रविवार, १४ मार्च, २०२१

राष्ट्रीय पक्षांना तामिळनाडूचे दरवाजे बंदच

द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे तामिळनाडूच्या राजकारणातील दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष. राज्यातील सत्ता आलटून पालटून या दोन पक्षांच्या हातात असते. अपवाद फक्त २०१६ च्या विधानसभा निवडणुकीचा. काँग्रेस आणि भाजप हे देशाच्या राजकारणातील दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष, मात्र या दोन्ही पक्षांची डाळ तामिळनाडूच्या राजकारणात अजून तरी तामिळनाडूत शिजलेली नाही. या दोन्ही पक्षांना द्रमुक आणि अण्णाद्रमुकचे बोट धरूनच राजकारण करावे लागले. त्यातही काँग्रेस प्रामुख्याने द्रमुकसोबत, तर भाजप अण्णाद्रमुकसोबत आघाडी करत राजकारण करत आहे. यावेळची विधानसभा निवडणूकही त्याला अपवाद नाही, पण द्रमुक आणि अद्रमुक काँग्रेस, भाजपवर कुरघोडी करतात की भाजप या दोघांवर कुरघोडी करतो हे पहावे लागेल. जयललिता आणि करुणानिधी हे दोघेही निवडणुकीच्या प्रक्रियेत कुठेही नसताना होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस आपणाला शिरकाव करायला मिळणार का या प्रतीक्षेत आहेत. अण्णाद्रमुकने भाजपला २०, तर द्रमुकने काँग्रेसला विधानसभेच्या २५ जागा दिल्या आहेत. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुक आघाडीसोबत काँग्रेसने ४१ जागा लढवल्या होत्या, यातील फक्त ८ जागाच काँग्रेसला जिंकता आल्या होत्या. २०११ च्या विधानसभा निवडणुकीत ६३ जागा लढवणारी काँग्रेस फक्त ५ जागा जिंकू शकली होती. २०११ मध्ये काँग्रेसच्या विजयाची टक्केवारी मिळालेल्या जागांच्या १० टक्क्यांपेक्षाही कमी होती. २०१६ च्या निवडणुकीत ती वाढत २० टक्क्यांवर आली. राज्यातील काँग्रेसची ही अधोगती पाहता द्रमुकने २५ म्हणजे खूप जास्त जागा काँग्रेसला दिल्या, असे म्हणावे लागेल. त्या तुलनेत भाजपने कमी जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. अर्थात काँग्रेसला या २५ जागांची खिरापत देताना चांगलेच अपमानित केले होते. काँग्रेसला या तडजोडीकरिता डोळ्यात पाणी आणावे लागले. द्रमुककडून झालेल्या अपमानाची अलागिरी यांनी जाहीर कबुली दिली. एवढा अपमान सहन करून काँग्रेसने द्रमुकशी आघाडी करण्याची काय गरज होती, असा विचार त्यांच्या मनात डोकावला होता, पण वरच्या नेतृत्वापुढे सगळे हतबल झालेले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या तमिळी नेत्यांची कोंडी झालेली आहे. विधानसभा निवडणुकीसोबत राज्यात कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेस खासदार वसंतकुमार यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. गंमत म्हणजे राज्यातील दोन्ही प्रादेशिक पक्षांनी ही लोकसभा पोटनिवडणूक लढण्यास नकार दिला. द्रमुकने ही जागा काँग्रेससाठी सोडली, तर अण्णाद्रमुकने भाजपला दिली. यातून हेच स्पष्ट होते की, दिल्लीच्या राजकारणात त्यांना रस नाही. आपली प्रादेशिक सत्ता मजबूत करणे एवढेच द्रमुक, अद्रमुक यांचे ध्येय आहे, पण या लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार कोण हाही काँग्रेसपुढे प्रश्न आहे. राज्यातील कार्ती चिदंबरम आणि अन्य नेत्यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका वद्रा यांनी या मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवावी म्हणून विनंती केली होती, मात्र ही विनंती काँग्रेसच्या नेतृत्वाने फेटाळून लावली. राजकीयदृष्ट्या प्रियांका वद्रा यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवणे सोयीचे नव्हते, पण या मतदारसंघासाठी उमेदवार मिळू नये हाही काँग्रेसचा पराभव आहे, पण एकूणच देशातील सर्वात जुना अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष असो वा भारतीय जनता पक्ष असो. या दोघांनाही दक्षिणेत शिरकाव करणे तितकेसे सोपे नाही. परस्परांचे कट्टर शत्रू असलेले द्रमुक, अद्रमुक हे पक्ष केंद्रीय पातळीवरील मोठ्या पक्षांना आपल्या राज्यात शिरकाव करू देण्यास राजी नाहीत. याबाबत त्यांचे एकमतच आहे.


त्यामुळेच काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना कमीत कमी जागा देण्याचे धोरण या दोन्ही प्रादेशिक पक्षांनी आखले. जेमतेम २० ते २५ जागा दोन्ही पक्षांना देण्याची तरतूद करून त्याबदल्यात काँग्रेस आणि भाजपला मानणारी राज्यभरातील मते आपल्या पक्षाला मिळवण्याची खेळी या दोन्ही पक्षांनी खेळलेली दिसते. इथे आमच्या दक्षिणेतील प्रादेशिक पक्षांचीच मक्तेदारी असली पाहिजे. ती कोणीही मोडून काढता कामा नये. दिल्लीत तुम्ही काहीही करा, पण इथे मात्र माज आमचाच असेल. हे या दोन्ही पक्षांनी दाखवून दिलेले आहे. दक्षिणेतील पक्ष आणि नेते हे अत्यंत कडवट असतात. बाहेरच्यांना घुसून देण्यास ते तयार नसतात. ना त्यांची भाषा इथे उपयोगी पडते ना विचार. दक्षिणेत जाऊन काँग्रेस, भाजपचे नेते हिंदीतून भाषण करतात तेव्हा त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. अन्य कोठेही लाखोंची सभा घेणारे पक्ष इथे आपला विचार मांडू शकत नाहीत. याचे कारण मूळ संवादात आहे. इथे तुमची भाषाच स्वीकारली जात नाही. हिंदी या भाषेचा तिरस्कार करणारी ही राज्ये आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम भाषिक दरवाजे बंद करायचे. मग संवादच संपतो. लोकांपर्यंत विचार पोहोचवायचे माध्यमच बंद केले की त्यांचा पक्ष विस्तारणे शक्य नाही. तामिळनाडू, केरळमध्ये हिंदी वर्तमानपत्र दिसत नाहीत. ती कोणी वाचतही नाही. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस कितीही छान भाषणे करणारे नेते असले, तरी त्यांना निष्प्रभ कसे करायचे याचे दशकानुदशके धोरण दक्षिणेतील नेत्यांनी आखून ठेवलेले आहे. त्यामुळेच कोणी आग्रह करायला जरी आला तरी त्याला अपमानित करून बाहेर काढायची तयारी या लोकांची असते. काँग्रेसला असेच द्रमुकने अपमानित केले. त्यामुळेच इथले दरवाजे अजूनही हिंदी भाषिक पक्षांना बंदच राहणार आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: