बुधवार, ३१ मार्च, २०२१

पुरस्काराची उंची वाढली

आशा भोसले यांना राज्य सरकारचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार जाहीर झाला. कोणत्याही पुरस्कारापेक्षा उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या या गुणी कलाकाराला हा पुरस्कार जाहीर झाला हे बरे वाटले. लता मंगेशकर, आशा भोसले या भगिनी आता पुरस्कारापलीकडे गेलेल्या आहेत. त्या स्वत:च एक पुरस्कार होऊन बसल्या आहेत. त्यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला हे खूप छान झाले. खरं तर तुलनेने तो उशिरा मिळाला असला तरी त्यांची दखल घेण्याची इच्छा राज्य सरकारला झाली हेही नसे थोडके.


सुरांच्या सहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज म्हणजे आशा भोसले. त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही, तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही, त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीतप्रकार नाही, असे म्हटले जाते. तो आवाज म्हणजे आशा भोसले यांचा आवाज.

आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात ‘माझा बाळ’ या चित्रपटातून केली. १९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक गाणी गायली खरी, पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत. त्या काळात हिंदी चित्रपटसंगीतावर लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका राज्य करत होत्या. त्यामुळे आशातार्इंना संधी मिळणे अवघड होते. या गायिकांच्या राज्यात राहून, गाऊन, आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचे, स्वत:ला सिद्ध करण्याचे फार मोठे आव्हान आशातार्इंपुढे होते. आपली वेगळी वाट, जागा निर्माण करणे सोपे नव्हते, पण वेगळ्या शैलीची गाणी गाऊन त्यांनी ती वाट निर्माण केली व चित्रपट आणि संगीतसृष्टीचे लक्ष वेधून घेतले. यादरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, मुलांची जबाबदारी, प्रतिकूल परिस्थिती या सगळ्या विपरीत घटकांशी सामना करत करत आशाताईंनी ते आव्हान स्वीकारले आणि ते स्वबळावर, आत्मविश्वासाने यशस्वीपणे पेलून दाखवले. १९५७-१९५८ हे वर्ष आशा भोसले यांचेच होते. सचिन देव बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. ‘कालाबाजार’, ‘लाजवंती’, ‘नौ दो ग्यारह’, ‘चलती का नाम गाडी’, ‘सुजाता’ हे आणि असे असंख्य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले. पुढची पाच दशके आशाताईंनी गाजवली. अनेक संगीतकारांबरोबर काम केले. अनेक कवींच्या काव्यरचनांना सुरांचे कोंदण दिले. एवढेच नाही, तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना, त्यातल्या अभिनेत्रींनादेखील अजरामर केले. ओ. पी. नय्यर आणि आशाताई एक अफलातून जोडी होती जमली. १९६० च्या सुमारास नय्यर यांचे संगीत असणारे ‘आँखो से जो उतरी है दिल में’ (फिर वही दिल लाया हूँ) हे गाणे; १९६५ चे ‘जाइये आप कहाँ’ (मेरे सनम); १९६८ मधील ‘वो हसीन दर्द दे दो’ (हम साया); ‘चैन से हमको कभी’ - अशी अनेक प्रसिद्ध गाणी त्यांनी गायली. राहुल देव बर्मन यांच्याबरोबर काम करताना ‘पिया तू अब तो आजा’ हे १९७१ चे ‘कारवाँ’ चित्रपटातील गीत, १९७१ चेच फिल्मफेअर पुरस्कार विजेते ‘दम मारो दम’; ‘जाने जा’ हे १९७२ चे ‘जवानी दिवानी’तले गाणे, ही गाणी आशा भोसलेंच्या आवाजाचा नवा बाज दाखवून गेली. १९८१ चा ‘उमराव जान’ हा चित्रपट आशाताईंमधली गझल गायिका रसिकांसमोर घेऊन आला. आशाताईंचा आवाज, खय्याम यांचे संगीत आणि ‘दिल चीज क्या है’, ‘इन आँखों की मस्ती’सारखी शब्दरचना हे सगळेच जमून आले. ‘दिल चीज क्या है’ या गीताला १९८१ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे ‘इजाजत’ चित्रपटातल्या ‘मेरा कुछ सामान’ या त्यांच्या गाण्यालाही १९८६ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आशा या सुरेल गायिकेचा गौरव राज्य शासनाच्या वतीने होत आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. हिंदीबरोबर आशा भोसलेंची मराठी गाण्यांची कारकीर्द बहरतच होती. सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा गायक-गायिकांबरोबरची गाणी मराठी रसिकमनात घर करून राहिली आहेत. बा. भ. बोरकर, आरती प्रभू, ग. दि. माडगुळकर, शांता शेळके, सुरेश भट, सुधीर मोघे यांच्या कवितांबरोबर सौमित्रसारख्या नव्या दमाच्या कवींच्या कविताही आशाताईंच्याच आवाजात रसिकांपुढे आल्या. सर्व कवींच्या शब्दांना आशाताईंनी सुरेल न्याय दिला. ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘जिवलगा राहिले रे दूर’, ‘ही वाट दूर जाते’, ‘फुलले रे क्षण माझे’, ‘झिनी झिनी वाजे’, ‘गेले द्यायचे राहूनी’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘आज कुणीतरी यावे’, अशी किती गाणी सांगावीत हाच प्रश्न पडतो. आशाबार्इंच्या कारकिर्दीचा आलेख मांडणे सोपे नाही, म्हणूनच त्या खºया अर्थाने महाराष्ट्र भूषण पुरस्काराला पात्र आहेत. त्यांना हा पुरस्कार दिल्याने त्या पुरस्काराची उंची वाढली आहे.


हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशा भोसले यांनी एस. डी. बर्मन यांच्यापासून ते ए. आर. रहमानपर्यंतच्या विविध कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले आहे. मराठीतही दत्ता डावजेकर-श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला आहे. मधुबाला-मीनाकुमारीपासून ते अलीकडच्या तब्बू-उर्मिला मातोंडकर-ऐश्वर्या रायपर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांनी मोहम्मद रफी, किशोर कुमार व सुधीर फडके यांच्याबरोबरचा काळ तर गाजवला आहेच, तसेच त्या आज ऋषिकेश रानडेसारख्या तरुण गायकाबरोबरही गात आहेत. आशाताई आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांशी गायिका म्हणून जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी १४ भाषांमध्ये १२००० हून अधिक गाणी गायली आहेत. अशा या महान गायिकेचा गौरव सुखद आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: