बुधवार, ३१ मार्च, २०२१

जबाबदारी कोणाची?


आज होळी पौर्णिमा आहे. होळीला आपल्याकडे लाकडं, शेण्या, गोºया, पालापाचोळा, असे छान पेटवून त्याभोवती बोंबा मारल्या जातात. तसेच प्रकार गेल्या काही दिवसांत राज्यात होताना दिसत आहेत. त्यामुळे प्रश्न पडतो की, या होळ्या कोण पेटवतो? की त्या आपोआप कशा काय पेटतात? राज्यात गेल्या काही दिवसांपासून आगीच्या अनेक घटना समोर येत आहेत. शुक्रवारी भांडुप येथे ड्रीम्स मॉल सनराईज येथे लागलेली भीषण आग तब्बल ३० तासांनंतर आटोक्यात आली आहे. या आगीत १२ कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच सकाळी प्रभादेवी येथे एका इमारतीला आग लागली होती, तर दुसरीकडे पुण्यात रात्री फॅशन स्ट्रीट मार्केटला लागलेल्या भीषण आगीत ४५० दुकाने खाक झाली. यादरम्यान मुंबईत परळमध्ये रात्री एका इमारतीला आग लागली होती. बदलापूरमध्येही अशी आग लागली आहे. गेल्या काही दिवसांत भिवंडी, मालेगांव, डोंबिवली अशा अनेक आगी आणि स्फोटांच्या घटना घडताना दिसत आहेत. त्यानंतर राजकारणाला उत येतो आणि राजकीय शिमगा सुरू होतो. त्यामुळे या आगी नेमक्या लागतात कशा? का त्या लावल्या जातात? असा प्रश्न पडतो.

आगीच्या घटनांनचे सत्र सुरू असतानाच पुण्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे शहरातील लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्त्यालगतच्या प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट येथे शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच कँटोन्मेंट अग्निशमन केंद्र आणि पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले आहे. दरम्यान, दोन ते अडीच तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. या आगीमध्ये तब्बल ४०० दुकाने जळून खाक झाली असून, सध्या कुलिंगचे काम सुरू असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे. महिना दोन महिन्यात किती घटना अशा राज्यात झाल्या आहेत हे पाहिले तर हे आगीचे प्रकार कशामुळे वाढत आहेत, असा प्रश्न पडतो. ज्याठिकाणी पुण्यात कोव्हिडच्या लसीचे उत्पादन होत आहे, त्या कंपनीलाही भीषण आग लागली होती. त्यातही अनके कर्मचारी मृत्युमुखी पडले. भंडाºयात हॉस्पिटलला लागलेल्या आगीत ११ बालकांचा मृत्यू झाला होता. हे प्रकार सातत्याने घडत आहेत.


या घटना घडल्यावर सरकार, मंत्रिगण, विरोधक यांचा शिमगा सुरू होतो. चौकशी समिती नेमली जाते. कुणावर तरी ठपका ठेवला जातो. कोणावर तरी कारवाई होते. आता त्या भंडारा प्रकरणात एका नर्सलाच जबाबदार धरून तिला निलंबित केले. कोणा एकाच्या निलंबनाने हे प्रश्न सुटतात का? फायर आॅडीट, तिथे अग्निशमन यंत्रणा होती की नाही याची चौकशी घटना घडून गेल्यानंतर केली जाते; पण अगोदर ही यंत्रणा का नाही सक्रिय होत? अग्निशमन यंत्रणा प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी, शाळा, रुग्णालये, मॉलमध्ये आहे की नाही याची चौकशी का केली जात नाही? असा इमारतींना बांधकाम पूर्ण झाल्याचा आणि वापराची परवानगी कशी दिली जाते? अग्निशमन यंत्रणा तपासण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे हे स्पष्ट झाले पाहिजे. ट्रॅफिकपासून वाहनांची सुरक्षितता, ट्रॅफिक नियम तोडणे, गाडीची कागदपत्रे, लायसन्स तपासणे हे जसे आरटीओ पोलीस तपासत असतात तसेच प्रत्येक इमारत, सार्वजनिक ठिकाणी अग्निप्रतिबंधक यंत्रणा आहे की नाही हे तपासायची जबाबदारी नक्की कोणाची आहे हे सरकारने जाहीर केले पाहिजे. ते पोलिसांनी करायचे का? ते महापालिका, पालिका यांनी करायचे का? ते अग्निशमन विभागाने करायचे का? ही जबाबदारी एकदा स्पष्ट करण्याची गरज आहे. आज ही कामे ही जबाबदारी नक्की कोण घेणार हे स्पष्ट न झाल्याने या घटना वाढत आहेत. त्यावरून राजकारणाला उत येतो. विरोधक आणि सरकार यांच्यात मग कलगीतुरा होतो आणि कधी कधी त्यांचा राजकीय शिमगा होतो. त्यांच्या दृष्टीने अशा आगी म्हणजे आनंदाचीच बाब असते. एकमेकांवर टीका करायला आलेली ही होळीच असते; पण सामान्यांच्या जिवाशी खेळून राजकीय होळी आणि शिमगा करण्याची गरज नाही. हे प्रकार टाळण्यासाठी सततची तपासणी करणारी यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे.

आज केवळ हॉस्पिटल, मॉललाच आगी लागत आहेत, असे नाही तर अनेक डोंगर, जंगलांना आगी लावल्या जात आहेत. घाटातून प्रवास करताना डोंगरच्या डोंगर पेटवले जात आहेत. पूर्वी वणवे आपोआप लागत असत. झाडाझाडांमधील घर्षणाने आगी लागत असत; पण आजकाल जंगले इतकी विरळ झालेली आहेत की, आपोआप वणवे लागण्याचे दिवस गेले आहेत. त्यामुळे या आगी कोणीतरी मुद्दाम लावत असावे. त्यावरून राजकीय होळी पेटत असते. आणखी एक शंका निर्माण होते ती ही की, या आगी नेहमी फेब्रुवारी-मार्च महिन्यातच लागतात. अर्थात उन्हाळा सुरू होत असल्यामुळे असेल कदाचित; पण मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना असतो. त्यामुळे विम्याचे पैसे मिळवण्यासाठी कोणी काही मुद्दाम हे प्रकार करत नाही ना याचीही चौकशी केली पाहिजे; पण या स्वार्थी अर्थकारणात आणि राजकारणात काही लोकांचे हकनाक बळी जातात त्याला कोण जबाबदार आहे का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: