बुधवार, ३१ मार्च, २०२१

आरोप होतात, लोक विसरतात

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हॉटेल-बारमालकांकडून खंडणी उकळण्याबाबत सूचना केल्याच्या आरोपामुळे सध्या राजकीय धुळवड सुरू झाली आहे; पण कोणत्याही मंत्र्यावर अधिकाºयांनी आरोप करण्याची ही काही पहिली वेळ नाही. आरोप होत असतात, होत राहतात; पण जनता ते विसरून जातात.


लांब कशाला जवळपास दोन वर्ष तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते २०१८ ला बाहेर आल्यानंतर किती पवित्र, शुद्ध झाले? हजारो कोटींची माया जमवली, बेहिशेबी मालमत्ता जमवली म्हणून ईडीची चौकशी झाली, तुरुंगात बसावे लागले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते; पण जामिन काय मिळाला आणि ते आदरणीय नेते म्हणून आता कसे छान मिरवत आहेत. सध्याच्या सरकारमध्ये मान्यवर मंत्रीही आहेत. त्यामुळे आरोप होतात; पण लोक विसरतात हे ज्याला कळलं त्याला कसली चिंता करायची गरज नाही.

महाराष्ट्रात यापूर्वी अशा प्रकारे अधिकाºयांनी सत्ताधाºयांवर केलेल्या आरोपांमुळे तात्कालिक राजकीय धुरळा उडाला व चिखलफेक झाली, तरी नंतर सारे कसे शांत शांत होते, असाच राज्याच्या राजकारणाचा इतिहास असल्याने मातब्बर नेते निर्धास्त आहेत. बदनाम हुए तो क्या नाम तो हुआ अशा प्रकारे हे नेते बिनधास्त उजळमाथ्याने फिरू शकतात. आपल्याकडे लाज अब्रू ही फक्त सामान्य, गारगरीब, मध्यमवर्गीय, पापभिरू लोकांसाठी असते. या लोकांसाठी त्याचा दुरान्वयानेही संबंध येत नसतो. अशा प्रकारचा आरोप झाला, तर सामान्य माणूस मेल्याहून मेला होऊन गेला असता; पण राजकारणात हे लोक इतके मुरलेले असतात की, आपण आता या चिखलात उतरलो आहेच, तर चिखलफेक होणारच हे गृहीत धरून ते चालत असतात. त्यामुळे त्याचे कोणाला सोयरंसुतक नसतेच. त्यामुळे आता परमबीर सिंह यांच्या आरोपांचा परिपाक काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


सत्ताधारी पक्षातील नेते-मंत्री, राजकारण्यांवरील आरोप हे नवीन नसले, तरी प्रशासनातील अधिकाºयांनी सत्ताधाºयांवर थेट आरोप करण्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे; पण प्रशासनातील अधिकारी विरोधकांची ही भूमिका उचलून धरतात हेही काही कमी नाही. आलेले सरकार आणि असलेले नेते हे फार काळ टिकणारे नाहीत, आपण मात्र दोन-तीन दशके सेवेत असणार आहोत याची जाणिव अधिकाºयांना असते. वास्तविक त्यांना कोणाची भीती बाळगायचे कारण नसते. कारण बदली करणे यापलीकडे हे नेते काहीच करू शकत नाहीत; पण तरीही अधिकाºयांकडून होणारे आरोप हे कमी असतात. गेली काही वर्ष ही जबाबदारी, भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचे काम अण्णा हजारे, मेधा पाटकर, किरीट सोमय्या ही मंडळी करत राहिली; पण त्यांचेही सातत्य नसते. नवे प्रकरण मिळाले की, पहिले सोडून द्यायचे असाच त्यांचा उद्योग असतो. त्यामुळे आरोप झालेले लोक बाहेर सुटतात आणि पवित्र होतात, कारण आरोप होतात लोक विसरून जातात हे सूत्र त्यांनी कोळून प्यायलेले असते.

महाराष्ट्रात १९९०च्या दशकात असे सर्वात मोठे प्रकरण गाजले ते मुंबई महापालिकेतील अधिकारी गो. रा. खैरनार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांचे. खैरनार यांनी पवारांविरोधात ट्रकभर पुरावे असल्याचेही जाहीर केले होते. विरोधी पक्ष भाजप-शिवसेना युतीने शरद पवार यांच्याविरोधात रान उठवले. शरद पवार यांच्या प्रतिमेवर आणि निवडणूक निकालावरही परिणाम होऊन युती सत्तेत आली; मात्र सत्तांतरानंतर पुढे काहीही झाले नाही. खैरनार यांचा तो पुराव्यांचा बहुचर्चित ट्रक कुठे हरवला कोणालाच समजले नाही. गो. रा खैरनार काळा की गोरा हेही आता कोणाला आठवत नाही; पण त्या काळात खैरनार यांनी तत्कालीन वाहिन्यांवर येऊन त्यांचा टीआरपी वाढवण्याचे काम केले होते हे खरे, म्हणजे त्या काळात आपकी अदालत ही रजत शर्मांची मालिका लोकप्रिय होती. आवर्जुन प्रेक्षक ती मालिका पाहत होते. त्यातही खैरनार पोहोचले होते. तिथेही त्यांनी या ट्रकभर पुराव्यांच्या बाता केल्या होत्या; पण खैरनार हे नाव विस्मरणात गेले. शरद पवारांनी त्यांना बेदखल केले. ते पुरावे मुंबई महापालिकेच्या कोणत्या डम्पिंग ग्राऊंडवर त्यांनी टाकले हे खैरनारच जाणोत.


यानंतर २०११-१२ च्या कालावधीत जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी विजय पांढरे यांनी सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यांबद्दल जाहीरपणे भाष्य केले. त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तडकाफडकी स्वत:हून राजीनामा दिला. नंतर ते परत मंत्रिमंडळात सहभागी झाले. याप्रकरणात विरोधी पक्ष भाजपने बैलगाडीभर पुरावे सादर करू, अशी वल्गना केली; पण भाजप सत्तेत आल्यावर ती बैलगाडी व पुरावे गायब झाले. इतकेच नव्हे, तर अजित पवारांवर आरोप करणाºया भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्यरात्री त्यांच्याशी युती करत सकाळी सकाळी सत्तास्थापन केली. आज विजय पांढरे कुठे आहेत, याचाच शोध घ्यावा लागेल. सत्तेवर आल्यावर महाविकास आघाडीने या प्रकरणात अजित पवारांना क्लीनचीटही देऊन टाकली. सगळे कसे शुद्ध, पवित्र झाले आहे. आरोप होत राहतात, लोक विसरतात या समीकरणाने फक्त गप्प बसायचे आणि पहायचे हे राजकारणातील यशाचे गुपीत आहे. काही अंगाला लागून घ्यायचे नाही. अन्य एका छोट्या प्रकरणात पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी त्या वेळचे गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांना पारपत्र देण्यात अडचण असल्याबाबत भाष्य केले. त्यावरून बराच राजकीय गदारोळ झाला. नंतर ते प्रकरण मिटले. आता परमबीर सिंह यांनी त्यांच्यावरील बदलीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला आहे; पण थोड्या दिवसांनी आणखी नवे प्रकरण येईल आणि लोक विसरून जातील, मग कसे या राज्यात सुराज्य असल्याचा साक्षात्कार जनतेला होईल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: