पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता वेगात सुरू झाला आहे. त्यामुळे होळीच्या अगोदरच राजकीय धुलवडीला आता वेग आलेला आहे. निवडणूक आयोगाने या पाच विधानसभांच्या तारखांची घोषणा करताच साºया नेत्यांनी नव्या दमाने प्रचाराच्या योजना आखल्या आहेत. या पाच राज्यांच्या निवडणुका निरनिराळ्या तारखांना आणि विविध टप्प्यांमध्ये होणार असल्या, तरी निकाल मात्र एकत्रितपणे २ मे रोजी जाहीर होणार आहेत. या राज्यातील निवडणुका देशाच्या राजकारणात मोठे बदल घडवून आणणाºया ठरणार आहेत. अर्थात असे नेहमीच म्हटले जाते. कोणत्याही चार-पाच राज्यांच्या निवडणुका आल्या की, त्याकडे मिनी लोकसभा म्हणून पाहिले जाते, पण त्यातून काही चित्र तयार होत नसते हे तितकेच खरे. म्हणजे शरद पवारांनी या निवडणुकीवरून केंद्राची भावी स्थिती काय असेल यावर भाकीत केले होते, पण मुळातच या पाच राज्यांत आसामवगळता भाजप कुठेच सत्तेत नाही. सत्तेतच काय त्यांच्या जागाही नगण्य अशाच आहेत. त्यामुळे त्यांनी इथे सत्ता मिळवली नाही तरी फारसा फरक पडणार नाहीये. एक जागा जरी जास्त मिळाली तरी त्यांना तो बोनस आहे, पण सत्तेत असलेल्या पक्षांची मात्र कसोटी आहे हे नक्की. त्यामुळेच आता प्रचार शिगेला पोहोचला आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात सत्तेसाठी मोठा संघर्ष बघायला मिळत आहे. राज्यातील ममता बॅनर्जी यांचे सरकार उलथवून टाकण्यासाठी भाजपने ‘इस बार दोसौं पार’ असा नारा दिला आहे. त्यादृष्टीने या पक्षाने पावले टाकलेली आहेत, पण हे शक्य होण्याची शक्यता फारच कमी आहे. भाजपने दोसौं पार नाही, पण शंभरपर्यंत मजल मारली तरी ती खूपच मोठी हनुमान उडी आहे, असे म्हणावे लागेल. प. बंगाल म्हणजे हिंसाचार अटळ... असो. तृणमूल काँग्रेसनेही हिंसाचाराच्या मार्गाचा अवलंब करीत तिसºयांदा राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी जोर लावला आहे. या राज्यातील सत्ता विरोधकांसाठीही महत्त्वाची ठरणार आहे, कारण ही सत्ता आली तर केंद्रातील भाजपच्या घोडदौडीला लगाम लावल्याचे श्रेय त्यांना मिळणार आहे. त्यामुळे भाजपविरोधक सगळे ममतांच्या पाठीशी उभे आहेत. ममता बॅनर्जींना न मागताच ही मदत मिळत आहे. त्याचा त्यांना फायदा होणार हे नक्की.
केरळमध्येही प्रचाराचा बिगुल फुंकला गेला आहे. केरळमध्ये पराभव झाल्यास देशातील सत्तेतून डावे लेफ्ट झाल्याशिवाय राहायचे नाहीत. भारतात त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि केरळ हे डाव्या पक्षांचे गड मानले जायचे. तथापि, पश्चिम बंगालचा गड दहा वर्षांपूर्वीच ढासळला. त्यावर तृणमूलने कब्जा केला. डाव्यांचा त्रिपुराचा बुरुजही आता ढासळला आहे. या पक्षाला भाजपने सत्तेबाहेर फेकले आहे. तेथील बुरुजावर आता केसरिया फडकत आहे. आता उरले केरळ. तेथे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीला सत्ताच्युत करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडीने आणि भारतीय जनता पक्षाने प्रयत्न चालविले आहेत. पिनाराई विजयन यांना डाव्यांची सत्ता टिकवून ठेवता आली नाही, तर त्यांच्या हातात देशातील एकही राज्य शिल्लक राहणार नाही. त्यामुळे इथेही धुलवड जोरात होणार हे नक्की. दक्षिणेत सध्या कर्नाटकशिवाय दुसरे कोणतेच राज्य भाजपच्या ताब्यात नाही. त्यामुळे तामिळनाडूमध्ये आपल्या पक्षाला काही जागा मिळाव्यात म्हणून भाजपने अण्णाद्रमुकच्या दोन गटांसह युती केली आहे. तेथे भाजपला फारशी आशा नाही. युतीत भाजपच्या वाट्याला केवळ २० जागा आल्या असून, भाजपने तेवढ्यावरच समाधान मानले आहे. काँग्रेससाठी केरळ, तामिळनाडू आणि आसामच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत.
आसाममध्ये पुन्हा भाजपची सत्ता येईल, असा अंदाज विरोधकसुद्धा व्यक्त करीत आहेत. सर्वानंद सोनोवाल यांनी गेल्या पाच वर्षांत राज्याचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले आहे. पक्षाने पाच वर्षांपूर्वी जो जाहीरनामा घोषित केला, त्यातील ६० टक्के आश्वासनांची पूर्तता झालेली आहे. पाच वर्षांपूर्वी आसामदेखील हिंसाचाराने धगधगत होता, मात्र भाजपने त्यावर फुंकर घालून राज्यात शांतता प्रस्थापित करण्यात यश मिळविले आहे. ईशान्येकडील लोकांना देशाच्या मुख्य प्रवाहात जोडण्याचे कामदेखील सर्वानंद सोनोवाल यांच्या सरकारने केले आहे. गेल्या पाच वर्षांत अनेक बंडखोरांना शरणागती पत्करण्यास या सरकाराने बाध्य केले. या सर्वांची फळे भाजपला मिळून, पुन्हा एकदा या राज्यातील जनता या पक्षावर विश्वास टाकेल, असे सध्याचे वातावरण आहे. त्यामुळे इथे शांततेत निवडणुका होतील, पण खरी राजकीय धुलवड सुरू आहे ती फक्त पश्चिम बंगालमध्ये. तामिळनाडूचे राजकारण सातत्याने दोन गटांत विभागलेले राहिले आहे. त्या दोन्ही गटांचे मुख्य नेते जयललिता आणि करुणानिधी हे आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या उत्तराधिकाºयांचा उदय झालेला आहे. एम. के. स्टॅलिन यांचा द्रमुक आणि पलानीस्वामी यांचा अण्णाद्रमुक असे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत आहेत. काँग्रेस पक्ष स्टॅलिन यांच्या द्रमुकबरोबर जुळवून घेतोय. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने फक्त आठ जागा जिंकल्या होत्या. यामुळे सध्या जागावाटपात स्टॅलिन यांनी काँग्रेसला कमी जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. जयललितांच्या निकटवर्ती शशिकला यांनी तात्पुरता राजकारण संन्यास घेतला आहे. त्याचा फायदा नेमका कोणाला होतो हे पहावे लागेल, पण इथे द्रमुक, अद्रमुक यांनाच धुलवड खेळायची आहे. काँग्रेस आणि भाजप हे फक्त इथे पिचकारीसारखे असणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा