बुधवार, २४ मार्च, २०२१

प्रबळ विरोधक

 



पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना केंद्रीय तपास यंत्रणेने शनिवारी रात्री उशिरा अटक केली. त्यापूर्वी जवळपास १२ तास त्यांची चौकशी केली. अर्थात ही अटक अटळच होती. हे वाझेंनाही माहीत होते. त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता. ज्याप्रकारे पुरावे दिसत होते. मनसुख हिरेनच्या पत्नीने नाव घेतले होते, विधीमंडळात अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी जे पुरावे सादर केले होते आणि अटकेची मागणी केली होती, त्यावरून ही अटक होणार हे निश्चित होतेच; पण कारण नसताना यात सरकार बदनाम झाले हे वाईट झाले. आज विरोधी पक्षांच्या दबावाने, प्रयत्नाने ही अटक करावी लागली, अशी हवा झाली आहे. ती सरकारने तातडीने दखल घेतली अशी होणे आवश्यक होते. त्यामुळे कारण नसताना आज सरकार बदनाम झाले आहे. सचिन वाझेंना पाठिशी घालण्याचा आटापिटा केला गेला आणि त्यात शिवसेना गोवली गेली हे वाईट झाले. यात विरोधक प्रबळ असल्याचे दिसून आले.

सचिन वाझेंचे नाव विरोधी पक्षांनी घेताच शिवसेनेच्या मंत्र्यांनी सभागृहात अन्वय नाईक प्रकरण उकरून काढले. हे नळावरच्या भांडणासारखे झाले. भाजपची चूक असेलही. अन्वय नाईक प्रकरण त्यांनी दाबण्याचा प्रकार केलाही असेल. त्याचा तपास होईलही; पण तुम्ही ते प्रकरण दाबले म्हणून आम्ही हे प्रकरण दाबणार, अशी जी कबुली दिली गेली, त्यातून शिवसेनेच्या मंत्र्यांचा पवित्रा चुकीचा दिसला. याला कोणत्याही सहकारी पक्षाने समर्थन दिले नाही. त्यामुळे शिवसेना इथे एकटी पडली. आज गरज होती ती शिवसेनेने आमचे पोलीस कसे आक्रमक आहेत, तपास जलदगतीने करतात हे दाखवण्यासाठी त्यासाठी तपासयंत्रणा कार्यरत करण्याऐवजी वाझेंना पाठिशी घालण्यात जो वेळ घालवला ती चूक होती.


उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीन स्फोटकाच्या कांड्या आढळल्या होत्या. या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. हे भयानक प्रकरण आहे. या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने फेटाळलेली अंतरिम अटकपूर्व जामिनाची याचिका फेटाळून लावल्यानंतर वाझे यांच्यावर एनआयएने कारवाई केली आहे. शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सकाळपासून वाझे यांच्याकडे चौकशी केली. अंबानी यांच्या घराजवळ कार उभी करण्यात सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एनआयएने केला असून, याच आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली आहे. व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथक अटक करू शकेल, अशी शक्यता असल्याने वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. या अर्जावर निकाल होईपर्यंत अटक करू नये, अशी मागणी त्यात होती; मात्र हे प्रकरण गंभीर असून वाझे यांना अटक करून कोठडीतील चौकशी आवश्यक आहे, असा युक्तिवाद करत एटीएसने या अर्जास विरोध केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तपास यंत्रणेकडे वाझे यांच्याविरोधात प्राथमिक पुरावे असल्याने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज देता येणार नाही, असं सांगत याचिका फेटाळून लावली. त्यानंतर वाझेंचा एनआयएने जबाब नोंदवला होता. याठिकाणी या प्रकरणात कारण नसताना राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष, वाद दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात नको ते राजकारण केले गेले. एटीएस विरुद्ध एनआयए असा वाद निर्माण केला गेला. या दोन्ही यंत्रणांच्या तपासात राजकीय हस्तक्षेप असता कामा नये; पण तो केला गेला. यात राज्य सरकारचा कमीपणा झाला ही वाईट बाब म्हणावी लागेल.

जिलेटीनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी २५ फेब्रुवारी रोजी पोलिसांना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळली होती. ही स्कॉर्पिओ गाडी ज्यांच्या ताब्यात होती ते मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील रेती बंदर इथे आढळला होता. त्यानंतर हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी दिलेल्या जबाबात सचिन वाझे यांच्यावर हत्येचा आरोप केला होता. त्यानंतर सचिन वाझे यांच्या भोवतीचे संशयाचे वर्तुळ आणखी गडद झाले होते. आता त्यांना अटक झाल्याने या प्रकरणाला आणखी गंभीर वळण लागले आहे. महाराष्ट्र पोलीस दलात सचिन वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हणजेच असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर पदावर कार्यरत होते. मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट'चे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. मुंबईत घडणाºया गुन्हेगारी कारवायांची गोपनीय माहिती मिळवून, त्या रोखण्याचं काम क्राइम ब्रांचच्या या युनिटकडे आहे. जून २०२० मध्ये मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सचिन वाझेंचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. निलंबन मागे घेतल्याने तब्बल १६ वर्षांनी वाझे यांचा पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत येण्याचा मार्ग खुला झाला. पोलीस दलात परतल्यानंतर वाझे यांची आयुक्तांनी प्रतिष्ठित मानल्या जाणाºया मुंबई क्राइम ब्रांचमध्ये नियुक्ती केली. अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामींच्या अटकेमागे वाझेंची महत्त्वपूर्ण भूमिका होती. अर्णब गोस्वामींच्या कथित टीआरपी घोटाळ्याचा तपास सचिन वाझे करत होते. या प्रकरणात बार्कचे माजी प्रमुख पार्थो दासगुप्ता यांना अटक करण्यात आली होती. अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्या ई-मेल प्रकरणाची चौकशी वाझेंचं युनिट करत होतं. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर सरकारने तपास एटीएसला दिला. एटीएसला दिलेल्या जबाबात विमला यांनी सचिन वाझेंवर खळबळजनक आरोप केले. सचिव वाझे माझ्या पतीला ओळखत होते. नोव्हेंबर महिन्यात माझ्या पतीने गाडी वाझे यांना वापरण्यासाठी दिली होती. वाझेंनी फेब्रुवारी महिन्यात गाडी परत दिली, असा आरोप विमला यांनी केला. विमला पुढे म्हणतात, २६ फेब्रुवारीला सचिन वाझेंनी माझ्या पतीला चौकशीसाठी नेलं. सायंकाळी ते त्यांच्यासोबतच घरी आले. पुढे दोन दिवस माझे पती सचिन वाझेंसोबत जात होते आणि येत होते. वाझेंनी माझ्या पतीला या प्रकरणात अटक हो. तुला २-३ दिवसांत जामिनावर बाहेर काढतो, असे माझ्या पतीने मला सांगितल्याचा जबाब एटीएसला दिलाय. या जबाबात विमला पुढे आरोप करतात, माझे पती मनसुख यांचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझेंनी केल्याचा मला संशय आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज होती. किमान चौकशी होणे आवश्यक होते; पण या प्रकरणाला वेगळे वळण देऊन हे प्रकरण विरोधकांवर उलटवण्याचा जो प्रयत्न झाला तो चुकीचा होता. तो सरकारच्या अंगलट आला. आता इतके झाल्यानंतर सरकारने आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. ही गोष्ट सरकारसाठी चिंतेची आहे. विशेषत: सरकारमधील घटक पक्ष काँग्रेस यातून हात झटकून मोकळा होईल आणि शिवसेनेला संशयाच्या भोवºयात टाकेल, अशी परिस्थिती होता कामा नये. पण आजतरी विरोधकांचे वर्चस्व दिसून आले आहे हे नक्की.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: