केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि आसाम या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्याने देशातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यात र्खया अर्थाने आता भारतीय जनता पक्षाची परिक्षा असणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी प. बंगालमध्ये मोठे वादळ निर्माण केलेले आहे. परंतु निवडणूक पूर्व झालेल्या काही सर्वेक्षणात ममता बॅनर्जींची सत्ता खेचून आणणे भाजपला अशक्य असे दाखवले आहे. भाजप तिथे दुर्सया क्रमांकाचा पक्ष राहील हे जरी दिसत असले तरी 200 चे लक्ष त्यांना गाठणे शक्य नाही असे अंदाज वर्तवत आहे. अर्थात अंदाज खरे ठरतातच असे नाही. येत्या दोन महिन्यात काहीही घडू शकते. सध्या तरी भाजपला पश्चिम बंगालमध्येच लक्ष देणे आवश्यक असणार आहे. अन्य राज्यात तशी जादू चालणे अवघड आहे.
प्रत्येक राज्यांमधील राजकीय प्रतिस्पर्धी वेगवेगळे असले तरी देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष असणारे भाजप आणि काँग्रेस यांना या निमित्ताने या राज्यांमध्ये आपले अस्तित्व दाखवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अर्थात काँग्रेसने अगोदरच तलवार म्यान केलेली आहे. आपला मानसिक पराभव त्यांनी अगोदरच व्यक्त केलेला आहे. पाच राज्यातील निडणुका मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत होतील याचा अंदाज घेउन दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी अध्यक्षपदाची निवड जूनपर्यंत पुढे ढकलली. कारण जर पुन्हा राहुल गांधींचे नाव अध्यक्ष म्हणून जाहीर केले असते तर या पाच राज्यातील अपयशाचा शिक्का त्यांच्या माथी बसला असता. अपयशाचे धनी म्हणून त्यांची ओळख झाली असती. त्यामुळे इथे र्खया अर्थाने भाजपच परिक्षा देणार हे नक्की.
पाच राज्यांपैकी आसाममध्ये संपूर्णपणे भाजपची सत्ता आहे, तर केरळमध्ये डावे सत्तेवर आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्यांमध्ये अनुक्रमे तृणमूल काँग्रेस आणि अण्णा द्रमुक यांची सत्ता आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे अस्तित्व या दोन राज्यांमध्ये अतिशय कमजोर आहे. या दोन राज्यांमध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याची संधी या निमित्ताने भाजप आणि काँग्रेसने घेतली तर आश्चर्य वाटायला नको.
गेल्या काही दिवसांमध्ये तृणमूल काँग्रेसमधील अनेक महत्त्वाचे नेते भाजपामध्ये आणण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा, विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा, पश्चिम बंगालची जबाबदारी असणारे विजय वर्गीस हे सर्व नेते सतत पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राडेही झाले आहेत. ही निवडणूक कशी असेल, त्याची चुणूक आधीच सर्वांना पाहायला मिळाली आहे. अर्थात, भाजपला वाटते तेवढी ही निवडणूक त्यांना सोपी जाणार नाही. कारण गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधीमध्ये ममता बॅनर्जी यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पश्चिम बंगालवर आपली पकड मजबूत केली आहे. या राज्यामध्ये एकेकाळी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस यांची सत्ता होती, त्या राज्यामध्ये सध्या या दोन्ही पक्षांचा अतिशय कमी प्रभाव आहे ही गोष्ट भाजपनेही लक्षात घेण्याची गरज आहे. भाजपची मुख्य मदार आयात केलेल्या उमेदवारांवर असणार आहे. जे पूर्वी काँग्रेस करत होती तेच आता भाजप करताना दिसत आहे. निवडून येण्याची क्षमता हा निकष ठेवून उमेदवार आयात करायचे धोरण पूर्वी काँग्रेसचे होते. आता तोच प्रकार भाजप करत आहे. तृणमूलमधील दोन चार डझन आमदार भाजपत आणायचे आणि भाजपचे संख्याबळ 3 वरून 100 वर न्यायचे, 200 चे लक्ष ठेवायचे असे भाजपचे चालले आहे. पण ही पक्षवाढ असणार नाही. याला सूज म्हणतात. ती केव्हाही ओसरू शकते. सत्तेसाठी वारा येईल तशी पाठ फिरवणारे नेते आयात करून पक्षवाढ होत नाही. पक्षाची वाढ ही विचारांनी होत असते. फोडा आणि झोडा यातून मोठा झालेला पक्ष अशी आज भाजपची अवस्था असताना भाजपला इथे फार मोठी परिक्षा द्यावी लागणार आहे. कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस यांच्या तुलनेने भाजपची निवडणूक स्ट्रॅटेजी अधिक प्रभावशाली असल्याने गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त चांगले यश त्यांना या निवडणुकीत मिळेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. पण ममता बॅनर्जी यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला संपूर्ण पराभूत करून पश्चिम बंगालमध्ये भाजपला सत्ता मिळवण्यासाठी सर्वोच्च पातळीवरील प्रयत्न करावे लागणार आहेत. ही त्यांची फार मोठी परिक्षा असणार आहे. तामिळनाडू राज्यामध्ये कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला कधीच स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नाही. या राज्यात नेहमीच करुणानिधी यांचा द्रमुक आणि जयललिता यांचा अण्णा द्रमुक या पक्षांची आलटून पालटून सत्ता येत असते. हे दोन्ही नेते हयात नसले तरी त्यांचे पक्ष मात्र तेवढेच प्रभावी आहेत आणि त्यांचे उत्तराधिकारीही तेवढेच प्रभावी आहेत. म्हणूनच सध्या सत्तेत असलेल्या अण्णा द्रमुक सोबत आघाडी करून निवडणूक लढविण्याची तयारी भाजपने केली आहे. पण या निमित्ताने दक्षिणेत चंचूप्रवेश तर बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपला फार मोठी परिक्षा द्यावी लागणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा