बुधवार, ३१ मार्च, २०२१

भुतांचा वावर


रात्रीस खेळ चाले-३ चे पर्व सुरू झाले. अपेक्षेप्रमाणेच प्रेक्षकांनी सोमवारी रात्री ११ वाजता हजेरी लावली. प्रत्येकाला अण्णा नाईक, शेवंता, पांडू यांचे दर्शन हवे होते. त्या मालवणी सदृष्य भाषेचा गोडवा हवा होता. गेल्या दोन्ही पर्वांत प्रेक्षकांनी त्याचा आनंद घेतला होता. तो पुन्हा मिळणार म्हटल्यावर सगळ्यांना आनंद झाला होता. अर्थात प्रेक्षकांची अपेक्षा होती की, ती देवमाणूस मालिका संपेल आणि त्या जागी अण्णा नाईकांचा वाडा दिसेल; पण देवमाणूसची खुनांची मालिका लांबतेच आहे. पोलिसांना मूर्ख बनवण्याचे काम चाललेच आहे. त्यामुळे अण्णांचा वाडा पाहण्यासाठी अकरापर्यंत जागावे लागते आहे.

मुळात ज्यांनी पहिली दोन पर्व पाहिले आहे, त्यांना या मालिकेचा आनंद हा मिळणारच. मालिकेचा उत्तरार्थ अगोदर आणि पूर्वार्धनंतर अशी या मालिकेची सुरुवातीला परिस्थिती होती. म्हणजे पहिल्या पर्वात पहिल्याच भागात अण्णांचा मृत्यू होतो. नंतर अभिरामच्या लग्नाच्या निमित्ताने सगळे कुटुंबीय तीन भाऊ त्यांची कुटुंबे जमतात आणि मृत्यूपत्राच्या वाचनानंतर भूतांचे प्रकार होत राहतात. त्यावेळी कुठलीही भयानकता दाखवली गेली नव्हती. फक्त संशयाचे वातावरण तयार करणे. हे प्रकार नेमके कोण करतो? तर सरतेशेवटी सायंटीस्ट असलेली निलिमा ही माधवची बायको आणि अण्णा नाईकांची मोठी सून हे सगळे करते, जमिनीसाठी तिने हा प्रकार केलेला असतो. त्यातूनच नेने वकिलांचा ती खून करते आणि पोलीस तिला पकडून नेतात, असा शेवट केला होता. हा काही पटापट उरका पाडल्यासारखा शेवट पटला नव्हता. घाईघाईने काहीतरी केले आहे असे वाटत होते.


पण दुसरे पर्व सुरू झाले आणि अण्णा नाईक प्रत्यक्षात दाखवले. त्यांचे कारनामे, धाक दाखवले. एकेक खून कशा प्रकारे करतात आणि त्यांची कलमे कशी लावली जातात आणि ती भूते जेव्हा प्रत्यक्ष प्रेक्षकांना दिसतात, तेव्हा मालिका रंजक आणि बिनचूक झालेली दिसली. पहिल्या पर्वातल्या सगळ्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे मिळाली. घरात विधवा असलेली छाया तिचे नेमके लग्न कसे झाले, ती विधवा कशी झाली. दत्ता कोण होता हे सगळे समोर आले. पहिल्या पर्वात दत्ता हा सख्खा भाऊ आहे असेच दाखवले होते; पण तो भिवरीचा खून केल्यानंतर आईने सांभाळला आहे हे दुसºया भागात कळते; पण दुसºया भागात भिवरी, काशा, शोभा, पोस्टमन, पाटणकर, शेवंता असे अनेक खून केल्यानंतर ती भुते नाचत नाचत अण्णांना छळत राहतात. आईने कितीही वाचवायचा, अण्णांना कोंडून ठेवायचा, प्रयत्न केला तरी अखेर ती भुते अण्णांना गाठतात आणि अभिरामच्या लग्नाच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पहिल्या पर्वाच्या सुरुवातीपर्यंत कथानक आणले जाते आणि तिथे अण्णा गेल्याचे दत्ता कळवतो तिथे ही मालिका संपते. त्यामुळे दुसरे पर्व संपल्यानंतर पहिल्या पर्वाचे कथानक पूर्ण होते, हे विशेष.

आता तिसरे पर्व २२ तारखेपासून सुरू झाले आहे. भरपूर कालावधी गेलेला आहे. वाडा पार जीर्ण झालेला आहे. एकटीच आई जख्ख म्हातारी झालेली आहे. वाड्याला पुन्हा सोन्याचे दिवस यावेत, घरातील सगळी बागडावीत म्हणून ती वाट पाहते आहे. अगदी भीकेला लागली आहे. वाडा कोसळतो आहे. सगळीकडे पडझड झालेली आहे. नव्याने गावात आलेली पिढी, दलाल तो वाडा विकत घेण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी या म्हातारीला फसवण्याचा, तिचा अंगठा घेण्याचा प्रयत्न दलालांमार्फत होतो आहे, अशी सुरुवात दाखवली. सगळा गाव जेवायला घालेल अशी श्रीमंत असलेली अण्णा नाईकांची बायको लोकांच्या घरी धुणीभांडी करतेय आणि उष्टा तुकडा खातेय हे करुण चित्र पहिल्या भागात पाहिल्यावर ही मालिका नक्की कशी पुढे सरकरणार याचा अंदाज येतो; पण पहिल्या भागापासून एकेक भुतं डोकवायला लागतात. त्यात पहिले भूत येते ते पोस्टमनचे.


अभिराम बेंगळुरूला आयपीएस अधिकारी म्हणून गेला आहे. त्याला पोस्टमनकडून पत्र लिहून ती घेत आहे. त्याला मजकूर सांगत आहे आणि तो पोस्टमन पत्र लिहितो आहे; पण गावातून जाणारी अन्य माणसे तीला एकटीलाच बडबडताना दिसतात. त्यांना पोस्टमनचे भूत दिसत नाही. त्यानंतर अण्णांचे भूत वाड्यात वाडा विकण्यासाठी त्या सरमाळकराला दारू पाजताना दाखवले आहे. त्यामुळे आता सगळे मृतात्मे पुढे एंट्री घेणार हे नक्की.

पण सर्वात वाईट अवस्था झालेली आहे ती माधवची. भिकाºयासारखा केस, दाढी वाढवून, फाटक्या कपड्यात तो वेड लागून फिरतो आहे. मराठीचा मुंबईचा प्राध्यापक; पण त्याला वेड लागले आहे. ते वेड कशाने लागले? नेमके काय झाले? लोक त्याला दगडं मारत असतानाच आई व मुलाची गाठ पडते आणि आई त्या वेड्या माधवाला घेऊन येते; पण तो अस्ताव्यस्तच आहे. कोणाला ओळखत नाही. आपल्याच नादात आहे. हे सगळे कसे घडले? वाड्याची पडझड कशी झाली? माधव वेडा कसा झाला? भुतांचा वावर अजूनही तिथे कसा आहे? आईलाच ती भुते कशी दिसत आहेत. हे सगळे आगामी काळात पहायला मिळणार आहे. कदाचित निलिमाला पोलिसांनी पकडून नेले आणि तिने नेने वकिलांचा खून केल्याचे समोर आल्याने माधवला धक्का बसला का? हे सगळे या मालिकेतून आगामी काळात उलगडत जाणार आहे. पण पहिल्या दोन भागातच या मालिकेने पकड घेतली आणि आपला खेळ चालू ठेवला आहे. परुळेकर बिल्डरला अण्णा ज्याप्रकारे स्वागत करतात, अण्णांवर अंत्यसंस्कार केल्यावर चितेतून त्यांचा आत्मा ज्याप्रकारे उठतो त्यावरून ही मालिका खूपच मजा आणणार असे पहिल्या भागापासूनच दिसते आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: