बुधवार, ३१ मार्च, २०२१

अस्थिरतेचे जनक

महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी उलथा पालथ व्हावी, असे शिवसेना नेते संजय राऊत यांना वाटते का? असा प्रश्न पडतो आहे. गेल्या काही दिवसांपासून आघाडीत दरी निर्माण होतील अशी त्यांच्याकडून होत असलेली वक्तव्ये ही हे सरकार अडचणीत आणणारी ठरत आहेत. त्यामुळे हे सरकार विरोधकांपेक्षा आघाडीतील घटक पक्षच पाडणार का आणि त्याचे दुवा संजय राऊत होणार का?, असा प्रश्न आज जनतेला पडलेला आहे. राज्यातील अस्थिरतेचे जनक ते बनणार का?, असा प्रश्न आहे.


ऐन होळीच्या दिवशी राज्याचे राजकारण रविवारी दोन मुद्यांभोवती फिरताना दिसले. एक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा लेख, तर दुसरा मुद्दा होता शरद पवार-अमित शहा भेटीचा. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्याचे वृत्त समोर आले. हे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळून लावले आहे, तर शहा यांनी सूचक विधान करत भेटीचा सस्पेन्स कायम ठेवला आहे; पण त्याचा लगेच माध्यमांनी अर्थ लावताना नवी सोयरीक जुळवली जात असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यातील बाकीच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी हे आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांचे आणि पक्षांचे कारनामे आहेत का? म्हणजे सचिन वाझे प्रकरणाने अडचणीत आलेल्या शिवसेना आणि सरकारला जनतेचे लक्ष हटवण्यासाठी नवा हा फंडा काढला आहे का?, हा प्रश्न आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. २६ मार्च रोजी अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर पवार-शहा यांची भेट झाल्याचे वृत्त एका गुजराती दैनिकाने दिले. या वृत्तानंतर राज्यात या भेटीबद्दल चर्चा सुरू झाली.


अर्थात शरद पवार-अमित शहा यांच्या गुप्त भेटीचे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळून लावले आहे. या भेटीच्या वृत्तावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षड्यंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे.

अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसने भेटीचे वृत्त फेटाळून लावले असले, तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने भेटीचा सस्पेन्स काय आहे. दिल्लीत शहा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पवारांसोबतच्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सगळ्याच गोष्टी सार्वजनिकपणे केल्या जात नाहीत, असे उत्तर शहा यांनी दिले. त्यामुळे पवार-शहा यांची भेट झाली की, नाही? हा सस्पेन्स मात्र कायम आहे; पण एकूणच ही हवा वाझे प्रकरण, कोरोनाचा वाढता प्रभाव हे सगळे अपयश लपवण्यासाठी चाललेली ही धडपड आहे का?, असा प्रश्न पडतो.


त्याचवेळी दुसरीकडे संजय राऊत यांनी घटकपक्षांनाच डिवचायचे काम चालवले आहे. राज्यात गाजत असलेल्या सचिन वाझे, परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी रोखठोक स्तंभातून भाष्य केले होते. राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही सवाल केले होते. राऊत यांच्या या लेखावरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते, असं म्हणत राऊत यांनी अनिल देशमुखांना खडेबोल सुनावले होते. राऊतांच्या या लेखावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. बारामतीत माध्यमांशी बोलताना पवारांनी राऊतांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार नीटपणे काम करत असताना, कुणीही त्यात मिठाचा खडा टाकू नये. मंत्रीपदाचं वाटप तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंत्रीपदाच्या वाटपासह पक्षातील सगळे निर्णय घेतात. तिच पद्धत महाविकास आघाडीतील इतर पक्षांमध्येही आहे. त्यामुळे तिन्ही पक्षातील नेत्यांनी अनावश्यक विधानं टाळून घेतल्या जाणाºया निर्णयाचा सन्मान ठेवायला हवा, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो. अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाºयांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्यानं कमीत कमी बोलावं. ऊठसूट कॅमेºयासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणं बरं नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असं वर्तन गृहमंत्र्यांचं असायला हवं. पोलीस खात्याचं नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसतं. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असतं. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसं चालेल?, असं राऊत म्हणाले होते.


दुसरीकडे संजय राऊत काँग्रेसलाही डिवचताना दिसत आहेत. यूपीएचे अध्यक्षपद शरद पवारांना दिले पाहिजे हे सांगून काँग्रेसला चिडवले. त्यावरून नाना पटोल आदी काँग्रेस नेत्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. आधी यूपीएमध्ये या मग बोला असे सुनावले, तर काँग्रेस वगळून यूपीए २ निर्माण करण्याचे प्रयत्न चालल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. साहजिकच सरकार अस्थिर करण्याचे हे प्रयत्न आहेत का?, असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. महाविकास आघाडी तयार करण्यात जो पुढाकार संजय राऊत यांनी घेतला होता, तसेच हे सरकार पाडण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे का?, असा राज्याला प्रश्न पडला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: