राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. याला काही लोकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. अशा लोकांमुळे संपूर्ण राज्याला आणि सर्वसामान्य जनतेला संकटात ढकलण्याचा प्रकार होण्याची शक्यता आहे, तरी हा प्रकार होता कामा नये. बेजबाबदारपणे वागणाºयांवर आणि त्यांच्यामुळे इतरांना संकटाच्या खाईत लोटणाºयांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळत असून, मृत्यूसंख्येतही भर पडू लागली आहे. गेल्या मार्चमध्ये याच कारणास्तव टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. त्याचे फायदेही झाले. कोरोनाबाधितांचा आकडा कमी कमी होत गेला. मृत्यूसंख्याही शून्यावर आली; पण जानेवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाने उचल खाल्ली असून, देशातील अनेक राज्यांत कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. राज्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होऊ लागल्यानेच अनेक शहरांमध्ये पुन्हा नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यातील स्थिती इतकी गंभीर आहे की, देशातील एकूण बाधितांपैकी ६१ टक्के बाधित एकट्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील चिंताजनक स्थितीची नोंद केंद्र सरकारनेही घेतली आहे. महाराष्ट्र, पंजाब, केरळ, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या सहा राज्यांमध्ये देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ८५ टक्के बाधित आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या आकडेवारीवरून त्या-त्या ठिकाणी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नियमांचे पालन न करणाºयांमुळे जनता संकटात जात आहे. काही नेते महाराष्ट्राचे हितचिंतक असल्याचे दाखवतात आणि स्वत:च मास्क वापरायला नकार देतात. यामागचे राज समजून घेतले पाहिजे. मास्क वापरण्यात या नेत्यांना कमीपणा का वाटतो? साहजिकच त्यांचे अनुयायी हे मास्क वापरत नाहीत. हे नियम मोडण्याचे प्रकार थांबले पाहिजेत.
खरे पाहिले तर नव्याने लागू झालेली टाळेबंदी आणि काही ठिकाणच्या संचारबंदीसाठी सामान्य नागरिकच जबाबदार ठरले आहेत. कोरोना मृत्यूची संख्या कमी होताच नागरिकांनी आजवर घालून घेतलेल्या बंधनातून स्वत:ची मुक्तता करवून घेतली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे सोडून दिले. निर्जंतुकीकरणाबाबतचे शासनाचे आदेश धुळीस मिळविले. मास्क न घालता आम्ही कसे छान फिरतो हे दाखवण्यात अनेकांना मोठेपणा वाटू लागला. अनेक ठिकाणी स्वच्छतेच्या नावानेही शंख असल्यासारखी स्थिती होती. त्यामुळेच आता राज्यात कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. अनेक शहरांमध्ये, तर टाळेबंदीदेखील घोषित करण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील सूचक इशारा दिलेला आहे. शनिवारी राज्यात ८८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, १५ हजार ६०२ नवीन कोरोनाबाधित वाढले. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३ टक्क्यांएवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ८११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९२.४९ टक्के आहे. यामुळेचे निर्बंध लावण्याची वेळ राज्य सरकारवर आली; पण ही वेळ येऊ देण्यासाठी आम आदमीच जबाबदार आहे. थोडासा कोरोना नियंत्रणात दिसताच लोकांनी मोकळीक घेतली. नातेवाईकांकडे उठबस वाढविली. भावा-बहिणींच्या, कुटुंबीयांच्या गाठीभेटी वाढून गेल्या. मित्र-मैत्रिणींच्या सहलींना आरंभ झाला. मंगल कार्यालये ओसंडून वाहू लागली. स्वच्छतेबाबतच्या नियमांना तिलांजली दिली गेली. बाजारांमध्ये गर्दी वाढून गेली. सात दिवसांच्या भाजी-पाल्याचा साठा करून द्यायचे सोडून लोक पाय मोकळे होतात, म्हणून दिवसातून दोनदा भाजीपाला आणू लागले. सगळं ठिक आहे, असे समजून गर्दी करू लागले. कारण नसताना बाहेर पडू लागले. त्यातून पुन्हा कोरोनाने शिरकाव केला. एकंदरीत लोकांचा मनावरील ताबा सुटल्याने कोरोना वाढत गेला. भारतीय औषध निर्मिती कंपन्यांनी याच्या दोन लसी तयार केल्या आणि त्यांना आंतरराष्ट्रीय संघटनांची आणि भारतीय वैद्यक परिषदेचीही मान्यता मिळविली. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी आल्यामुळे आजपर्यंत रुग्णांच्या मनात या रोगाबद्दल जी धास्ती होती, ती कमी झाली. भारताने स्वत: तर लसी निर्माण केल्याच शिवाय त्या अनेक देशांना मागणीनुसार पाठवल्यादेखील. त्यामुळे भारताची जगातील पत वाढली. ब्राझीलसारख्या देशांनी तर भारताबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना महावीर हनुमान भारतातून ब्राझीलमध्ये कोरोनाची संजीवनी घेऊन समुद्रावरून उड्डाण करून येत असल्याचे चित्र माध्यमांमध्ये प्रसिद्ध केले. अनेक मुस्लिम देशांनासुद्धा भारताने लसी पाठवल्या. त्यामुळे जी मुस्लिम राष्ट्रे आजवर भारताकडे शत्रूराष्ट्र म्हणून बघायची, त्यांचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. भारताचे दातृत्व सर्वत्र चर्चिले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, निरनिराळे चित्रपट कलावंत, अभिनेते, उद्योगपती यांनी लसी टोचून घेतल्याने या लसीबाबत उगाच बदनामीकारक बातम्या पसरविण्याच्या कारस्थानालाही मूठमाती मिळाली. सरकारी पातळीवर इतके चांगले प्रयत्न होत असताना, नागरिकांचा बेजबाबदारपणा पुन्हा संकटाच्या खाईत लोटताना दिसतो आहे. याला कुठे तरी आळा बसला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी मी जबाबदार हे अभियान सुरू केले. प्रत्येकाने ही जबाबदारी घेतली पाहिजे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे. नियमांचे पालन केले पाहिजे; पण तसे न होता लोक बेजबाबदारपणे वागत आहेत. म्हणून सांगावेसे वाटते की, कृपया पुन्हा राज्याला संकटाच्या खाईत ढकलू नका. आता जर पुन्हा मोठा लॉकडाऊन लागला तर अनेकजण उध्वस्त होतील. हे पाप आपल्या माथी लावून घेऊ नका. नियमांचे पालन करण्यात कमीपणा मानू नका. विशेषत: जे नेते स्वत:ला खूप श्रेष्ठ समजतात, जगाला अक्कल शिकवतात त्यांनी आता मास्क घालून आणि नियमांचे पालन करून आपल्या कार्यकर्त्यांना संदेश दिला पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा