, आवाजातील चढउतार इतके स्पष्ट सुंदर होते की, साक्षात डोळ्यापुढे चित्र उभे करण्यात ते यशस्वी झाले होते. कथा श्रवण करणे हे प्रत्येकालाच आवडत असते, पण ती सांगण्याची एक शैली असावी लागते. ती चांगली शैली भगरे गुरुजींकडे असल्याने त्यांनी झी मराठीचा प्रेक्षकवर्ग अक्षरश: खिळवून ठेवला होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात अतुलशास्त्री भगरे यांनी झी मराठीला संजीवनीच दिली होती.
त्याचे बक्षीस म्हणून आता दररोज सायंकाळी ८ मार्चपासून ‘घेतला वसा टाकू नको’ नावाची मालिका आता सुरू झाली आहे. भगरे गुरुजींच्या श्रवणीय निवेदनातून ही मालिका पुढे सरकत आहे. वेगवेगळ्या व्रतांची माहिती यातून दिली जात आहे. त्याचे सादरीकरणही उत्तम आहे. विशेष म्हणजे गेला महिनाभर या कार्यक्रमाची जाहिरात होत होती. त्यावेळी भगरे गुरुजी नेहमीप्रमाणे माहिती देतील असे वाटत होते, पण त्या व्रतांच्या कथांचे असे सुंदरपणे सादरीकरण होणार आहे अशी कोणी कल्पनाही केलेली नव्हती, पण त्यांचे सादरीकरण करून भगरे गुरुजींनी आपल्यातील कलाकारही दाखवून दिला आहे.
झी मराठीवरील सासवा-सुना, सवती-सवती, नवरा-बायको यांची भांडणे, कुरघोड्या करणाºया मालिकांपेक्षा एक चांगला कार्यक्रम झी मराठीला संजीवनी देणारा ठरतो आहे. हसूही न येणारे ‘चला हवा येऊ द्या’सारखे कार्यक्रम सात-सात वर्ष चालू आहेत, पण त्याहीपेक्षा चांगले काही दिले तर प्रेक्षक कोणत्याही वेळेत ती मालिका, कार्यक्रम पाहू शकतात हे ‘घेतला वसा टाकू नको’ या कार्यक्रमातून भगरे गुरुजींनी दाखवून दिले आहे.
कोणतीही व्रतवैकल्य करताना त्यामागची कामिकता बाजूला करून त्याचा नेमका अर्थ सांगणे महत्त्वाचे असते. व्रतवैकल्ये म्हणजे देवाशी केलेला व्यवहार, व्यापार नाही, तर त्याचा फायदा आपल्याला नक्की कसा होतो हे सांगणे महत्त्वाचे असते. तशा अनेक मालिका, चित्रपटांतून नवनवी व्रते पहायला मिळतात, पण ती सात्विकपणे सांगणे आणि त्यांतील दांभिकपणा नष्ट करणे महत्त्वाचे असते. अतुलशास्त्री भगरे यांच्या या मालिकेतून त्याचीच अपेक्षा आहे, पण भगरे गुरुजींनी झी मराठीचा टीआरपी वाढवला हे मात्र नक्की.
आता झी मराठी फारच अध्यात्मिक होताना दिसते आहे. कारण दोन महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतही स्वीटूचे लग्न ठरावे म्हणून तिला शेजारच्या बाईने १७ शनिवार करायला सांगितले आहेत. आता हे कुठले काढीव व्रत आहे हे माहिती नाही, पण १७ शनिवार केल्याचे कुठेही ऐकिवात नाही. सोळा सोमवार, सोळा शुक्रवार, २१ संकष्टी, ११ गुरुवार, असे आकडे ऐकले आहेत, पण जिच्या लग्नात सतरा विघ्न येत आहेत त्या स्वीटूला १७ शनिवार हे व्रत झी मराठी निर्मितच असावे. मुळात लग्न ठरण्यासाठी रुक्मिणी स्वयंवरची पोथी, नवनाथातील अध्याय वाचल्याचे ऐकले होते, पण १७ शनिवार हे नवे व्रत भगरे गुरुजींना न विचारता केलेले दिसते. शनिवार हा मारुतीचा वार. वैराग्याचे दैवत मारुती आणि लग्न ठरण्यासाठी तो कसा प्रसन्न होणार हे आता स्वीटूचे लग्न ठरताना पहायला मिळेल, पण जर खरंच स्वीटूला ओम भेटला, तर महाराष्ट्रातील लग्नाळू मुली हे व्रत सुरू करणार का? हा प्रश्न निर्माण होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा