शुक्रवार, ५ मार्च, २०२१

वाटा पळवाटा

मुंबई महानगर क्षेत्रातील काही स्टेशनवरील प्लॅटफार्मच्या तिकीटांमध्ये रेल्वेने भरमसाट म्हणजे पाचपट वाढ केली आहे. २४ फेब्रुवारी रोजी हा निर्णय घेण्यात आला असून, १५ जूनपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे. सीएसएमटी, दादर, एलटीटी या स्थानकांसह काही निवडक स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे या स्टेशनवर जाण्याआधी खिशाचा विचार करण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे. अर्थात रेल्वेने जरी हा पोरकट निर्णय घेतला असला, तरी प्रवासी बाप बिलंदर बेटा कलंदर अशा प्रवृत्तीचे आहेत. या स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये केल्याने काहीच फरक पडणार नाही; पण हा निर्णय घेणाºयांच्या कल्पना शक्तीचे कौतुक करावेसे वाटते. ५० रुपये प्लॅटफॉर्म तिकीट केल्यावर लोक प्लॅटफॉर्म तिकीट घेणारच नाहीत. सरळ तिकीट काढून मोकळे होतील. तिकीट काढल्यावर प्रवास केलाच पाहिजे असे थोडेच बंधनकारक आहे? त्यामुळे सर्वात प्रथम असा गझनीच्या मोहंमदासारखा निर्णय का घेतला याचा विचार केला पाहिजे.


मध्य रेल्वेने मुंबई महानगर क्षेत्रातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीटात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे कारण उन्हाळ्यात कोरोनाचा धोका असल्याने रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. २४ फेब्रुवारी रोजी हा निर्णय घेण्यात आला असून, १५ जूनपर्यंत लागू असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली; पण गर्दी रोखण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाचा काय संबंध? प्लॅटफॉर्म तिकीट साधारणपणे कोणी लांबच्या प्रवासाला निघाला आहे, त्याला सोबत सोडायला म्हणून कोणी आले असेल, तर गाडी सुटेपर्यंतच्या काळात प्लॅटफॉर्म तिकीट काढले जाते. एरवी लोकलच्या स्थानकात कोणी प्लॅटफॉर्म तिकीट काढण्याच्या भानगडीत पडत नाही. मग दादर, सीएसएमटी, पनवेल स्थानकात तिकीट दर वाढवून काय उपयोग? त्यापेक्षा तिकीटच देऊ नका. गेल्यावर्षी सारखी रेल्वे बंद ठेवा. तिकीट वाढवल्याने गर्दी कमी होईल, असा समज चुकीचा आहे. प्लॅटफॉर्म तिकीटला तिकीट हा पर्याय आहे. ही साधी गोष्ट विचारात कशी घेतली नाही? आणि उन्हाळ्यात जर कोरोना वाढेल, अशी भीती होती, तर १ फेब्रुवारीपासून लोकल ट्रेन सर्वांसाठी खुली केलीच कशाला? अजून जूनपर्यंत ती बंद ठेवायची होती. आजही दुपारी १२ ते ४ आणि रात्री ९ नंतर शेवटच्या गाडीपर्यंत तसेच पहिल्या गाडीपासून सकाळी ७ पर्यंत सर्वांना लोकल परवानगी आहे; पण ७ ते १२ आणि ४ ते ९ या वेळात प्रवास करणाºयांची चौकशी रेल्वेने केली आहे का? सकाळ दहाच्या सुमारास लहान मुलांना घेऊन, नटून थटून लग्नसमारंभाला, खरेदीला आणि विविध अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी लोक स्टेशनवर गर्दी करताना दिसतात. त्यांना पकडण्याचा कधी रेल्वेने प्रयत्न केला आहे का? जसे स्टेशनमधून बाहेर पडताना तिकीट तपासले जाते, तसे स्टेशनमधून प्रवेश करताना कोण लहान मुलांना घेऊन चालले आहे, कोण ज्येष्ठ नागरिक प्रवास करत आहेत याचा कधी विचार केला आहे का? बिनधास्त प्रवास करतात लोक. स्टेशनवर गर्दी होतच आहे. लोक विनामास्क फिरत आहेत. बिनधास्त तंबाखू खात आहेत, मास्क वर करून थुंकत आहेत. प्रत्येक क्षणाला हे चित्र दिसत आहे. त्यावर लक्ष केंद्रीत केले, तर प्रवासापेक्षा दंडात्मक वसुलीतून रेल्वेला उत्पन्न मिळेल; पण गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट ५० करण्याचा निर्णय म्हणजे मोरीला बोळा अन् दरवाजा उघडा असला प्रकार आहे.

आता मुंबई महानगर क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, भिवंडी रोड स्टेशन या स्थानकांचे प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले आहे. पूर्वी या स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपये होते. या रेल्वे स्टेशनवर नेहमी गर्दी असते. उन्हाळ्यात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने आणि कोविडचे संक्रमण अजूनही कमी झालेले नाही. त्यामुळे गर्दी होणाºया या स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट वाढवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे; पण लोकांना येऊच कशाला दिले जाते? गर्दीची, संसर्गाची भीती असेल तर स्टेशनच बंद ठेवण्याचा निर्णय घ्या.


पनवेलचा माणूस प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपयाचे काढण्यापेक्षा २० रुपये देऊन सीएसएमटीचे तिकीट काढेल. अगदी १० रुपये देऊन खारघर रिटर्न तिकीट काढेल. ठाण्याचा माणूस प्लॅटफॉर्म तिकीटाला ५० रुपये देण्याऐवजी १० रुपये देऊन भांडुप किंवा दिवा रिटर्न तिकीट काढेल. दादरचा प्रवासी कुर्ला तिकीट काढेल. त्यामुळे रेल्वेचा महसूल वाढणार नाही की, गर्दी कमी होणार नाही. जिथे वाटा आहेत लोक तिथे पळवाटा काढणारच. म्हणूनच सरकारने, रेल्वे प्रशासनाने वास्तववादी उपाययोजना केल्या तर बरे होईल. अनावश्यक प्रवास करणारे, रेल्वेमधून विक्री करण्यासाठी फिरणारे प्रवासी, भिकारी, गर्दुल्ले यांचा बंदोबस्त केला, तर बरेच काही साध्य होईल. रेल्वेस्थानक परिसरातील पानपट्ट्यांवर बंदी घातली, तंबाखू खाऊन प्रवास करणाºयांवर मोठा दंड लावला तर थुंकणाºयांचे, घाण करणाºयांचे प्रमाण कमी होईल. रेल्वे आणि रेल्वे पोलिसांचे कर्मचारी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर उभे करून प्रत्येकाची तपासणी केली तरीही अनावश्यक गर्दी करणाºयांवर आळा घालता येईल, त्यांना दंड करता येईल; पण आपण काही तरी करतोय हे दाखवण्यासाठी फ्लॅटफॉर्म तिकीटाचा दर ५० रुपये करणे हा काही उपाय नव्हे, त्यातून काहीही साध्य होणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: