गुरुवार, २९ जुलै, २०२१

योद्धा मुख्यमंत्री


२६ नोव्हेंबर, २०१९ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि ते राज्याचे महाविकास आघाडीचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून गेल्या दीड वर्षात नावारूपास आले. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर एकापाठोपाठ एक संकटांची मालिका त्यांच्या वाट्याला आली; पण अत्यंत खंबीरपणे लढा देत, अत्यंत संयमी खेळी खेळत त्यांनी आपली कारकीर्द पुढे चालू ठेवली आहे. संकटांशी यशस्वीपणे लढणारा योद्धा मुख्यमंत्री, अशी त्यांची ख्याती झाली आहे. विशेष म्हणजे ही युद्धे ते नुसती लढताना नाही, तर जिंकताना दिसत आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात याच त्यानिमित्ताने शुभेच्छा!


नोव्हेंबर २०१९मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यावर राज्य सरकार स्थापनेसाठी जवळपास १ महिन्याचा कालावधी लागला. या कालावधीत अनेक घडामोडी, भेटीगाठी घडत होत्या; पण कसलीही घाई न करता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी यशस्वी बोलणी करत सरकार स्थापनेचा तिढा सोडवत महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात आणले. अनेक जणांनी सशाची झेप घेत सरकार स्थापनेचा प्रयत्न केला; पण कासवाच्या गतीने जात ही शर्यत जिंकायची आहे, या इराद्याने त्यांनी सरकार स्थापन केले आणि यशस्वी दीड वर्ष कारकीर्द आज अखेर केली आहे.

मुख्यमंत्री पदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि एका पाठोपाठ एक संकटांची मालिकाच तयार झाली; पण न डगमगता त्यांनी या सगळ्या संकटांना तोंड दिले आहे, हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळेच विविध पाहणींमध्ये, सर्वेमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत ते कायम पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत.


एकीकडे राज्य सरकार स्थापनेची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे संपूर्ण जगावर एक संकट त्याच सुमारास येऊ घातले होते. ते म्हणजे कोव्हिड-१९ या कोरोनाच्या लाटेचे संकट. नोव्हेंबर २०१९ पासूनच चीनमधून या रोगाला सुरुवात झाली. भारतात तो पोहोचेपर्यंत मार्च २०२० उजाडले; पण तिथपासून संपूर्ण देशच एका फार मोठ्या संकटात सापडला. मुंबई आणि महाराष्ट्र हा तर देशाचा आत्मा. देशाची आर्थिक राजधानी मुंबई. या महाराष्ट्रालाच या संकटाने वेढले. संपूर्ण देशभरातून पोटापाण्यासाठी, रोजगारासाठी लोक महाराष्ट्रात येतात. मुंबईत येतात. अशावेळी सर्वांची जबाबदारी पेलणे हे सोपे आव्हान नव्हते; पण केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क ठेवून, प्रसंगी आपली मते स्पष्ट मांडून ही परिस्थिती कशी हाताळायची याचे उद्धव ठाकरे यांनी अचूक काम केले. या रोगावर इतका अभ्यास केला की, महाराष्ट्रातल्या जनतेला वाचवण्यासाठी नेमके काय केले पाहिजे हे त्यांनी बरोबर जाणले. त्यादृष्टीने कोणाच्या आग्रहाला बळी न पडता, प्रसंगी कटूता स्वीकारून निर्बंध लादण्याचा त्यांनी निर्णय घेतला. माणसं जगली, तर पुढचं सगळं आहे. आधी प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा, रोजगार आणि बाकीचे पुढे आहेच. कोणाची रोटी थांबू न देता महाराष्ट्र चालवण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यशस्वीपणे केले. हे करताना त्यांच्या मनात फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच विचार होता. तो म्हणजे, रडायचं नाही, आता लढायचं. त्याप्रमाणे त्यांनी एक योद्धा म्हणून या पदाकडं पहात आपलं काम चोखपणे चालू ठेवले आहे.

एकीकडून कोरोनाचा उद्रेक होत असतानाच दुसरीकडून गेल्या वर्षी जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळाने कोकणाला झोडपले. ते संपते ना संपते तोच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. ती कुठे ओसरायला सुरुवात होते तोच तोक्ते या चक्रीवादळाला तोंड देण्याची वेळ महाराष्ट्रावर आली. ते संपते ना संपते तोच पुन्हा मागच्या आठवड्यापासून राज्यात होत असलेली अतिवृष्टी, पूर, शहरं पाण्याखाली जाणे, दरडी कोसळणे या संकटांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला. एकूणच मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांना एक योद्धा म्हणूनच मैदानात उतरावे लागत आहे; पण आपल्या संयमी कामगिरीने ते प्रत्येक युद्ध जिंकताना दिसत आहेत. मित्र पक्षांना विश्वासात घेऊन, बरोबर घेऊन राज्याचा हा गाडा यशस्वीपणे हाकत आहेत.


अनेक आघाड्यांवर लढणे म्हणजे काय असते ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शिकायला मिळते. एकीकडे विरोधक, प्रसारमाध्यमांकडून होणारी टीका असेल, तर दुसरीकडे पक्षाचीही जबाबदारी असेल. राज्याचा शकट तर चालवायचा आहेच. तो चालवताना विविध संकटांना तोंड द्यायचे आहे. अशा परिस्थितीत नेमके काय करायचे याचे तारतम्याने पाऊल उचलण्याचे काम अतिशय शांत संयमीपणाने त्यांनी केले आहे हे विशेष आहे. तोल जाऊ न देता, धीर न सोडता खंबीरपणे कसे वागायचे याचे जीवंत उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे. प्रसंगी कठोर निर्णय घेऊन कटूता आली, तरी ती स्वीकारताना न डगमगणारा नेता म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पहावे लागेल. मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल. आज सामान्यांसाठी ती बंद आहे. नोकरदारांसाठी ती बंद आहे. शिक्षक, वकील या सर्वांसाठी ती बंद आहे; पण माझ्या मराठी माणसाला जपले पाहिजे या प्रेमापोटी त्यांनी लोकलवर या सर्वांना निर्बंध लावले आहेत. ते भय्ये परप्रांतिय करू देत बिनधास्त प्रवास, घेऊ देत लोकलचा लाभ बाहेरचे; पण मी माझ्या मराठी माणसाला संकटात जाऊ देणार नाही हा जो त्यांनी बाणा स्वीकारला आहे तो अत्यंत कौतुकास्पद असाच आहे.

संपूर्ण राज्याचे शंभर टक्के लसीकरण करणे आणि हे युद्ध जिंकणे या एकाच ध्येयाने मुख्यमंत्री कार्यरत आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त लसींचा साठा महाराष्ट्राच्या पदरात कसा पडेल, यासाठी सतत ते जातीने लक्ष देत आहेत. सरकारी, महापालिका रुग्णालयांबरोबरच खाजगी रुग्णालयांतूनही लसीकरण कसे करता येईल, प्रसंगी घरोघर कसे करता येईल, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हा या कोरोना युद्धाचा प्रकार आहे. अशा या योद्धा मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा!


प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: