कोरोना व्हायरसच्या काळात लॉकडाऊनमुळे माणसं घरात बसून होती आणि काही ठिकाणी अजूनही आहेत, मात्र या काळात सायबर गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाल्याचे दिसत आहे. आॅनलाईन व्यवहार वाढले तसे आॅनलाईन गुन्हेगारी वाढली आहे. तुमच्याकडची एखादी वस्तू विकायला तुम्ही ओएलएक्सवर टाकली की, हमखास तुम्हाला याचा अनुभव लगेच येईल. लॉकडाऊनमुळे त्यामुळे चोºया, दरोडे या प्रकारात घट झालेली असली तरी सायबर गुन्ह्यांमध्ये मात्र प्रचंड वाढ झालेली दिसते. आॅनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे पारंपरिक गुन्हेगारीचे प्रमाण एकीकडे कमी होत असताना सायबर गुन्हेगारी वेगाने वाढत आहे, हे आता दिसून येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आॅनलाईन व्यवहारामुळे, तर सायबर गुन्हेगारांसाठी जणू पर्वणीचाच काळ आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष, गुंतवणुकीचे आमिष, लॉटरी लागल्याचे आमिष, संकेतस्थळावरून मोबाइल संच, फर्निचर, दुचाकी, मोटारी अशा वस्तूंची विक्री करायची आहे, असे आमिष दाखवून सामान्यांना हातोहात गंडा घालण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यामुळे दर दिवशी सायबर गुन्ह्यांत वाढ होत आहे. यात आर्थिक फसवणुकीचे प्रमाण सर्वाधिक आहे.
वास्तविक याबाबत सायबर विभागाकडून वेळोवेळी प्रबोधन करण्यात येत असले, तरी सर्वसामान्य नागरिक खास करून महिला याकडे कानाडोळा करताना दिसतात. कोणतीही बँक आपला पासवर्ड, खाते नंबर वा इतर गोपनीय माहिती विचारत नाही, असे वारंवार खुद्द बँकांकडून सांगण्यात येत असते. तसे मेसेजही बँका आपल्या ग्राहकांना पाठवत असतात, पण तरीही हमखास कोणाचा तरी फसवा फोन येतो आणि ग्राहक फसला जातो. कोविड कर्ज, मुद्रा कर्जच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून कर्ज घ्या म्हणून फोन करणारे अनेक लोक कार्यरत आहेत. तुम्हाला ३० मिनिटांत ते २४ तासांत कर्ज खात्यात ट्रान्स्फर करतो असे सांगून सर्व्हिस आणि प्रोसेसिंग चार्जेसच्या नावाखाली पैसे गोळा करणारी यंत्रणा कार्यरत आहे. काही अॅप डाऊनलोड करा आणि दहा मिनिटांत तुमच्या खात्यात पैसे जमा करा, असले मेसेज येतात. त्यात अनेकजण फसतात.
बँक बझार, पैसा बझार, बजाज फायनान्स, आदित्य बिर्ला अशा मोठमोठ्या कंपन्यांची नावे सांगून हे पैसे लुटण्याचे प्रकार होत आहेत. पोलीस, बँका तसेच अन्य संस्थांकडून सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. तरीही हे प्रकार फोफावत आहेत. माणसांच्या असहाय्यतेचा गैरफायदा उठवला जात आहे. अनोळखी व्यक्तींकडून दाखविण्यात येणाºया आमिषांना बळी पडू नका. आॅनलाईन व्यवहार करताना खातरजमा करा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे, पण पोलीस नेमके काय आवाहन करतात हे या गुन्हेगारांना माहिती असते. त्यामुळे ते त्यावर मार्ग काढून सफाईदारपणे गुन्हे करतात. त्यामुळे हे प्रकार वाढीस लागतात.
सायबर क्राइमच्या आकडेवारीनुसार देशभरात घडणाºया सायबर क्राइमपैकी ७० टक्के गुन्हे हे मोबाइलच्या माध्यमातूनच केले जातात. मोबाइलचे सीम सहजपणे बदलता येतात वा वापरून फेकून देता येतात. त्यांचा माग शोधण्यासाठी अथक प्रयत्न घ्यावे लागतात. तपास अधिकारी चिवट असेल तर तो कोणत्याही गुन्हेगाराला कोठूनही शोधून काढतोच, मात्र तपासात हलगर्जीपणा झाला तर मात्र गुन्हेगाराच्या पथ्यावर पडते. मोबाइलच्या गुन्ह्यांमध्ये आर्थिक फसवणूक, हॅकिंग, फेक कॉल्स, बदनामी, व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून अश्लील मेसेज, फोटो, व्हिडीओ शेअर करणे, फोटोशॉपच्या ट्रिक्स वापरून एखाद्याचे फेक अकाऊंट तयार करणे आदी सर्व प्रकारांचा समावेश आहे. खासगी संदेश सार्वजनिक करण्याची भीती दाखवून ब्लॅकमेलिंग करणे, पैशाची, शरीरसुखाची मागणी करणे असे गुन्हे घडतात. आपला आपल्या कुटुंबीयांशी, मित्र-मैत्रिणींशी मनमोकळा संवाद असणे याकरिताच महत्त्वाचे असते. कोविड-१९ अर्थात कोरोनाच्या संकटकाळात हे प्रकार अधिक वाढीस लागले. राष्ट्रीय सायबर सुरक्षा २०१३ हे सायबर क्षेत्रातील सर्वसमावेशक सायबर सुरक्षा धोरण पहिल्यांदाच भारत सरकारने आणले. या धोरणात काही महत्त्वाच्या मुद्यांचा समावेश करण्यात आला होता. यात राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्र, चाचणी केंद्र, मालवेअर देखरेख केंद्र, राष्ट्रीय गंभीर माहिती सुरक्षा केंद्र यांची उभारणी करण्याचे नमूद करण्यात आले होते. भारत सरकारने आता नवे सायबर सुरक्षा धोरण २०२० आणले जाईल, अशी घोषणा केली आहे. अर्थात सायबर सुरक्षेबाबतच्या मुद्यावर आपल्याकडे पायाभूत सुविधांमध्ये कमतरता आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस, अत्याधुनिक यंत्रसामग्री, इंटरनेट-सक्षम साधने आणि प्रचंड माहिती यांसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे सायबर हल्ल्याचे क्षेत्र आता अतिशय गुंतागुंतीचे झाले आहे. देशातील विविध संस्था आता आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम झाल्या आहेत. सायबर हल्ल्यांचा सामना करणाºया जगातील पहिल्या १० देशांमध्ये भारताचाही समावेश होतो. विशेष म्हणजे, कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनच्या काळातच हे सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. फिशिंग, स्पॅमिंग आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील यंत्रणांची स्कॅनिंगच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती चोरणे, अशा घटनांमध्ये तब्बल तीन पटीने वाढ झाली आहे. हॅकिंग, स्पॅम मेलद्वारे मालवेअरचा शिरकाव आणि अशाच इतर असुरक्षित प्रकारांचा वापर करून सायबर हल्ले होण्याच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात आणि वर्क फ्रॉम होमची संस्कृती वाढल्याने इंटरनेटवर संशयित सर्फिंगचेही प्रमाण वाढले आहे. कदाचित ही फक्त एक सुरुवात आहे आणि येत्या काळात सायबर हल्ल्यांचे हे प्रमाण आणखी वाढेल, अशी दाट शक्यता आहे. माणसं घरातून बाहेर पडत नाहीत, सहजगत्या त्यांना फसवून लुटता येईल याची जाणीव गुन्हेगारी जगतात वाढीस लागल्यानेच हे सर्व घडून येताना दिसते आहे. देशभरात घडणाºया गुन्हेगारीवर नजर टाकली असता सहज लक्षात येते की, गुन्हेगारांचे वय कमी होते आहे, तर गुन्ह्याची तीव्रता, क्रूरता आणि त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकतम वापर तपास यंत्रणेच्या आवाक्याबाहेरचा होत चालला आहे. नेट बँकिंग करताना कॉमन वायफायचा वापर टाळावा, असे वारंवार सांगितले जाते. याशिवाय मोबाइल बँकिंग करताना वनटाइम पासवर्डचा आग्रह धरावा. आपला ओटीपी शेअर करू नका किंवा तुमच्या मोबाइलवर माझा ओटीपी चुकून आला आहे, तो मला सांगा, अशी विचारणा करणाºयांपासून सावध रहा. आॅनलाईन वा आॅफलाईन आर्थिक व्यवहार असोत वा व्यक्तिगत माहितीचे आदानप्रदान, दक्षता बाळगलीच पाहिजे, पण हे एक नवे आव्हान पोलिसांपुढे आहे हे निश्चित.
लॉकडाऊनमध्ये सगळे जसे आॅनलाईन झाले तसेच गुन्हेगारही आॅनलाईन झाले त्याचा परिणाम सामान्य माणसांची फसवणूक होण्यात होतो, पण फोनवरून असे गुन्हेगार सराईतपणे फसवणूक करण्यासाठी आग्रह धरतात तेव्हा आपण सावध असले पाहिजे हे नक्की. ओएलएक्सवर घरातील जुन्या वस्तू अडगळीचे सामान विक्रीला आपण काढतो आणि त्यातून पैसे येण्याऐवजी आपलेच पैसे जाण्याची भीती असते. खरेदी करायला येणारे फोन यूपी-बिहारचे भय्ये असतात. ते पेटीएमवरून पैसे पाठवतो असे सांगून स्कॅन करण्यासाठी क्यूआर कोड पाठवला जातो. पैसे रिसिव्ह करण्यासाठी क्यूआर कोडची गरज नसते, पण माणसं फसतात. अशा प्रकारांकडे लक्ष देण्याची गरज आहे. हा प्रकार कोरोनापेक्षा भयानक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा