बुधवार, ३ मार्च, २०२१

शांती संमेलनातून बोध


जम्मूमध्ये रविवारी काँग्रेसचे शांती संमेलन झाले. अर्थात या शांती संमेलनात ज्या अनुभवी नेत्यांनी काँग्रेसशी निष्ठा राखली; पण त्यांना आता शांत बसा असा सल्ला सोनिया गांधींनी दिला त्यांचे हे संमेलन होते, पण यामध्ये सध्याच्या काँग्रेसची वाताहत राहुल गांधींमुळे आणि गांधी कुटुंबाच्या धोरणामुळे होत आहे, हेच स्पष्ट केले. त्यामुळे यातून स्पष्ट विचार मांडल्यावर तरी काँग्रेस काही बोध घेणार का हा प्रश्न आहे.

या संमेलनात गुलाम नबी आझाद यांच्या अनुभवाचा पक्षाने लाभ घेतला नसल्याचीही तक्रार अनेक नेत्यांनी केली. यात तेच लोक होते ज्यांनी मागच्या वर्षी सोनिया गांधींना पत्र पाठवले होते. हे नेते अस्वस्थ का आहेत, याकडे काँग्रेसने हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले. त्यांना अडगळीत टाकण्याचा प्रयत्न केला गेला. परिणामी काँग्रेस आणखी गाळात जाताना दिसत आहे.


काँग्रेस गेल्या दशकात अधिक दुबळी झाली असून, नव्या पिढीतील नेत्यांशी पक्षाची नाळ जोडली जाईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत ‘जी-२३’मधील काही नेत्यांनी यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. हा स्पष्टपणे काँग्रेसला इशारा होता. सरळसरळ ही बंडखोरी आहे हे सोनिया गांधी, राहुल गांधींनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना संसदेतून निवृत्त करण्याचा निर्णय पक्षाने घेतला, त्यामुळे आपल्याला वेदना झाल्या. काँग्रेस पक्षाने आझाद यांच्या अनुभवाचा अधिक चांगला फायदा करून घ्यावयास हवा होता, अशी भावना यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली. गुलाम नबी आझाद यांचे काँग्रेससाठी योगदान मोठे आहे; पण त्यांना अक्षरश: अडगळीत टाकावे तसे घाणेरडे आरोप करून राहुल गांधींनी दूर केले. त्यामुळे जे ख‍ºया अर्थाने निष्ठावंत काँग्रेस नेते म्हणून ओळखले जातात ते कपिल सिब्बल, आनंद शर्मा यांच्यासारखे नेते अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे; पण काँग्रेसने त्याची दखलही घेतली नाही. गेल्या वर्षी काँग्रेसच्या २३ बंडखोर नेत्यांनी (जी-२३ नेते) काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना खुले पत्र पाठवून पक्षाच्या कारभारावर जोरदार टीका केली होती; पण ही तक्रार पक्षहितासाठी या नेत्यांची कळकळ आहे हे सोनिया गांधींनी ओळखले नाही. त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आणि या नेत्यांवरच आगपाखड केली. त्यानंतर झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत ही दुखावलेली मनं शांत होतील, अशी अपेक्षा असताना तिथे वादावादी झाली आणि या नेत्यांना अपमानित केले गेले. त्यामुळे ही अस्वस्थता कुठेतरी जम्मूतल्या शांती संमेलनातून बाहेर पडली. तळागाळातील कार्यकर्त्यांशी पुन्हा नाळ जोडण्यासाठी ‘शांती सम्मेलन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची स्थिती काय आहे याची आझाद यांना चांगलीच जाण आहे. त्यांना संसदेतून मुक्त करण्यात येत असल्याची आम्हाला जाणीव झाली, तेव्हा आम्हाला वेदना झाल्या. त्यांनी संसदेतून जाऊ नये असे आम्हाला वाटत होते, काँग्रेस त्यांच्या अनुभवाचा फायदा का करून घेत नाही ते कळत नाही, असे सिब्बल म्हणाले. हा पक्षाला चांगलाच आहेर होता; पण नुसती मते व्यक्त होऊन काही उपयोग नाही, कारण या मतांची कदर काँग्रेस नेतृत्वाकडून कदापी घेतली जाणार नाही. त्यामुळे काँग्रेसला वाचवण्यासाठी या नेत्यांचे प्रयत्न म्हणजे निष्फळ मैथुनाचाच प्रकार आहे.


कपिल सिब्बल यांच्या मतांशी पक्षाचे प्रवक्ते आनंद शर्मा सहमत झाले. यातूनही काँग्रेस काही बोध घेणार आहे की नाही, हे पहावे लागेल. कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांच्यासह मनीष तिवारी, आनंद शर्मा, भूपिंदर हुड्डा आणि राज बब्बर हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. जम्मू-काश्मीरचा एकही प्रतिनिधी राज्यसभेत नसल्याचे १९५०पासून प्रथमच घडले आहे, त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आनंद शर्मा म्हणाले. काँग्रेस पक्ष दुर्बल झाल्याचे मत सिब्बल यांनी व्यक्त केले, त्याच्याशी शर्मा यांनी सहमती दर्शविली.

काँग्रेस पक्षाला सध्या भेडसावणाºया समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपण आणि आपले सहकारी जम्मूत एकत्र आले आहेत. काँग्रेस पक्ष दुर्बल होत चालला आहे हे सत्य आम्हाला दिसत आहे आणि म्हणूनच आम्ही येथे एकत्र आलो आहोत, यापूर्वीही आम्ही एकत्र आलो होतो आणि आम्हाला एकत्रितपणे पक्ष मजबूत करावयाचा आहे. काँग्रेसची नेमकी कमजोरी काय आहे? तर इतिहासावर ती चालत आहे.


आजच्या तरुण पिढीला आकर्षित करायचे असेल, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार, तुमच्याकडे काय कार्यक्रम आहे हे जाहीर करायला लागेल. माझी आजी, माजे वडील, माझे आजोबा या इतिहासावर आता काँग्रेस तग धरू शकणार नाही. मोदींच्या मागे तरुण का धावत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी हे काही तरुण नाहीत, पण ते तरुणांचे आयकॉन आहेत. याचे कारण त्यांच्याकडे नवे विचार आहेत, तरुणांना आकर्षित करतील असे कार्यक्रम आहेत; पण राहुल गांधी त्या मानाने लहान असूनही त्यांना कसलीही भविष्याची दृष्टी नाही. मोदींवर टीका हा एकमेव कार्यक्रम त्यांच्या हातात आहे. आज तरुणांना तो कसा वाईट आहे हे नको आहे, तर तू कसा शहाणा, चांगला आहेस हे सांगणारे कोणीतरी हवे आहे. काँग्रेसकडे त्याचाच अभाव आहे. त्यामुळे या शांती संमेलनातून काँग्रेसने काही बोध घेतला, तर ठिक नाही तर मे महिन्यात या पाच राज्यांतील निवडणुकांचा निकाल येईल, तेव्हा पुरता बेंडबाजा वाजलेला असेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: