बुधवार, २४ मार्च, २०२१

पोरकट विधान

आपण काय बोलतो, कशासाठी बोलतो याचे भान काँग्रेस नेते राहुल गांधींना कधीच नसते. समोर माईक आहे, स्टेज आहे म्हणून काहीही बोलायचं, हा त्यांचा फंडा दिसत आहे; पण त्यातून ते स्वत:चे हासे करून घेत आहेत. देशातल्या जनतेबरोबरच काँग्रेसचे नेतेही ओशाळून त्यांना हसत आहेत, असे चित्र आहे. शुक्रवारी त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान एक विधान केले. काय तर म्हणे, नागपूरमध्ये जन्म झालेली एक संघटना अख्ख्या देशावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतेय. मग इटलीत जन्माला आलेली एक बाई जर देशाला नियंत्रित करण्याचे प्रयत्न करत असेल, तर भारतात जन्माला आलेली संघटनेने तसे प्रयत्न केले, तर त्यात चूक काय आहे? संघ काय नियंत्रित करतो आहे याचा विचार करण्यापेक्षा राहुल गांधींनी आपला पक्ष कसा नियंत्रित करता येईल, याचा विचार केला पाहिजे.


राहुल गांधींची ही पोरकट सवय आता इतक्यावेळा अपयश आल्यानंतरही जात नसेल, तर त्याला हसावे की रडावे हेच जनतेला समजेनासे झाले आहे. निवडणूक प्रचार म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करायची एवढेच त्यांना कळते. तरी भिवंडीत ते बरळले होते त्याची केस अजून चालू आहे. अनेकदा सुनावणीला यावे लागले आहे, तरी तो पोरकटपणा जात नाही याचे आश्चर्य वाटते. संघ, भाजप काय करतो हे सांगायला तुमची सभा नाही, तर काँग्रेस काय करणार आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला प्रचाराला पाठवले आहे, हे तरी या महाशयांना समजालला हवे होते.

राहुल गांधी सध्या आसामच्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा घेत असून, दिब्रुगढमध्ये झालेल्या एका प्रचारसभेत त्यांनी भाजपप्रणीत केंद्र सरकारसोबतच आरएसएसवर देखील निशाणा साधला आहे. देशात लोकशाहीचं पतन होत आहे. तरुण बेरोजगार आहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत. सीएएसुद्धा आहे. आसामची जनता दिल्लीत आल्यानंतर त्यांनी त्यांची संस्कृती, भाषा बदलावी, अशी आपण अपेक्षा ठेऊ शकत नाही, असं म्हणत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला. आपण निवडणुकीच्या प्रचारासाठी आलो आहोत. आपल्याला तिथे सत्ता मिळणार नाही हे जरी खरे असले, तरी अगोदरच हार कशाला मानायची? जरा लढत देण्याचा प्रयत्न केला पाहिजे एवढेही धाडस त्यांच्यात का नाही? आसाममध्ये केंद्र काय करत नाही, बेरोजगारी आहे का नाही हे विचारले नाही, तुम्ही हा प्रश्न कसा सोडवाल ते सांगा, जनता लगेच सत्ता हातात देईल; पण फक्त नौटंकी करायची सवय झालेल्या या महाशयांना वर्षानुवर्ष दातात अडकलेले खरकटे पुन्हा पुन्हा काढायची सवय लागली आहे. नोटबंदी, जीएसटी, संघ या व्यतिरिक्त काहीच बोलायला मुद्दे नाहीत का? का सगळे पीए लोक जे त्यांना भाषणाचे मुद्दे देतात ते गायब झाले आहेत? अशाने काँग्रेस मोठी होणार नाही.


संघ काय नियंत्रित करतो आहे हे विचारण्यापेक्षा आपल्या पक्षातीलच २३ नेते आपल्या फालतुगिरीच्या विरोधात एकवटले होते. आपल्या माताजींना पत्र लिहिले होते. त्यांच्यावर नाराजी व्यक्त करून पक्ष अस्ताव्यस्त केला आहे तो सावरण्याची गरज आहे. आता या नेत्यांना नियंत्रित करा आणि मग सत्तेची स्वप्न पाहा. दुसºयावर टीका करून काही साध्य होत नसते हे राहुल गांधींनी लक्षात घेण्याची गरज आहे. २००१ नंतर नरेंद्र मोदींना मोठे केले ते काँग्रेसने. त्यांच्यावर सतत टीका करून सोनिया गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी मोदी नाव सतत चर्चेत ठेवले. भाजपला म्हणूनच ती फार मोठी ढाल मिळाली. त्यामुळे आता टीका करण्यापेक्षा राहुल गांधींनी आपण काय आहोत याचे मार्केटिंग करावे, म्हणजे आहे ती स्थिती तरी कायम राहील. नाही तर आणखी काँग्रेसला गाळात जावे लागेल.


राहुल गांधी प्रचारासाठी मिळालेले व्यासपीठ म्हणजे करमणूक करण्याचे साधन आहे, असे समजत असतील, तर तो त्यांचा पोरकटपणा आहे. सामान्य कार्यकर्त्यांबरोबर जेवायला बसलो, चहावालीबरोबर बसलो असले फोटोसेशन करून काही साध्य होणार नाही. त्या चहाच्या मळ्यात फिरून प्रचार केला, पानं खुडली, त्यांच्याबरोबर रोटी खाल्ली, तरी तो दिल्लीत बसलेला चहावाला सगळा चहा कोळून प्यायलेला आहे याचे भान राहुल गांधींनी ठेवले पाहिजे. हे त्यांचे प्रकार अनेकवेळा प्रत्येक निवडणुकीत झालेले आहेत. विदर्भातल्या कलावती नावाच्या एका गरीब महिलेच्या झोपडीत राहुल गांधींनी भाकरी खाल्याचेही चित्र महाराष्ट्राने पाहिले होते. नंतर त्यातील खोटेपणाही लक्षात आला. ती भाकरी त्या कलावतीने केलेली नव्हती, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तो शो अरेंज केला होता, त्या कलावतीची कशी फसवणूक झाली हे सगळे पितळ उघडे पडले होते. त्यामुळे काँग्रेसची अवस्था नाव सोनुबाई हाती कथळाचा वाळा अशीच झालेली आहे.

आजकाल अशा नौटंकीला कोणी भीक घालत नाही. मागे मुंबई दौºयावर आल्यावरही त्यांनी लोकलमधून प्रवास केला होता. त्यासाठी एटीएममधून पैसे काढले. रेल्वे तिकीटाच्या रांगेत उभे राहून तिकीट काढले. मी विनातिकीट प्रवास करत नाही, असे भासवण्याचा प्रयत्न केला; पण तेव्हा राहुल गांधी खासदार होते. खासदारांना रेल्वे फुकट असते. मग तिकीट काढण्याचे नाटक का केले? रांगेत तिकीट काढण्यासाठी ती तयार केलेली रांगही खोटी होती, सगळे काँग्रेस कार्यकर्ते रांगेत उभे केले होते. ते डब्यात बसलेले प्रवासीही मॅनेज केलेले होते. असे करून देश नियंत्रित होत नाही. त्यामुळे संघ देश नियंत्रित करतो आहे याचा विचार सोडा आणि आपल्या पक्षाला अगोदर सांभाळा, असे त्यांना सांगावेसे वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: