मराठी ज्येष्ठ नाट्य आणि सिनेअभिनेते श्रीकांत मोघे यांचे शनिवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात श्रीकांत मोघे यांनी दिलेले योगदान हे अत्यंत मोलाचे आहे. हरहुन्नरी, चतुरस्त्र अभिनेता अशीच त्यांची ख्याती होती. त्यामुळे जवळपास ५० वर्ष जे या क्षेत्रात काम केलेले कलाकार आहेत त्यांच्या जाण्याने एक फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे.
६ नोव्हेंबर १९२९ रोजी किर्लोस्करवाडी येथे श्रीकांत मोघे यांचा जन्म झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, अभिनेते शंतनू हे चिरंजीव आणि सून अभिनेत्री प्रिया मराठे असा परिवार आहे. दिवंगत कवी सुधीर मोघे त्यांचे कनिष्ठ बंधू होत. एकूणच कलाकारांचे कुटुंब असा हा मोघे परिवार होता. सदैव हसतमुख चेहºयाने प्रत्येकाचे स्वागत करणारे आणि प्रत्येकाशी जिव्हाळ्याने संवाद साधणारे मोघे काही वर्षांपासून आजारी होते. व्याधींमुळे त्यांना व्हिलचेअरमधून फिरावे लागायचे. अशाही परिस्थितीत नाउमेद न होता ते सभा सोहळ्यांना आवर्जून हजेरी लावून वातावरण प्रफुल्लीत करायचे. शनिवारी त्यांनी कर्वे नगर येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.
श्रीकांत मोघे यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजमध्ये झालं होतं. बीएस्सीसाठी ते पुण्याच्या स. प. कॉलेजात गेले. मुंबईत त्यांनी बी. आर्च. ही पदवी घेतली. शाळेत असतानाच ते नाट्यअभिनयाकडे वळले. पुणे व मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, ख्यातनाम नाटककार भालबा केळकर यांच्या बिचारा डायरेक्टर या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन केले. लग्नाची बेडी, अंमलदार अशी नाटके त्यांच्या बहारदार अभिनयाने गाजली. त्यांनी ६०हून अधिक नाटके आणि ५०हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. श्रीकांत मोघे यांनी आपल्या नाट्यप्रवासावर आधारित ‘नटरंगी रंगलो’ हे आत्मचरित्र लिहिलं आहे. ‘स्वामी’ मालिकेतील त्यांनी साकारलेल्या राघोबादादांच्या भूमिकेला रसिकांची दाद मिळाली. सांगली येथे २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
एकेकाळी मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांत चॉकलेट हिरो अशी प्रतिमा असलेले नायक म्हणून श्रीकांत मोघे यांच्याकडे पाहिलं जायचं. वसंत कानेटकर यांच्या लेकुरे उदंड जाली नाटकामधील राजशेखर ऊर्फ राजा असो की पु. ल. देशपांडे यांच्या वाºयावरची वरात मधील बोरटाके गुरुजी या भूमिका म्हणजे रसिकांना मनमुराद आनंद देणारे कलाकार अशी नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांची ओळख आहे. पुलंसोबत काम करणे हे तितके सोपे नव्हते; पण दोघांची भट्टी प्रचंड जमली होती. वाºयावरची वरात मधील दोघांची जुगलबंदी आणि कित्येकवेळा डायलॉग न बोलताही घेतलेला हशा हा हुकमी होता.
विनोदी भूमिकांपासून खलनायकापर्यंत भूमिका त्यांनी केल्या होत्या. धाकटी मेहुणी या चित्रपटात मेहुणीच्या प्रेमात पडलेला आणि तिच्या नादाने बायकोचा खून करणारा नकारात्मक नायक त्यांनी ७०च्या दशकात रंगवला होता. १९८०मध्ये सचिनचे युग सुरू झाल्यानंतर त्याच्या प्रत्येक चित्रपटात श्रीकांत मोघे हे हमखास असायचे. अगदी मायबापमध्ये अपघाताने घरात गेलेला बाप असो की, गंमत जंमतमध्ये वर्षा उसगांवकरचा बाप, नवरी मिळे नवºयालामध्ये सचिनचा मालक अशा बहुतेक चित्रपटात सचिन पिळगांवकर यांनी श्रीकांत मोघेंना संधी दिली होती. त्या भूमिका त्यांनी संस्मरणीय केल्या. १९६०च्या दशकात पुलंच्या पिढीपासून नंतर राजा गोसावी शरद तळवलकरांच्या पिढीपर्यंत आणि नंतर सचिनच्या पिढीपर्यंत अशा तीन पिढ्यांमध्ये सहकलाकार म्हणून त्यांची कारकीर्द लक्षणीय अशी आहे.
वसंत कानेटकरांचे लेकुरे उदंड जाली या नाटकात दया डोंगरे आणि श्रीकांत मोघे यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. यात गाणी गात असलेली त्यांची स्वगत ही अफलातून त्यांनी सादर केली होती. एवढी शहाणीसुरती माणसं पण लग्नच का करतात, लग्नच का करतात, करून सवरून संसाराच्या फंदात का पडतात, माणसं लग्नच का करतात? हे स्वगत म्हणताना ते जो अभिनय करायचे त्याला वन्स मोअर मिळायचा. हे नाटक तसं सादर करणं आणि प्रेक्षकांच्या पचनी पडणं तितकं सोपं नव्हतं; पण या नाटकातून श्रीकांत मोघे यांनी लिलया तंबू पेलला होता. काही वर्षांपूर्वी हे नाटक सुबोध भावेंनी नव्या संचात आणले होते; पण प्रेक्षकांनी श्रीकांत मोघे यांच्याशी त्यांची तुलना केल्याने हे प्रयोग थांबले. यावरून लक्षात येते की, मोघे यांनी ते नाटक किती उंचीवर नेऊन ठेवले होते.
अशोक सराफ यांच्याबरोबरही श्रीकांत मोघे यांचे अनेक चित्रपट झालेले आहेत, म्हणजे सचिन पटांशिवाय तुझ्या वाचून करमेनासारखे अनेक चित्रपटात दोघे एकत्र आलेले आहेत. छोटी भूमिका असली, तरी ती लक्षात राहील अशी करायची आणि कथेचा महत्त्वाचा धागा असेल अशाच त्यांच्या वाट्याला आल्या, त्यामुळे ते कायम स्मरणात राहणारे कलाकार असतील. हा खेळ सावल्यांचामध्ये खोताची भूमिका त्यांनी केलेली आहे. धो-धो पाऊस पडत असताना, खोतांची हट्टी मुलगी मला शहाळं पाहिजे, म्हणून रात्रीच्यावेळी रडत असते, तेव्हा सगळ्या गड्यांना तुम्हाला मी पोसतो; पण तुम्ही माझ्या मुलीचा एक हट्ट पुरवू शकत नाही? असे विचारून नरसूला भर पावसात नारळाच्या झाडावर चढायला लावतो, तेव्हा वरून खाली पडून नरसू मरतो. हा चित्रपटाच्या कथेचा महत्त्वाचा भाग आहे. ही दोन पाच मिनिटांची भूमिकाही मोघे यांनी लक्षात राहिल, अशी केली होती. असा कलाकार आपल्यातून निघून गेलेला आहे. त्या हरहुन्नरी कलाकाराला भावपूर्ण आदरांजली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा